श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ‘डोह’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १९६५ साली प्रकाशित झाली.
श्रीनिवास कुलकर्णींचे बालपण सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या औदुंबर या गावी गेले. बालपणीचे हे औदुंबर गाव, त्या गावचा परिसर, तेथील माणसे,निसर्ग एवढंच नव्हे तर तिथली प्राणी-सृष्टी या सर्वांचे अत्यंत प्रभावी चित्रण ‘डोह’मधील लेखांत दिसून येते.
‘डोह’मधल्या एकूण अकरा लेखांपैकी ‘सुसरींचे दिवस’ आणि ‘हा चौघडा झणाणे’ हे दोन लेख ‘मौज’मध्ये प्रसिद्ध झाले तर उर्वरित सर्व लेख ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाले. या सर्व लेखांचा प्रसिद्धी कालखंड १९६१ ते १९६५ असा आहे.
‘डोह’मधील या सर्व अकरा लेखांत औदुबरच्या परिसरातील निसर्ग आणि त्याची विविध रूपे तसेच तेथील समाजजीवनाचा भाग बनलेल्या प्राण्यांचे अनोखे विश्व हे श्रीनिवास कुलकर्णींनी अत्यंत सूक्ष्म आणि तरल नजरेनं टिपलं आहे.
‘डोह’मधील ‘आम्ही वानरांच्या फौजा’, ’जुन्या जन्मीची माणसे’, ‘रात दिवाभीताची’ आणि ‘सुसरींचे दिवस’ हे चार लेख अनुक्रमे वानर, वटवाघूळ, घुबड आणि सुसर या प्राण्यांवरील आहेत. हे चारही लेख संपूर्ण पुस्तकात त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. खरं म्हणजे ह्या चारही लेखांनी ‘डोह’वर आपला ठसा उमटवलाय असं म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
हे सर्व खरे असले तरी या पलीकडे जाऊन या प्राण्यांविषयी जी निरीक्षणे नोंदली आहेत त्यांचा खरे-खोटेपणा तपासावा, शास्त्रीय निकषांवर ती टिकतात का याचा शोध घ्यावा असा प्रयत्न त्यांनी केला नाही.किंबहुना त्याची आवश्यकताही त्यांना वाटली नाही हे येथे नमूद करावेसे वाटते. ‘सुसरींचे दिवस’ किंवा ‘जुन्या जन्मीची माणसे’ हे लेख म्हणजे ललित लेखनाइतकेच निसर्ग-शास्त्राचेही लेखन आहे ही गोष्ट त्यांनी ध्यानात घेतली नाही. केवळ ललित लेखन म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले.
माझ्या मते या पैलूकडे दुर्लक्ष होण्याचे एक कारण असे असू शकते की त्या काळात ग्रामीण भागाचा आजच्यासारखा विकास झाला नव्हता आणि मुंबई वगळता पुण्यासह सर्व शहरांच्या परिसरातील निसर्ग बऱ्यापैकी टिकून होता. शहरातील लोकांची नाळ आपल्या मूळ गावांशी जुळलेली होती. त्यामुऴे ‘डोह’मधील निसर्ग त्यांच्या दृष्टीने अगदीच अनोखा नव्हता. कुठे ना कुठे तो त्यांना भेटत होता. साहजिकच वाचक आणि समीक्षकांनी श्रीनिवास कुलकर्णींच्या लेखनातील इतर पैलूंकडेच अधिक लक्ष दिले आणि त्यांतील निसर्ग-शास्त्र उपेक्षित राहिले.
आपल्यापाशी जे नसते त्याचीच जास्त ओढ लागते, हा साधा नियम आहे. त्यामुळे आजच्या पिढीत निसर्गाविषयी आकर्षण वाढलेले दिसते. त्याचाच परिणाम म्हणून निसर्ग आणि पर्यावरण या विषयांवर विपुल प्रमाणात साहित्य गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झाल्याचे तसेच ह्या विषयावरील पुस्तकांच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येते.
जागतिक पातळीवर निसर्गशास्त्राचे लेखन ललित अंगाने मांडण्याचे श्रेय सर्वप्रथम स्वीडनचा सर्वश्रेष्ठ निसर्ग-शास्त्रज्ञ कार्ल लिनीअस याच्याकडे जाते. त्याने अठराव्या शतकात वनस्पती,पशु-पक्षी,कीटक यांविषयी ललित शैलीत शास्त्रीय लेखन केले. त्यानंतर युरोपमध्ये अनेकांनी त्याचे अनुकरण केले. मराठीतही आता हा प्रकार रूढ झाला आहे.
मराठीत व्यंकटेश माडगुळकरांनी प्रथम हा प्रकार हाताळला आणि मारुती चितमपल्लींनी तो रुजवला असे मानले जाते. परंतु माडगूळकर आणि चितमपल्लींच्याही खूप काळ आधी श्रीनिवास कुलकर्णींनी अशा प्रकारचे लेखन ‘डोह’मधील या चार लेखांत फार मोठ्या ताकदीने केले ही गोष्ट ‘डोह’ वाचल्यानंतर लक्षात येते.
तसे पाहिले तर श्रीनिवास कुलकर्णी हे माडगूळकर अथवा चितमपल्लींसारखे निसर्ग अभ्यासक किंवा शास्त्रज्ञ नाहीत. त्यामुऴे रुढ अर्थाने ह्या लेखनास निसर्गशास्त्राचे लेखन म्हणता येणार नाही.
खरे तर या प्राण्यांविषयीची माहिती लेखकाला दादा, थोरली आई, आबू ,नाना शिंगटे इत्यादींकडून मिळाली. याच्या जोडीला लेखकाचे स्वतःचेही निरीक्षण होते.म्हणूनच लेखांतील निरीक्षणे शास्त्रीय असल्याचा दावा लेखकाने कधी केला नाही किंवा त्यांची सत्यासत्यता तपासून पाहण्याचा प्रयत्नही केला नाही.
थोडक्यात सांगायचे झाले तर निसर्गशास्त्राची माहिती लेखकापर्यंत पोहोचण्याची कोणतीही प्रसार-माध्यमे त्या काळात लेखकाकडे उपलब्ध नव्हती.याचाच अर्थ ह्या चारही लेखांतील निरीक्षणांचे श्रेय श्रीनिवास कुलकर्णींचे स्वतःचेच आहे.
ही वस्तुस्थिती डोळ्यांसमोर ठेवून जेव्हा या लेखांचा मी निसर्गशास्त्राच्या दृष्टीकोनातून अभ्यास केला तेव्हा जरा चकित झालो.कारण यातील अनेक निरीक्षणे शास्त्रीयदृष्ट्या अचूक होती. अर्थात काही निरीक्षणे आणि त्यातून काढलेली अनुमाने चुकीची होती हे येथे नमूद करायला हवे.पण ही गोष्ट साहजिक होती शिवाय त्यांचे प्रमाणही अल्प होते.
याची सुरुवात ‘आम्ही वानरांच्या फौजा’ या लेखापासून करू.
