कथा
अच्युतन त्यांना म्हणायचेसुध्दा, “तुला कितीही महागातला परफ्यूम आणून दिला तरी तो नको असतो. आता कॉफी पावडर कपड्यांवर शिंपडून जात जा बाहेर फिरायला जाताना. तेवढंच बाकी ठेवलंयस, देवकीअम्मा.” देवकीअम्मा हसून म्हणायच्या, “काही तरी काय बोलता हो? हा वास म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तुम्हाला काय कळतंय? तुम्हाला आवडत असेल ती चिकोरी की काय त्या बिया मिसळलेली पाकिटातली पुचकट कॉफी. मी वास पण घ्यायची नाही तिचा. ही प्युअर, ताजी दळलेली कॉफी म्हणजे, आ हा हा हा ! आणि अत्तराचं म्हणाल तर द्या ती तुमच्या लेकीला. जावईबापूंना आवडतात ते फवारे अंगावर मारून घ्यायला. मग काय? आणि आपली सरोज पण त्यातलीच. नवऱ्याला आवडतं म्हणून स्वत:ला पण आवडून घेते. प्रेम करून कल्याणम् (लग्न) केलंय ना !”
सरोजा, अच्युतन आणि देवकीअम्मांची एकुलती एक लाडाची कन्या. एस पी कॉलेजमधून बी ए वुइथ हिस्ट्री केलं आणि तिथंच लेक्चरर असलेल्या श्रीनिवास कुलकर्णीबरोबर प्रेमही! आता, तमिळ नवरा मिळाला नस्ता का? रास्ता पेठ तर उतू जाते आहे तमिळियन्सनी. पण नाही ! महाराष्ट्रीयन गाठला तिनं. देवकीअम्मांच्या मते “तिनं कसलं? त्यानंच ओढलं असणार तिला प्रेमाच्या जाळ्यात”. देवकीअम्मानी रडून घर डोक्यावर घेतलं होतं तेव्हा. अच्युतननी आणि शेजारपाजारच्या लोकांनी कशी तरी समजूत घातली. संमती देण्याआधी मात्र अम्मानी खोदून खोदून विचारून घेतलं, “सरोजा, दारू बिरू पीत नाही न ग तो? आणि सिगारेट? मास मच्छी खाणारा असेल तर बिलकुल करू देणार नाही मी हे कल्याणम्. आधीच सांगून ठेवते.”
पण गंमत बघा, लग्नानंतर महिन्याभरातच जावईबापूनी सासूबाईना इतकं आपलंसं केलं की काही विचारू नका. आणि यथावकाश जेव्हा सरोजाला बाळ झालं, मुलगी, तेव्हा अम्मांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जावयाविषयी मनात असलेलं उरलसुरलं किल्मिष देखील पार नाहीसं झालं. मुलीचं नाव त्याना मुरुगनदेवाच्या अर्धांगिनीचं ठेवायचं होतं, ‘दैवानाई’. पण महाराष्ट्रीय वाटणारं ‘देवयानी’ ठेवायला त्यांनी नाही म्हटलं नाही. पेथी (नात) देवयानी ही देवकीअम्मा आणि ताता (आजोबा) अच्युतन या दोघांचीही कमालीची लाडकी झाली. पण लाडाकोडात वाढत वाढत ती जेव्हा दहा वर्षांची झाली तेव्हा श्रीनिवास कुलकर्णीना मुंबईमध्ये चांगल्या पगाराची नोकरी चालून आली. मोठा पगार आणि राहायला फ्लॅट मिळणार होता त्यामुळं कुलकर्णी कुटुंबानं पुणं सोडून मुंबईला जायचा निर्णय घेतला.
श्रीनिवासनी ती नोकरी स्वीकारली. आधी जाऊन जॉइन झाले आणि मग कंपनीच्या संमतीनं माटुंगा भागात एक फ्लॅट पसंत करून सरोजा आणि देवयानी ह्या दोघीना घेऊन आले. अच्युतन मुदलियार आणि देवकीअम्मा दोघेही गेले होते लेकीचं नवं घर लावून द्यायला. माटुंगा म्हणजेही मिनी तमिळनाडूच म्हणा ना. त्यामुळं लेक तर खूष होतीच, अम्माना देखील आनंद झाला मुलीचा आणि नातीचा तमिळ संस्कृती आणि भाषेशी संपर्क बनून राहील याचा. आठ दिवस राहून दोघं परतले पुण्याला. पण दोघांचं, विशेषत: अम्मांचं, मन लागेना रास्ता पेठेतल्या घरात. जावई, लेक आणि लाडकी नात, सगळेच जवळ नाहीत हे मोठं कारण झालं अच्युतन आणि देवकीअम्मा दोघांना पुणं नकोसं व्हायला.
अच्युतननी मग पुन्हा एकदा देवकीअम्मांकडं विषय काढला कोईमतूरला जाऊन रहायचा. यावेळी त्याना होकार मिळाला. आठवडयाभरासाठी तिकडं जाऊन घराची डागडुजी करून घेऊन ते परत आले आणि आणखी एक आठवडयानंतर दोघेही रवाना झाले पुण्यातलं आपलं बस्तान उठवून.
कुलकर्णी कुटुंब मुंबईत आणि मुदलियार कुटुंब कोईमतूरमध्ये आनंदानं राहायला लागले. होता होता दहा वर्षं उलटली. श्रीनिवास आणि सरोजा दोघांनाही देवयानीनंतर आणखी एक मूल व्हावं अशी इच्छा होती खरी. देवकीअम्मा आणि अच्युतन दोघंही मधून मधून टुमणं लावत असत सरोजाकडं. परंतु परमेश्वराच्या मनात नव्हतं ते. देवयानी ही एकुलती एक मुलगीच राहिली कुलकर्णी कुटुंबात. श्रीनिवास आणि सरोजानेही ईश्वरेच्छा मान्य केली आणि आणि देवयानीला काहीही कमी पडू न देता वाढवण्यात आनंद मानला.
