मोहन कान्हेरे
माझं नाव सुवर्णा जोशी (खरं तर हे माझं खरं नाव नव्हे पण लाजिरवाण्या गोष्टी सांगायच्या झाल्या की. )
मी मूळची कोकणातली . रत्नागिरी जिल्ह्यात माझं गाव.
या गावाचं नावही सांगायची माझी इच्छा नाही….. कारण गावातल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने मला सहानुभूती दाखवायला नकोय; मला फोन करायला नको; पत्र पाठवायला नको आणि भेटायला तर मुळीच नको.
माझं शालेय शिक्षण गावातल्याच बाळबोध शारदा विद्या मंदिर शाळेत झालं .
घरून आणि शाळेमध्ये खूप चांगले संस्कार मिळाले .
जुन्यातलं ते चांगलं घ्यायचं आणि नव्यातलं ही चांगलं घेऊन आपण जगण्याची कला साध्य करायची असं माझं राहणं…..
माझ्या मैत्रिणी देखील अतिशय सरळ मनाच्या आणि भावनाप्रधान! मीही स्वतःला तसंच समजते .
अशी मी कॉलेजचं शिक्षण घ्यायला मुंबईला माझ्या काकाच्या घरी गेले . सिडनहॅम या नावाजलेल्या कॉलेजमधली मी नावाजलेली विद्यार्थिनी झाले……
मन लावून अभ्यास केला आणि कॉमर्सची पदवीधर झाले.
पुढचं शिक्षण घेत असतानाच एका कर्तबगार चांगल्या तरुणाची, निशिकांत जोशीची बायको झाले. हे सर्व अगदी लवकर लवकर जमून आलं; आजही मला त्या योगायोगाचं आश्चर्य वाटत आहे.
निशिकांत म्हणजे नेमस्त स्वभावाचा आणि सरळ मार्गी तरुण !
त्याचीही स्वप्नं होती आणि ती माफक होती. त्या दृष्टीने त्याने वाटचाल केली आणि त्याच्याशी, वयाच्या बाविसाव्या वर्षी माझं लग्न झालं.
आमचं लग्न झाल्यानंतर एक वर्षातच निशीची ट्रान्सफर झाली, ती देखील अति दूर. हरियाणामध्ये गुरुग्राम येथे आम्हाला यावं लागलं. दिल्लीच्या विमानतळापासून सव्वा तासांवर आमचं गुरुग्राम. तिथे सेक्टर ५६ मध्ये माझं वास्तव्य सुरू झालं.
सुरुवातीला तो पेइंग गेस्ट म्हणून राहिला आणि मग, भाड्याचं घर घेऊन त्याने मला बोलवून घेतलं.
या गुरुग्राममधल्या जीवनाशी जुळवून घेताना माझी बरीच कसरत झाली पण सुदैवाने इथे चांगल्या मैत्रिणी मिळाल्या .
सुमित्रा तर पुण्यातली . आमची दूरदूरची नातलग .
ती माझी खास मैत्रीण झाली .
*************
कालांतराने गोड, गोऱ्या, गोमट्या मुलीची, कांचनची मी आई झाले. मग तर खूप व्यस्त झाले…..
बघता बघता हे शहर माझं झालं आणि मी या शहराची झाले. या शहराचाच एक भाग झाले…..
आता माझी दुर्दैवी कहाणी तुम्हाला सांगायची आहे. यामध्ये तुम्हाला सावध करण्याचा सुद्धा माझा प्रयत्न आहे.
***************
गेले दोन दिवस माझं डोकं भणभणत आहे….. मला जीव नकोसा झाला आहे…
त्या दिवशी ऑफिस च्या कामानिमित्त निशी मेरठला गेलेला होता.
……घरात मी एकटीच!
….खूप रडले….. स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं…..जेवलेही नाही. नुसतंच दूध पिऊन दिवस ढकलले…… माझ्या निशीला काही कळवायची हिम्मतच होत नव्हती.
रमेश, हा माझा चुलत भाऊ, मुंबईत रहाणारा….. खरं तर माझा तो मित्रही आणि आधारसुद्धा….
त्याला फोन करून कळवले आहे. तो शनिवारी इथे येणार आहे ……
माझ्या आयुष्यात जसा खड्डा पडलाय तसा तो तुमच्या आयुष्यात पडू नये म्हणून हे आता लिहायला घेतलंय…..
आमचा सेक्टर मला खूप आवडतो.
घरापासून सर्व सर्व जवळ आहे आणि रात्रीसुद्धा इथे जाग असते.
इथे मोजकी मराठी कुटुंबं आहेत. बाकी सर्व परप्रांतीय….. त्यामुळे संबंध बेताचेच राहिले आहेत.
सहा महिन्यांपूर्वीच मला इथे एक बऱ्यापैकी नोकरी मिळाली, त्यामुळे कोणाच्यात मिळून मिसळून राहण्याची, मैत्री करण्याची, एकत्र ट्रीपला जाण्याची कधी संधी लाभली नाही.
आम्ही दोघं नोकरीच्या निमित्ताने सेक्टर ५ मध्ये जातो.
आमची घरातून निघायची वेळ एक असते मात्र परत येताना कधीकधी रात्रीचे नऊसुद्धा वाजतात……
माझी सुकन्या…… कांचन!
तिच्या चेहऱ्यात विलक्षण गोडवा …….कोणालाही तिच्याशी बोलावंसं वाटेल……
साडेपाच फूट उंच…… तरतरीत…… दोन वर्षे कथ्थक शिकलेली…….
दीनानाथ दलालांच्या चित्रातली सुंदरीसुद्धा कांचनइतकी सुंदर नाही …..संस्कृत नाटकातील शकुंतलाच ती…..
गोरीपान. अतिशय बोलके घारे घारे डोळे…..लाघवी स्वभाव.
गोड गोड बोलणारी आणि समोरच्याला पटकन आपलंसं करणारी…..
माझ्या बहिणीचा हा गुण तिने घेतला आहे. सर्वांनाच ती हवीहवीशी……
कॉलेजमध्ये तिचं हे पहिलंच वर्ष……
पण तिचं कॉलेजमधलं आयुष्य कसं चाललंय, तिला अभ्यास आवडला का, तिच्या मैत्रिणी कोण आहेत……मला फारसं माहीत नाही….. एकदाच सेक्टर ६८ मध्ये जात होतो तेव्हा गाडीतून तिने मला तिचं मॉडन कॉलेज दाखवलं त्या दिवशी रविवार होता मी गाडी थांबवली आणि तिला म्हटलं मला तुझं कॉलेज बघायचंय आपण वॉचमनला विचारून आत जाऊन येऊ; ती हो म्हणाली कॉलेजच्या प्रवेशद्वाराशी आम्ही गेलो तेव्हा वॉचमन तिच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, ये क्या अन्वर साहेब नाही आहेत कोण अनवर असं विचारायला हवं होतं पण दुसराच काही विषय निघाला आणि ते राहून गेलं विचारायची.
आम्हा तिघांची साप्ताहिक भेट फक्त रविवारी! तीसुद्धा निसुटती, बरीचशी औपचारिक……
सकाळी ब्रेकफास्ट झाला की पळायची बाजूच्या टॉवरमध्ये, सुजाताच्या घरी…..
एकदा तिकडे गेली की कधी परतेल सांगणं कठीण!…… मग आमच्या गाठीभेटी नाहीत, मोकळं बोलणं नाही ……आम्हा तिघांना एकत्र गप्पा मारताना कधी कुणी पाहिलं नसेल.
मला आणि निशीला, फावला वेळ नाही.
इथलं आयुष्य मुंबईच्या वरताण धावपळीचं …..
त्या शुक्रवारी मी ऑफिसमधून नेहमीप्रमाणे आले.
टेबलवर पर्स ठेवली….. खूप तहान लागली होती तरीदेखील मी किचनमध्ये गेले नाही…..कारण तिथेच एक मोठा लिफाफा ठेवला होता. उत्सुकतेने मी तो उघडला. आत पत्र होतं, माझ्या लाडक्या कांचनचं……
****************
” मी आता तुझी कोणीच नाही…… तुझ्याशी, बाबांशी, सर्व नातलगांशी मी संबंध तोडत आहे……मला त्याचं जराही दुःख नाही…..