श्रीनिवास कुलकर्णींचा सत्यकथेत (ऑक्टोबर १९६१) प्रसिद्ध झालेला हा पहिला लेख. ‘डोह’मध्येही या लेखाचा क्रमांक पहिलाच आहे.
या लेखात श्रीनिवास कुलकर्णींनी औदुंबरमधील वानरांची मजेशीर निरीक्षणे टिपली आहेत. परंतु त्याचबरोबर ‘वानरांच्या टोळीतील टोळीप्रमुख नराकडून टोळीतील नर-पोरांची होणारी हत्या’ आणि ‘टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ‘ ही दोन अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत. ‘वानरांच्या टोळीत सत्तांतर होते’ ही माहिती त्यातून मिळते. ही दोन्ही निरीक्षणे वस्तुस्थितीला धरून आहेत.
खरे म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘सत्तांतर‘ या कादंबरीचे बीजच या लेखात आहे. स्वतः माडगूळकरांनीही सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.त्यात त्यांनी म्हटलेय, ’वानरांविषयी कुतूहल वाटावे असा लेख मी प्रथम श्रीनिवास कुलकर्णी यांच्या ‘डोह’ (१९६५) या ललित गद्य संग्रहात वाचला.’
याच प्रस्तावनेत माडगूळकरांनी, भारतातील वानरांवर म्हणजेच हनुमान लंगूरवर कोणी कोणी संशोधन केले याची सविस्तर माहिती दिली आहे.
भारतातील वानरांचा पद्धतशीर अभ्यास प्रथम चार्ल्स मॅकन (१९३३) आणि फिलिस जे (१९५८) यांनी केला. त्यानंतर१९५८ ते १९७५ पर्यंत वानरांवर एकूण अकरा महत्वपूर्ण अशी संशोधने झाली. त्यात ‘प्रायमेट्स ऑफ एशिया’,’ द लंगूर्स ऑफ अबू’ अशा महत्त्वाच्या ग्रंथांचा समावेश होता. हे सर्व लिखाण श्रीनिवास कुलकर्णींच्या वाचनात येण्याची अजीबात शक्यता नव्हती हे या पूर्वीच स्पष्ट झाले आहे.
वानरांवरील या लेखानंतर वटवाघळांविषयीचा ‘जुन्या जन्मीची माणसे’ हा लेख जानेवारी १९६३ मध्ये सत्यकथेच्या अंकात प्रसिद्ध झाला.
या छोटेखानी लेखात वटवाघळांची अनेक सुंदर निरीक्षणे नोंदलेली आहेत. वटवाघळे कशी वितात, पाणी कशी पितात, फळे कशी खातात, त्यांचे उडणं, त्यांच्या हालचाली यांची मनोरंजक माहिती त्यातून मिळते.
या लेखात ज्या वाघळांचे तपशिलांत वर्णन आलेय ती वाघळे ‘फ्लाइंग फॉक्स’ या प्रकारची आहेत, ही गोष्ट सहज ध्यानात येते.
या वाघळांबरोबरच घरात चुकून शिरणाऱ्या पाकोळीचेही वर्णन या लेखात आहे. लेखक पाकोळ्यांना ‘वाघळांची पिले’ असे समजायचा. परंतु’ पाकोळीच्याच आकाराएवढी पण वटवाघळाचीच वेगळी जात’ असे थोरल्या आईचं मत होतं. थोरल्या आईचं हे निरीक्षण अचूक होते.
‘फ्लाईंग फॉक्स’ आणि ‘इंडिअन पिपीस्ट्रील’ या दोन वाघळांव्यतिरिक्त आणखी दोन प्रकारच्या वाघळांचा उल्लेख या लेखांत आहे. हे दोन्ही उल्लेख त्रोटक स्वरुपात आहेत. परंतु निरीक्षण अचूक असेल तर छोट्या निरीक्षणातूनही योग्य अनुमान काढता येऊ शकते असे मला वाटते.
या वाघळांसंबधीचे लेखातील ते दोन उल्लेख असे आहेत :
‘वाघळे अगदी जवळून पाहता आली ती देवाच्या आवारातून वरती आलेल्या उंबरावर लटकणारी. दोन वाघळे नेहमी तिथे जोडीने असत.’
‘एक वाघळ दिवटीच्या मळीतल्या फणसावर राही. आमच्या गावातील त्या एकुलत्या फणसाला ओळखणारे वाघळ इतरांहून वेगळे असले पाहिजे.’
हे ते दोन उल्लेख.
‘नेहमी जोडीने राहणारी’ आणि ‘फणसावर एकट्यानं राहणारे’ ही निरीक्षणे ती वटवाघळे कोणत्या प्रजातीची असावीत हे ओळखण्यास मदत करतात. प्रेटरच्या ग्रंथातील माहितीवरून ती ओळखण्याचा मी प्रयत्न केला.
प्रेटरच्या ‘इंडिअन ऍनिमल्स’ या ग्रंथात भारतात आढळणाऱ्या वाघळांच्या एकूण अकरा प्रजातींची माहिती दिली आहे. या दोन वाघळांची ओळख पटवताना प्रथम मी अकरांमधील ‘फ्लाईंग फॉक्स’ आणि ‘इंडिअन पिपीस्ट्रील’ ही दोन वाघळे वगळली. तसेच ‘सेरोटीन’ हे वाघळ हिमालय आणि आसाम या भागांतच आढळते. त्यामुळे त्याचाही विचार केला नाही.
तसेच ‘फल्व्हस फ्रूट बॅ’ट, ‘बिअर्डेड शिथ-टेल्ड बॅट’, ‘इंडिअन फाल्स व्हॅम्पायर’ आणि’ कॉमन यलो बॅट’ ही चार वाघळे फार मोठ्या संख्येने वस्ती करतात (ROOSTING). त्यावरून लेखांतील ही दोन वटवाघळे यापैकी नाहीत हे स्पष्ट होते.
‘टिकल्स बॅट’ संबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही इतकं ते दुर्मीळ आहे.
लेखातील ही दोन्ही वाघळे वेगळ्या जातीची आहेत असे लेखकाचे निरीक्षण आहे. त्यामुळे साहजिकच उंबरावर नेहमी जोडीने आढळणारे वाघूळ हे ‘ग्रेट इस्टर्न हॉर्स शू बॅट’ या प्रजातीचे तर त्याहून वेगळे ,गावातल्या एकुलत्या फणसावर एकट्याने राहणारे वाघूळ हे ‘शॉर्ट नोज्ड फ्रूट बॅट’ या प्रजातीचे असावे असा निकर्ष मी या दोन निरीक्षणांवरून काढला.
वाघळे पाणी कशी पितात त्याचेही वर्णन लेखकानं केले आहे. हे निरीक्षण लेखकाचे स्वतःचे आहे. विशेष म्हणजे या लेखानंतर जवळ-जवळ सत्तावीस वर्षांनी मारूती चितमपल्लींनी लिहिलेल्या ‘ पवित्र पंखांची वाघुळं ‘या लेखात केलेले वर्णनही असेच आहे. याच लेखात चितमपल्लींनी , ‘वाघळांविषयी इतकं नाजूक,हळुवार लिहिताना मला कुठं आढळून आलं नाही ‘ असं श्रीनिवास कुलकर्णींच्या लेखाविषयी लिहिले आहे.
