कथाचतुष्टयी (४)
दीपावली २०१८ विशेष
कथा चौथी
निर्मला
मुकुंद नवरे
लग्नात मामा का लागतो असं मी विचारलं तर तुम्ही म्हणाल लग्नमंडपात मामा मुलीला घेऊन येतो आणि लग्न लागतं तेव्हा तो अंतरपाट धरायलाही असतो. तेही खरंच आहे कारण एका बाजूने भटजी आणि दुस-या बाजूने मामा असे दोघेच हे काम ‘ताराबलं’ म्हटले जाईपर्यंत करतात. त्यातही फरक म्हणजे भटजी त्याचवेळी मंगलाष्टकं म्हणत असल्यानं मामाला फक्त अंतरपाट धरण्याचं काम असतं. पण निर्मलाच्या लग्नाची गोष्ट सांगितल्यावर मामा आणखी काय करू शकतो ते तुम्हाला कळेल.
निर्मला माझी भाची आणि मी तिचा मामा. ती माझ्या आक्काची मुलगी. आक्का तिच्या पहिल्या बाळंतपणाला माहेरी आली होती याचा अर्थ मी निर्मलाला जन्मापासून पाहत आलो आहे हे कळेलच. तिचे बोबडे बोल मी जसे ऐकले तसेच तिने बालकमंदिरात म्हटलेली गाणी आणि नाच मला अद्याप आठवतात. आक्कानं तिला मॉंटेसरीत घातलं होतं त्यामुळे तिचा मनोविकास लहानपणापासून चांगला झाला हे मी मनोवैज्ञानिक होण्याआधीपासून म्हणत आलो आहे. मी असं म्हटलं की आक्का म्हणणार, ‘तुला आपल्या भाचीचं भारीच कौतुक’. तेही कदाचित खरंच असेल कारण मनाचे सर्व व्यापार कुणाला कळले आहेत ? आम्ही मनोवैज्ञानिक पण आडाखे बांधत केस हाताळत असतो आणि यश मिळतं तेव्हा आडाखे बरोबर असण्याची ती पावती असते… तर ते असो.
परत निर्मलाकडे येतो. ती लहानपणापासून चुणचुणीत आहे आणि गोरी नसली तरी तिचं सावळेपणही नजर आकर्षून घेतं हे मीच नाही तर बघणारा कोणीही मान्य करील. अशी ही माझी भाची कोल्हापुरातच वाढली आणि तिनं केव्हा शाळा पार केली हे आम्हाला कळलंही नाही. तिला पाठीवर भाऊ झाला तरी आमची आक्का आणि सदानंदरावांनी तिला मोठी करताना मुलगा मुलगी असा भेदभाव कधी केला नाही. त्यामुळे कॉलेज शिक्षणाचा प्रश्न आला त्यावेळी खुशाल निर्मलाच्या आवडीप्रमाणे तिला वालचंद इंजिनियरिंग कॉलेजात आक्कानं पाठवलं तेही घरापासून दूर. त्यामुळे झालं काय तर ती आणखीनच स्मार्ट झाली. प्रत्येक सेमेस्टरमधे तिला चांगल्या ग्रेड्स मिळत गेल्या. फायनलला असतानाच कॅंपसला मुलाखती झाल्या आणि एका आय् टी कंपनीनं तिची निवड केली. अर्थात याचं मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. कारण एक तर आमची भाची गुणाचीच आणि दुसरं म्हणजे तिचा विषय इलेक्ट्रॉनिक्स. त्यामुळे डिग्री आणि जॉब ऑफर एकाच वेळी तिच्या हातात आल्या तेव्हा आक्काला एकीकडे आनंद झाला तर मुलगी आता पुण्याला जाणार याचं दु:खही झालं.
पण खरी परीक्षा पुढे होती. या आय् टी कंपन्या मुलांना भारतात बसवून ठेवत नाहीत हे मला कळत होतं तसं ते निर्मलालाही माहित होतं. आणि तसंच झालं. ट्रेनिंगचे सहा महिने आणि पुढचं वर्ष होण्याच्या आतच तिला स्कॉटलंडला जाण्याची ऑर्डर मिळाली तेव्हा आक्काला खरा धक्का बसला. पण त्यातून मी तिची समजूत काढली आणि आक्कानं खंबीर होऊन तिला निरोप दिला. तिला विमानतळावर पोचवायला मुंबईला आम्ही सगळेच गेलो होतो त्यावेळी निर्मला शेवटच्या क्षणी थोडी बावरली पण ते स्वाभाविक म्हटलं पाहिजे कारण ती एका संपूर्ण अनोळखी जगात प्रवेश करायला निघाली होती… तर ते असो.
