त्या सी ई ओ असल्या तरी आमच्या ऑफिसमध्ये साऱ्याजणींशी खेळीमेळीने वागत. आम्हा सर्वांना आपलेसे कधी केले तेच कळले नव्हते. त्यांची कडक इस्त्रीची कलकत्ता साडी, त्यांचे ताठ मानेने चालणे, त्यांचे वाचन, अर्थशास्त्राचा व्यासंग आणि त्यांची भेदक दृष्टी. आम्ही सगळे त्या कितीही हसत खेळत वागल्या तरी जरा वचकूनच असू.
मी जरी निवृत्त असले तरीही असंख्य कामात स्वतःला बुडवून टाकलेले. वेळच मिळत नसे. रोज मैत्रिणीला सांगून दिवस पुढे ढकलत होते. त्या खूप आजारी आहेत, आता त्या सतत झोपूनच असतात, आता त्यांना विस्मरण होते; अशा अनेक मैत्रिणीकडून सोडलेले दुःखी निःश्वास कानीं पडत होते. मन अस्वस्थ झाले होते पण तरीही आज, उद्या करीत राहीले
एक दिवस अचानकच फोन खणखणला .नाव बघितले तर त्यांचाच फोन.. आश्चर्याचा धक्काच बसला. का केला असेल त्यांनी मला फोन ? का, हा त्यांच्या घरून कोणी इतरांनी तर नाही केला …धस्स झाले ..काही बातमी देण्यासाठी ? हात उचलून रिसीवर घेईपर्यंत मनाची गती किती जलद असते ..जाणवले. त्या निमिषार्धातच आरती प्रभूंची कविता ..गेले द्यायचे राहून ….तुझे नक्षत्रांचे देणे….देणे …तरळून गेले. खरेच मी आधी जाऊन भेटायला पाहिजे होते का? त्यांना माझ्याशी काही बोलायचे होते का ? मागेही त्यांनी दोन, तीन वेळा फोन करून विनविले होते..खूप भेटावेसे वाटतेय, येतेस का मोनिका घरी? आपले देणे ?….माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने…शोकांतिकेची ही भावना ठसठसून गेली.
घाबरत फोन उचलला…”.हॅलो, किती क्षीण आवाज होता. मोनिकाच नं ?..तुम्ही येणार होता मला भेटायला ऐकलं ..कधी येताय? वाट बघतेय मी. ..” .थांबत थांबत, दीर्घ श्वास घेत त्यांनी कसेबसे हे वाक्य पूर्ण केले, ” लवकर या हं! ” हु s !! पुनः शांत, शांत….”तो बोलवतच नाही गं.. कधी बोलावेल? सर्व देवांना आठवून झालं. आता कोणाला आळवू? ” …!..तूच करतेस का माझ्यासाठी प्रार्थना? ”
मी दचकलेच. हे शुभांगिनी राजे बोलत आहेत .हो, त्यांचे नावच राजे..एखाद्या ‘राजे’प्रमाणेच त्या जगल्या. मानिनी.!
हे आम्ही ठेवलेले दुसरे नाव. त्या इतक्या अगतिक कशा झाल्यात? मी निस्तब्ध ..हात थरथरू लागले..वर आढयाकडे बघत …त्यांना तो बोलावत नाही ..एवढ्या का निराश ? वैफल्यग्रस्त ?? इतक्या लवकर ?
भानावर येताच, मी उत्तरले, ” काहीही काय म्हणता मॅडम , माझे कोणते देव उरले आता ? आणि मी का तशी प्रार्थना करू ? केली तर तुमच्या दीर्घ आयुष्याची, आरोग्याची नाही का करणार ?”
” हो…तू..तर ..एग्नोस्टिक …नाही का ? पण…काही तर …करा तुम्ही …तो बोलवू दे आता..” त्यांचा तो अडखळत येणारा, असा कधीही न ऐकलेला आवाज आता मला असह्य झाला. मी लगेच म्हटले, ” हो..हो..येतो आम्ही, लवकरच भेटू मॅडम.. ठेवू फोन आता?”
“बरं !”