वटवाघळांसंबंधीची बरीचशी माहिती गावातल्या नाना शिंगटेने लेखकाला दिली. नाना शिंगटेने वाघळांचा चांगलाच अभ्यास केला होता.वाघळे कशी वितात याचेही फार छान वर्णन त्याने केलेय.
‘वाघळीला एका वेळी एकच पिलू होते. तिची पिलू बाहेर यायची जागा ती लोंबकळत असताना वरच्या बाजूला असते. पिलू बाहेर यायच्या वेळी वाघळी आपल्या पायांनी ते काढून घेऊन छातीशी झेलते.’
असे नानाचे निरीक्षण होते.हे निरीक्षण ‘फ्लाईंग फॉक्स’ प्रजातीच्या संदर्भात होते.
प्रेटरच्या ग्रंथात फ्लाईंग फॉक्स वाघळांमधील विण्याच्या क्रियेचे वर्णन नाही पण इंडिअन पिपीस्ट्रील वाघळे कशी वितात त्याचे वर्णन आहे आणि ते नाना शिंगटेच्या वर्णनाशी तंतोतंत जुळते.
नाना शिंगटे वाघळांचा जाणकार होता. नानाच्या मते फळांची जाणकारी वाघळांइतकी कुणालाच नसते.तसेच ‘ वाघळं विमानागत जातात आणि आंब्याच्या दिवसांत गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात’ हा नानाचा शोध होता.
नानाने हा शोध कसा लावला ते समजत नाही. खरे म्हणजे औदुंबर कोकणापासून बरेच दूर पूर्वेला आहे. साताऱ्यातील वाघळे रात्री चिपळुणात जातात असे कुणी सांगितले तर त्याचे विशेष वाटत नाही. फार पूर्वीपासून सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळीच्या बाजारात चिपळूणकडची माणसे तांदूळ विकायला येत त्यावरून तसा अंदाज येतो. परंतु रत्नागिरी आणि औदुंबर यांमध्ये असा काही संबंध दिसून येत नाही. त्यामुळे नानाचा हा शोध म्हणजे चक्क थाप असावी असे मला वाटले.
परंतु एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सहजच महाराष्ट्राचा मोठा नकाशा उघडला. एक फूटपट्टी घेऊन रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणे जोडून पाहिली आणि मी चक्क उडालो. ही दोन्ही ठिकाणे आडव्या सरळ रेषेत आहेत. स्पष्टच सांगायचे झाले तर दोन्ही गावे जवळ-जवळ एकाच अक्षांशावर आहेत.म्हणजे औदुंबरचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचेल.
नानाचा हा शोध खरा ठरला. आयुष्यात ज्याने कधी रत्नागिरी बघितली होती की नाही याची शंका यावी अशा नानाने साठ-एक वर्षांपूर्वी, आजच्यासारख्या गुगल मॅपसारख्या सुविधा उपलब्ध नसताना, हा अद्भूत शोध कसा लावला याचे नवल वाटते.
‘सुसरींचे दिवस’ हा लेख १९६४ साली ‘मौज’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. चाळीसहून अधिक पानांचा हा लेख, ‘डोह’चा मास्टरपीसच आहे.
औदुंबर गावातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या डोहातील सुसरी आणि गावकरी यांच्यातील सहजीवनाचे अप्रतिम चित्रण या लेखात पाहायला मिळते.
या लेखातील, सुसरींविषयीची माहिती शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासण्यापूर्वी सुसरींची शास्त्रीय माहिती पाहू.
भारतात तीन प्रकारच्या सुसरी आढळतात. मार्श क्रोकोडाईल,सॉल्ट व़ॉटर क्रोकोडाईल आणि घडियाल. यातील . मार्श क्रोकोडाईल आणि घडियाल ह्या गोड्या पाण्यातील सुसरी आहेत.
शास्त्रीय वर्गीकरणानुसार ह्या तीनही सुसरी ‘क्रोकोडिलिनी’ या उपकुलात मोडतात. त्यांच्या खालच्या जबड्यातील चौथा सुळा दात वरच्या जबड्याला असलेल्या खळगीसारख्या भागातून वर आलेला दिसतो. सुसरीचे तोंड मिटले असले तरी तो जबड्याबाहेर डोकावताना दिसतो.
मार्श क्रोकोडाईल आणि घडियाल यांमधील मुख्य फरक असा की, घडियालच्या नाकाचा टोकाचा भाग (चुंबळ) गोलाकार घड्यासारखा दिसतो. त्यावरूनच तिला घडियाल हे नाव पडलं.मार्श क्रोकोडाईलपेक्षा ती लांबीला अधिक असून तिची लांबी १६ ते १८ फूट एवढी असते. ती फक्त मासे व पक्षी खाते.घडियाल विशेषकरून उत्तर भारतातील नद्यांत आढळतात तर मार्श क्रोकोडाईल आपल्याकडे आढळतात.
मार्च-एप्रिल महिन्यांत सुसर नदीकाठच्या प्रदेशात अंडी घालण्यासाठी योग्य जागेच्या शोधात रात्री हिंडते. त्या वेळी मातीत तिच्या सरपटल्याच्या खुणा दिसतात.(यालाच सरपट पडणे असे गावकरी म्हणत)
पावसाळ्यात नदीचे पाणी पोहोचणार नाही अशा बेताने तेवढ्या उंचीवर जमिनीत खळगा करून त्यात सुसर अंडी घालते. साधारणतः ६०ते ७० अंडी एकाच वेळी घातली जातात. अंडी घातल्यावर सुसर शेपटीने माती पसरवून खड्डा बुजवून टाकते.
सुसर स्वतः अंडी उबवत नाही. खड्ड्यातील उबेमुळे अंडी उबतात. सुसरीच्या अंड्यातील गर्भामध्ये सेक्स क्रोमोसोम नसतो. गर्भाचे लिंग खड्ड्यातील तापमानावरून ठरते. ३० अंश सेल्सिअस तापमान असेल तर गर्भ मादी असण्याची शक्यता असते. ३१अंश से. असेल तर नर किंवा मादी आणि ३२-३३ अंश से. तापमान असेल तर गर्भ नर असण्याची शक्यता जास्त असते. तापमानाचा गर्भाच्या वाढीवर आणि सर्व्हायवल रेटवरही परिणाम होतो.कमी तापमानात गर्भाची वाढ अपूर्ण होते. पिले अशक्त निपजतात. साधारणतः ८० दिवसांत अंडी उबतात. अंड्यातून बाहेर यायच्या वेळी पिले आतून आवाज काढतात. त्याला चिर्प (chirp)असं म्हणतात. तो ऐकून सुसर खड्ड्यापाशी येते आणि खड्डा मोकळा करते. पिलांना जबड्यात घेऊन नदीत नेते.
पिलांच्या तोंडाच्या टोकावरती एक छोटा दात असतो. त्याला एग टूथ म्हणतात. त्याच्या मदतीने पिले अंड्याचे टरफल फोडून बाहेर येतात. पिलांच्या डोळ्यांवरती एक सरकपडदा असतो. त्याला निक्टिटेटिंग मेंब्रेन म्हणतात. हा मोठेपणीही कायम राहतो.