निर्मला ग्लासगोला गेली आणि तिकडे ब-यापैकी रूळली. आक्काला तिनं वचन दिलं होतं त्यानुसार दर दिवसाआड ती फोनवर ख्याली खुशाली कळवत असे. तिचा फोन येऊन गेला की आक्का मला फोन करून सगळं सांगत असे. पुढे फोन आठवड्यातून एकदा आला तरी आक्काला काही वाटेनासं झालं. निर्मलाची असाइनमेंट दोन वर्षाची होती त्यामुळे मधे एकदा तीन आठवड्याच्या सुट्टीवर ती येऊन गेली तेव्हा मलाही भेटून गेली. तेव्हाच तिच्यात आलेला आत्मविश्वास मला सहज जाणवला.
*****
अशी दोन वर्षे पाहता पाहता निघून गेली आणि निर्मला असाइनमेंट संपवून भारतात परतली ! ती आता पुण्यातच घर घेऊन राहू लागली. आक्काला लेक परत आल्याचा आनंद झाला. ती कधी पुण्याला लेकीकडे जाऊन राहू लागली तर इतर वेळी निर्मला पुण्याहून कोल्हापूरला जा ये करू लागली. आक्काला आता निर्मलाच्या लग्नाचे वेध लागले होते. ती ग्लासगोला असताना तिकडेच काही जुळवेल अशी धाकधुक मनात होती. पण तसं काही नसल्याचं कळलं तेव्हा आक्काचा जीव भांड्यात पडला. ती उत्साहानं निर्मलासाठी स्थळं शोधू लागली. तसं तिनं मलाही सांगून ठेवलं. मी निर्मलाचं मत जाणून घेण्यासाठी विचारलं तेव्हा ती भारतात राहिली तर यापुढे तिचं कामाचं ठिकाण पुणे, मुंबई किंवा तत्सम शहर असणार हे तिनं सांगितलं. त्यानुसार स्थळ निवडताना ते स्थानिक असलं तरी मुलगा पुण्यात किंवा मुंबईत काम करणारा असावा असं मी आक्काला सांगितलं. आमचे सदानंदराव मात्र मुलगा चांगल्या घराण्यातला हवा यावर अडून होते आणि नोकरीपेक्षा व्यवसायात माणूस पुढे जातो या विचाराचे होते. मुलगी आपल्यापासून फार दूर जाऊ नये असं तर दोघांनाही वाटत होतं. शेवटी निर्मला त्यांची मुलगी आहे आणि तीही लहान नाही, त्यामुळे त्यांना योग्य वाटेल तो निर्णय त्यांना घेऊ द्या असं मला बायकोनं सांगितलं आणि ते मला पटलं. मामा आणि मामी असलो तरी त्यांच्या निर्णयात आम्ही प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही.
आणि एक दिवस आक्कानं मला फोनवर ‘या’ स्थळाबद्दल सांगितलं. त्यांनी फोटो आणि कुंडली पाहिल्यावर आता मुलगी पाहण्याची तयारी दाखवली होती. ही मंडळी कोल्हापूरला स्थायिक होती पण मुलगा अभिजित सी ए ची परीक्षा उत्तीर्ण केलेला पण सध्या पुण्याला त्याच्या मामाच्या फर्ममधे काम करत होता. पुढच्याच शनिवारी आक्कानं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम घरीच ठेवला होता आणि मला त्यावेळी येण्यासाठी तिनं गळ घातली. त्याप्रमाणे आक्काकडे छोटेखानी कार्यक्रम झाला. मुलगा अभिजित, त्याचे आई-वडील असे तिघेही आले होते. निर्मलाला त्यांनी पाहिली तेव्हाच त्यांना ही पसंत पडणार असा विचार माझ्या मनात आला. मलाही गोरागोमटा अभिजित आणि ती अनुरूप वाटली, आणि इतर बाबींचं कॉंबिनेशनही योग्य वाटलं. सर्वच गोष्टी जुळत होत्या. फक्त एक होकाराचा शब्द हवा होता पण तो कानावर पडायला दोन दिवस लागले. तरीही आक्काला आनंद झाला आणि ती पुढच्या तयारीला लागली.
आक्कानं मोठ्या आनंदानं निर्मलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम केला. दोन्ही बाजूची मंडळी उत्साहात होती. सगळे नातलग आणि आप्त मिळून साठ एक माणसं आली होती. निर्मला आणि अभिजित छान सजले होते आणि सगळीकडून त्यांचं कौतुक चाललं होतं. या निमित्तानं नवीन ओळखी झाल्या. माझी पहिल्यांदा ओळख झाली ते नेमके अभिजितचे मामा निघाले. आम्ही दोघेही मामा, त्यामुळे बोलायला विषय चांगला मिळाला.
” सावळी वधू बरी गौर वराला .. जोडा छान शोभतोय ” काही तरी सुरुवात करायची म्हणून मी बोललो.
” सगळं छान आहे हो .. पण हा अभिजित … याला थोडी मनाला मुरड घालायची सवय हवी. म्हणजे मी मामा असून बोलतो कारण आज ना उद्या हे कळणारच ” ते म्हणाले.