फोन ठेवला तरी तो अशक्त, रडवा, थकलेला, निराश आवाज त्यांचा होता हा विश्वासच बसत नव्हता. राजे मॅडम ..इतक्या थकल्या? त्यांच्या फक्त येण्यानेच ऑफिसमधील प्रत्येक क्लार्क कामात बुडून जाई. त्यांच्याजवळ येताच ऑफिस फाईल धरून उभा राही, त्यांना बघताच त्यांच्या साडीच्या कडक इस्त्रीला मनातल्या मनात सलाम ठोकी. त्यांचे रुबाबदार चालणे, बोलणे बघून आदराने मान खाली घाली…त्या ?…त्या राजे मॅडम ?
आता तरी जायलाच पाहिजे भेटायला. मोनिकाने फोन उचलला आणि त्या सखीस डायल केला. ती केव्हापासून जाऊया म्हणतच होती. लगेच दिन, वार, वेळ ठरली.
” आलात ,अरे….वा तिघी ही ….आलात… .खूप खूप… बरं वाटलं. “.
त्या जरी हळू आवाजात कण्हत अडखळत बोलत होत्या तरी त्यांना आपल्या येण्याने बरे वाटतेय हे तिघींना जाणवले.
त्यांच्याकडे बघवत नव्हते. तिघींनाही ऑफिसमधली त्यांची छबी पुसून टाकण्याची इच्छा नव्हती.
पायापासून गळ्यापर्यंत घातलेले पांघरूण. पण तरीही त्याच्या आतून एक अतिशय कृश झालेले शरीर जाणवत होते. मान एका बाजूला कलंडली होती. केस विस्कटलेले, ओठातून चिकट द्रवपदार्थ बाहेर येऊन सुकलेला. बोटे वेडीवाकडी झालेली, आणि आवाज न उमटणारा.
तिघीही एकमेकांकडे बघत भावविवश झाल्यात.३, ४ वाक्ये इकडची तिकडची बोलून झाली. तीच तीच गुळगुळीत, झालेली, बोथट, असंवेदनशील, निर्जीव वाक्ये…” काय, मॅडम ..किती बारीक झालाय, काळजी घ्या, औषधं वेळेवर घेतां नं ?…” वगैरे
” हो..मग!. माझी मुलं, सत्यजित, विश्वजित आठवतात ? दोघेही बाहेर ..”
” हो हो..चांगलंच आठवतं, मॅडम..लहानपणी ऑफिसमध्ये यायचे…एक इंजिनियर झाला नं ? ”
” यस.. करेक्ट! आणि दुसरा डॉक्टर !”
” एक लंडनला असतो ..एक अमेरिकेत ”
हे सर्व अतिशय हळू, थकलेल्या आवाजात चालू होते.
थांबत, थांबत …मुलांचे कौतुक पुढे सरकत होते. “बघा, किती काळजी घेतो माझी.. एक नर्स, एक मेड, त्यांच्याशी बोलता यावं म्हणून हा नवीन धर्तीचा फोन ..कारण मला तर हातात धरता येत नाही …हा, बघा कसा उशीजवळ उभा राहतो नुसतं बटन दाबायचं …ते बटनसुद्धा ही नर्स दाबून देते…..आणि बोलायचं.. ! दर आठवड्याला टोपलीभर पैसे पाठवतात.”
त्यांचा चेहरा… इतका विदीर्ण…. मी नर्सला म्हटले, ” जरा पुसतेस का ? ”
ती जणू ओरडलीच ,” अहो, दहा वेळा पुसते..दिवसात. ”
आम्हा तिघींची नेत्रपल्लवी ….आपल्यासमोर जर नर्स अशी वागते ..त्या एकट्या असताना ?..कशी कामे करत असेल ?
” काही नका बोलू तिला .” . राजे मॅडमच्या डोळ्यातून जाणवले.
” ती रागावून निघून गेली तर ? ”
त्यांचे डोळे पाझरत होते..” रुपयांचे मी काय करू? त्यांना तर वेळच नाही भारतात यायला …मी एकटीच जाणार ..मी गेल्यावर तरी येतील का?”
मी ” आता होते भुईवर गेले गेले आकाशात ” …..बहिणाबाईंच्या ओळीत हरवले. आता या मुलांचे कौतुक करीत होत्या आणि आता…? खरेच मन क्षणात इकडे तर क्षणात तिकडे ..असे का होते ? मनाचे काही खरे नाही .
त्यांना खूप बोलायचे होते. पण बोलवत नव्हते ..मला म्हणाल्या, ..” मी गेले की ते कपाट उघड, वर उजवीकडे एक करंडा आहे, तो उदयपूरहून आणला होता, फक्त तुझ्यासाठी..तुझी कलात्मक दृष्टी.. अनोख्या वस्तू संग्रह करण्याची आवड..”