सुसर हा शीत रक्ताचा प्राणी आहे.तिचा चयापचयाचा वेग मंद असतो. त्यामुळे ती अनेक दिवस न खाता राहू शकते. सुसर मांसाच्या लचक्यांचे चर्वण न करता तसेच गिळते.अन्नाचे पचन होण्यासाठी ती छोटे-मोठे दगड गिळते. त्यांना गॅस्ट्रोलिथ असे म्हणतात. सुसरीला स्वेदग्रंथी नसतात. म्हणून ती बराच वेळ तोंड उघडे ठेवून शरीराचे तापमान कमी करते.
दादांनी सुसर आणि मगरीतला,’ मगर सुसरीहून मोठी क्रूर, खोल पाण्यात राहणारी. मगरीची चुंबळ सुसरीच्या डोक्याहून खूप वाटोळी आणि जबडा-नाक या भागाचा सुळका त्यातून पुढे आलेला ‘ असा सूक्ष्म फरक लेखकाला सागितलाय. हे वर्णन घडियालला लागू पडते.पण दोघींचाही चौथा सुळा दात जबडा मिटला तरी बाहेर दिसतो.
लेखातील सुसरीची सरपट, तिचे चिंचेजवळील घळीत अंडी घालणे, पिलांचा जनन सोहळा हे सर्व वर्णन अफलातून असेच आहे आणि ते सर्व मुळातूनच वाचायला हवे. त्यातील काही गैरसमज पाहू.
लेखातील ‘ इतकी साठ-सत्तर अंडी घालून ती तयार होईपर्यंतचा काळ सुसर रात्री तिथे येत असली पाहिजे’ तसेच ‘ खालच्या अंड्यातले पिलू वरच्या अंगाला ढोसलून तोंड वर काढी. ते वयाने वरच्यापेक्षा मोठे असे.सुसरीने ते आधी घातलेले असे.’ ही अनुमाने मात्र चुकीची आहेत.
सुसर अंडी घालण्यासाठी सुयोग्य जागा सापडेपर्यंतच गावात येत असे. एकदा योग्य जागा सापडली की तिथे खड्डा करून सर्वच्या सर्व अंडी एकाच वेळी घालत असे.
तसेच खड्ड्याच्या तळातील भागाचे तापमान वरच्या भागापेक्षा थोडे अधिक असल्यामुळे खालच्या अंड्यांतील पिलांची वाढ चांगली झालेली असे. तसेच वरच्या थरातील काही थोडी अंडी कच्ची असत याचे कारण तापमानाचा अंड्यातील गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो हे आहे.
‘पिलांच्या चुंबळीच्या लहान-मोठेपणावरून, पाठीमागल्या काट्यांच्या उंचीवरून, धारेवरून त्यातील नर मादी ओळखता येत,‘ हे निरीक्षण मात्र निश्चितच दखल घेण्याजोगं आहे.
‘सुसरीला वरती चाललेल्या प्रकारची कशी जाणीव व्हायची’ याचे कोडे लेखकाला पडे. त्याचे उत्तर, पिले अंड्यातून बाहेर यायच्या वेळी जो आवाज काढत, हे आहे. हा आवाज वरती लोकांना हवेत ऐकू येत नसे पण त्याची स्पंदने जमिनीतून सुसरीला जाणवत. दूरवरून येणाऱ्या आगगाडीचा आवाज प्लॅटफॉर्मवर ऐकू येत नाही पण रूळाला कान लावला की चाकांचा खडखडाट ऐकू येतो तसे.
पिलांच्या नाकाडावरील एग टूथ, त्यांच्या डोळ्यांतील सरकपडदा ही दोन्ही निरीक्षणे अचूक आहेत. पक्ष्यांच्या पिलांना एग टूथ असतो आणि काही पक्ष्यांमध्ये सरकपडदाही असतो परंतु सुसरीबाबतची ही दोन्ही निरीक्षणे मराठीत तरी याच लेखात प्रथम नोंदलेली आहेत.
‘पाण्यातल्या देवळाच्या गरुडावर संध्याकाळच्या वेळी एक सुसर जबडा उघडून पडे आणि पिवळ्या चोचीचे मातकट रंगाचे दोन पक्षी तिच्या जबड्यात उतरून दाढेत झालेले किडे,अळ्या खात. ‘ हे लेखकाचे निरीक्षण मात्र विवादास्पद आहे. हिरोडोटसने हे निरीक्षण नोंदवलेय. पण काहींच्या मते पक्षी आणि सुसर यांच्यातील हे सहजीवन प्रत्यक्षातील नसून कपोलकल्पित आहे. तर काहींच्या मते असे सहजीवन असते आणि हे पक्षी प्लव्हर जातीचे असतात.
पक्षी आणि सुसर यांच्यातील सहजीवनाबाबतचा हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू. पण पन्नास-साठ वर्षांपूर्वी सुसर आणि मानव यांच्यात मात्र सहजीवन अस्तित्वात होते हे हा लेख वाचून कळतं.
सुसरींकडून क्वचित माणसांवर हल्ले होत, कुत्री, जनावरं पाण्यात ओढून नेली जात हे जरी खरे असले तरी डोहातील सर्व सुसरी माराव्यात असा विचार कधी गावकऱ्यांच्या मनात आला नाही. अंड्यातून बाहेर पडलेल्या सर्वच पिलांना मारून टाकले जात नसे. सुसरीचा वंश टिकावा म्हणून त्यातील चांगली वाढ झालेली काही पिले नदीत सोडली जात. नदीची परिसंस्था टिकून राहण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे याची जाणीव गावकऱ्यांना होती.
‘क्रोकोडाईल’ हा शब्द मूळ ग्रीक ‘क्रोकोडिलॉस’ या शब्दावरून आला. त्याचा अर्थ लिझार्ड. ग्रीक भाषेत ‘हो क्रोकोडिलॉस ताउ पोटेमॉ’ अशी संज्ञा आहे. त्याचा अर्थ’ लिझार्ड ऑफ रिव्हर’ असा आहे.
जुन्या घराच्या काळ्या कडीपाटावरून फिरणाऱ्या पालीवर हात उगारला की दादा लेखकाला सांगत, ‘पाली आपल्यावर रागावल्या की, नदीत राहायला जातात आणि त्यांच्या सुसरी होतात. ‘
अशा तऱ्हेने ‘डोह’मधील ह्या चारही लेखांचा निसर्गशास्त्राच्या अंगाने शोध घेतल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतात. त्या अशा,
‘डोह’मधील हे चारही लेख निसर्गशास्त्राचे महत्वाचे दस्तावेज आहेत. केवळ ललित लेख म्हणून त्यांचा विचार करणे हे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल.
निसर्गशास्त्राचे लेखन मराठीत सर्व प्रथम ललित शैलीतून मांडण्याचा मान निःसंशय श्रीनिवास कुलकर्णींकडे जातो. अशा प्रकारच्या साहित्याचा मराठीतील पहिला आविष्कार म्हणून ‘डोह’ची मराठी साहित्याच्या इतिहासात नोंद होते.