मला ते ऐकून काहीसं आश्चर्य वाटलं. मीच त्यांना थोडसं बाजूला घेऊन गेलो. माझ्यातला मनोवैज्ञानिक मला स्वस्थ राहू देईना.
” लग्नानंतर बदलतं हो .. बायकोच्या ताब्यात गेला की माणूस बदलतो. ” मी म्हणालो.
” तसं झालं तर बरंच की हो. पण काय आहे, हा एकुलता एक, त्यामुळे लहानपणापासून आई वडीलच त्याचं ऐकत आलेत, प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी व्हायलाच पाहिजे .. आता बाहेरच्या जगात असं नेहमीच कसं होणार. पण तुम्ही म्हणता तसं झालं तर आनंदच आहे. ” ते म्हणाले.
आमची ओळख झालीच होती म्हणून मी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड मागून घेतलं. माझंही कार्ड त्यांना दिलं. त्या मामांशी माझं एवढंच बोलणं झालं पण त्यावरून परिस्थितीचा अंदाज आला. मात्र याबाबत कुणाशी बोलायचं नाही असं मी ठरवून टाकलं.
साखरपुडा झाल्यावर पुढच्या कार्यक्रमाला गती आली. दोन्ही पक्षांनी मिळून लग्नाचा मुहूर्त काढला. लग्नाला सहा महिने होते त्यामुळे तयारीला वाव होता. तयारी तर आजकाल दोन्ही बाजूचे आई वडीलच करत असतात. ज्यांचे लग्न ठरलेले असते ते दोघे तर हिंडायला फिरायला मोकळच असतात. इथे तर काय दोघांचे आई वडील कोल्हापुरात आणि ही दोघे कामानिमित्ताने पुण्याला होती. त्यामुळे त्यांच्या गाठी भेटी होत असणार यात शंका नव्हती. दोघेही कधी आठवड्याच्या शेवटी कोल्हापूरला येऊन सोमवारी परत जात असत. आक्का आणि सदानंदरावांच्या डोक्यात हे लग्न सोडून दुसरा विचारच नव्हता.
*****
असे तीन महिने गेले आणि एक दिवस सकाळी आक्काचा फोन आला. ती रडकुंडीला आली होती कारण निर्मला या लग्नाला नाही म्हणत होती. तिच्यासाठी हा जणू बॉंब गोळा होता.
” आता तूच काही तरी समजूत घाल बाबा तिची. आमचं तर ती काहीच ऐकायला तयार नाही ” आक्का म्हणाली.
” ती आहे कुठे ? ” मी विचारलं.
” आहे पुण्यालाच. काल रात्री फोनवर बोलली. खूप विचार करून नाही म्हणतेय असं म्हणाली. आम्ही दोघांनी गळ घातली, तू इकडे आल्यावर बोलू असं सुचवलं. पण ही काही ऐकायला तयार नाही. नाही म्हणजे ठाम नाही असंच म्हणत राहिली. आता तूच सांग, सगळं या थराला आल्यावर आता नाही म्हटलं तर सगळीकडे छीथू होणार.. लोक काय म्हणतील .. ” ती म्हणाली.
” जरा धीरानं घे आक्का. काही तरी कारण असणार बघ. आपल्याला माहित नाही. ती इकडे आल्यावर बोलू तिच्याशी. माझी खात्री आहे ती मला सांगेल, सगळं खरं खरं सांगेल ” मी आक्काची समजूत काढत बोललो. ” तिला सध्या फोनही करू नको. आता यानंतर जेव्हा ती कोल्हापूरला येईल तेव्हाच तिच्याशी बोलायचं, आपण होऊन तो विषयही काढायचा नाही, न जाणो मधल्या काळात त्यांच्यात गैरसमज असेल तर आपोआप पॅच अप होईल… “
” तसं झालं तर ठीकच रे बाबा ” आक्का म्हणाली. सबुरी राखण्याचा मार्ग आम्ही निवडला. ते चांगलंच झालं.
माझ्या अपेक्षेप्रमाणे निर्मलानं मलाच बुधवारी फोन केला. मी शनिवार रविवार घरी असणार का अशी तिनं चौकशी केली.
‘ महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे ‘ म्हणाली. ती शुक्रवारी रात्रीच कोल्हापूरला येणार होती. तिच्याच इच्छेप्रमाणे शनिवारी सकाळी क्लिनिकमधे आमची भेट ठरली. हे तिनं आक्कालाही सांगितलं असणार कारण तिनं फोन करून ‘ नीट सांभाळ रे बाबा, आता तुझ्या हातात सगळं आहे’ असं मला सांगून टाकलं.
शनिवारी मी दहा वाजता क्लिनिकमधे जाऊन स्थानापन्न होणार एवढ्यात ‘ मामा ..’ म्हणत निर्मला केबिनमधे शिरली. आत आल्या आल्या ती मला येऊन बिलगली. तिच्या डोळ्यात अश्रू होते.