तुम्ही सर्व काफीर……खुजे…….
आणि म्हणूनच बिनधास्त सर्व काही मोकळेपणे लिहीत आहे.
हे पत्र जेव्हा तुझ्या हातात असेल तेव्हा मी ३२,००० फुटांवर विमानात बसलेली असेन…..
माझ्या शेजारी माझा रब, माझा आका, अनवर, मला कुशीत घेऊन बसलेला असेल. आम्ही दोघं त्या वेळेस एका वेगळ्याच दुनियेत जाण्याची स्वप्नं रंगवत असू……
माझा अन्वर ……मस्त उंची, उत्तम देहयष्टी, सावळा, भेदक नजर !
त्याने रोखून पाहिलं की समोरच्या मुलीच्या ……..
मला तो ‘खुशबू’ म्हणतो……
किती रोमँटिक आहे बघ तरी! खूप खूप प्रेम करतो माझ्यावर. त्याच्या वॉलेटमध्ये माझा फोटो आहे आणि त्याच्या खाली त्याने माझी सही घेतली आहे .
माझी खूप आठवण आली की माझा फोटो तो पहात बसतो. ( खुद्द त्यानेच मला हे सांगितलं आहे)
मी भेटले की दर वेळेला नवी शायरी ऐकवतो, छान छान गिफ्ट देतो मला ….. आमची नवी ओळख झाली तेव्हा पहिल्या भेटीत त्याने मला गोल्डन वॉच दिलं .
त्याच्याकडे लखनवी अदब आहे. त्याच्या आवाजात जादू आहे …..मस्त गातो आणि तेही फक्त माझ्याच साठी……
त्याच्यासारखा तगडा मर्द माझ्या आयुष्यात आला आणि मी पूर्ण बदलले गं ….. माझ्या जागी असतीस, तुझंही असंच झालं असतं……
मागचं एक वर्ष आम्ही एक दुसऱ्याचे झालो आहोत.
हे सगळं कसं घडलं ते तुला सांगते.
शबनम बारमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. एखाद्या रोमँटिक सिनेमात शोभेल अशी आमची जवळीक झाली……
आता विस्तारानेच सांगते.
शबनममध्ये मी वेफर्स खात असताना मला जोरदार ठसका लागला. अन्वरला मी ओळखतही नव्हते……धावत जाऊन त्याने पाणी आणलं……माझा ठसका थांबेपर्यंत माझ्यासमोर बसला. माझी अवस्था बघून त्याचे डोळे पाणावले……
रंजना मला नंतर म्हणाली की हे नाटक असणार….. एखाद्या अनोळखी मुलीला ठसका लागला तर डोळ्यात पाणी यायची काय गरज?
तिला काय माहित कवी मनाचा माणूस कसा असतो ते……
मी तिथून निघताना त्याने रुबाबदारपणे खिशातून स्वतःचं कार्ड काढलं. त्याच्यावर उर्दूत लिहिलं होतं,
‘ शायर अन्वर ‘
फक्त फोन नंबर, शेजारी एक जलती हुई शमा…..
मला ते वाचता आलं नाही. मी त्याला विचारल्यावर तो खूप हसायला लागला. त्याचं हसणं जगावेगळं आहे.लहान मुलासारखं निरागस आहे. मला तो हसताना खूप आवडत होता. माझ्या डोळ्यात खोलवर बघत त्याने विचारलं ,
” फिर कब मिलोगी? मुझे आपकी नशिली आँखो पर शायरी लिखनी है “
माझ्या नजरेला नजर भिडवून त्याने माझा हात हातात घेतला आणि…….
एवढी धिटाई? मला तर त्याचं कौतुकच वाटलं…..
नाही तर आमचे तरुण! मुलींच्या समोर लाजत बुजत बोलतात…. नजरेला नजर द्यायलासुद्धा घाबरतात….. सिली……
हळूहळू आमच्या भेटी वाढत गेल्या. त्याचे मित्र माझ्यावरून त्याला चिडवायला लागले. माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या तू फार पुढे जाऊ नकोस……..
त्या मला मागे का खेचत होत्या? बहुतेक त्या माझ्यावर जळत होत्या…….
आता तुला शेवटचं सांगते कारण तुझ्या मनात ते आलं असणार……..
तो तुम्हा मध्यमवर्गी काकवांचा आवडता प्रश्न आहे, की मुलगा करतो काय?
तू त्यांना सांग तो फार मोठा शायर आहे.
लवकरच त्याचं पुस्तक येणार आहे. ते आलं की बॉलीवूडमधल्या लोकांची लाईन लागेल. ….. त्याने सिनेमा करता लिहावं अशी त्याला गळ घातली जाईल.
मग तर काय, पैसा आणि प्रसिद्धी…….पैसे मोजायला वेळ मिळणार नाही असं तो मला सांगत होता……..
पैशांवरून आठवण झाली……
तुला ते सुरुवातीलाच सांगायला हवं होतं ……
घरातून जेव्हा मी निघाले तेव्हा अन्वरच्या आग्रहावरून आपल्या दोघींचे दागिने आणि लॉकरमधली सगळी कॅश मी त्याच्या बॅगेत ठेवली आहे…..
तुम्हा दोघांची बँकेची पासबुकं आणि त्याच्या आग्रहाखातर तुमचे पासपोर्टही घेतले आहेत…..
तो म्हणाला, इमर्जन्सी में ये सब हमारे पास चाहिये…. ”
देवघरातला पितळी बाळकृष्ण बरोबर घ्यायला त्याने मला होकार दिला….. त्याचं मन किती मोठं, हे यावरून सिद्ध झालं ……
आणि हो चांदीचं तांब्या भांडंसुद्धा आम्ही घेतलं आहे.
अन्वर म्हणाला, ” आपके पेरेंट दोनो पैसे वाले हैI उन्हे खूब सारी तनखा मिलती होगी. जब मौका मिलेगा तब मै किसी के साथ उनके पैसे और गहने लौटा दूंगा I उनको जिंदगी मे कभी भी मै मिलूंगा नही I तुम मिली और क्या चाहिये मुझे?”
तो मला म्हणाला ,
” मेरे मा बाप दिल्ली में रहते है I और उनको मिलने के लिए, तुम्हे छोड कर पंद्रह दिनो के बाद अकेले वहां जाना है I “
हे सर्व वाचताना तू रडायला लागशील……. पण माझ्यावर तुझा विश्वास आहे हे मला माहित आहे…… मला खात्री आहे.
रडू नको खुळ्यागत…..
मी माझ्या प्रगतीसाठी जात आहे. एक नवं आयुष्य मी सुरू करत आहे.
मला खुशबू हे छान नाव मिळणार आहे आणि मला प्रार्थना करायला नवा रब मिळणार आहे…… हाऊ रोमँटिक……
मला आता अजान म्हणता येते आपले सगळे देव मला परके वाटतात …..तूसुद्धा…..
बाबा भडकतील याची मला खात्री आहे. त्यांना सावरायचं काम तुझं आहे….. त्यांना म्हणावं,
” पोलिसात जाऊ नका. तसं काही केलंत तर त्याचे मित्र, ‘ सर तन से जुदा ‘ करतील “
कधी आठवण तुझी आलीच तर येईन भेटायला….. खुशबू अन्वर या नव्या नावाने…….
खुशबू अन्वर.