मी स्फुंदू लागले,..”गेल्यावर का ? असं काय ? त्या गेल्यावर मी का येणार? कोण ओळखणार मला ?”
” कागद आणतेस ?” पेन आहे ?..”
” लिही…”
ऐकू येत नव्हते..त्यांच्या तोंडाशी कान लावून प्रयत्न करीत होते ..
तरीही मी एकटी
——————–
तू माझीच निर्मिती
पण गेलास किती दूर
सोडूनि या जीवाला
किती काळजी न् हुरहूर
( मनीषा अगदी मला खेटून उभी राहीली. काय ? हे तिने खुणेनेच विचारले..मी अगदी पुटपुटत उत्तरले…”बहुधा कविता !” )
नाळ कापली तरीही
तू चिकटुनि माझ्या वक्षी
स्तन्य चोखुनि कसा तृप्त
विसावला माझ्याच कुक्षी
(किती क्षीण येतोय आवाज…हृदयाचे कान, पंचप्राण ओतूनही फुस फुस फक्त )
धरलीस वाट शिक्षणाची
परि बोट माझे सोडेना
विव्हळत परतुनि आला
शांतावला उदरावरी सोना
कर्फ्यू लागला एकदा
तू एकटाच शाळेत
मी धास्तावुनी घरीच
तुझीच छबी मनात
( ” ..अगं.. काय लिहीते आहेस, त्या काय बोलताहेत ? ऐकू येतंय का तुला ?” अश्विनी काळजीत.. मी ” हो ” उत्तर देताच म्हणे….का लिहितेस? मला विश्वास होत नाहीये.. या असे शब्द सांगत आहेत ? अगं, याच ना त्या ?…ग्लोबलायझेशनच्या निवडीसाठी तावातावाने बोलणाऱ्या, मुद्देसूद समजावून देणाऱ्या..त्यांचे ते वैचारिक द्वंद्व, ती चर्चा, तो वादविवाद ..यशस्वीपणे दुसऱ्याचे मुद्दे खोदून काढणे ….छे !..मला नाही वाचवत ! )
होते माझ्याही हृदयात
“हिरकणी” चे अदम्य साहस
परि चहूबाजूंनी गराडा
केले तरी अशक्य धाडस
पाहता मला दुरूनि
तू धावत जवळी आला
घेऊन तुला कवेत
माझा जीव निमाला
( अगं.. स्त्री ही शेवटी,आईच…माया, जिव्हाळा हे शब्द काय ती नेहमीसाठी पुसून देऊ शकते ? तिच्या शब्दकोशात अक्षय्य राहणारे …नाही हं…या काळातील आहेत त्या ..मार्जिनल युटिलिटीवर बोलणाऱ्या, यूज व्हॅल्यू कशी वाढते सांगणाऱ्या…राष्ट्राचे आणि बाजारपेठेतील मायक्रोइकॉनॉमिक्स वर आपली ठाम मते मांडणाऱ्या आहेत गं त्या !
मधून मधून अश्विनीची फुसफूस चालूच होती तरीही मी नेटाने त्या काय सांगताहेत हे उतरवून घेत होते )
पंख लाभले तुजला
भरला शिडात वारा
घेतली गगन भरारी
दिला सोडून मोह सारा
( त्यांना ही पंख लाभले होते की…आठवते तुला..सरकारने बाहेरच्या देशातून कर्ज न घेता बॉण्ड्स, फिक्स्ड डिपॉजिट्सतर्फे पैसे मिळवावे..आपल्याच मुलांना तसे करायला लावणे…उद्योगांना भरभराट कशी येते? त्यासाठी लोकांना आकर्षित कसे करायचे हे सर्व ज्या स्त्रीला माहीत आहे, जिने स्वतः गुंतवणूक करून मुलांना मार्गी लावले, आपली कंपनी मोठी केली, त्या बाईने इतके हतोत्साहित व्हावे?)
आता फक्त तुझे मी
चित्र उराशी धरते
धाडू नकोस रुपये
तुझ्याविना हे घरच रिते
( इतकी वर्षे जी रुपये, चलन, शिन, डेरॅम, डॉलर ,टका, युरो यातच राहिली. बोलली, जगली, ती म्हणतेय नको मला रुपये ?)