” मामा तूच मला यातून बाहेर काढ, मला हे लग्न नाही करायचं … ” ती म्हणाली.
” शांत हो निर्मला, तुझ्या इच्छेविरूद्ध लग्न होणार नाही … ” मी तिला आश्वासन दिलं. ती समोरच्या खुर्चीत बसली.
माझ्या शब्दांनी तिला दिलासा मिळाला. ती शांत झाली. मी थोडा वेळ जाऊ दिला तेव्हा तिचा आवेग ओसरला.
” आता मला एक एक करत सांग, नक्की काय झालं, तू लग्नाला नाही म्हणतेस की अभिजित नको … ” मी म्हणालो.
” मामा, मला लग्न करायचं आहे रे. पण हा अभिजित मला नको. मी खूप खूप विचार करून या निर्णयाला आले. ” ती म्हणाली.
” पण साखरपुडा झाला तेव्हा तर तू आनंदात होतीस ” मी आठवण करून दिली. ” त्यापूर्वीही तुम्ही एकमेकांशी बोलून मगच निर्णय घेतला होता, बरोबर नं ? ” मी विचारलं.
” मामा, ते सगळं भूतकाळात गेलं समज. अभिजित नक्की कसा आहे हे मला नंतरच कळत गेलं. आणि मामा, दोन तास एकत्र बसलो, बोललो म्हणून माणूस पूर्ण कळतो का ? ” तिनंच मला विचारलं.
मला होकार देणं शक्य नव्हतं. कारण ती खरं तेच बोलत होती. वर्षानुवर्षे सोबत राहूनही माणूस कळत नाही हे सिद्ध करणारी असंख्य उदाहरणं मी रोज पाहत होतो.
” पण आता तरी तो तुला पूर्ण कळला असं म्हणू शकतेस तू ?” मी विचारलं.
” नाही रे मामा. पण तो कळला नं तेवढा बस झाला. त्याच्यासोबत नाही राहू शकणार मी ” ती म्हणाली.
” हे पहा, तुझ्यावर कोणी सक्ती करणार नाही. प्रॉमिस. पण मला सांग तुमच्यात एवढं काय बिनसलंय.. तुला तो आताच न आवडण्याचं काय कारण ? ” मी विचारलं.
” मामा, त्याचा इगो … तुला कसं सांगू , त्याला कुणाची पर्वाच नाही रे. सगळं त्याला त्याच्या मनासारखंच झालेलं हवं असतं… जरासं इकडचं तिकडे झालेलं चालत नाही. आणि या सगळ्याचा त्याला अभिमान वाटतो हे तर त्याहून भयंकर ” ती म्हणाली.
मला अभिजितच्या मामांनी साखरपुड्याच्या दिवशी काढलेले उद्गार आठवले. तसाच अनुभव निर्मलाला आलेला दिसत होता.
” निर्मला, याशिवाय आणखी काही कारण ? ” मी जिज्ञासेनं विचारलं. माझ्यातला मनोवैज्ञानिक, दुसरं काय !
” आणि तो एक नंबरचा स्वार्थी आहे , जेवायला बसला की सगळं स्वत:ला वाढून घेतो. समोरच्याचा विचार सुद्धा नाही. आणि आवडी निवडी ! तशात त्याला आवडतं तेच घरी झालं पाहिजे हे त्यानं मला सांगून टाकलंय.” ती म्हणाली.
हे थोडं अति आहे हे मला जाणवलं. पण खरंच एवढं कारण असेल की आणखी काही, मी विचारात पडलो.
” या सगळ्यात निर्मला, जे तुला सहन होणारच नाही असं काही आहे का.. ” मी विचारलं.
” मामा, एवढं बस नाही का ? आणखी काय सांगू ? अरे तो फार पझेसिव्ह आहे . त्यानं मला माझ्या सोशल ग्रुप्सची माहिती खोदून खोदून विचारून घेतली. ‘मला सगळं कळलं पाहिजे’ म्हणाला. माझा मोबाईल फोनही हातातून ओढला. गेल्याच आठवड्यात.. त्यावेळचा त्याचा चेहरा मला वेगळाच वाटला … ” ती म्हणाली.
मला आता या प्रकरणी मुद्देच मुद्देच दिसू लागले. अभिजितच्या स्वभावावर औषध शोधणे हा त्या लोकांचा प्रश्न होता. मी निर्मलापुरता विचार करण्याचा निर्णय घेतला.
” ओके. निर्मला तू घरी आई बाबांना ही सगळी कारणं आता सांगून टाक. मला बोललीस हेही सांग. माझी खात्री आहे ते तुला सपोर्ट करतील. त्यांचा पाठिंबा असल्यावर आपल्याला पुढे जाता येईल. काय करायचं ते सगळं तू माझ्यावर सोड.” मी म्हणालो.