– ©️ मोहन कान्हेरे,
गुरुग्राम
mohankanhere@yahoo.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
स्वागत फुलांनी – रान अबोली
– सविता कांबळे
savitak211@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विचारशलाका
(६१)
– प्रेषक शुभदा अघोर
shubhadaaghor@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आणखी एक (अज्ञात ) केशवसुत
कै. म. के. दामले
– पृष्ठ ६९ –
– प्रेषक माधव मनोहर जोशी
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
श्रीमद्भगवत्गीता
१५ व्या अध्यायाचा भावानुवाद
माधव मनोहर जोशी
श्लोक ११ —
*यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् ।*
*यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ १५-११ ॥*
*अर्थ* —
योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्त्वतः जाणतात;
परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या
आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. ॥ १५-११ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
जाणती योगी ही l हृदयस्थ आत्मा l
करिता प्रयत्ना l मनोभावे ll
असे ज्याचे चित्त l बहुत अशुद्ध l
असा तो निर्बुद्ध l काय जाणे ll
*श्लोक १२–
*यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।*
*यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १५-१२ ॥*
*अर्थ,* –
सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि
जे तेज अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे, असे तू जाण. ॥ १५-१२ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
रवी,चंद्र,अग्नी l बहु तापलेले l
कैसे तेज आले l त्यांचेकडे ll
हे तू जाण पार्था l माझेच हे तेज l
उजळी जगास l सारीकडे ll
*श्लोक १३*–
*गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।*
*पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १५-१३ ॥*
*अर्थ* —
आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि
रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. ॥ १५-१३ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
धरेच्या पोटात l शिरून तो मीच l
धारितो सर्वांस l मम तेजे ll
बनूनी मी चंद्र l माझिया रसाने l
पोषितो प्रेमाने l वनस्पती ll
*श्लोक १४–
*अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।*
*प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १५-१४ll*
*अर्थ* —
मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर
अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. ॥ १५-१४ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
बनुनी मी अग्नी l सर्वांच्याच तनी l
वसती करुनी l मी असतो ll
प्राण व अपान l बघ वायुसंग l
अन्न चतुरंग l पचवितो ll
*श्लोक १५*–
*सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।*
*वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५-१५ ॥*
*अर्थ* —
मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच
स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे.
तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे. ॥ १५-१५ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
मी वसे हृदयी l सकलांच्या खोल l
माझे हे बोल l ध्यानी ठेव ll
होतसे निर्माण l ज्ञान अन् स्मृती l
तसेच विस्मृती l माझ्यामुळे ll
जाणीतो मी वेद l ज्ञानाचा उगम l
वेदात परम l मीच आहे ll
****************************
– ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
प्रदीप वर्तक..एक मनस्वी कलाकार
सौ स्वाती वर्तक
२५ ऑगस्ट १९५० रोजी सौ. लीलाताई आणि श्री अनंतराव वर्तक यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. नाव ठेवले प्रदीप…तेव्हा ठाऊक नव्हते हा असेच नावाप्रमाणे तेजोमय असणार.
तसे त्या घरात गाणारे असे कोणी नव्हते पण संगीताप्रती प्रेम , जिव्हाळा आजीपासून सर्वांनाच होता.. याला उपजत देणगी असावी ..बालपणापासून संगीताची आवड..आजकाल जसे लिट्ल चॅम्प्स गाजतात तसे तो मंचावर गात होता, गाजत होता..त्याची धाकटी बहीण उषा वर्तक तीही सोबत असे. ( हिने तर नंतर मोठेपणीही अनेक कार्यक्रम प्रस्तुत करून अगदी लता मंगेशकर यांना देखील कौतुक करण्यास बाध्य पाडले होते )
पण प्रदीपच्या आवाजाला दृष्ट लागली बहुदा. अठराव्या वर्षी काहीतरी त्रास झाला आणि आवाज अतिशय घोगरा व जड झाला..गाण्याची आवड तशीच होती, संगीताचे सूर त्यांना साद देत. तदनंतर त्यांनी आपला मोर्चा “संगीतकार “ या क्षेत्राकडे वळविला. त्यात त्यांनी नावाप्रमाणेच दैदिप्यमान यश मिळविले. त्या काळात त्यांची गाणी आकाशवाणी व दूरदर्शनवर ऐकवली जात. त्यांच्या गाण्यांचा दर्जा बघून त्यांना “आकाशवाणी संगीतकार ग्रेड 1” हा मान मिळाला. त्यांच्या सोबत अरेंजर म्हणून विलास जोगळेकर काम करीत असत दोघांची जोडी छान जमली होती.
त्यांचे स्नेही अशोक पत्की यांनीही संगीत नियोजन केले. दूरदर्शनवरील ‘आरोही’ आणि ‘शब्दांच्या पलीकडले’मध्ये त्यांची गाणी गाजली..हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांचे ” दर्यावरी “ या गाण्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती
श्रीनिवास खळे, यशवंत देव, शंकर वैद्य, शांताराम नांदगावकर, पद्मिनी बिनीवाले अशी अनेक नावे घेत येतील. यांच्या सोबत कार्य करायला मिळाले म्हणून ते प्रसन्न होते.
त्यांचे त्या काळचे गायक, गायिका… हेमंत कुमार, महेंद्र कपूर, मन्ना डे,अरुण दाते, अरुण इंगळे, शरद जांभेकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, उषा वर्तक, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी, दिलराज कौर, सुषमा श्रेष्ठ, प्रमिला दातार. इतर असत
पण काही वर्षे मध्यंतरी घर, संसार, मुलाचे शिक्षण, परदेश गमन या व्यापात संगीताशी तडजोड करावी लागली ..इच्छा असूनही इतर व्यापामुळे सूर दूर सारावे लागले. आणि निवृत्तीनंतर पुनः चैतन्य सळसळू लागले; त्यात भक्कम साथ दिली त्यांची सहधर्मचारिणी चित्रा वर्तक यांनी..ती त्यांची सावली बनून राहिली.
नव्या उमेदीने, नवे गायक, गायिका, नवी ऊर्जा ..
पुनः अनेक गाणी केली; यावेळेस त्यांचे नवीन कलाकार होते …सुदेश भोसले, मंदार आपटे, वैशाली भैसने माडे, साधना सरगम, अर्चना गोरे, स्वाती आपटे आणि इतर
कवी…भालचंद्र फडणवीस, श्रेयसी वझे, श्रीनिवास आठल्ये यांच्या शब्दांना त्यांनी योग्य तो न्याय दिला..
या सत्रात त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील गीत लाखो लोकांची पसंती मिळविणारे ठरले ..मंदार आपटे आणि वैशाली माडे यांच्या सुमधुर तयार आवाजात ते अतिशय कर्णमधुर झाले आहे.
त्यांचा स्वभाव मिस्किल होता, हास्य खळाळते होते, आपल्या मतांवर ठाम असत. समोरची गायिका किती प्रतिष्ठित आहे याचा विशेष मुलाहिजा न बाळगता स्वतः चे पाहिजे असलेले सूर मिळाले नाहीत तर स्पष्ट बोलत ..कधी कधी याची इतरांना खंत वाटे..अनेक समस्या त्यांनी हसत झेलल्या. भरपूर शारीरिक व्याधी असूनही एकटेच काठी घेऊन लांब लांब कामानिमित्त फिरत असत.. ही जिद्द वाखाणण्यासारखी होती ,प्रेरणास्पद होती .
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. सह्याद्री वाहिनीवर त्यांची मुलाखत रंगली.. स्वच्छद कॅलिडोस्कोप भाग ३५ मधील मुलाखत बरेच काही सांगून जाते .तसेच अर्चना गोरे यांची डॉक्युमेंटरी ही बोलकी आहे, मा.हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून कौतुक व आशिष शेलार यांच्यातर्फे सत्कार झाला. आणि बरेच काही.
रसिक वाचकांनी इच्छा असल्यास बघावी.
खाली दुवा देत आहे .
दिनांक ११जानेवारी 2026 रोजी संगीत क्षेत्रातील हा मनस्वी तारा निखळला .त्यांचा स्वभाव विशेष माझ्या कानात गुणगुणतो की ते आताही यक्ष,गंधर्व,अप्सरा यांच्या सोबत मस्त महफिल रंगवत असतील .
ओम शांती.