राजे मॅडम निद्राधीन झाल्या होत्या. थोडा वेळ वाट बघून आम्ही “मेड”ला सांगून निघालो. कवितांचे आणि त्यांचे नाते वेगळेच होते. मनातील मळभ विरले होते. मन मोकळे झाले असणार आणि गाढ झोप लागलीअसेल.
मॅडमच्या कथाही गाजल्या होत्या. त्यावर संवाद, परिसंवाद घडले होते. एक दोन विद्यार्थ्यांनी तर त्यांच्या पुस्तकांवर डॉक्टरेट मिळवली होती पण आता ही डिलीरियममध्ये लिहिलेली कविता ??
” नाही गं.. त्या अशा सतत दुःखी राहत नव्हत्या. ”
” नाही काय ? ”
” आपल्याला इतरांच्या मनातील काय कळतं ? ”
” आता हीच बघ नं कविता ..”
” मला हेच कळत नाही, कोणी एक कविता वाचून किंवा एक कथा वाचून त्या लेखिकेबद्दल कसे काय मत बनवू शकतो ? जजमेंटल होण्यात आपण घाई तर करत नाहीये नं ? ती निराशाजनकच लिहीते, ती फार सेक्सीच लिहीते, ती वामपंथी आहे का उजव्या मताची? तिच्या कथा, कविता फार बायकी असतात …तिला सुखी स्त्रिया कधी दिसल्याच नाहीत का ? तिच्या प्रत्येक कथेतील स्त्री अशी उदास का ?”
सगळ्या निवृत्त लिपिक, अधिकारी, मॅनेजर…..त्यात मधूनच ही यौवना कुठून शिरली..चर्चेत भाग घ्यायला ?
” का गं बाई? तुला का असं वाटतं ?…”
” हो, स्त्री आणि सुखी ? हे एक ..मिथ.. च आहे .”
” नाही, सुख ,दुःख हे मानण्यावर असतं … ”
” ही सर्व पुस्तकी वाक्यं “…तिच्या येण्याने चर्चेला वेगळेच वळण लागले आणि एका तरुण मुलीचेही असे विचार असू शकतात हे बघून साऱ्याच स्तब्ध झाल्यात. निःशब्द..
मला कळतच नाही , ” डोंगराएव्हढी कर्तव्य अंगावर घेऊन, हे ओझं खांद्यावर पेलवत स्त्री जगतेच कशाला ? ” पोक काढून जन्मभर चालत राहायला?? ”
” उगी उगी..! शर्वरी..इतकी पॅनिक नको होऊस. ” ..मनीषाने ढासळता पूल सावरायचा वृथा प्रयत्न केला.
” अरे, जगू द्या न् प्रत्येकाला आपलं आयुष्य , जसं जगावेसं वाटतं तसं … ”
मनीषा, अश्विनी आणि मोनिका ही दोन प्रचंड तफावत असलेली चित्रे आ वासून बघत राहिल्या.
एकीकडे शर्वरीचे, दुसरे राजेमॅडमचे आजचे.
तिघींच्या मनात राजेमॅडमचा भूतकाळ सरसरत जात होता .
त्या काळात त्यांनी घरच्यांचा घरी राहण्याचा आग्रह डावलून नोकरी केली ..दोन्ही मुले लहान, त्यांना मोठे करणे, सुसंस्कारित करून उच्च शिक्षण देणे. मानाने जगणे एवढेच त्यांचे ध्येय. ती निकड होती. त्यांची गरज होती. लोक जेवढे ..तेवढी तोंडे..त्यांचे टोमणेही तेवढेच. पण पतीनिधनानंतर दोन्ही मुले वाढवणे ही, जवाबदारी कोणी उचलणार होते का ?
उपकार ” सिनेमाचे गाणे त्यांच्या आवडीचे..नाते, प्यार, वफा सब बातें हैं बातों का क्या ?
प्रसंगी मुलांना ऑफिसमध्ये आणून वाढवले. मुलांनी आईचे कष्ट बघितले आणि त्याचा मान राखला हेही तितकेच खरे!
किती हुशार निघाली. मोठा इंजिनियर तर धाकटा डॉक्टर झाला. आनंदाचे भरते आले होते.
हे वाक्य घोळवत अतिशय प्रसन्न चित्ताने त्यांनी मुलांना लंडन, अमेरिकेत पाठविले होते .
आणि येथे एकट्याच राहत होत्या.