देवयानी समंजस आणि आईवडिलांवर खूप प्रेम करणारी, त्यांच्या मनाविरुध्द काहीही न करणारी मुलगी होती. मराठी आणि तमिळ दोन्ही संस्कृतींमधून चांगल्या आचारविचारांचा वारसा घेऊन ती वाढली. रामनारायण रुईया कॉलेजमधून मानसशास्त्र विषय घेऊन बी ए झाली. एका कन्सल्टन्सी फर्ममध्ये नोकरीलाही लागली. सरोजाला, आता देवयानीचं लग्न व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं. देवयानीनं ते मान्य केलं. आपला आयुष्याचा जोडीदार कसा असावा ह्याबद्दल तिच्या काही अपेक्षा असतीलही, तरीही आईच्या सांगण्यावरून मुलगा तमिळ असला तर उत्तम हेही तिनं मान्य केलं. श्रीनिवासला अर्थातच देवयानीसाठी चांगला मराठी वर शोधायचा होता. पण सरोजाचं मन त्यानं ना आजवर कधी मोडलं होतं ना आताही. त्याचं एक म्हणणं मात्र होतं. “सरू, सासूबाईंनी जसा, मी शाकाहारी, निर्व्यसनी – अगदी सिगारेटसुध्दा न ओढणारा असेन याची खातरजमा करून घेऊन मगच मला पास केलं, तसाच मीही तुम्ही जो कुणी तमिळ ‘वरुङगाल मणमगन’ (संभाव्य वर) शोधाल त्यानं शाकाहारी, निर्व्यसनी, सिगारेट, दारू यांना स्पर्शही न करणारा असं असावं हा आग्रह धरेन. त्याची शैक्षणिक पात्रता, अर्थार्जनाची क्षमता हे मुद्देही तपासणं आवश्यक आहे. आणि आपल्या देवूला त्याच्या घरी काहीही त्रास होता कामा नये ही अट तर असणारच असणार माझी.”
नातीच्या ‘कल्याण संबंधम्” विषयी अच्युतनतातांचं म्हणणंही तेच होतं. आपला नातजावई मराठी नसून तमिळ असणार आहे याचाच त्यांना आणि देवकीअम्माला आनंद झाला.
वरसंशोधन सुरू झालं. मिनी तमिळनाडूमध्ये नायडू, अय्यंगार, पिल्लई, अय्यर वगैरे कुटुंबांमध्ये सरोजाच्या, खरं तर श्रीनिवासच्या, कसोटीला उतरणारी तरुण विवाहेच्छु मुलं सापडणं काही कठीण गेलं नाही. वळसम्मा आणि (आता दिवंगत) माधवन मुपनार यांचा एम कॉम झालेला, सद्गुणी मुलगा आधीरायन हा सरोजा, श्रीनिवास आणि मुख्य म्हणजे देवयानी ह्या तिघांनाही पसंत पडला. आधीरायननंही देवयानीला एकदोन वेळा भेटून, बोलून आपणही ह्या कल्याणसंबंधम् साठी अनुकूल असल्याचं दर्शवलं. मुपनार म्हटल्यावर अच्युतनतातांनी जरा जास्त चौकशी केली. डिफेन्स अकाउण्ट्समध्ये ऑडिट सेक्शनमध्ये सर्वपल्ली मुपनार म्हणून एकजण होता ते त्याना आठवलं आणि मग काय, त्या मुपनारशी काही नातं आहे का मुलांचं ते शोधताना समजलं की आधीरायन हा सर्वपल्ली मुपनारच्या दिवंगत भावाचाच मुलगा होता. आता अच्युतनतातांनी वयोमानामुळं कुरकुरत असलेली कंबर कसली आणि सर्वपल्लीचा शोध सुरू केला. फोनाफोनी करत करत ते पोचले केरळ राज्यातल्या त्रिसुर जिल्ह्यात असलेल्या गुरुवायुर मंदिरापाशी. त्यांचा एके काळचा कलिग सर्वपल्ली देखील आता सेवानिवृत्त होऊन त्रिसुरमध्ये स्थायिक झालेला होता. विष्णुभक्त असल्यामुळं त्यानं गुरुवायुर मंदिराचा परिसर निवडला होता आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी.
लाडक्या नातीच्या होऊ घातलेल्या कल्याणम् मुळं उत्साहानं पुन्हा तरुण बनलेले अच्युतन मुदलियार मग पोचले गुरुवायुरला.
सर्वपल्ली मुपनारनाही आनंद झाला आपला जुना सहकारी मित्र भेटल्यामुळं. आधीरायनविषयी त्यांनी सारी माहिती दिली. भाऊ माधवनच्या मरणानंतर आधीरायन आणि वळसम्मा दोघांना आधार त्यांनीच दिला होता. आधीरायननं कल्पना दिली होती त्यांना ‘वरुङगाल मणमगई’ (संभाव्य वधू) देवयानीबद्दल आणि अच्युतनताताप्रमाणे त्यांनाही आनंद झाला होता. सर्वपल्लीनी आग्रह केल्यावरून अच्युतन दोन दिवस राहिले मित्राकडे. गुरुवायुर मंदिरात देव दर्शन घेऊन त्यांनाही समाधान झालं. मंदिर परिसर आवडला त्यांना. आणि सर्वपल्लीनी कल्याणम् समारंभ गुरुवायुर मंदिरात करावा’ असा प्रस्ताव मांडल्यावर, “मला देखील ते आवडेल; परंतु देवयानीच्या आई वडिलांना आणि खुद्द देवयानीला विचारून सांगतो” असं आश्वासन देऊन ते कोईमतूरला परतले.