माझ्या नुसत्या बोलण्यानं निर्मलाच्या चेह-यावर हुरूप आला.
” आता मला सांग, तू अभिजितशी अजून बोलते बिलतेस की नाही… का गट्टी फू ? ” मी विचारलं.
” काय रे मामा … ” ती पहिल्यांदाच हसून म्हणाली, ” अरे बोलणं नसेल तरी आम्ही व्हॉट्सॅपवर आहोतच की. ते चालूच.
असतं. नवरा असणं वेगळं आणि फ्रेंडशिप वेगळी. ” ती म्हणाली.
ते ऐकल्याबरोबर माझ्या डोक्यात एक विचार चमकला. नजर समोरच्या भिंतीवरील कॅलेंडरवर स्थिरावली.
” पुढच्या रविवारी एकत्र जेवण घेऊया ? पुण्यात…” मी म्हणालो, ” मी तिकडे येतो. या आठवड्यात कधी तरी त्याला सांग. त्याच्या आवडीच्या हॉटेलमधेच भेटूया म्हणजे तो नाही म्हणणारच नाही. ” मी म्हणालो.
” हो, चालेल. मी नेहमीच्या हॉटेलमधे टेबल बुक करून ठेवते.” ती म्हणाली.
” आणि एक, चौघांसाठी बुक कर, मी त्याच्या मामांना बोलावणार आहे … ” मी म्हणालो.
” ते कशासाठी …? ” ती हेल काढत म्हणाली.
” ते तुला नंतर कळेल ” मी म्हणालो. माझ्या मनात योजना पक्की झाली होती.
माझ्या अपेक्षेप्रमाणे आक्काचा फोन दुपारीच आला. निर्मलानं तिला सगळं सांगितलं होतं. ते ऐकल्यावर हे लग्न न झालेलं बरं असं तिलाही वाटल होतं. आधी सदानंदरावांनी थोडी खळखळ केली होती, पण यातून बाहेर पडायला ते तयार झाले होते.
” आता तूच बघ रे बाबा. सगळं तुझ्यावर सोपवते … ” ती म्हणाली.
नंतर दोन दिवसांनी निर्मलाचा पुण्याहून फोन आला. माझ्या सांगण्यानुसार तिनं हॉटेलमधे रविवारच्या जेवणासाठी एक टेबल आरक्षित केलं होतं. मी नंतर अभिजितच्या मामांना फोन करून जेवणासाठी आमंत्रण दिलं.
” भेटून खूप दिवस झालेत, एकदा भेटूया ” मी म्हणालो. निर्मला आणि अभिजित पण असतील हे सांगितलं.
त्यांनीही आढेवेढे घेतले नाहीत. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाचा पुन्हा एकदा अनुभव आला.
” नक्की भेटू. ” ते म्हणाले.
आणि त्या रविवारी आम्ही हॉटेलमधे जेवणासाठी एकत्र आलो. तरूणाईनं बरीच गर्दी केली होती तरी आम्हाला एका कोप-यात टेबल मिळालं. एका बाजूला निर्मला आणि मी तर दुस-या बाजूला अभिजित आणि त्याचे मामा असे आम्ही समोरासमोर बसलो.
वेटरनं मेन्यू कार्ड्स आणून टेबलावर ठेवली.
” सांग तू काय हवंय ते … ” निर्मलाच्या हातात एक कार्ड देत म्हणालो.
” थांबा मी ऑर्डर करतो … ” तिच्या हातून कार्ड काढून घेत अभिजित म्हणाला. त्यानं हात वर करून वेटरला बोलावलं आणि कार्डवर नजर टाकत काय घ्यायचं ते ठरवलं.
वेटर जवळ आला तेव्हा कुणाला काही न विचारता त्यानं ऑर्डर दिली. ती घेऊन वेटर निघून गेला.
” इथं काय चांगलं मिळतं मला माहित आहे ” आमच्याकडे बघत अभिजित म्हणाला. मी आणि मामा एकमेकांकडे बघत होतो.
” मामा, सध्या व्यवसाय काय म्हणतो ? ” मी अभिजितच्या मामांना विचारलं.
” चांगला चाललाय. जी एस् टी मुळे व्यापारी वर्गाची रिटर्न्स वगैरे खूप कामं वाढलीत. आमच्या व्यवसायात तसं मरण नाही पण जनसंपर्क ठेवावा लागतो, मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात, विश्वास संपादन करावा लागतो… ” मामा म्हणाले.
” अभिजित, तू सध्या मामांकडे असतोस. पुढे काही स्वत:चा व्यवसाय करणार की मामांकडेच… ” मी विचारलं.
” मला काय गरज, मामांची प्रॅक्टीस आहेच की. त्यामुळे सध्या तरी मी कुठला विचार करत नाही. ” तो म्हणाला.
” असं कसं, काही अॅंबिशन वगैरे … ” मी म्हणालो.
” आपण इथेच बरे आहोत. ” अभिजित म्हणाला.