विचार करकरून मेंदू शिणला..नयनी नीर पुसत आम्ही तिघी घरी परतलो.
कोण बोलतेय ?…हे कोण आलेय ? रात्रभर माझ्या मनाची तगमग संपत नव्हती…घालमेल वाढत होती.
” बस, सत्यजित, तू आलास, तुझीच वाट बघत होते…! आणि विश्वजित का नाही आला रे ?”
“हे बघ आता दहा दिवस येथेच राहा..मी तुझ्या आवडीचे लाडू करून देऊ का ? ये..जवळ ये..!”
सकाळी उठताच राजे मॅडमच्या घरी फोन लावला. नर्सने उचलला.. मी तब्येतीबद्दल विचारताच उत्तरली, “हां, ठीक है..बेटा आया है ना ! गपशप चल रही है..!”
“हो, अरे, वा..! कधी आला? कोण आलाय ? सत्यजित का विश्वजित?
“अरे, क्या बाई..! आपभी ..? आपकी मॅडम……त्याच बरळत आहेत मनातच ..आता रोज हेच चालतं ..”…..!
@@@
– ©️ सौ. स्वाती वर्तक
यहाँ परेशान
पर उम्मीदों पे
जीता है इंसान!
जब फटे आसमान
आती है नदी उफान पर !
बहा देती है गाँव खेत
पर नहीं बहाती उम्मीदों को !!
जब पडे सुखा
आस लगा के बैठते हैं!
आयेगी कब बारिश
उम्मीद लगा के बैठते है !!
माॅं बाप, भाई बहन
पती पत्नी कच्चे बच्चे!
सारे रिश्ते ज़िंदगी
बंधे है उम्मीदोंकी धागोंसे!!
जिंदगी के चंद आखरी पल
कैसे गुजरेंगे पता नहीं!
पर एक खुशहाल मौत की
उम्मीद लेके जीते है!!
ये उम्मीद ही है
जो जीने का मकसद है!
उम्मीद के बिना
जिंदगी अधूरी है!!
शुक्रगुजार हूॅं उस रब का
जिसने हमें उम्मीद दी!
इसी उम्मीद के सहारे
तो हमने जिंदगी बिताई!!
– ©️ मिलिंद कर्डिले
पारशी जमातीविषयीचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. काही शतकांपूर्वी पारशांचे पूर्वज पर्शियाहून निर्वासित म्हणून गुजरातमधल्या संजाणला आले. तेथील राजाने त्यांना आश्रय द्यायला नकार दिला. तेव्हा पारशांच्या प्रमुखाने दुधाने भरलेला एक पेला घेतला आणि त्यात चमचाभर साखर घालून ती ढवळली. साखर दुधात पूर्णपणे विरघळली आणि दूधही गोड बनले. ‘साखरेप्रमाणे आम्ही या देशात राहू’ असा संदेश त्याने ह्या कृतीतून दिला. राजाने त्यांना राहण्यास परवानगी दिली. पारशांनी दिलेला शब्द पाळला. ह्या जमातीने टाटा-गोदरेज यांसारखे उद्योगपती, पालखीवाला-नरीमन यांसारखे कायदेतज्ज्ञ, भाभा-सेठना यांसारखे शास्त्रज्ञ, दादाभाई नौरोजी-फिरोजशहा मेहता यांसारखे राजकारणी देशभक्त आपल्याला दिले. कोरोनाची लस विकसित करणारे सायरस पूनावाला देखील पारशीच. अशा तऱ्हेने पारशी जमात इथल्या संस्कृतीत मिसळून गेली आणि तिने आपले समाजजीवन समृद्ध केले.
वृक्षसंपदेतून आरोग्यदायी पर्यावरणाकडे ह्या मालिकेत हे उदाहरण देण्याचा उद्देश आपल्या लक्षात आला असेलच. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय किंवा परदेशी हा मानवीवाद जसा जगाच्या सर्व भागात चालू आहे तसाच देशी किंवा स्थानिक विरुद्ध विदेशी असा वाद वनस्पतींबाबतही चालू आहे. साहजिकच देशी-विदेशी वनस्पती ह्या संकल्पेनेचा विस्ताराने विचार व्हायला हवा.