आल्या आल्या त्यांनी श्रीनिवासला फोन लावला, सगळा वृत्तान्त सांगितला. सरोजाशी आणि देवयानीशीही बोलले. तिला म्हणाले, ‘देवा, येन् अम्पाना पेथी (माझ्या लाडक्या नाती), ऐक. देवकीअम्मा आणि मी, दोघंही थकलो आहोत. मुंबईचा प्रवास आता आम्हाला झेपणार नाही. शिवाय मुलाच्या काकांचीही इच्छा आहे की कल्याणम् विधी गुरुवायुर मंदिरामध्ये व्हावा. आम्हालाही आवडेल ते. तेव्हा बघ, विचार कर. अम्मा आणि आप्पा, दोघांशीही बोलून मला काय ते कळव. आणि हे बघ, आप्पांना सांग, म्हणाव निश्चयतारत्तं (वाङगनिश्चय) उरकून घ्या लवकर आणि मग तू ये इकडे दोन तीन दिवस रजा घेऊन. आम्हाला बोलायचंय तुझ्याशी.”
त्यानंतर आठवड्याभरात वाङगनिश्चय झाला. लग्नाची तारीख ठरली तीन महिन्यांनंतरची. लग्न गुरुवायुर मंदिरात करायचं हेही ठरलं. श्रीनिवासच्या नातेवाईकांमध्ये खूप जवळचे असे कोणी नव्हते, ऑफिसातील आणि इतर मित्र जे आवर्जून केरळमध्ये येतील ह्या समारंभासाठी असे थोडेच होते. जे खास होते येण्यासारखे त्यांना तिकडे नेण्याची, इतर सामग्री नेण्याची वगैरे सारी व्यवस्था श्रीनिवास करणार होता. हे सगळं अच्युतनना देवयानीनं कळवलं. तिला स्वत:ला आत्ताच तातडीनं कोईमतूरला जाणं मात्र रजेच्या अभावी शक्य नव्हतं तेही कळवलं. ताता जरा हिरमुसले झाले पण देवयानीनं दोन आठवडयानंतर रजा मिळेल तेव्हा येईन असं आश्वासन दिलं त्यामुळं त्यांना बरं वाटलं.
कबूल केल्याप्रमाणं देवयानीनं सांगितल्या वेळेला आठ दिवसांची रजा मिळवली आणि कोईमतूरला गेली. अच्युतन आणि देवकीअम्मा दोघांनाही इतक्या दिवसांनंतर लाडकी नात आली म्हणून कमालीचा आनंद झाला. देवकीअम्मांना आता अधू झालेली नजर, वाढलेलं वय, वाढलेलं वजन आणि वाढलेला आकार यांमुळं शैथिल्य आलं होतं. त्यामुळं अच्युतनताताच घरची, बाहेरची कामं करत. देवयानीला हे बघून खूप वाईट वाटलं. मग आल्या आल्या तिनं तातांच्या विरोधाला न जुमानता सगळा कारभार आपल्या हातात घेतला. म्हणाली, “ताता, आठ दिवसांचा तर प्रश्न आहे. नंतर तुम्हीच बघणार आहात नेहमीप्रमाणं. मग आता माझं ऐकायचं आणि मला सारं करू द्यायचं. बस्स. मी काही ऐकणार नाही तुमचं.”
त्या रात्री देवकीअम्मा आणि अच्युतनताता खूप एक्सायटेड होते. सर्वपल्ली मुपनार यांनी त्यांच्या घराविषयी, घरातल्या माणसांविषयी, चालीरीतींविषयी जे जे काही सांगितलं होतं ते सारं तातांनी देवयानीला सांगितलं. शिवाय आपल्या घरचे तमिळ रीतिरिवाज, सणवार, देवदेवता, त्यांची उपासना, व्रत वैकल्ये, काय बोलू नि किती बोलू असं झालं होतं त्याना. मध्यरात्र उलटून गेली तरी आता झोपायचंय हे ध्यानात न घेता अम्मा, ताता, दोघे – विशेषत: अच्युतनताता – बोलत, उपदेश करत राहिले. शेवटी देवयानीनंच सांगितलं, “आता पुरे झालं ताता. आय प्रॉमिस, आय शाल डू ऑल आय कॅन टु बी दि मोस्ट आयडियल मरुमगई (सून).” ताता हसले आणि मग तिघेही झोपायला गेले.
सकाळी सकाळीच मुपनारांचा फोन आला अच्युतनना. आधीरायनकडून त्यांना समजलं होतं देवयानी कोईमतूरला गेल्याचं. तेव्हा तिला गुरुवायूरला घेऊन येण्याची गळ घातली त्यांनी. देवयानीला विचारून तातांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघून एक दिवसासाठी येत असल्याचं कळवलं.
सकाळी प्रायवेट गाडी करून तिघंही गुरुवायुरला गेले. तीनएक तासांचा प्रवास होता. आरामात झाला. मुपनार कुटुंबात देवयानीचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं गेलं. आधीरायनच्या काकीनं तर तिला आपल्या जवळ बसवून घेऊन मायेनं कुरवाळलं. थोडे ताजेतवाने झाल्यावर सगळ्यांनी गुरुवायुरअय्यप्पाचं दर्शन घेतलं. मंदिराचा परिसर पाहून आणि कल्याणम् समारंभांसाठी मंदिरात कायमस्वरूपी असलेली व्यवस्था तसेच निवासाच्या अद्ययावत सोयी पाहून देवयानीला आनंद झाला. आपलं कल्याणम् अशा सुंदर पवित्र ठिकाणी होणार याचं समाधान झालं. संध्याकाळ झाली तसे ताता, अम्मा आणि देवयानी कोईमतूरला परत जायला निघाले. दिवसभराच्या धावपळीनं ताता थोडे थकल्यासारखे झाले होते त्यामुळंच बहुधा ते फारसं न बोलता गाडीत डोळे मिटून बसून होते.