” अभिजित, लग्नानंतर निर्मलाची बदली बंगलोरला झाली तर काय करशील ? ” मी विचारलं.
” अशी कशी होईल ? ” त्यानं विचारलं.
” का नाही , ती तर अमेरिकेतही होऊ शकते. ” मी म्हणालो.
ते ऐकून अभिजित गडबडला. त्यानं याबाबत काहीच विचार केला नव्हता हे उघड होतं.
” अभिजित, निर्मलाशी कधी या विषयावर बोलणं नाही झालं ? ” मी विचारलं.
” मी बोलले होते. पण यानं ते मनावर घेतलं नाही. वेळ येईल तेव्हा पाहू म्हणाला … ” निर्मला म्हणाली.
एवढ्यात वेटर आला आणि त्यानं ट्रेमधून आणलेले पदार्थ टेबलावर मांडले. अभिजितचं लक्ष विचलित झालं. त्यानं लगेच दोन वाडगे पुढ्यात ओढले आणि स्वत:च्या प्लेटमधे पदार्थ वाढून घेतले.
” तुम्ही पण घ्या. ” तो आम्हाला म्हणाला. त्यानं वाडगे पुढे सरकवले.
” थॅंक्स ” मी म्हणालो. मग निर्मलानं इतरांच्या प्लेट्स भरल्या.
” घ्या मामा ” ती आम्हा दोघांना म्हणाली. आम्ही जेऊ लागलो.
” इथला पनीर टिक्का मसाला मला खूप आवडतो ” अभिजित म्हणाला. त्याला जेवण आवडलं होतं.
” अभिजित, आपण तू आणि निर्मलाबद्दल आता बोलूया, तुम्ही एकमेकांना आवडलात का ? ” मी विचारलं.
” ती मला आवडली आहे . ” अभिजित चट्कन म्हणाला.
” आणि निर्मला, तू काय सांगशील ? ” मी विचारलं .
” मामा, मी यावर खूप विचार केलाय आणि आता मी म्हणू शकते की आम्हा दोघांचं ट्यूनिंगच वेगळं आहे.” ती म्हणाली.
” म्हणजे काय ? ” अभिजित तिच्याकडे बघत म्हणाला.
” मी काय बोलतेय ते तुला पूर्ण कळतंय अभिजित. ” निर्मला म्हणाली. ” तू मला कधी आवडला होतास पण आता म्हणशील तर तुझ्याशी लग्न केलं तर ती माझी चूक होईल असं मला वाटतं आणि ती चूक मी करणार नाही.”
” पण मग इतके दिवस… ” अभिजितनं बोलायला सुरूवात केली.
” थांब अभिजित, ” त्याचे मामा म्हणाले ” निर्मला जर असं म्हणत असेल तर आता तो मुद्दा फार ताणण्यात अर्थ नाही.”
” मलाही तसंच वाटतं अभिजित, माझी अनेक वर्षांची प्रॅक्टिस आहे, अनेक असफल विवाह मी पाहिले आहेत. मला वाटतं जेव्हा मन ‘नाही’ म्हणत असतं तेव्हा ओढून ताणून लग्न करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे तुम्ही दोघांनी झालं गेलं विसरून पुढे जाणंच योग्य ठरेल.” मी म्हणालो. अभिजित गप्प राहिला.
आमचं जेवण निम्म्यावर आलं होतं तेव्हाच जेवणाचा बेरंग झाला होता. पण मी तशी तयारी ठेवली होती.
” मामा, ” अभिजितच्या मामांकडे बघत मी म्हणालो, ” आपण भविष्याचा विचार करत हा निर्णय घेतला पाहिजे. मी हिच्या आई-वडिलांना सांगतो, तुम्ही याच्या आई-वडिलांना सांगा. अभिजित आज विचार करतो त्यापेक्षा काही वेगळा विचार त्यांना करावा लागेल असं मला वाटतं. “
” तुमचं म्हणणं मला पटतंय ” मामा म्हणाले. ” आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. “
ते ऐकून माझा जीव भांड्यात पडला.
” पण मामा, आज या मुलांकडून एक शिकूया, आजकालची मुलं मैत्री आणि लग्न यात गल्लत करत नाहीत. आपण मित्र म्हणून नक्कीच संबंध ठेऊ शकतो.” मी म्हणालो.
” आणि आज तर फ्रेंडशिप डे आहे … ” पर्समधून गुलाबाचं फूल काढून अभिजितला देत निर्मला म्हणाली.