– ©️ सौ स्वाती वर्तक
खार ,मुंबई ५२
swati.k.vartak@gmail.com
https://youtu.be/O-8Npf6IkhY?si=4BuUBsY88LHAsQoq
https://youtu.be/bsw1eZTWR9k?si=yYKn7c3DKjDo8cIt
https://youtu.be/1OkYG6k6ukU?si=YlnJiFFFiHu7Lpze
@@@@@@
आजची कविता
सौ. विनया माधव जोशी
राधेची तक्रार
राधा आणिक कृष्ण, अचानक भेटले स्वर्गात l
गोकुळानंतर तयांची कधी घडली नव्हती भेट ll१ll
अवचित बघुनी राधेला, कृष्ण गडबडला मनी l
राधा होती शांतचित्त, स्मितहास्य तिच्या वदनी ll२ll
“कसे आहात द्वारकाधीश? ” राधा पुसे कृष्णाला l
‘ द्वारकाधीश ‘ संबोधन ऐकोनी, कृष्ण मनी बावरला ll३ll
म्हणे कृष्ण, “हे राधे, मी आहे कान्हा तुझा लाडका l
‘द्वारकाधीश’ म्हणोनी मजला करू नको ग परका ll४ll
गोकुळ सोडून द्वारकेत मी, पुरता बुडलो व्यापात l
राधे, तव आठव येता अश्रू दाटत होते नयनात ll५ll
राधा सांगे, ” कृष्णा,मज तुझी कधीच आठवण आली नाही
आठव कैसा येईल, तुज जर कधी विसरलेच मी नाही ll६ll
तुजला मी जपून ठेवले होते या माझ्या नयनांमध्ये दोन्ही l
रडले नाही कधीही, अश्रूंसह तू वाहून जाशील म्हणूनी ll७ll
गोकुळास या सोडूनी, तू पोचलास थेट द्वारकेस l
प्रेम विसरुनी आमुचे, कधी न आलास भेटण्यास ll८ll
स्वकर्तृत्वाने तुज कीर्ती मिळाली,ह्या साऱ्या जगती l
द्वारकेस जाऊनी तू कान्हा बदललास रे किती ll९ll
दहा बोटे तुझी जादुई फिरत होती त्या बासरीवरी l
मधुर स्वरांवर लुब्ध होऊनी डोलत होती गोकुळनगरी ll१०ll
गोकुळ सोडून जाता, या बासरीस पुरता तू विसरलास l
द्वारकेस जाऊनी एका बोटावर सुदर्शन चक्र घेतलेस ll११ll
गोकुळात गोवर्धन उचलूनी कित्येक जीव तारलेस l
द्वारकेस जाता सुदर्शन चक्राने दुष्ट जीव घेतलेस ll१२ll
कुरुक्षेत्री पार्थास गीता सांगूनी, केलास रे तू उपदेश l
आशय तिचा महान,आजही मार्ग दावी सकलांस ll१३ll
पराक्रमी द्वारकाधीश म्हणूनी, तू पूज्य असशी जगती जरी l
कान्ह्या, तुझे बालरुप ठसले सकलांच्या मनमंदिरी ll१४ll
प्रत्येक मंदिरी पहा तू कान्ह्या, जाऊनिया ह्या पृथ्वीवरी l
कृष्णा, तुजसवे दिसेल राधा सर्वत्र तुझिया बरोबरी ll१५ll
– ©️ सौ. विनया माधव जोशी
प्रेषक माधव मनोहर जोशी
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
भुतं खरीच असतात का ?
माधव मनोहर जोशी
आपण राहतो त्या जगात मानव प्राण्यांबरोबर इतरही अनेक पशु, पक्षी, जलचर, कृमी कीटक हे सारेच सुखेनैव जगत असतात. “जीवो जीवस्य जीवनं “असे जरी वचन असले तरीही ज्याप्रमाणे मानवाला ह्या पृथ्वीतलावर वास्तव्य करण्याची परवानगी आहे तितकीच परवानगी इतरही सर्व पशु,पक्ष्यांना नक्कीच आहे. ह्यामध्ये मी भूतांचाही समावेश नक्कीच करीन ! आता ह्या ठिकाणी “भुते“ हा एक वादाचा प्रश्न आहे. भुते नक्की अस्तित्वात आहेत का ह्याबद्दल कोणीच ठामपणे सांगू शकत नाही.
पुरातन काळापासून मानवाने ज्या बऱ्याच गोष्टींचा शोध लावला, ज्या बऱ्याच शास्त्रांचा (आणि शस्त्रांचाही ) शोध लावला, त्यात ज्योतिषशास्त्र ह्या शास्त्राचा अंतर्भाव आहे. ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. परंतु ह्या ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मलेल्या जवळपास प्रत्येक सनातनी व्यक्तीची जन्मकुंडली बनवली जातेच जाते, अगदी मानवाने विज्ञानात कितीही प्रगती केली,आणि माणूस चंद्रावर तर पाय ठेऊन आलाच आहे परंतु आता मंगळाच्या भोवतीही घिरट्या घालू लागलेला आहे, तरीही अजून जन्मकुंडल्या बनतच आहेत, मंगळाची पीडा आहे का हेही पाहिले जात आहे ! ह्या ज्योतिषशास्त्रानुसार मानवात बरेच गण असतात, उदाहरणार्थ मनुष्य गण, देव गण, राक्षस गण ! त्यातील काहीकाही गणातील लोकांनाच फक्त भुते दिसू शकतात, इतर गणातल्या लोकांना दिसू शकत नाहीत असे मी मागे कुठेतरी वाचलेले होते. परंतु नक्की कोणत्या योनीतील लोकांना भुतं दिसतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही, पण काही लोकांचा असा विश्वास आहे की मनुष्य गण ह्या योनीतील लोकांना भुतं दिसू शकतात, तर देव गण किंवा राक्षस गण यांसारख्या इतर योनीतील लोकांना ती दिसत नाहीत. अर्थात हे असे सारे मानले जाते. याशिवाय, कमकुवत मनाच्या लोकांना भूत दिसण्याची शक्यता अधिक असते, असेही मानले जाते.
माझ्या पत्रिकेत माझा देवगण लिहिलेला असल्याने मला मात्र भुते आत्तापर्यंत कधीच दिसली नाहीयेत. लहान असल्यापासून मला भुतांच्या गोष्टी ऐकायला फार आवडत असत. बहुदा जी गोष्ट आपण पाहू शकत नाही परंतु ती अस्तित्वात असल्याचे इतरजण सांगतात, अशा गोष्टींबद्दल माणसाला बहुधा जात्याच आकर्षण असते, आणि मीही त्याला अपवाद नव्हतो. शाळा कॉलेजात असताना भुतांच्या गोष्टी मित्रांना सांगण्यात आणि त्यांच्याकडून ऐकण्यात फार गंमत वाटत असे. मला अजून आठवते की शिवाजी पार्कमधील स्काऊट हॉलच्या समोर मुंबईच्या महापौरांचा बंगला आहे (एकेकाळी तो ग्वाल्हेरच्या महाराजांचा एक महाल होता ), आता त्याचे बाळासाहेब ठाकरे स्मारकात रूपांतर करणे सुरु आहे. त्या बंगल्याला लागून एक चिंचोळी वाट थेट समुद्राच्या पुळणीवर जात असे. तिला आमच्या लहानपणी भूतगल्ली असे म्हणत असत. ( जेव्हा शेजारी सावरकर स्मारक बांधण्यात आले तेव्हा ती वाट बंद करण्यात आली.) तर ,आमच्या लहानपणी आम्हाला अगदी दिवसाढवळ्या सुद्धा त्या भूतगल्लीतून समुद्रावर जायला प्रचंड भीती वाटे. एकदा काही मित्रांबरोबर जिद्दीने पैज लावलेली होती आणि आम्ही २ मित्र एकमेकांचा हात घट्ट धरून जोरात रामरक्षा म्हणत ती गल्ली पार केलेली होती, आणि पैजेचे चक्क ५ रुपये जिंकलेले होते. तेव्हा मला जाणीव झाली की आपल्याला भुते दिसणे शक्य नाही. तर ते असो.