दुर्बीण किंवा छायाचित्रणाच्या कोणत्याही साधनांशिवाय, या विषयावरील ग्रंथ तसेच इंटरनेट सारख्या सुविधा नसताना पन्नास वर्षांपूर्वी श्रीनिवास कुलकर्णींनी ही सूक्ष्म निरीक्षणे करून ती शब्दबद्ध केली हया गोष्टीचे खरोखर नवल वाटते.(त्याच वेळी श्रीनिवास कुलकर्णींनी ही वाट चोखाळून पुढे वाटचाल केली असती तर मराठी निसर्गशास्त्र साहित्याच्या दृष्टीने ती गोष्ट मोलाची आणि भाग्याची ठरली असती हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. असो.)
‘डोह’च्या प्रकाशनानंतर आज पन्नास वर्षांनी निसर्ग आणि मानव यांच्यातील साहचर्य संपल्याचं हे चित्र आपल्याला दिसतं.
परंतु याचवेळी एक आशादायक गोष्टही दिसून येते.ती ही की या गोष्टीची भयानकता आता थोड्या प्रमाणात लोकांना जाणवू लागली आहे.
‘जगा आणि जगू द्या’ या पर्यावरणाच्या संदेशाचं पालन करणं पशु-पक्ष्यांपेक्षा माणसाच्याच जास्त हिताचं आहे ही गोष्ट हळूहळू सर्वांच्या लक्षात येत चालली आहे.
अर्थात यासाठी गावात दिवसा ‘वानरांच्या फौजा’ फिरत असल्या पाहिजेत तर ‘रात्र दिवाभीतांची’ असली पाहिजे आणि ‘सुसरींचे दिवस’ कसे असतात ते सांगणारी ‘जुन्या जन्मीची माणसं’ही असायला हवी.
‘हे सर्व एकेकाळी कसे अस्तित्वात होते’ हे सांगत ‘डोह’ची वाटचाल दिमाखात चालू आहे आणि पुढेही चालूच राहील.
@@@
महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, शाखा शाहूपुरी यांच्या ‘वाङमय चर्चा मंडळा’त वाचलेला निबंध (२० फेब्रु.२०१४) साभार.
(‘मौज प्रकाशना’तर्फे प्रकाशित झालेल्या ‘डोहः एक आकलन’ ह्या पुस्तकात ह्या लेखाचा समावेश करण्यात आला आहे.)
रवी आवरण
सौंदर्य सखीचे
बघतो चोरून
कनक फुलांची
करी उधळण
सावळ्या संध्येचे
होता आगमन
सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर या कृष्णाकांठच्या खेड्यात माझा जन्म झाला. गावाला दोन मैलांचा डोह आहे आणि चहूबाजूंनी व्यापून राहिलेला गार हिरवा रंग.
अक्षर घटवावे, चित्रे काढावीत, वाचन करावे, सर्व समजून घेत असावे आणि स्वतःच्या मर्यादाही ओळखाव्यात, हे शिक्षण घरातच मिळाले. निर्माण होणा-या प्रत्येक उत्सुकतेला समाधान देणारे उत्तर मिळे. आणि एकूण एक उत्तरे लक्षात राहत. पुढचा प्रश्न त्या उत्तराच्या पुढचा. दिसणा-या आणि न दिसता जाणवणा-या गोष्टीच्या तळापर्यंत जाण्याचा छंद संपला नाही.
कविता वाचायला आणि मोठ्यांदा म्हणायलाही आवडे. छान वाटणा-या कोणत्याही घटनेचा कवितेशी काहीतरी संबंध आहे, असे वाटे. कवितेतले जग डोळ्यांपुढे उभे राहायला, खरेखुरे वाटायला यास वेळेपासूनच प्रारंभ झाला. या ख-याखु-याचा शोध घेत असताना लिहायला लागलो. पहिले पहिले लेखन वडिलांनी सुधारलेले असे. कधी ते इतके सुधारले जाई की त्यांत माझे काहीच उरत नसे. आता सर्व माझेच असते.
त्या वेळी खूप मोठे वाटणारे मंडळाचे वाचनालय, समजले – नाही समजले तरी सगळे वाचून संपवले. वाचलेले, ऐकलेले, स्वप्नातले, लेखन करताना एकाच प्रभावी पातळीवर येऊ शकते, हा अनुभव अजून उरला आहे.
माझी पहिली कविता मराठी चौथीत असताना, पां, ना. मिसाळ यांनी ‘बालसन्मित्र’मध्ये पहिल्यांदा छापली. आणि पहिली गोष्ट का. रा. पालवणकरांनी ‘खेळगडी’च्या शेवटच्या बाललेखांकात. नंतर कविताच लिहिल्या. प्रसिद्धीची चटक असलेल्या काळाचा एक तुकडाही पुढे आला. आता अनेक वैय्यर्थांच्या जाणिवा होत आहेत.
मराठीतल्या बहुतेक लहानमोठ्या नियतकालिकांतून कविता छापून आल्या. त्या निमित्ताने खूप नियतकालिकांशी संबंध आले. अलीकडे पहिल्या वेगाने कविता लिहिता येत नाही, याचे वाईटही वाटत नाही. चांगल्या कवितेच्या भेटीसाठी वाटचाल झाली. एकाकी आणि स्वयंभू अनुभव उत्कटपणे येतो. तो शब्दांत घेताना कुठे कमी न पडण्याची किमया कधीतरी अचानकपणे सुरू होईल असे आतून वाटत असते. कवितेवर नितांत निष्ठा आहे. चांगली कविता वाचायला मिळाली की अतिशय आनंद होतो.
कविता लिहीत असताना १९६० मध्ये चुकून एक लेखन केले. गो. नी. दांडेकरांनी ते ‘सत्यकथे’कडे नेऊन दिले आणि ‘सत्यकथे’ने आवडल्यामुळे छापले. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आले. त्यांनी माझ्या लेखनाविषयी फार केले. आपल्याला लिहिता येत नाही असे वाटून खिन्न व्हावे तो भागवतांचे स्निग्ध, चैतन्यदायक पत्र यावे ! त्यांच्यामुळेच ‘डोह’ मधली लेखने लिहून पुरी झाली.
एरव्ही, लेखन करणे हे एक संकटच वाटते. म्हणून अधिक लिहून होत नाही. एखादे लेखन करावयाचे म्हटले की ते वर्षानुवर्षसुद्धा मनात तळ देऊन राहते. त्यातला लिहून होईल तेवढा भाग मनातून उडून जातो. उरलेला जणू सुटकेसाठी वाट पाहत असतो. लिहावयाचा भाग, अंधुक जाणीव असलेला एखादा अज्ञात प्रदेश उल्लंघण्यासाठी पुढे उभा असावा तसा असतो. कधी तो अंगावर कोसळेल वाटते. कधी धीर येतो. खेड्यामधल्या अंधारातून जातांना हळुहळू दिसायला लागावे तसे लिहिताना होते. तो पुढे पसरलेला असतो. त्याला अनेक वाटा असतात. काही वाटा कवितांकडे जातात. काही, दुस-यायच कुठल्यातरी लेखनाचे धुमारे फुटत असलेल्या दिशांना. काही वाटांच्या शेवटांना अद्भुत धुके असते.