[ कथामालिका समाप्त ]
– मुकुंद नवरे
mnaware@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पाखरे भिरभिरती अंबरी : भानू शिरधनकर
विस्मृतीत गेलेली पुस्तके
प्रस्तावना
मुकुंद गणेश सहस्त्रबुद्धे
प्रिय वाचक,
‘ऑलिम्पिकची नवलकथा’ या कै. भानू शिरधनकर यांच्या पुस्तकाची सुरुवातीची काही प्रकरणे ‘मैत्री’च्या आपल्यासमोर सादर केली होती आणि आपण त्याला उत्तम प्रतिसाद दिला. ते पुस्तक आपण विकत घेऊन वाचावे अशी अपेक्षा आहे. आज शिरधनकरांच्या ‘पाखरे भिरभिरती अंबरी’ या आणखी एका रोचक पुस्तकाची प्रस्तावना साभार पुनःप्रसिद्ध करत आहोत. – सं.
ब-याच वर्षांपूर्वी एकदा आमचे वडीलधारे मित्र ‘वाङ्मयशोभे’चे श्री. नाना केळकर गप्पा मारायला घरी आले होते. त्यांचेबरोबर एक अपरिचित गृहस्थ होते. घरी त्याचवेळी आणखी दोनतीन मित्रही आले होते. सुटीचा दिवस होता आणि सकाळची वेळ होती. चहापाणी झाल्यावर घरातली मंडळीही गप्पांत सामील झाली. केळकरांच्या नवीन प्रकाशनाबद्दल विचारता त्यांनी शिरधनकरांच्या ‘सर्कसचे विश्व’ या नव्याने प्रकाशित होणा-या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. विषय असा होता की सा-यांनीच त्यात उत्साहाने भाग घेतला. कुणीतरी सहज म्हटलं की या पुस्तकाच्या लेखकाची भेट झाली पाहिजे. त्यावर नाना केळकरांनी विचारलं, ‘तुम्ही त्यांना बघितलं नाही ?’ लगेच त्यांनी पलीकडच्या खुर्चीत निर्विकार शांतपणे बसलेल्या एका मध्यमवयीन गृहस्थाकडे बोट दाखवलं. आम्ही सर्व अवाक झालो. नानांबरोबर आलेल्या त्या अपरिचित गृहस्थांची आम्ही साधी चौकशीही केली नव्हती. आणि त्यांनीही आपल्या अस्तित्वाची जराही जाणीव होऊ दिली नव्हती. अर्थातच सर्वांनी नंतर त्यांना चांगलंच घेरलं. त्याना नाना प्रश्न विचारले. आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा आवडता विषय निघाल्याबरोबर इतका वेळ गप्प बसलेला हा गृहस्थ एकदम इतका बोलका झाला की वेळ किती गेला ते समजलंच नाही. सर्वजण अगदी खूष झाले. श्री. शिरधनकरांशी प्रथम परिचय हा अशा रीतीने झाला. नंतर अधूनमधून भेटी होत राहिल्या. पण त्यांचे आवडीचे विषय सोडले तर बाकीच्या विषयांवर बोलायला ते फारसे उत्सुक नसत.
दुस-या महायुद्धानंतरच्या काळात शिरधनकरांनी सागरी जीवन आणि शिकारकथा, प्राणीकथा इत्यादी विषयांचे लेखक म्हणून मिळवलेली लोकप्रियता अमाप होती. पण तरीही कोणत्याही सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमात ते उपस्थित असल्याचं कधी ऐकलं नव्हतं. आमच्यापैकी कुणीही त्यांना ओळखलं नव्हतं ते त्यामुळेच.
काही वर्षांपूर्वी ‘अभिनव प्रकाशन’च्या श्री. वामनराव भटांबरोबर ते घरी येऊ लागले. वामनरावांनी त्यांची सांगितलेली एक आठवण सांगण्यासारखी आहे. शिरधनकरांची नोकरी संपल्यावर कित्येक वर्षे त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम त्यांना मिळाली नव्हती. आणि अनेक वर्षं त्यांच्याबरोबर वावरलेल्या वामनरावांनाही त्यांनी ते सांगितलं नव्हतं. संकोचापोटी शिरधनकर कोणाशी हा विषय काढीत नसत. पैसे त्यांचे होते आणि त्यांना त्याची गरजही होती. पुढे कोणीतरी त्यांच्या कचेरीत हे प्रकरण नेलं. शिरधनकरांचे प्रेमी तिथेही होते. त्यांनी इतर कामं बाजूला सारून, जुने कागद तपासून त्यांचे पैसे त्यांना देण्याची व्यवस्था केली. अगोदर कळते तर अगोदरही मिळाले असते. पण यांच्या संकोचापुढे कोण काय करणार !
उत्तरोत्तर अधिक परिचय झाल्यावर एक वेगळेच शिरधनकर दिसू, जाणवू लागले. हे शिरधनकर म्हणजे सा-या निसर्गाशी एकरूप झालेला एक अवलिया होता. उंच, शेलाटी अंगकाठी, तरतरीत नाक, तुकतुकीत सावळा वर्ण आणि विलक्षण भावपूर्ण डोळे असलेले शिरधनकर एरवी कितीही अबोल असोत पण निसर्गाबद्दल बोलणं निघालं म्हणजे मग त्यांच्याकडे पाहात राहावं. पशुपक्ष्यांबद्दल बोलताना वा लिहिताना ते अगदी त्यांच्यापैकी एक असल्यासारखं बोलत. जणू ते आपल्या भाऊबंदांबद्दलच बोलताहेत. असं वाटे, की त्यांना त्यांची भाषाही समजत असली पाहिजे.