निघताना मुपनारअम्मानी अडाई आणि दही, चटणी भरून डबा दिला होता. त्यामुळं रात्री घरी पोचल्यावर स्वैपाक करायची आवश्यकता नव्हती. कुणालाच जास्त भूक नसल्यामुळं देवयानी आणि देवकीअम्मानी एकएक अडाई खाल्ली. ताताना तेही नकोसं वाटलं. कपभर दूध आणि एक केळं खाऊन ते म्हणाले, “मला जरा थकल्यासारखं वाटतंय त्यामुळं मी झोपतो” आणि ते व देवकीअम्मा झोपायला गेले. देवयानी देखील तिला दिलेल्या खोलीत जाऊन अंथरुणावर पडली. तिला पडल्या पडल्या झोप लागली. रात्री दीड वाजायच्या सुमाराला देवकी अम्मानी येऊन तिला जागं केलं. “देवू, ताताना कसं तरीच होतंय. छातीत दुखतंय आणि पूर्ण डाव्या हाताला मुंग्या आल्यासारखं वाटतंय म्हणतायत.” देवयानी धावलीच तातांच्या खोलीकडं. तातांची चाललेली तगमग बघून तिनं त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. लक्षणं ऐकल्यावर त्यांनी ताबडतोब ताताना कार्डियाक हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं. ते स्वत: डायरेक्ट तिथं पोचतो म्हणाले. देवयानीनं शेजारी राहत असलेल्या राधाकृष्णनना उठवलं. त्यांनी त्यांची गाडी काढली आणि अच्युतनताताना हॉस्पिटलमध्ये नेलं. अम्माला घरीच थांबवून देवयानी त्यांच्याबरोबर गेली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरानी तातांचा ईसीजी काढला आणि तो बघून त्यांना सरळ आयसीयू मध्ये शिफ्ट केलं. तिथं आवश्यक ते तातडीचे उपचार करून डॉक्टर बाहेर आले. देवयानीला आपल्या केबिनमध्ये नेऊन म्हणाले, “मिस्, पेशंटची मेडिकल हिस्ट्री तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर सांगतो. सात वर्षांपूर्वीची कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्यूअर (सीसीएफ) ची ही केस आहे. त्यात आता अॅक्यूट मायो कार्डियल इन्फारक्शन (एमसीआय) झालं आहे आहे. आर्टरीमध्ये ब्लॉकेजिसही आहेत. साध्या शब्दांत सांगायचं तर हा तीव्र हार्ट अटक आहे. सीसीएफ नंतर पेशंटचं आयुष्य पाच ते सात वर्षं इतकंच असतं. त्यात आत्ताचा हा अटॅक. त्यामुळं हे अजून किती दिवस काढतील ते मी सांगू शकणार नाही. ही इज नाईंटी इयर्स ओल्ड. त्यामुळं सर्जरी अॅडव्हायजेबल नाही. आता मी त्याना ट्रॉम्बॉलाइझ करून सीडेटिव्ह दिलेलं आहे त्यामुळं ते गुंगीत आहेत. शुद्धीवर आल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकाल. बोलतीलही ते तुमच्याशी. पण मी खोटी आशा देऊ शकत नाही. अॅट द मोस्ट फोर टु फाइव्ह डेज. यू नो व्हाट आय मीन.”
“तुम्ही नका काळजी करू तिची. कणखर मनाची आहे ती. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या म्हणजे झालं.” देवकीअम्मानी उत्तर दिलं.
“मला बोलायचंय तिच्याशी. तिला आत बोलव.”
“एका वेळी एकालाच आत येऊ देतात. मी बाहेर जाते आणि तिला पाठवते. पण जास्त बोलू नका.” असं म्हणून देवकीअम्मा बाहेर गेल्या. देवयानी आत आली आणि तातांच्या बेडजवळ उभी राहिली. डोळे डबडबले होते पण तरी हसून तिनं तातांचा हात हातात घेतला.
“माझ्या लाडक्या देवू, अगं पाणी का आहे तुझ्या डोळ्यात? रडू नको. मी ठीक आहे. तुझ्या कल्याणम् च्या आधी बरा होऊन येतो. प्रॉमिस.”
“बघा हं ताता. वचन देताय तुम्ही मला. पाळायलाच हवंय.”
“अगं ! पाळणार म्हणजे पाळणार. कल्याणम् समारंभच काय मी तुझा आख्खा संसार बघायला पण येणार आहे तुझ्या घरी. आता हास बघू. तुला डॉक्टरनं काय सांगितलं मला ठाऊक नाही. पण माझं वचन म्हणजे वचन. आता देवकीला घेऊन घरी जा. आयसीयू तनं बाहेर काढतील मला तेव्हा या.”
‘ठीक आहे ताता. मी विचारते डॉक्टरना कधी स्पेशल रूममध्ये ट्रान्सफर करणार आहेत ते. आणि हो, मी आईला फोन केला होता. ती पण येईल उद्यापर्यंत.” देवयानीनं तातांच्या कपाळावर ओठ टेकले आणि बाहेर गेली.
एक दिवसांनंतर अच्युतनला स्पेशल रूममध्ये ट्रान्सफर केलं गेलं. मुंबईहून आलेली सरोजा आणि देवयानी त्याना बघायला गेल्या. मुलीला बघून अच्युतनना गहिवरून आलं. बराच वेळ नुसता तिचा हात हातात धरून तिच्याकडं बघत राहिले. सरोजालाही रडू आवरलं नाही. कढ ओसरल्यानंतर लेक आणि वडील भरभरून एकमेकांशी बोलले. इतके की अखेर जवळ बसलेली देवयानी म्हणाली, “ताता, तुमची लेक आली तर लगेच नातीला विसरलात ना?”