ज्यांच्या स्नेहामुळे समृद्ध व्हावे असे खूपच मित्र मिळाले.
मला जिथून हुरूप येतो त्याचे हे उगम आहेत.
लिहिण्यासारखे आणखी कितीतरी आहे ….
– श्रीनिवास विनायक कुलकर्णी
मागील महिन्यात गुगल कंपनीने पुढील ५-७ वर्षात भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, ही केलेली घोषणा आणि जिओने ५ जी तंत्रज्ञान सुरु करण्याचे केलेलं सुतोवाच, हा निश्चितच एक योगायोग नाही. जागतिक पातळीवर काम करणारे व्यावसायिक जेव्हा असा काही निर्णय घेतात तेव्हा त्यामागे पुढच्या १० वर्षांचे समाजचित्र त्यांच्या डोळ्यासमोर असते. या दोन्ही घटनांचा थेट परिणाम माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यम जगावर होणार हे निश्चित. क्लाऊड टेक्नोलॉजीचा वापर, इंटरनेटचा वाढता वेग ही याची वैशिष्ट्ये ठरतील. शिक्षण, प्रबोधन, करमणूक यांचा एक नवा अवतार यातून समोर येण्याची दाट शक्यता आहे. कोरोना नंतरच्या काळात माध्यमांचा चेहेरामोहरा कसा असेल याचा नेमका अंदाज बांधून मनुष्यबळ, सर्जनशीलता आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची हा यक्ष प्रश्न येत्या काळात माध्यम जगाला सोडवावा लागणार आहे.
यातील सर्वात महत्वाची गोष्ट प्राधान्याने विचारात घ्यावी लागेल ती म्हणजे गेल्या काही काळात प्रेक्षक वाचक यांच्या बदललेल्या सवयी. हीच सवय आता माध्यम आणि विपणन क्षेत्राला एक कलाटणी देणारी गोष्ट ठरु शकते. कोरोना काळ संपल्यानंतर या बदललेल्या सवयीला पुन्हा ताळ्यावर कसे आणायचे याला प्राधान्य द्यावे लागेल. प्रेक्षक / वाचक संशोधन हा विपणनाचा मोठा प्रकल्प हाती घ्यावा लागेल.
गेले ४,५ महिने सुरु असलेल्या या साथीच्या थैमानाने माध्यम व्यवसायाचे कंबरडे मोडले आहेच आणि हा आणीबाणीचा काळ आणखी किती महिने चालणार याचे उत्तर सध्या तरी आपल्यापैकी कोणाकडेही नाही. पण बदललेल्या परिस्थितीची दखल घेऊन माध्यम विश्वाला पुढील वाटचाल करावी लागणार आहे हे निश्चित. यात जमेची बाब म्हणजे याचा मोठा परिणाम झाला आहे तो कावळ्याच्या छत्र्यासारख्या उगवलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्राला.केवळ भांडवल आहे म्हणून व्यवसायात उतरलेल्याना आपल्या कौशल्य शून्य कारभाराचे मोठे फटके बसायला सुरवात झाली आहे. ते आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. प्रेक्षकांसाठी आणि वाचकांसाठी हा मोठा लाभ आहे. कारण जलपर्णी काढल्याशिवाय नितळ पाणी दिसत नाही ते आता दिसू लागेल.जी माध्यमे आपल्या कार्यसंस्कृतीवर आणि उच्च व्यावसायिक मूल्यांवर मार्गक्रमण करत आहेत त्यांच्या समोरही आव्हानं नाहीत असे नाही. मुख्य आव्हान आहे ते म्हणजे जाहिरातींचे. टीव्ही माध्यमात ३० टक्के जाहिरातींचा ओघ कमी झाला असून गेल्या वर्षीपेक्षा ३६ टक्क्यांची घट सध्याच्या कालावधीत नोंदली गेली आहे. नियमित जाहिरात करणाऱ्या ३५% कंपन्यांची अनुपस्थिती हा मोठ्या काळजीचा विषय आहे.लॉक डाऊनमुळे टीव्ही माध्यमाकडे नागरिकांचा ओढ वाढताना दिसला २५ ते ४० टक्के प्रेक्षकांमध्ये वाढ झालेली दिसली पण जाहिरातदार मात्र फारसा प्रतिसाद देत नाहीत असे चित्र दिसले. म्हणजे टीआरपी हा मुद्दा कोरोनाने निष्प्रभ केल्याचे दिसते.माध्यमातल्या अशा अनेक अंधश्रद्धा या निमित्ताने हळूहळू संपुष्टात येताहेत हे एक बरे आहे.
सर्वसाधारणपणे सर्व माध्यमांमध्ये ५० ते ६० % जाहिरातीचे उत्पन्न कमी झाले आहे. या माध्यमांना आता नव्या युक्त्या प्रयुक्त्या करुन तोटा होणार नाही अशी व्यूव्हरचना करावी लागत आहे. त्याचा परिणाम दर्जा व आशय संपन्नतेवर पडणार नाही ही कसरतही करावी लागत आहे. आपला वाचक / प्रेक्षक टिकवणे हा यातला कळीचा मुद्दा असेल. कारण आर्थिक संकटामुळे हा वाचक ग्राहकांच्या भूमिकेत गेला आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीतून आलेला चोखंदळपणा आणि शेलकी निवड हा यात महत्वाचा निकष ठरु शकतो.
न्यू नॉर्मलचा हा टप्पा स्विकारताना डिजिटल माध्यम उद्योग आता वेगाने आपल्या भावविश्वात, दैनंदिन व्यवहारात प्रवेश करतो आहे. त्याच्याबरोबरच्या सहजीवनाला आता आपल्याला जुळवून घ्यावे लागणार आहे. हे मान्य करुनही करमणूक क्षेत्रातील नाटक, चित्रपटगृहातील सिनेमे, सांस्कृतिक कार्यक्रम ऑफ लाइन माध्यम व्यवहार आजही जनमानसात आपले वैशिष्ट्य टिकवून आहेत. ते अधिक लोकाभिमुख कसे करता येतील त्यामधील त्रुटी कमी करुन त्याचे आकर्षण कसे टिकवून ठेवता येईल यावर माध्यमकर्मी मंडळीना काम करावे लागेल.
यावरचा प्रभावी उपाय मला असा दिसतो की प्रसार माध्यमांना पुढील काळात जाहिरातींच्या कुबड्या कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पे वॉलसारखे प्रयोग पाश्चात्य देशात सुरु आहेत, वर्गणीदार हाच उत्पनांचा महत्वाचा स्रोत असला पाहिजे, जाहिराती नाही हे या मागचे धोरण आहे. हेच धोरण वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या यांच्या बाबतीतही वापरता येईल. दर्जेदार आशय हाच माध्यम विश्वाचा कणा असायला हवा ही भावना आता सार्वत्रिक होण्याची गरज आहे. फुकट मिळणारे किंवा अल्प किमतीत मिळणारे बहुतेक सत्वहीन असते याचा अनुभव आपल्याला सर्वच क्षेत्रात येतो; माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मोफत हवे ही मानसिकता बदलून मुठ सैल करण्याची तयारी आता सर्वानीच करायला हवी.