देशी वृक्ष किंवा वनस्पती म्हणजे मूळ भारतीय उपखंडातील वनस्पती, ज्या इथल्या मातीत, वातावरणात हवामानात वाढल्या आणि उत्क्रांत झाल्या अशा वनस्पती. येथे देश हा शब्द प्राकृतिक भौगोलिक अर्थाने घ्यायचा, राजकीय अर्थाने नव्हे. भारतातील बऱ्याच मोठ्या भू-प्रदेशात सर्वसाधारणपणे समान परिस्थिती आढळते. त्यामुळे मूळची भारतीय वनस्पती देशाच्या निरनिराळ्या भागातही देशी म्हणून समजायला हरकत नाही.
त्यातही काही वनस्पती काही शतकांपूर्वी आपल्याकडे आल्या आणि इथल्या वातावरणात समरस झाल्या. उदाहरणार्थ हादगा किंवा अगस्ता. हादगा हा मूळ मलेशियापासून उत्तर ऑस्ट्रेलिया ह्या प्रदेशातला. तो नक्की कधी भारतात आला माहीत नाही पण आयुर्वेदाच्या राजनिघण्टु ग्रंथात त्याच्या गुणधर्मांचे वर्णन केले आहे.
याशिवाय ग्रामीण भागातील मंदिरांच्या आवारात हमखास आढळणारा पांढरा चाफा किंवा खुरचाफा तसेच तांबडा चाफा, अनंत किंवा केप जास्मिन हे वृक्ष देखील तशा अर्थाने देशी नव्हेत. तांबडा चाफा मूळचा अमेरिकेतील उष्ण कटिबंधातला तर अनंत मूळचा चीन किंवा जपानचा. मूळचा मध्य आफ्रिकेतला गोरख-चिंचेचा वृक्षही असाच शेकडो वर्षांपूर्वी इथे आला आणि इथला झाला.
अशा काही थोड्या वनस्पती सोडल्या तर गेल्या चार-पाचशे वर्षांत इंग्रजांनी आणि पोर्तुगीजांनी ज्या काही वनस्पती आणल्या त्या विदेशी समजल्या जातात. पोर्तुगीजांनी बटाटा, साबुदाणा, मिरची, अननस, चिकू, हापूस ह्या वनस्पती आणल्या आणि त्य़ांची लागवड केली. पण गंमत म्हणजे हापूस किंवा अल्फान्सो हा मूळचा आपला नाही, हे मान्य करायला आपल्याला जड जाते. मिरची ही आता आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनली असली तरी ती पोर्तुगीजांनी चार-पाचशे वर्षांपूर्वी भारतात आणली हे आपल्याला माहित नसते. त्यापूर्वी त्रिकटु म्हणजे सुंठ, मिरी आणि पिंपळी ह्या तीन कटु म्हणजेच तिखट रसाच्या वनस्पतींचा खाद्यपदार्थांत वापर केला जाई.
इंग्रजांनी कुंपणासाठी म्हणून घाणेरी, कोयनेल, शेर, बिट्टी अशा वनस्पती आणल्या आणि लावल्या. महोगनी, सुरू ह्या झाडांची लागवड केली. शंकासूर, गुलमोहर, नीलमोहर, पिचकारी अशी सुंदर फुले येणाऱ्या वनस्पतींचे देखील स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात आगमन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक वनीकरण विभाग व वन खात्याने झटपट वाढणाऱ्या अनेक विदेशी प्रजाती आणल्या आणि त्यांची मोठ्या प्रमाणात रस्ते व महामार्गांच्या बाजूने लागवड केली. ह्या वनस्पतींना येथील हवामान मानवले आणि त्या नुसत्या वाढल्याच नाहीत तर फोफावल्या.
पण याचबरोबर मानवाचा स्मृतिरंजनात रमण्याचा स्वभावही वनस्पतींच्या देशांतरास कारणीभूत ठरला हे विसरून चालणार नाही.
कोकिळ ( Cuckoo / Asian Koel )
हा पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.
कोकीळ हा पक्षी जरी कोणी बघितलेला नसला तरी त्याबद्दल काहीही ऐकल नाही, असा माणूस साडपणे कठीण. ‘कुहूsकुहू’ हा स्वर कानी पडला की वसंत ऋतुचे आगमन झाले, असे समजावे. बऱ्याच जणांना माहीत नसते की पंचमातील साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे. गंमत म्हणजे पंचम स्वरांत गाणारे हे पांखरू बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही कुठे दडून बसलेय तेच समजत नाही.