ताता म्हणाले, “अगं तुला कसं विसरेन? शक्य आहे का ते? तुला वचन दिलंय तुझा संसार बघायला येणार आहे म्हणून. अगदी या जन्मात जमलं नाही तरी पुढच्या जन्मात तर नक्की येणार. तुझ्याच पोटी मुलगा म्हणून जन्म दे असं सांगणार आहे अय्यप्पाला. म्हणजे जन्मल्यापासूनच बघत राहीन तुझा संसार.” आपल्याच बोलण्यावर अच्युतनताता खूष होऊन हसायला लागले. नर्स, सरोजा आणि देवयानी तिघीही “आता पुरे, पुरे” म्हणेपर्यंत हसता हसता एकदम थांबले. चेहरा कसनुसा झाला. डाव्या डोळ्याची पापणी लवायला लागली, डावा हात लुळा पडला. नर्सनं दोघींना खोलीबाहेर काढून डॉक्टरना बोलावलं. ताताना ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक आला होता. डॉक्टरांनी ताबडतोब ट्रीटमेंट सुरू केली. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं, “मिस्टर मुदलियार ट्रीटमेंटला लिमिटेड रिस्पॉन्स देत आहेत. कॅरोटिड आर्टरीत आलेल्या ब्लॉकेजमुळं ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता आहे. परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या मिसेस इथं नाहीत का? त्यांना बोलावून घ्या.” देवयानीने राधाकृष्णनना फोन करून सांगितल्यावर ते लगेच देवकीअम्माना घेऊन आले.
सगळेजण तातांच्या बेडजवळ गेले. ताता कष्टाने अडखळत सरोजाला म्हणाले, ‘सरोजा, ही माझी गोड नात आहे ना देवू …. दैवानाई…. देवयानी, तिचं कल्याणम् आहे दोन महिन्यांनंतर. थाटात कर हं. ही देवकी, देवकीअम्मा, माझी वाघीण तुला मदत करेल. काळजी नको करू. श्रीनिवासना पण सांग तसं.” इतकं बोलून ते गप्प झाले. बराच वेळ मुकाटयानं देवकीअम्माचा हात आपल्या उजव्या हातात धरून राहिले. आणि मग अचानक अम्माना म्हणाले, “देवकीअम्मा, आता मी मरणार आहे का ग ?”
“काही तरी बोलू नका ताता. शांत डोळे मिटून पडून रहा बघू तुम्ही.” देवयानी म्हणाली.
चार पाच मिनिटं झाली असतील. तातांच्या हातातून अम्मांचा हात अलगद सुटला. परत पकडायचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांचाच हात लुळा पडला होता.
नर्सनं बोलवून आणलेल्या डॉक्टरनी ताताना तपासलं आणि म्हणाले, “आय अॅम सॉरी, ही इज नो मोअर.”
देवयानीनं हे वाक्य ऐकलं आणि तिचं काळीज लक् कन् हाललं. ‘चार वर्षांचं मूल, मरण म्हणजे काय हे कळण्याचं वय नाही. आणि हे शब्द?’ डोळ्यात उभं राहिलेलं पाणी निपटत देवकीअम्मा रामानुजनला थोपटत म्हणाली “ना, येन् कोळ्ळु पेरन ( माझ्या लाडक्या नातवा ), असं बोलू नकोस.”
देवयानीच्या डोळ्यासमोर अच्युतनतातांचा हॉस्पिटलमधला अखेरचा दिवस उभा राहिला. आणि ती आवेगानं रामानुजनला मिठी मारून पुटपुटली, “नाही ताता, मी जाऊ नाही देणार तुम्हाला या वेळी. तुम्ही वचन दिलंय मला, माझा आख्खा संसार तुम्ही बघणार आहात म्हणून. आता कुठं सुरुवात झाली आहे.”
उभा जन्म होवो वारी
वाट संपावी सत्वरी
वेगे पोचावे मंदिरी
प्रेमे चढावी पायरी
भाव दाटले अंतरी
गोड नामाची माधुरी
सदा असावी अधरी
माय दिसता गाभारी
व्हावे हृदय पंढरी
भेटताना ऊराऊरी
श्वासे भरावी कस्तुरी
देह व्हावा एकतारी
विठू वसावा अंतरी
विसरून दुःखं सारी
जीव सुखावे माहेरी
शुद्ध भावाची शिदोरी
द्यावी निघता माघारी
किती झाल्या खेपा तरी
पुन्हा वाटे यावे दारी
एक मागणे श्रीहरी
ऊभा जन्म होवो वारी
– © वर्षा पेठे
vnpethe@gmail.com
विठ्ठल रखुमाई ( चित्र ) – अॅड क्रांती आठवले पाटणकर
एक छोटासा किस्सा सांगावासा वाटतो. पुलंनी लिहिलंय की ते जेव्हा चाळीत राहत होते तेव्हा त्यांच्या शेजारी एक सत्यभामाबाई राहत होत्या. बाईंना पेटीवादनाची खूप हौस होती, पण तेवढी कला त्यांच्या बोटात उतरत नव्हती. सूरपट्टी शोधत शोधत त्या वादन करीत. त्यांच आवडतं गाणं ‘ सत्य वदे वचनाला नाथा ‘. दुपारी घरातली कामं करून झाली की त्या त्यांच्या घरातल्या पलंगावर पेटी वादन करायला बसत…… पहिलं गाणं अर्थातच सत्य वदे वचनाला नाथा……
पुलनी लिहिलंय, सत्यभामाबाईंचं वादन म्हणजे आपली करमणूक……
त्या जेव्हा पेटीवर ‘सत्य ‘ शोधायला लागत तेव्हा त्यांचा गळा नाथापर्यंत पोहोचलेला असे.