२००२ ते २०१३ हा कालावधी या क्षेत्रासाठी जागतिक मंदीचा ठरला; यापुढील काळ हा अधिक अक्राळ विक्राळ स्वरूपात समोर उभा ठाकणार आहे. माध्यमकर्मींच्या नोकऱ्यांमधील सुरक्षितता हा मुद्दाही कोरोना नंतरच्या काळातही महत्वाचा ठरणार आहे. राष्ट्रीय पातळीवर एक हजारहून अधिक अर्ध वेळ / पूर्ण वेळ पत्रकारांचा रोजगार गेल्या १२-१५ महिन्यात गेला आहे. काहींच्या नोकऱ्या वाचल्या पण पगारात १० ते ३०% कपात करण्यात आली आहे. द वॉल्ट डिस्ने कंपनीसारख्या मातब्बर संस्थेनेही स्वेच्छा वेतन कपातीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आहे. जगभरात थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती आहे. या खडतर वाटेवरुन मार्ग काढत माध्यम विश्वाला पुढे जायचे आहे.
मनुष्यबळाच्या बाबतीत निर्माण झालेल्या या खडतर परिस्थितीला माध्यम क्षेत्रांनी निवडलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आणि कौशल्याची वानवाही यला काही अंशी जबाबदार आहे. अर्धशिक्षित पत्रकार, केवळ तांत्रिक सामुग्री हाताळणारे पण वृत्त मूल्यांची जाण नसणाऱ्या मंडळीनी अनेक वृत्तवाहिन्या गजबजलेल्या आहेत; त्यांना आत पायबंद घालण्याची वेळ आली आहे. नव माध्यम पत्रकारिता, माध्यम व्यवसाय हा केंद्र बिंदू ठेऊन तयार केलेल्या अभ्यासक्रमांना आणि प्रात्यक्षिकांवर भर देणाऱ्या शिक्षणाला पर्याय नाही हे वास्तवही या महामारीच्या संकटाने समोर आणले आहे. कूशल मनुष्यबळ हा आता परवलीचा शब्द होणार आहे. अर्धशिक्षित, कमी पगारात काम करणारे तंत्रज्ञ फारसे कामाचे नाहीत ही जाणीव आता पक्की होणार आहे; हा या संकटाने दिलेला आशीर्वादच म्हणावा लागेल.
– ©️ डॉ केशव साठये
Keshavsathaye@gmail.com
आज बघूया – शब्द एकच; पण त्याचं लिंग बदललं की अर्थही बदलतो अन् पदार्थ देखील…
१) कात – तो कात आणि ती कात. तो कात पानांत घालतात व ओठ लाल होतात आणि ती कात म्हणजे सापाची कात.
२) खोड – ती खोड आणि ते खोड. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही आणि झाडाचे किंवा चंदनाचे खोड.
३) शेव – हा जरा आडवळणाचा शब्द पहा. ती शेव म्हणजे शेव-बटाटा पुरी वगैरेशी संबंधित आणि तो शेव म्हणजे टोक. उपरण्याचा शेव बुडवला व मास्तरांनी कोटाला लागलेला डाग पुसला.
आता एखाद्या शब्दाचा वापर करून काय साधता येतं पहा-
‘अप्सरा’ नावाऐवजी ‘बायको’ नावाची पेन्सिल असती तर जास्त समर्पक नाव ठरलं असतं ना ! कारण ?
कायम टोकाची भूमिका ! आहे की नाही गंमत माय मराठीत?
– ©️ सचिनदा
“ विभाताई, विभाताई,….रामलीला होणार ..रामलीला होणार …” .जिन्यावरून धडपडत वर येत, पळत, धापा टाकत माझा धाकटा भाऊ हे सांगायला आतुर झाला होता, आनंद त्याच्या तोंडावरून ओसंडून वाहत होता.
आणि खरेच होते ते ….! आमची बाल मने प्रसन्न होत. अशी दसऱ्याची वर्दी आमच्या घरात १० दिवस आधी लागत असे.
आमच्या भल्या मोठ्या घरासमोर एक विस्तीर्ण मैदान होते. तेथे क्रिकेटचे वेड फारसे नव्हते पण हॉकी मात्र सर्व मुले खेळत असत. ऑलिम्पिकमध्ये गोल करून विश्वचषक आणून देणारा हॉकीपटू याच मैदानात घडलेला, तेथे सभा होत, अटलजी येत, आणि …आणि आमचे बालविश्व व्यापून टाकणारे, आनंदाचा अमोल ठेवा वाटणारे ..रामलीला ..चे खेळही होत. दसरा जवळ आला की ट्रक भरून तेथे लोखंडी कांब, लाकडी तक्ते, फळ्या, कनातीचे रंगीबेरंगी कापड, झालरी, खुर्च्या, लहान मोठे बांबू , ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या योजनेसाठी लागणारे चित्रविचित्र रीळ, वायर, भोंगे असे भरपूर सामान उतरविले जाई. ते बघताच किंवा त्यांचे आवाज येताच लहानग्यांना प्रेमाचे भरते येई. कोणी मैदानात ते जवळून बघायला पळे तर कोणी घरच्या भावंडांना निरोप द्यायला धावे.
दोन दिवसातच रामलीला सुरू होत असे. गंमत अशी की आमच्या घरातूनसुद्धा ती दिसत असे. पण अति उत्साही मुले संध्याकाळपासूनच स्पष्ट दिसावे, अगदी जवळून बघता यावे यासाठी मैदानात जात. पुढे बसण्याचा नंबर लावत. आज तेथे कोणती कथा दाखवली, ती नाट्यरूपात दुसऱ्या दिवशी आमच्या घरी थोडी मोठी भावंडे करीत असत. तेथले युद्ध देखील संगीतमय असे. ते नोटेशन आणि त्या तालावर नाचत तलवारी फिरवणे अजूनही आम्हा सर्वांना पाठ आहे. १० दिवस नुसती धमाल असे. आमचा सर्वात मोठा भाऊ थोडी दादागिरी करे. नेहमी राम होण्याचा मान मलाच मिळाला पाहिजे, हा त्याचा खाक्या ..तर दुसरा मोठा भाऊ शरद पडेल ती कामे करी. आज लक्ष्मण, तर उद्या मारुती, कधी रावण. बहीण वनिता एकच स्त्री पात्र, त्यामुळे राजमाता कौसल्याही तीच, सीतामाताही तीच, त्राटीकाही तीच तर मंदोदरीही तीच. आम्ही खालची भावंडे त्यांच्या दृष्टीने अगदीच बाल..त्यामुळे वरकड कामे करण्यासाठी आणि प्रेक्षक म्हणून आम्हाला बहुमान मिळे. दादाताईचे मित्रही येत… आते, मामे भावंडे कधी वेगळी वाटलीच नाहीत. आमची गच्ची खूप मोठी. तेथे दिवस दिवस पसारा, गोंधळ घातला तरी मोठयांना खालच्या माळ्यावर काही कळत नसे. त्या बापड्या स्वतःच्या कामात इतक्या व्यस्त असत की मनातून त्याही सुखावत असतील, मुलांची भुणभुण नको. एकदा तर शरदला मारुती केले होते. मित्रांनी त्याला छान सजवले, लांब लांब चिंध्या आणून मोठी शेपूट केली आणि दिली खोचून त्याच्या विजारीत. अगदी खऱ्यासारखे करायचे हं… म्हणत कोठून तरी चिंधी पेटवून आणली आणि त्याच्या शेपटीला आग लावली. म्हणे आज लंकादहन होणार आहे. सुदैव आमचे की नेमकी त्याच वेळेस आई आली, मुलांचे काय चालू आहे बघायला ( भाग्य, तिला अशी लक्ष ठेवण्याची सवय होती. ) तो उपद्व्याप बघून तिचे धाबे दणाणले. पण तिच्या प्रसंगावधनाने मोठीच दुर्घटना टळली.