कावळ्याचा भाऊबंद वाटावा असा हा कोकीळ अतिशय लाजरा बुजरा असतो. आकाराने कावळ्यापेक्षा लहान, मजबूत चोच आणि गुंजेसारखे लालभडक डोळे. मादी कोकीळ, हा एक वेगळाच पक्षी आहे इतपत वेगळी वाटते. अंगावर फिकट राखी रंगानं खडी काढावी अशी कोंबडीसारखी पिसे असतात. तिचे डोळे नरासारखेच असतात पण ती गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा चिरका असतो.तिचे ओरडणे म्हणजे कचकचाट असतो.
कोकीळ पक्षी कधीच घरटी बांधत नाहीत घरटे बांधले नाही तरी यथाकाल अंडी देण्याची वेळ येते वीणीच्या हंगामात ते कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात. अंडी घातलेले कावळ्याचे घरटे सापडले की नर कोकीळ कावळ्याच्या घरट्यापाशी जातो, कावळा-कावळी नराला हुसकायला जातात तेवढ्या वेळात दबा धरून बसलेली कोकिळा कावळ्याच्या घरट्याचा ताबा घेते. कावळ्याची अंडी चोचीत उचलून फेकून देते आणि लगबगीने त्या जागी स्वत:ची अंडी घालते आणि उडून जाते. एरवी धूर्त आणि चतुर असलेले कावळे इथे हमखास फसतात आणि कोकिळेची अंडी स्वत:ची म्हणून ती उबविण्याची जबाबदारीही घेतात, पिल्ले झाली की त्यांना चारा पाणी देतात, मोठी करतात. यथावकाश पिल्ले मोठी होतात व उडून जातात. हे विचित्र जीवनचक्र निसर्गात अव्याहतपणे चालू आहे.
हिवाळ्याची सुरुवात झाली की कोकीळ एकदम गडप झाल्यागत वाटतो. कारण त्याचा आवाजच ऐकू येत नाही परंतु कोकिळ आणि कोकिळा आवाज न करता दिवस वसंत ऋतु येईपर्यंत जिथे असतील तिथेच दिवस काढतात. पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो काही प्रजाती मात्र स्थलांतर करतात. जगभरात ह्या पक्ष्याच्या १२० प्रजाती आहेत
२७.
मोर ( Peackock )
२६ जानेवारी १९६३ सालापासून मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. कोंबडी वर्गीय हा पक्षी १९६३ पूर्वी विनाशाच्या मार्गावर होता. ह्याचे मांस चविष्ट असते, ह्या समजुतीमुळे त्यांची बेछूट शिकार करण्यात आली. शेवटी ही प्रजाती नाहीशी होते की काय असा प्रश्न उपस्थित झाला. मोराचे भारतीय धार्मिक आणि पौराणिक परंपरेतील महत्वाचे स्थान आणि हिंदू धर्मीयांच्या मनात असलेले त्याच्याबद्दलच्या पवित्र भावना लक्षात घेता त्याचे सर्वांगीण संवर्धन व्हावे ह्या उद्देशाने देशात आढळणाऱ्या सर्व पक्ष्यात सुंदर आणि आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या ह्या देखण्या पक्ष्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आणि मोरांना अभय मिळाले. आज देशात अनेक ठिकाणी मोरांची संवर्धन केंद्रे आहेत.
मोराच्या मादीला लांडोर (Peahen) म्हणतात. तिला मोरासारखा पिसारा नसतो. मोरांचे मुख्य अन्न म्हणजे कीटक, फळे, भाज्या, धान्य; मोर हा शाकाहारी आणि मांसाहारी आहे. मोराला साप खायलाही आवडते. मोर टोमॅटो, गवत, पेरू, केळी, हिरव्या आणि लाल मिरच्या मोठ्या आवेशाने खातो. मोर सरडे आणि अनेक प्रकारचे कीटक खाऊ शकतो. मोर हा एक सर्वभक्षी पक्षी आहे, जो गवत, पाने, हरभरा आणि गव्हापासून कीटक व साप यांना खाऊ शकतो. मोर हा शेतकऱ्यासाठी मित्र पक्षी आहे. हे शेतातील कीडे, कीटक, उंदीर, सरडे आणि साप खातो.