एक दिवस असेच अचानक शिरधनकर घरी आले आणि एक हस्तलिखित ठेवून गेले. उघडून पाहतो तो ते प्रस्तुत ग्रंथाचं हस्तलिखित होतं. योगायोग असा की त्याच सुमारास मी बरीच मोठी सुट्टी घेऊन लोणावळ्याला जाऊन राहणार होतो. अर्थातच असा ग्रंथ वाचण्याची अगदी खास सोय झाली. हा ग्रंथ वाचताना त्यांच्या निसर्गाशी असलेल्या तादात्म्याची खात्री पटली. आयुष्यभर निरीक्षण करून पक्ष्यांबद्दल जी माहिती त्यांनी जमवली ती अगदी काळजीपूर्वक, खुलासेवार आणि रंगतदारपणे त्यात मांडली होती. वाचताना प्रथमच ध्यानात आलं की पक्षी कसा बघावा हेच मुळी मला माहित नव्हतं. पण त्यांचं लिखाण वाचायला लागल्याबरोबर अगदी ‘तिला उघड’ म्हटल्यासारखं पक्ष्यांच्या जगांत माझा अलगदपणे प्रवेश झाला.
सकाळ संध्याकाळ फिरायला जाताना मी आपोआपच पक्षी पाहू लागलो. त्यांची नावं समजावून घेऊ लागलो. त्यांचं निरीक्षण करू लागलो. लिखाण इतकं नेमकेपणाने लिहिलं आहे की बरेचसे पक्षी पाहिल्यावर त्यांची नावं लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. शंका आली अथवा अधिक माहिती हवी असली तर पुन्हा एकदा लिखाणातला तेवढा भाग काढून वाचायचा, म्हणजे काम भागत असे. पक्ष्यांचा आकार, रंग रूप, आवाज, बसणं – उडणं, उडण्याची पद्धत इत्यादींकडे जाणीवपूर्वक लक्ष जाऊ लागलं. शिरधनकर नुसतेच माहितगार नाहीत. तर ते एक सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांच्या लिखाणाचा प्रभावच असा आहे की पक्षीगणांचं सौंदर्यही आपोआप आपल्यापुढे उलगडत जातं.
सुट्टी संपल्यावर लोणावळा सोडून मी परतलो. पण माझं पक्ष्यांबद्दलचं आकर्षण मात्र मला सोडून गेलं नाही. ते उत्तरोत्तर वाढतच गेलं. अजूनही वाढत आहे. आजही सहलींना गेल्यावर – मग ते गावात असो, डोंगरात, रानात वा समुद्रावर असो – मन पक्षी शोधू लागतं. सापडले म्हणजे त्यात रमू लागतं. आगगाडीने जातानाही आता मला ते दिसतात. एवढंच काय पण, माझ्या मध्य मुंबईतल्या घराजवळही ते दिसतात. कावळे आणि कबुतरं तर सोडाच, पण पूर्वी कधीही न दिसलेले पोपट, दयाळ, गवई, कोतवाल, हळद्या यांच्यासारखे नावाजलेले सुंदर पक्षीही मला माझ्या राहत्या परिसरात दिसू लागले आहेत. हे पक्षी पूर्वी कुठे होते ? असं कसं झालं ? मला ते पक्षी पूर्वी का दिसले नाहीत ?
मी काही कुणी पक्षीतज्ज्ञ नाही. पक्षी पाहावेत असंही मला पूर्वी कधी वाटलं नाही. पण शिरधनकरांच्या ‘पाखरे भिरभिरती अंबरी’नं माझ्यात कसा बदल झाला आणि मला एक नवा आनंदाचा विषय कसा प्राप्त झाला हे सांगण्याकरताच हे सर्व लिहिलं. शिरधनकरांचं असामान्य अनुभवविश्व, सौंदर्यदृष्टी आणि निवेदनकौशल्य यांच्यामुळे कोणीही वाचक असाच बदलून जाईल आणि पक्षीप्रेमी बनेल याबद्दल मला थोडीही शंका नाही.
– मुकुंद गणेश सहस्त्रबुद्धे
पाखरे भिरभिरती अंबरी : लेखक भानू शिरधनकर
प्रकाशक : वामन विष्णु भट, अभिनव प्रकाशन, ५३, गुरु नानक मार्केट, दादर, मुंबई ४०० ०१४.
प्रथमावृत्ती : डिसेंबर १९७९
किंमत : २० रुपये
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कै. सचित वाघ – प्रेषक सुभाष फडके
आय पी जी सादरीकरण – मंदार मोडक