रामलीला सुरू होण्याआधी हरिहरन वगैरे गायकांची भजने ध्वनिक्षेपकावर ऐकायला मिळत. पुनः पुनः ऐकून ती पाठ होत आणि मग घरातील मोठ्या झोपाळ्यावर किमान ९, १० जण बसून त्या गाण्यांची उजळणी करत असू. दसऱ्याच्या दोन दिवसांपूर्वीच मैदानात एक आणखी आकर्षण मुलांना दिसे. तेथे मोठमोठे तीन पुतळे उभारण्यात येत. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे. त्यात खूप फटाके ठासून भरत. असे दहा दिवस कधी संपत हे कळतही नसे .आणि मग दादाच्या मराठी पुस्तकातील धडा ऐकू येई….हसत हसत वाचन होई…”मोरू ऊठ. दसरा उजाडला . मोरूचा बाप मोरूला म्हणाला. …”
मग दसऱ्याच्या तयारीची मज्जा अवर्णनीय. त्या काळी सॅटीन या कापडाचे अप्रूप. माझी आई त्या कापडाचे आम्हा मुलींना परकर पोलकी शिवत असे .त्यावर फुले लावीत असे. नवा कोरा वास असलेले कपडे सणावारीे परिधान करण्याचा आनंदआजच्या डझनांनी कपडे टाकणाऱ्या मुलांना नाही कळणार.
तोरण, फुले, सजावट, ८, १० किलो तरी श्रीखंड आणि वर चिक्कार लाडू. आधी सांगितल्याप्रमाणे आमचे घर इतके मोठे होते की मोठा भाऊ जेव्हा प्रथम नोकरीनिमित्त मुंबईला आला आणि भाड्याने राहत होता तेव्हा त्याच्या शेजाऱ्याने तोंडाचा आ असा काही वासला की बंदच होईना कारण भाऊ त्याला एवढेच म्हणाला होता “ या घराएवढे आमच्या घरात बाथरूम आहे हो, मला आठवण येतेय. ” . त्यामुळे दसऱ्याला असंख्य लोक त्या मैदानातील आतिषबाजी, दारूकाम, फटाके, मिरवणूक बघायला येत. दारासमोरून मिरवणूक जाई त्यात राम आणि रावणाचे युद्ध चालू असे. ते मैदानापर्यंत जाई आणि तेथे स्टेजवर थोडा वेळ युद्ध चाले. एकदा रावण खाली पडला की मैदानात उभारलेले पुतळे पेटवण्यात येत. त्यातही ठरलेले. आधी मेघनाद मग कुंभकर्ण आणि शेवटी .. राम स्वतः येत. आपले धनुष्य बाण उचलत आणि रावणावर नेम धरीत. तो पुतळा पेटून धडधडू लागे .. रावणदहन… त्यातील दारुशोभा काम संपूच नये असे वाटे. एकदा का तो कोसळला की जीवाच्या आकांताने सर्व ओरडत… प्रभू श्री राम की जय … काही स्त्रिया भक्तिभावाने हात जोडीत.
हे सर्व बघण्यासाठी घरी येणाऱ्यांची गणती नसे. ओळखीचे, अनोळखी. कोणीही. कोणालाही मज्जाव नसे. श्रीमंत, गरीब, ड्रायव्हरचे, मोलकरणीचे नातेवाईक, शेजाऱ्यांच्या गणगोतातील, लहान, थोर किती किती लोक असायचे. आणि आई आमची.. प्रत्येकाने प्रसाद घेतला का नाही हे आवर्जून बघायची. एकदा मला आठवते, तिने चारशे लाडू केले होते. का तर म्हणे अगं, मागल्या वर्षी थोडे कमी पडले होते नं .. धन्य त्या माऊलीची. पूर्वीच्या स्त्रियांचा कामातील आवाका नि उरक बघून मी थक्क होते. आज लॉकडाऊनमुळे, ”किती काम पडतं गं,“ म्हणणाऱ्या बघितल्या की आपोआप माझे कर या स्त्रियांसाठी जुळतात.
आमचे वडील, भाऊ आणि पुरुष मंडळी शिलंगणाला जात. नवी सडक नाव असलेल्या रस्त्यावर शमीचे झाड होते, तेथे जाऊन पाने घ्यायची येताना मोठे शिवलिंग असलेले शिवमंदिर लागे. तेथे जाऊन पाने वाहायची आणि भक्तिभावाने पूजा करायची व घरी परतायचे. आम्ही बहिणी, आई, इतर स्त्रिया दूध पाणी घेऊन त्यांच्या येण्याची वाट बघत असू. कारचा हॉर्न ऐकू आला की लगबगीने वरील पायरीवर तयार. त्या काळीसुद्धा जरी राज्ये विलीन झाली होती तरी श्री श्री जिवाजीराव शिंदे हे सोने लुटत. त्यांच्या परिचितांमध्ये वडिलांचे नाव वर असे त्यामुळे घरापासून लांब असलेले एक देऊळ ज्याला.. मांढरे की माता.. म्हणून ओळखतात तेथे वडील, भाऊ जात असत .. शमीची पाने सोन्याचा वर्ख लावलेली श्रीमंत राजे वाटत. ती घेऊन सर्व घरी येत. वडिलांना मुलगा, मुलगी हा भेद पसंत नव्हता. एकदा त्यांनी वनिताताईला पण विचारले, तुला चलायचे आहे का ? ती आनंदाने गेली आणि राजांनी तिला देखील सोन्याची पाने दिलीत. अजूनही ज्योतिरादित्य शिंदे दसऱ्याला तेथे जातात असे कळते.
सर्वांचे पाय दुधाने धुवून पुसून झालेत की कधी कधी गाण्याचा कार्यक्रम असे. नंतर हसत खेळत जेवणे काय मोठाल्या पंगती झडत. आणि दहा दिवस चाललेली धमाल संपुष्टात येत असे.पुनः पुढच्या वर्षीची वाट बघत .
– ©️ सौ. स्वाती वर्तक