गोविंदराव पटवर्धन यांचा भव्य सत्कार रवींद्र नाट्य मंदिरात झाला, तेव्हा मला जायची संधी मिळाली होती. सभागृह खचाखच भरलेलं होतं. मधल्या रिकाम्या जागेत रसिक श्रोते मांडी घालून खाली बसले होते. सत्कार समारंभ छानच झाला. सर्वांचीच भाषणं आटोपशीर आणि रंजक झाली.
मध्यंतरानंतर पुलंना गोविंदरावांच्या बरोबर संवादिनी वादनाच्या जुगलबंदीला बसावं लागणार होतं….. टाळ्यांच्या गजरात दोघेही मंचावर विराजमान झाले. वादनापूर्वी पुलंनी हातात माईक घेतला आणि श्रोत्यांना सांगितलं की अनेकदा मंचावर लोकांच्या पोटात भीतीने गोळा येतो, पण आज गोविंदरावांच्या बरोबर वादन करायचं म्हणजे माझ्या बोटात गोळा आला आहे…
चंद्रचूड वासुदेव यांच्याबद्दल मला माहित असलेलं आज जरा विस्ताराने सांगतो. विस्ताराने अशा करता की त्यांच्याबद्दल एरव्ही फारसं कुठे काही छापून आलं नाही. त्यांच्या कलाजीवनाचा कुठेही विशेषत्वाने गौरव केला गेला नाही.
त्यांचं वैशिष्ट्य असं की लय, शब्द आणि सुरावटींचे बारकावे वादनातून ते व्यक्त करीत. कौशल्य आणि बुद्धी याचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. गायकाला पेटीवादक साथ करतो तेव्हा ते काम अति संयम ठेवून करावं लागतं. स्वतःची विद्वत्ता दाखवून गायकावर कुरघोडी करायची नसते. गायक जेव्हा गातो तेव्हा मधली जागा किंवा आवर्तने पेटी वादक, तबलावादक नजाकतीने भरून काढतात. ही जागा जेव्हा भरायची असते तेव्हा गायकाची शैली समजून घेऊन भरणा करावा लागतो. चंद्रचूड वसुदेव हे काम अतिशय समजून करीत असत.
त्या त्या गायकाला योग्य अशी साथ संगत ते करायचे हे हा त्यांचा विशेष!
चंद्रचूड यांच्याकडे उत्तम स्मरणशक्ती होती. सहा महिन्यांनी किंवा आठ महिन्यांनी तालमीला हजर झाले तरी त्यांना चाल आणि मधल्या जागा व्यवस्थित आठवत असत. त्यांना मनपसंत असलेलं संगीत तर ते वाजवीत असत तथापि अन्य कलाकारांची शैली किंवा अन्य देशातल संगीत सुद्धा ते अभ्यासात असत. गायक जर चांगलं गात असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत असे आणि तो जर असहनीय गात असेल तर वासुदेव यांचा चेहरा अत्यंत गंभीर दिसत असे.
डॉक्टर अशोक रानडे यांनी सांगितले की एकच दुर्गुण या कलाकाराचा होता तो म्हणजे त्याला महत्त्वकांक्षा नव्हती….आपल्या कला साधनेमध्ये ते व्यग्र असायचे.
त्यांच्या सहभागामुळे अनेक कार्यक्रम उभे राहिले आणि गुणवत्ता टिकून राहिली. त्यांनी गीताला चाल देताना त्या गीताची गती डौल नजाकत आणि रुबाब लक्षात घेतला व तशी चाल केली. उत्तम सारंगीवादकाला सारंगीतले सूर ऐकू तर येतातच पण ते दिसायलाही लागतात असं म्हटलं जातं. वासुदेव यांच्या वादनामुळे चांदण स्वरात लपलेला गंध, दरवळायला लागतो अशी अलंकारिक भाषा लक्ष्मण जोशी यांनी वापरली आहे.
चंद्रचूड वासुदेव यांना आपुलकीने सर्वजण भाऊ म्हणत. त्यांच्या वादनाची सर्वत्र खूप तारीफ होत असे. दूरदर्शनवर सुहासिनी मुळगावकर यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. त्यातल्या संगीताच्या कार्यक्रमांसाठी त्या आवर्जून भाऊंनाच बोलवीत.अजित कडकडे यांच्या २०० मैफिलीना भाऊंनी साथ संगत केली आहे. कार्यक्रमाच्या आधी एक तास ते सभागृहात हजर राहत असत.
मोगुबाई कुर्डीकर, कुमार गंधर्व, बसवराज राजगुरू, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, प्रभा अत्रे, सुरेश हळदणकर अशा नामवंतांबरोबर भाऊंनी संवादिनीवर अनेक कार्यक्रमातून साथ संगत केली आहे. अनेक गद्य नाटकांना पार्श्वसंगीत दिलं आहे. त्यांच्या अनेक रचनांपैकी ‘गावत मन हरी गान ‘ ( तोडी अंग ) आणि सोड रे पदरा ( रामकली अंग ) यांचा खास उल्लेख केला जातो.
भाऊंची आठवण म्हणून दर वर्षी गिरगांवातील साहित्य संघामध्ये तीन-साडेतीन तासाचा कार्यक्रम सादर केला जातो. हा कार्यक्रम विनामूल्य असतो. प्रकाश वगळ हे संवादिनी वादक पुढाकार घेतात, आणि खूप कष्ट करतात, तेव्हा तो कार्यक्रम रसिकांना ऐकायला मिळतो.भाऊंचे सुपुत्र निषाद वासुदेव आणि त्यांची स्नुषा ( सून ) शर्वरी यांचा आयोजनात मोठाच सहभाग असतो.