पुढे इंजिनीरिंग झाल्यावर मला पहिलाच जॉब हा वरळी येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड ह्या मोठ्या कंपनीत मिळाला. खूप मोठी कंपनी असल्याने मी साहजिकच खुशीत होतो. इथे नोकरीत असताना मला २, ३ वेळा भुतांचे प्रताप मात्र पाहायला मिळाले ! मला प्रत्यक्ष भूत दिसले नाही, परंतु एक भूत करत असलेल्या अचाट कृत्यांचा मी प्रत्यक्षदर्शी मात्र नक्कीच होतो ! त्याचे झाले असे,—-
वरळी येथील आमच्या कंपनीची जी लोकेशन होती तो संपूर्ण भाग सोनापूर एरिया म्हणून अजूनही ओळखला जातो. आमचे जे मेन गेट होते, त्याच्या बरोबर समोर हिंदू स्मशानभूमी होती, आमच्या डाव्या बाजूला मुस्लिम धर्मियांची दफनभूमी तर त्याच्या समोर ख्रिस्ती लोकांची दफनभूमी होती. म्हणजे अजूनही त्या सर्व तेथे आहेतच. त्यामुळे बरेचदा समोरील हिंदू स्मशानभूमीत जेव्हा प्रेताचे दहन सुरु असायचे तेव्हा तो एक विशिष्ट वास आमच्या कंपनीत दरवळत असे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा आमच्या कंपनीने तिथे जागा विकत घेतली होती, त्यावेळेसही ती जागा मुस्लिम धर्मियांच्या दफनभूमीतील काही भागच विकत घेऊन तेथे फॅक्टरी उभारलेली होती. आमच्याकडे असलेले जुने सिनियर्स आम्हाला सांगत असत की बरेचदा एखाद्या नवीन मशीनच्या फौंडेशन साठी खोदताना जमिनीखाली काही सांगाडे मिळालेले होते म्हणून !
माझी नेमणूक ही क्वालिटी कंट्रोल खात्यात झालेली होती. नवीन असताना साहजिकच मला तीनही पाळ्यात काम करावे लागलेले होते. आमच्याकडे तिसरी पाळी ही रात्री १२ वाजता सुरु होऊन सकाळी साडेसात वाजता ती संपत असे. माझे खाते बरेचसे आमच्या मेनगेट जवळ होते. रात्रीच्या वेळेस तिसऱ्या पाळीत स्टाफचा असा मी एकटाच असायचो आणि अशा वेळेस मी आमच्या खात्यात न बसता मशीन शॉपमध्ये जाऊन बसत असे. कारण मशीन शॉप हा मेन गेट पासून बराच लांबवर होता. तिसऱ्या पाळीचा पहिला चहा हा साधारणपणे पहाटे दीड ते पावणे दोनच्या सुमारास मिळत असे. आमच्या कडे बहुतेक सर्व आयात केलेली मशिनरी होती. त्या मशिन्स सेट करण्यासाठी अनुभवी कामगार होते. त्यांना सेटर्स असे म्हणत असत. कोणताही नवीन जॉब एखाद्या मशीनवर घ्यायचा म्हटल्यावर हे जे सेटर्स असत ते त्या जॉबचे ड्रॉईंग वाचून त्यानुसार मशीन सेट करत असत . (त्याकाळात कॉम्पुटर द्वारे चालवली जाणारी मशिन्स, सीएनसी , नव्हती ). एकदा मशिन्स सेट झाले की मग हे जे सेटर्स असत ते ते मशीन ऑपरेटरच्या हातात देत असत. हे जे ऑपरेटर्स असत ते त्याकाळी बहुदा अर्धशिक्षित उत्तर प्रदेशचे भय्ये असत. कामात ते वाघ असत, परंतु त्यांना मशीनचे फारसे ज्ञान नसे. सेटर्सने सेट केलेलं मशीन हिरवे बटन दाबून सुरु करायचे आणि जॉब झाला की लाल बटन दाबून ते बंद करायचे इतपतच ज्ञान त्यांना असायचे. आमच्याकडे एक भले मोठे अवजड असे व्हर्टिकल बोअरिंग मशीन होते. त्याची उंचीच साधारणपणे ८ ते ९ फूट असावी आणि त्याचा व्यास सहज ५ ते ६ फूट असावा. असे हे मशीन चालवण्यासाठी बलदंड शरीराच्या कामगाराची गरज भासत असे.
अजूनही ती रात्र आठवली की माझ्या अंगावर शहारे येतात. त्या रात्री ह्या अवजड मशीनवर हिरालाल नावाचा एक धष्टपुष्ट भय्या काम करत होता. तो सहज सहा फुटाहून उंच आणि साधारणपणे शंभर किलो वजनाचा तगडा ऑपरेटर होता. मी दीड वाजून गेला असल्याने पहिल्या चहाची वाट पाहत होतो. सर्व कामगारांना चहा वाटून झाल्यावर मलाही चहा मिळाला. मी शॉपफ्लोरवरील एका टेबलाला खेटून उभा राहून चहाचा आस्वाद घेत होतो. सर्व साधारणपणे ज्या लोकांना धूम्रपानाची सवय असते अशा लोकांना चहा प्यायल्यावर हमखास धूम्रपानाची तल्लफ येते. आमच्या कंपनीत शॉपफ्लोरवर धुम्रपानास बंदी असल्याने असे लोक चहा पिऊन होताच बाजूला असलेल्या टॉयलेट्स मध्ये किंवा त्याच्या बाजूला बसून विडी, सिगारेट्स ओढत असत. ह्या गोष्टी जरी मॅनेजमेंटला मान्य नसल्या तरी आम्ही अशा गोष्टींकडे निदान तिसऱ्या पाळीत तरी कानाडोळा करत असू. त्या रात्री मी चहा पित असताना आमच्याकडचा एक हेल्पर घाबराघुबरा होत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “साब, जल्दी चलो , हिरालाल मर रहा है !” मला क्षणभर काही सुचेना, मी पटकन माझ्या ग्लासातील उरलेला चहा तसाच टाकला आणि त्या हेल्परच्या मागे धावत गेलो. तो मला कामगारांच्या टॉयलेटकडे घेऊन गेला. तेथील दृश्य जे मी पाहिले त्याने मी जागच्याजागी अक्षरश: थिजलो. मी पाहिलं तेव्हा सहा फूट उंचीचा शंभर किलो वजनाचा हिरालाल आपणहून जमिनीपासून सुमारे तीनेक फूट उंच उचलला जाऊन जमिनीवर आपटला जात होता. हे कसे होतेय ते काहीच कळत नव्हते. नदीच्या काठी पूर्वी बायका जशा आपली लुगडी धुताना लुगड्याचा पिळा हाताने उचलून डोक्याच्या मागून फिरवून मग जमिनीवरील दगडावर आपटत असत, अगदी नेमक्या त्याच ऍक्शन प्रमाणे हिरालाल उचलला जाऊन जमिनीवर आपटला जात होता. बरे त्याला कोणीही असे उचलत नव्हते, हे सारे आपॊआपच होत होते. एवढ्या बलदंड हिरालालला असे उचलून खाली जमिनीवर आपटण्याची शक्ती कोणातच नव्हती, परंतु जे होत होते ते माझ्या डोळ्यासमोर होत होते. बिचारा हिरालाल “माफ करो सर, माफ करो” असे काहीतरी बरळत होता ! माझ्या डोळ्यासमोर असे तो तीनदा उचलला जाऊन आपटला गेलेला मी पाहिलं. त्यानंतर सारे शांत झाले. हिरालाल जमिनीवर निपचित बेशुद्ध पडला. मी त्याच्या जवळ जाऊन पाहिले तर त्याचा श्वासोच्छवास सुरु होता. मी पटकन चार पाच कामगारांना सांगून त्याला उचलले आणि मेन गेटपर्यंत आणले, नशिबाने त्या अपरात्री समोरच एक टॅक्सी मिळाली त्यात हिरालालला घालून त्याच्या बरोबर २ कामगार पाठवले आणि कोपऱ्यावरील ESIS हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले. इकडे शॉपफ्लोरवर येऊन मी सर्वांना परत कामे सुरु करण्यास सांगितले. त्याच वेळेस एक वयस्कर कामगार माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “साहेब, हे भुताचे काम आहे बरं का ! तुम्हाला ठावे नाही पण आम्ही असे प्रकार लय टायमाला बघतो.” मी त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण मी मनातल्या मनात नक्कीच टरकलो होतो, हे निश्चित !