मोर रात्री घनदाट झाडांवर उभे राहून झोपी जातात. मोर घरटी करत नाहीत. लंडोर वर्षाच्या जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान अंडी देतात. जमिनीवर एखाद्या खोबणीत, गवतांच्या गचपणात ती एका वेळी ३ ते ५ अंडी देते. एका मोराचे २ ते ३ माद्यांबरोबर संबंध असतात त्यामुळे नीट संवर्धन केल्यास वर्षभरांत १० ते १५ नवे मोर तयार होतात.
ह्या राष्ट्रीय पक्ष्याचा पिसारा, त्याची पिसे, त्याचे वर्षा ऋतुतील नृत्य ह्याची वर्णने आणि “नाच रे मोरा” सारख्या कविता प्राथमिक शाळेपासून शालेय शिक्षणात असल्याने मोराबद्दल माहिती नसलेला भारतीय विरळाच म्हणावा लागेल.
– ©️ प्रदीप अधिकारी
adhikaripradeep14@gmail.com
संजय केतकर
पंजाबराव देशमुख
विदर्भाच्या इतिहासानं पहिल्या पानावर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेबांचं नाव लिहिलं. ‘बोले तैसा चाले’ हे भाऊसाहेबांच्या जीवनाचं मुख्य सूत्र. एक तत्त्वनिष्ठ सेवाव्रती म्हणून मराठी मनानं त्यांचा गौरव केला आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या पापड या एका छोट्याशा गावांत २७ डिसेंबर १८९८ रोजी पंजाबरावांचा जन्म झाला. अमरावतीच्या हिंदू हायस्कुलमधून ते मॅट्रिक, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२० साली उच्चशिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी त्यांनी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘वेदवाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’. पंजाबरावांचं पांडित्य या प्रबंधावरून सिद्ध होतं. बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले, ते एका विधायक कार्याची योजना मनात धरूनच.
१९३१ साली भाऊसाहेबांनी श्री शिवाजी संस्थेची स्थापना करून त्याचा विस्तार केला. तो थक्क करणारा आहेच; परंतु भाऊसाहेबांच्या प्रगल्भतेचं ते एक विराट दर्शन आहे. अनेक महाविद्यालयं, शाळा, बालक मंदिरं, प्रशिक्षण विद्यालयं, कृषी महाविद्यालय, छात्रालयं, व्यायामशाळा, अशा जवळपास दीडशे संस्था श्री शिवाजी शिक्षण संस्थेत अंतर्भूत आहेत.
पंजाबराव १९३०साली व-हाडाचे शिक्षण व कृषिमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कर्जलवाद कायदा पास करून घेतला आणि हजारो शेतक-यांना सावकारी पाशातून मुक्त केलं. त्यांच्या जमिनीसुद्धा त्यांना परत मिळवून दिल्या. १९५२ ते १९६२ या कालावधीत ते केंद्रीय कृषिमंत्री होते. पंजाबरावांनी १९५९ साली दिल्ली येथे ‘जागतिक कृषी प्रदर्शन’ भरवलं. मधुमक्षिका पालन संस्था, कृषियंत्र सामुग्री संघटना, भारतीय कृषक सहकारी अधिकोष अशा कितीतरी संस्थांचे ते संस्थापक व अध्यक्ष होते. कृषी विद्यापीठाची कल्पना पंजाबरावांचीच. अर्थातच विदर्भातील कृषी विद्यापीठाला ;पंजाबरावांचं नाव देण्यात आलं आहे.
पंजाबरावांना १९४६ साली भारतीय घटना परिषदेचं सभासदत्व देण्यात आलं. ही जबाबदारीसुद्धा त्यांनी समर्थपणे सांभाळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंजाबरावांच्या कार्याचा विशेष गौरव केला आहे.
भाऊसाहेबांना समाजाची सुधारणा करायची होती. १९२७ साली मोर्शीच्या हिंदू अधिवेशनात चातुर्वर्ण्य, जातिभेद आणि अस्पृश्यता यांचा निषेध करणारा ठराव त्यांनी संमत करून घेतला. अमरावतीचं अंबादेवी मंदिर त्यांच्याच प्रयत्नामुळे सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. शिक्षण, शेती, सहकार, अस्पृशोद्धार, जातिभेद निर्मूलन या विधायक कार्यांत जीवन समर्पित करणारे पंजाबराव दि. १० एप्रिल १९६५ रोजी स्वर्गवासी झाले
– संजय केतकर
[ ‘महाराष्ट्र टाइम्स‘ : शतकाच्या पाऊलखुणा – दि. ३० एप्रिल २००० वरून साभार ]