आज भाऊ आपल्यात नसले तरी रसिकांच्या सुगंधी स्मृतीमध्ये ते कायम असणार ..
.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी, १९४४ साली संगीत ‘विद्याहरण’ हे नाटक पाहायला लहान वयातले चंद्रचूड गेले होते. गिरगावातल्या साहित्य संघात हा नाट्य प्रयोग झाला. पडदा उघडल्यावर नांदी सादर केली गेली. तेव्हा जे ऑर्गन वादन या छोट्या मुलाने ऐकलं त्याने तो प्रभावित झाला. आणि मग हे वाद्य आपण शिकायचं. आधी पेटीवादन शिकायचं असं त्यांच्या मनात आलं.
सुरुवातीला बाबुराव चौगुले यांच्याकडे प्राथमिक शिक्षण झालं. मधुबाला चावला या गायिकेला पेटी वादनाची साथ संगत त्यांनी केली.
पुढे मग एक फार मोठा गुरु त्यांना लाभला. त्या गुरुचं नाव मधुकर पेडणेकर. सर्वजण त्यांना पी मधुकर म्हणत. अतिशय वेगळ्या ढंगाचं, शैलीदार वादन ते करीत. त्यांच्याबद्दल संगीत क्षेत्रामध्ये खूप आदर होता. त्यांच्या नावाचा दबदबा होता. ते लहरी होते पण प्रेमळ होते,असं चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
‘कुलवधू’ नाटकात साथ संगत करण्याची पहिली संधी चंद्रचूड यांना मिळाली. ‘ बोला अमृत बोला ‘ हे नाट्यगीत ज्योत्स्ना भोळे यांनी गायलं तेव्हा चंद्रचूड यांची ऑर्गन साथ ऐकून त्या प्रभावित झाल्या. नाटक संपल्यानंतर त्यांनी या तरुण वादकाचं खूप कौतुक केलं होतं.
आकाशवाणी आणि दूरदर्शनवर चंद्रचूड वासुदेव यांना बरीच संधी मिळाली ..
सुहासिनी मुळगावकर यांना हाच कलाकार साथ संगतीला हवा असे. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या गायनालासुद्धा सथ करण्याचं भाग्य त्यांना लाभलं होतं.
काही नाटकातून अभिनय करण्याचीसुद्धा त्यांना संधी मिळाली. ‘सुंदर मी होणार’, ‘तो मी नव्हेच’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘महाराणी पद्मिनी’ अशा नाटकांचा उल्लेख करता येईल. काही नाटकांचे संगीतदिग्दर्शन तबीयतीने त्यांनी केलं. काही नाटकांना पार्श्वसंगीत त्यांनी दिलं.
प्रपंचामध्ये त्यांना कृपालिनीताईंची छान साथ मिळाली. त्यांचे सुपुत्र निषाद हे हौसेने पेटी वादन करतात. मॅनेजमेंट विषयात ते उच्चविद्याविभूषित आहेत आणि एका खाजगी कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर काम करीत आहेत.
आपल्या सगळ्यांना कुतूहल असेल, वासुदेव कुटुंबीय कुठे राहतात ठाकूरद्वार नाक्यापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर त्यांचं अतिशय नीटनेटकं आणि छान घर आहे. मला त्यांच्या घरी जायची दोन-तीन वेळा संधी मिळालेली आहे. निगर्वी आणि साधी माणसं आहेत……
गोगलगाय [ भाग १ ]
श्रावण महिन्यात रानात, शेतात, बागेत हिंडताना उन्हात पांढरी काचेसारखी रेषा चकाकताना दिसते. नीट निरखून पाहिल्यास त्या रेषेच्या टोकाला मातकट रंगाचा बोटभर लांबीचा एक प्राणी दिसतो. त्याच्या शरीरातून जो श्लेष्म पाझरतो तो उन्हात चकाकत असतो. हा प्राणी म्हणजे गोगलगाय.
खरं म्हणजे बिनशंखाच्या गोगलगायींना म्हणजे स्लगना स्वतःचं रक्षण करण्यासाठी शंखासारखा अवयव नसतो. त्यांच्या शरीरातील चिकट द्रव त्या त्यांच्या वाटेला जाणाऱ्या मुंगी, मुंगळ्यांसाऱख्या कीटकांच्या अंगावर सोडतात. ह्या द्रवात तो अडकून पडतो. अशा तऱ्हेने ह्या गोगलगायी स्वतःचं रक्षण करतात. अर्थात पक्ष्यांसारख्या मोठ्या शत्रूविरुद्ध त्याचा काही उपयोग होत नाही. असं असलं तरी उत्क्रांतीमध्ये महाकाय डायनोसोर नष्ट झाले पण गोगलगायी पाचशे कोटी वर्षांपासून तग धरून आहेत.
गोगलगायींची हालचाल अत्यंत मंद असते. त्यांचं शरीर मऊ, बुळबुळित असतं. त्यांच्या पाठीवर कोठेही चिमट्याने दाबले तर त्यातून चिकट द्राव बाहेर येतो. तो बिनविषारी असतो परंतु त्यामुळे अनेकांना गोगलगायींची किळस वाटते.
गोगलगायीत नर आणि मादी अशी प्रजोत्पादनाची लिंगं असतात. रानातल्या दगडांखाली, पालापाचोळ्यात त्या अंडी घालतात. ढिगाऱ्यातल्या उबेने अंडी उबतात. पावसाळ्यात वाहून आलेल्या पाला पाचोळ्याच्या ढिगाखाली गोगलगायी मोठ्या संख्येने आढळतात. स्लग गोगलगायींचा रंग मातकट असतो. या गोगलगायी पक्ष्यांची विष्ठा, पालापाचोळा खातात. कबुतराप्रमाणे जेथून आल्या तेथे परत जाण्याचा त्यांचा स्वभाव असतो. ह्याला घरपरतीची भावना किंवा होमिंग इन्स्टिंक्ट असं म्हणतात.