ह्या घटनेनंतर हिरालालचे पुढे काय झाले हे जाणून घायची मला उत्सुकता होती. परंतु मला सांगण्यात आले की ८ दिवस हॉस्पिटलात उपचार घेतल्यावर हिरालाल त्याच्या गावी यूपीला निघून गेला आहे म्हणून !
अगदी अश्याच प्रकारची घटना त्यानंतर साधारणपणे दीड महिन्यानंतर मला पाहायला मिळाली. माझी परत तिसरी पाळी सुरु झाली होती. तसाच साधारणपणे पहाटे दीड च्या सुमारास मी चहाचा आस्वाद घेत असताना मागच्या प्रमाणेच एक हेल्पर धावत आला आणि मला म्हणाला , “सर, चलो, झुमरू मरनेही वाला है !” मी तसाच चहा टाकून धावत मागच्याच स्पॉटला गेलो. आमच्याकडे झुमरू नावाचा एक अत्यंत किडकिडीत हेल्पर होता. तो टॉयलेटच्या बाहेर जमिनीवर आडवा पडून आपोआप जमिनीपासून सुमारे ३ ते ४ इंच वर उचलला जाऊन खाली आपटला जात होता. तोही “मुझे बचाव, मैं अब बिडी नाही पिऊंगा !” असे काही तरी बरळत होता, तोही ३,४ वेळा उचलला जाऊन मग बेशुद्ध पडला. मग त्यालाही ESIS हॉस्पिटलात रात्री भरती केले.
असे लागोपाठ दोन विचित्र प्रकार बघितल्यावर मी विचार करायला लागलो, की नेमके ह्या दोघांना नक्की काय झालेले असावे ते ! काही कळत नव्हते, जुने कामगार तर मला सांगत होते की हे भुताचे प्रतापच आहेत म्हणून ! माझ्या डोळ्यासमोर मी हे प्रताप पाहिलेले होते, पण मला भूत काही दिसले नव्हते. मग हे नक्की काय असेल ह्याच विचारात मी बरेच दिवस असताना मला माझे उत्तर अचानक मिळाले, ते असे.
सुमारे २ महिन्यानंतर तिसऱ्या पाळीतून मी परत जनरल शिफ्टमध्ये कामात असताना एके दिवशी जेव्हा दुसरी पाळी साडेतीन वाजता दुपारी सुरु झाली, तेव्हा आमच्या खात्याच्या दारातून हिरालाल आत आला. हा आता पूर्वीचा हिरालाल राहिलेला नव्हता, त्याचे वजन बरेच कमी झालेले होते. त्याच्या चेहऱ्यावर थकल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. तो सरळ माझ्यापाशी आला आणि त्याने माझे चक्क पाय धरले. मला म्हणला, “ साब, ऊस रात आपने मुझे अस्पताल भेजा उसके लिये मैं बच गया, नाही तो मैं वोही दिन मरनेवालाही था.” मी पटकन त्याला उठवत म्हटलं, ”अरे भाई, अब बताओ की ऊस दिन क्या हुआ था”. तो म्हणाला, “साबजी, अपने कंपनीमे एक मायकेल नामका जनरल मॅनेजर अंग्रेजोंके जमानेमे था, वोह बहुतही नेक आदमी था और अनुशासन प्रिय था. काम के दौरान कोईभी कारीगर अगर टाइम पास करते नजर आता था तो वो साब गरम होते थे, और ऐसे कारीगरको चार्जशीट देते थे. ऊस रात चाय पिनेके बाद मुझे बिडी पिनेकी आदत है, तो मैं टॉयलेटके बाहर बिडी पी रहा था, अचानक दाये बाजूसे सफेद घोडेपर बैठके मायकेल साब आये .” मी मध्ये टोकत त्याला म्हटलं, “अरे मायकल कैसे आयेगा ? और वोभी घोडपे बैठके ?” त्यावर हिरालाल म्हणाला, “अरे साब, मायकेल तो कबका मर चुका है, उसके लिये ये अपनी फॅक्टरी सबकुछ थी , कंपनीके अंदर काम करते वक्त वो यहा मरा था, अब उसका भूत हो गया है, वो रातको राऊंड लगाता है, ऊस रात मुझे बिडी पिते हुए देखकर वो घोडेसे नीचे उतरा, मुझे माँ बहेनपर दो चार गालिया दी और उठा उठा के मुझे पटकने लगा ! और मै तो बेहोष हो गया, आगेका मुझे मालूम नही !” त्याचे हे सांगणे ऐकून मी नखशिखांत हादरलो. अशाच प्रकारचे स्पष्टीकरण त्यानंतर काहीच दिवसांनी मला झुमरू ह्यानेही दिले !
मंडळी, ह्या सर्वाला काय म्हणावे ! मला प्रत्यक्ष भूत कधी दिसले नाही परंतु भुताचे असे विचित्र प्रकार मात्र नक्कीच पाहायला मिळालेले आहेत. आणखीही काही प्रकार सांगण्यासारखे आहेत, पण ते पुन्हा केव्हा तरी !
*****
– ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी
भूगोलाचा इतिहास : ४३
एल के कुलकर्णी
यस्यां समुद्र उत सिंधुरापो यस्यांमन्नं कृष्टय: संबभूवु :
यस्यांमिदं जिन्वति प्राणदेजत् सा नो भूमि: पूर्वपेये दधातु ।।
जिच्यावर नद्या, समुद्र सरोवरे इ. असून धनधान्य व पिके पिकवणारी माणसे जिथे निर्माण होतात आणि जिथे जे प्राणमय आणि गतिशील आहे, ते जीवन व्यतीत करते, ती भूमी आम्हाला पहिल्या दुग्धपानाचा आनंद देवो.
– भूमीसुक्त ( अथर्ववेद)
या भूमीसुक्तात पृथ्वीची सुंदर भौगोलिक वर्णने केली आहेत. पण वरील ऋचेत वर्णन केलेली वसुंधरा जन्मतः खडक वायूचा एक ओसाड ढीग मात्र होती. तिच्या रुपांतरणाचा इतिहास जेवढा रंजक तेवढाच नाट्यमय आहे.
सुमारे ४५० ते ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. नवजात पृथ्वी म्हणजे खडक, धूळ व वायु यांचा एक प्रचंड समुच्चय होता. त्यावेळची स्थिती कल्पनातीत भयंकर होती. तिच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतील खडकांचे असंख्य तुकडे उल्केच्या रुपात तिच्यावर येऊन कोसळत होते. त्याच काळात खडकातील किरणोत्सारी द्रव्ये आणि प्रचंड दाब यामुळे तिच्या अंतरंगातील उष्णता प्रचंड वाढून खडक वितळू लागले. खडकांना पडलेले तडे व भेगातून लाव्हारस बाहेर पडून ज्वालामुखीचे उद्रेक होऊ लागले. तो लाव्हारस साचून भूपृष्ठावर ज्वालामुखी पर्वतांची निर्मिती होऊ लागली. उल्कावर्षाव, भयानक उष्णता व ज्वालामुखींचे अव्याहत उद्रेक ही अशी भयंकर स्थिती सुमारे पन्नास कोटी वर्षे राहिली. हा उल्कावर्षाव व ज्वालामुखी उद्रेकाचे पर्व थोडे शांत होईपर्यंत चंद्र पृथ्वीपासून वेगळा झाला होता.
दरम्यान वितळणाऱ्या खडकातील निकेल, लोहासारखी जड मूलद्रव्ये तळाशी जाऊन आणि अल्युमिनियम, सिलकेट्स सारखी हलकी मूलद्रव्ये वर येऊन भूकवच तयार झाले. भेगा व तडे यामुळे भूकवचाचे तुकडे पडले. याच तुकड्यांचे अपवहन होऊन कालांतराने खंडांना आजचे स्वरूप प्राप्त झाले. त्याक्रियेत भूखंडांचे तुकडे – प्लेट्स – एकमेकांवर आदळून घडीचे पर्वत म्हणजे वलीपर्वत, तर जिथे भूकवच खचले तिथे खचदऱ्या व गटपर्वत निर्माण होऊ लागले.
बाल्यावस्थेत पृथ्वीभोवती वातावरण असे नव्हते. खडकांच्या ढिगाऱ्यासोबत धूळ व वायूंचे दाट आवरण होते. त्यात हायड्रोजन, हेलियम, मिथेन व अमोनिया असावा. अव्याहत ज्वालामुखी उद्रेकातून अनेक वायु पृष्ठभागावर आले आणि ते वातावरणाचा भाग बनले. त्या वातावरणात मुख्यतः हायड्रोजन सल्फाईड,
अमोनिया आणि सध्याच्या २०० पट कार्बन डाय ऑक्साईड असावा. हायड्रोजन सल्फाईड व अमोनिया हे हळूहळू क्षाररुपात जमिनीत व समुद्रात पोहोचले. पृथ्वीच्या वातावरणात मुळात मुक्त स्वरूपातील ऑक्सिजन नव्हता. कारण जो काही ऑक्सिजन होता, त्याचा हायड्रोजनशी संयोग होऊन पाणी तयार झाले होते. पुढे वनस्पती निर्माण झाल्यावर त्यांच्या अन्ननिर्मिती (प्रकाश संश्लेषण) क्रियेत ऑक्सिजन मुक्त होऊ लागला. त्यामुळे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढत २०% पर्यंत झाले. त्याचवेळी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड वायु प्रकाश संश्लेषण क्रियेत शोषला जाऊन त्याचे प्रमाण 0.03% पर्यंत खाली आले.
वातावरणाचा मुख्य घटक असलेला नायट्रोजन वायु कमी क्रियाशील तर हेलियम हा एक निष्क्रिय वायु आहे. त्यामुळे हे दोन्ही वायु मुक्त वायुरुपात हवेत शिल्लक राहिले.
पृथ्वीवरचे जलावरण सुमारे 380 कोटी वर्षांपूर्वी तयार झाले. त्यापूर्वीही पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण आजच्या एवढेच होते. पण सुरवातीचा काही काळ अतिउष्ण तापमानामुळे हे सर्व पाणी वातावरणात वाफेच्या रुपात होते. नंतर पृथ्वी जसजशी थंड होऊ लागली, तसतशी हवेतील वाफ मुसळधार पावसाच्या रुपात जमिनीवर कोसळू लागली. हा ‘पहिला पावसाळा’ हजारो वर्षे अविरत चालू होता. त्या काळात हवेतील बहुतेक सर्व वाफ पाणी होऊन भूपृष्ठावर पोहोचली. पावसाच्या रुपातील हे पाणी भूकवचातील खोलगट भागात साचण्याची क्रिया हजारो वर्षे होत गेली आणि त्यातून महासागर व समुद्र निर्माण झाले. जमिनीत पोहोचलेले पाणी भूजलाचा रुपातही साठत गेले. तसेच पर्वतावरून नद्या वाहू लागल्या. त्यांच्यातून वाहून येणारा गाळ साचून मैदाने तयार होऊ लागली. दुसरीकडे पर्जन्य व नद्यांच्या पाण्यात जमिनीवरील क्षार विरघळून हजारो वर्षे सागरात वाहून गेले व सागरजल क्षारयुक्त झाले. अशा प्रकारे जलावरण निर्माण झाले.
अशा प्रकारे पृथ्वीवर सुरवातीच्या 50 कोटी वर्षात वातावरण व त्यानंतर सुमारे 80 कोटी वर्षापर्यंत जलावरण, म्हणजे महासागर व समुद्र तयार झाले. आता तिच्यावरील एका अभूतपूर्व नाट्यप्रवेशाची तयारी पूर्ण होत आली होती. तो प्रवेश होता सजीवांच्या आगमनाचा. भूमी, वातावरण व जलावरण हे नेपथ्य तयार होते. हजारो वर्षे अव्याहत तुफान पाऊस, विजांचे थैमान व सागरलाटांचे अखंड नर्तन चालू होते. उच्च ऊर्जा असणारे अतिनील किरण सरळ भूपृष्ठापर्यंत येत होते. त्या ऊर्जेच्या साहाय्याने समुद्र व हवेतील संयुगांची आंतरक्रिया व्हायची फक्त बाकी होती. या अनुकूल स्थितीतही पहिल्या सजीव जन्माची संभाव्यता युगानुयुगे सागरलाटांवर हिंदकळत होती. कधी संयुगे अगदी जवळ येऊन निसटून जात होती. कधी ती जवळ येत होती, तर नेमका त्या क्षणी अतिनील किरणांचा स्पर्श मिळत नव्हता. असा हा शक्याशक्यतेचा हा खेळ लाखो वर्षे चालला. अचानक कधीतरी एका क्षणी सर्व जुळून आले. आणि समुद्रात पहिली सजीव संयुगे निर्माण झाली. ओसाड निर्जीव धरेवर जीवचैतन्याचा आविष्कार झाला. तेव्हा पृथ्वीचा जन्म होऊन सुमारे १०० कोटी वर्षे होत आली होती. पुढे प्रकाश संश्लेषण करणारे सजीव तयार होऊन पृथ्वीचे वातावरण बदलू लागले. यानंतर त्यांच्यातून एकपेशीय सजीव व पुढे बहुपेशीय सजीव तयार झाले. त्यांच्यातून कोट्यवधी वर्षाच्या लक्षावधी प्रकारच्या सपुष्प अपुष्प इ. वनस्पती तसेच जलचर, उभयचर, डायनोसार वगैरे सरपटणारे प्राणी, पक्षी व सस्तन अशी प्राणिसृष्टी क्रमाने उत्क्रांत होत गेली. या विकास क्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर मानव उत्क्रांत झाला. ही घटना फार अलीकडची म्हणजे फक्त काही लाख वर्षांपूर्वीची. अशा प्रकारे एकेकाळची निर्जीव, रुक्ष, भयंकर व ओसाड पृथ्वी जीवसृष्टीने बहरून गेली.
अमेरिकेच्या फ्रॅंक ड्रेक यांनी १९६१ मध्ये एक प्रसिद्ध समीकरण मांडले. विश्वात जीवसृष्टी किती ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, हे या समीकरणातून मांडले आहे. प्रत्येक घटक अनुकूल असण्याची शक्यता किमान मानली, तरी आपल्या आकाशगंगेतच जीवसृष्टी असणारे हजारो ग्रह असू शकतील, असे हे समीकरण सांगते. असंख्य विज्ञान कथा व सिनेमातूनही परग्रहावरील सजीव कल्पिले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र आजच्या क्षणापर्यंत तरी या संपूर्ण विश्वात पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्यावर सजीव आहेत आणि त्यांच्यामुळे तिला भूमाता होण्याचे भाग्य लाभले आहे.
पण हे मातृत्व लाभण्यासाठी ज्वालामुखीचे थैमान, उल्कापात, विजांचा कडकडाट, खडक वितळविणारी प्रचंड उष्णता असे कितीतरी भोग तिला भोगावे लागले. तात्पर्य, माता – मग ती कोणतीही असो, पण आधी तिला कितीएक दिव्ये करावी लागतात, वेदना सहन कराव्या लागतात, तेंव्हा कुठे मिळते विश्वातले सर्वोच्च पद – मातृत्व. मात्र तिच्या त्या भोगांची जाणीव कोण आणि किती ठेवेल याबाबतही तिला निरपेक्षच राहावे लागते – मग ती भूमाता असो, की घराघरातली आई असो.
– ©️ एल. के. कुलकर्णी
lkkulkarni.nanded@gmail.com
सोबतचे चित्र : नवजात पृथ्वी – संकल्पचित्र. (इंटरनेट वरून साभार)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बाजीराव- मस्तानी आणि पेशवे घराण्याचा इतिहास
भाग ५/७
अॅड. क्रांती आठवले-पाटणकर
बाजीरावाचा मृत्यू झाला तेव्हा, मस्तानी पुण्यात कैदेत होती. ही बातमी पुण्यात पोचल्यानंतर काही काळातच मस्तानीचा मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूबाबत स्पष्ट नोंदी मिळत नाहीत.