बहुतांश गोगलगायी निरुपद्रवी असतात. फार थोड्या आकाराने मोठ्या असलेल्या गोगलगायी शेतीचं व फळबागांचं नुकसान करतात. आपल्या बागेतील पालापाचोळा खाऊन जगणाऱ्या गोगलगायी पुन्हा मातीत मिसळून जातात आणि जमीन समृद्ध करून आपल्यावर उपकार करतात.
अनेक जण आपल्या बागेतील पालापाचोळा एकत्र करून जाळून टाकतात. हे पर्यावरण विरोधी कृत्य आहे. त्यामुळे हवेचं प्रदूषण तर होतंच शिवाय अनेक पोषकद्रव्यंही नष्ट होतात. त्याच बरोबर हल्ली बागेतील चिखलाने पाय खराब होऊ नयेत म्हणून तेथे पेव्हर ब्लॉक बसवले जातात.
याचाही गोगलगायींच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे गोगलगायी शहरातून दिसेनाशा झाल्या आहेत.
वास्तविक आपल्या बागेतील जमीन समृद्ध करणाऱ्या गोगलगायींचं स्वागत करायला हवं.
दान हा शब्द “दा” या धातूपासून बनला आहे. देणे आणि कापणे असे या धातूचे दोन अर्थ होतात. आपल्यातले कापून दुस-याला देणे म्हणजे दान. आपल्याला पेढा हा प्रसाद म्हणून मिळाला; आपण त्यातला अर्धा शेजारच्या माणसाला दिला तर ते दान होईल. दान म्हणजे समविभाजन असा अर्थ शंकराचार्यांनी केला आहे.
विनोबा जमीनधारकांना जमिनीचा सहावा हिस्सा मागत. लोक तसा सहावा हिस्सा देऊनही टाकीत. त्यामुळे आपण धर्मकार्यातून मोकळे झालो असे त्यांना वाटे. आपल्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी संग्रह होतो. धनाचा संग्रह करण्याची वृत्ती तर सर्वसामान्यपणे दिसून येते. नाव चालविण्यासाठी पाण्याची गरज आहे परंतु पाणी नावेच्या खाली असायला हवे; याप्रमाणे धनाची, संपत्तीची गरज आहे ती घरात नव्हे, तर समाजात. घरात संपत्ती वाढण्यात धोका आहे. म्हणून ती समाजात वाटली गेली पाहिजे. संत कबीर नावेच्या उदाहरणाने हेच आपल्याला सांगतात. ते म्हणतात, ” पानी बाढो नाव मे, घर मे बाढो दाम, दोनो हाथ उलीचिये, यही सयानो काम.”
विनोबा म्हणतात, विवाहाने तुम्ही बांधले जाता आणि त्यात आपले कल्याण समजता. तसेच “दाना”सारख्या धर्मकार्यात नित्य बांधले जाण्यात कल्याण आहे.
एकदा काही खाल्ले तर त्यामुळे खाण्यातून सुटका होत नाही. ही शरीरासाठी फायद्याची गोष्ट आहे हे आपण जाणतो. म्हणून आपण रोज भोजन करतो. रोज स्नान करणे, भोजन करणे, झोपणे हे नित्यकर्म आहे तसे दानही नित्य कर्म आहे. त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. भोगामुळे जी मलिनता येते ती धुण्यासाठी रोज दानरूपी स्नान अवश्य करायला हवे.
समाजात सतत दानाचा प्रवाह वाहत राहणे हा सामाजिक दृष्टीने दानाचा अर्थ आहे. याचे उत्तम उदाहरण आपले शरीर आहे. हात लाडू उचलतो, तो जिभेवर ठेवतो, चर्वणानंतर जीभ तो पोटात ढकळते. पोट जर स्वार्थी बनले आणि लाडू त्याने स्वत:पाशी ठेवून घेतला तर शस्त्रक्रिया करण्याची पाळी येईल. परंतु पोट त्याला पचवून, रक्त बनवून शरीरात सगळीकडे पाठवून देते. अशा त-हेने शरीराचा प्रत्येक अवयव स्वार्थी नसून देह परायण असतो. प्रत्येक अवयव स्वार्थी बनला तर भोजन संपलेच.
लहानपणापासून आपल्याला आईवडिलांनी वाढवले, आपले शरीरिक, मानसिक पोषण केले. समाजाने शिक्षण दिले, चरितार्थाचे साधन दिले, या सर्वांचे आपल्यावर उपकार आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. “दान” ही त्यांच्या उपकाराची, समाजाचे ऋण अंशत: फेडण्याची संधी आहे. पुण्यकर्म आहे. म्हणून आपण स्वत:ला उपकारकर्ता समजू नये. ते आपले कर्तव्य आहे. कर्तव्यपूर्ती ही अभिमानाची गोष्ट आहे का? त्यामुळे दानात अभिमानाला जागाच नाही.
– ©️ हेमंत मोने.
त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकत्रित प्रकाशचित्राचा मी उल्लेख केला होता. काही वाचकांनी ते प्रकाशचित्र पहायची उत्कट इच्छा व्यक्त केली.
आणि मग ‘मैत्री’ परिवारातल्या सौ. स्वाती वर्तक यांनी मला ते प्रकाशचित्र पाठवले. जिज्ञासूंसाठी सोबत ते प्रकाशचित्र सादर करत आहे. धन्यवाद.