पाबळ हे मस्तानीला निर्वाहखर्चासाठी दिलेल्या तीन गावांपैकी एक गाव. येथे गावाच्या वेशीलगत थोरल्या बाजीरावांचा प्रशस्त वाडा होता. हे आवार “मस्तानीची गढी” या नावाने ओळखले जाई. १९७५ सालापर्यंत ते पुष्कळसे शाबूत होते. पुढे इथे काहीही सुस्थितीत राहिले नाही.
आज देखील जर दोनशें वर्षीच्या अवधीत जुन्या-नव्या विचार-आचारांचा लढा तीव्र स्वरूपात विद्यमान असलेला आपण पाहतों, तर नवीन विचारांची सुरुवातही ज्या काळात नव्हती, त्यांत चिमाजी, राधाबाईसारख्यांच्या मनात प्रागतिक विचार आले नाहींत याबद्दल त्यांस दोष देण्यात हशील नाही. त्यांच्यावर दोष येतो तो इतकाच की, मनुष्यस्वभावाची योग्य पारख त्यांना झाली नाही आणि मस्तानीस टाकून देण्याचा भलताच आग्रह त्यांनी बाजीरावास केला. “व्यवहार म्हणजे तडजोड” हा न्याय कोणत्याही काळांत जाणत्या माणसांनी सांभाळला पाहिजे. बाजीरावानें मस्तानीसह दूर राहवें, घरात राहून इतराच्या मनोभावना दुखावू नयेत अशी व्यवस्था घडवून आणणं शक्य होते.
पण एवढा पराक्रमी बाजीराव, ज्याने पुण्यास वाडा बांधून राजधानी सजविली, त्यालाच “वाड्यातून निघून जा” असे कोण ? कसे सांगणार ! बाकी बाजीराव स्वतः होऊनच बाहेर राहून लोकापवाद टाळीत होते. मस्तानीस घेऊन ते शानिवारवाड्यातच बाजूस राहू लागले. त्याच्याकडे इतरांचा प्रवेश बहुतेक बंद पडला. चिमाजीअप्पा मात्र आगाऊ वर्दी देऊन त्याच्या भेटीस जात असत, असा प्रकार काही काळ चालला.
बाजीराव मस्तानीला सोडून देण्यास कबूल नाही तर तिला आपणच जबरदस्तीने दूर करावी, शक्य तर तिला जगातूनच नाहीशी करावी असा विचार काही मंडळीच्या मनात अल्पकाळ चालला. तिला व बाजीरावालाही या गोष्टी कळल्या. दोघाचेही जीव कासावीस झाले असल्यास नवल नाही. त्यामुळे शाहूमहाराजांचा आदेश “ज्याची वस्तू त्यास द्यावी आणि त्यांचे समाधान करावे” हा किती दूरविचाराचा व योग्य होता हे लक्षात येते ! मस्तानीच्या जिवास अपाय झाला नाही याचे श्रेय शाहू महाराजांस दिले पाहिजे.
दरम्यान बाजीरावाचे व मस्तानीचें दळणवळण अंतस्थपणे चालू राहून एकमेकाचे नोकर जात येत होते. उभय पक्षांचे हेर व पहारे आपापल्या कामावर असून काय खटपटी आत चालल्या आहेत याची माहिती दोघासही होती. एका अर्थानें दोघेही भयभीत झालेली होती. खरें म्हटले तर आश्चर्य वाटते तें हे कीं, क्षणमात्रांत आपल्या तेजानें प्रत्यक्ष बादशहाच्या छातीत धडकी भरविणारा आणि निजामासारख्यास आपल्या पायांशी नमविणारा हा हजारो अश्वसैनिकांचा अद्वितीय सेनानी स्वकीयांपुढे केवळ गोगलगाय बनून निःस्तब्ध राहिला, शे-पन्नास स्वारांनिशी एकदम वाड्यावर हल्ला करून मस्तानीला धाडसानें सोडवून नेण्यास धजला नाही, हा प्रकार आपण पाहतों. पण त्याच्या चरित्राच्या दृष्टीनें हेंही त्याचे शहाणपणच म्हणावे लागलें, बंधु, पुत्र, मातुश्रींना, त्याने दुखविले नाही आणि स्वतःच निमूटपणें यातना सहन केल्या, यामुळें त्याच्या चरित्रास उठाव मिळतो.
बाजीराव यांच्या मृत्यूचे वर्तमान ऐकताच मस्तानीचा प्राण गेला. नुसत्या धक्क्याने असा प्रकार कदाचित होऊ शकतो. पण, बाजीरावांच्या जिवंतपणी जर उघडपणे आपले असे भलतेच हाल होऊ शकले, तर त्याच्या पश्चात आपल्याला कोण त्राता राहिला? असा विचार मनात येऊन तिने जाणूनबुजून अपघाती प्रयोग करून घेतला असणे संभवनीय आहे. मात्र याबद्दल निश्चित माहिती नाही. काही ठिकाणी असे म्हटले आहे की मस्तानीचा मृत्यू हा शनिवारवाड्यातच झाला. तेथून तिला तिच्या गावी पाबळ येथे आणले गेले. कित्येकांच्या मते बाजीराव मृत्यूशय्येवर असताना ती पुण्याहून निघून रावेरखेडी येथे जात असताना पाबळ येथे त्यांच्या मृत्यूची बातमी तिला कळली आणि तिथे तिने लगेच प्राण सोडला. पाबळ येथे मस्तानीची कबर गावाजवळच आहे. पाबळ, केंदूर, आणि लोणी ही गावे हिला इनाम दिली होती. बुंदेलखंडात बाजीरावांना मिळालेली जहागीर सन १७८८ पासून “बांदा संस्थान” या नावाने मस्तानीच्या वंशजांकडे होती . मस्तानीच्या सर्व वंशजांना “पेशव्यांचे वंशज” असल्याचा फार अभिमान आजही वाटतो.
मस्तानीने बाजीरावाला आपले अवघे जीवन समर्पित केले होते.
“कौन दुनियामे आया है किसके लिये!
अर्श-ए-आजमपे होते है ये फैसले,
जब खुदाकी इनायत इधर हो गई,
तू मेरा, मै तेरी हमसफर बन गई,
तू मेरा ताज है, तेरी इज्जत हूँ मै…”
(शायरा – शबिना अदिब)
अशीच भावना मस्तानीची असावी.
मस्तानीच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्या मुख्य खासा देवघरात “मस्तानीचा टाक” ठेवण्याबद्दलची चिमाजीअप्पांनी सूचना केली होती. त्या टाकाबद्दल इतिहास संशोधक (कै.) कृ.वा. पुरंदरे यांचे संशोधन आहे. या संशोधनामुळे मस्तानीचा बाजीराव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने विवाह झाला असावा असे म्हणता येईल. अन्यथा देवघरातील देवांमध्ये “टाक” ठेवण्याची पात्रता मान्य झाली नसती. तथापि या विवाहबद्दल स्पष्ट माहिती मिळत नाही.(पूर्वीच्या काळी स्त्री सती गेल्यानंतर तिचा “टाक” करून तो घरातील देवात ठेवत. पेशवेकुलात अशाप्रकारचे सौ. अन्नपूर्णाबाई व सौ. रमाबाईंचे टाक देवांत ठेवले होते. टाक– धातूच्या पत्र्यावरील देवतेचा ठसा.)
थोरले बाजीराव आणि मस्तानी यांच्या संदर्भात प्रियकर हिंदू आणि प्रेयसी मुसलमान किंवा अर्धमुसलमान (तेही कोणीही धर्मांतर न करता) असलेले संपूर्ण भारताच्या इतिहासात हेच एकमेव उदाहरण असावे हे मात्र मान्य करायलाच हवे.
आता पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचे वंशजाविषयी माहिती घेऊ
“पेशवे घराण्याचा इतिहास” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत, आपल्या निवेदनात, लेखक प्रमोद ओक म्हणतात…. “अधिकारलालसा, सत्तास्पर्धा, वारसाहक्काची अतिरिक्त जाणीव, हयामुळे आपसात भाऊबंदकी सुरू होऊन बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी पाया रचलेले पेशवा घराणे आतून बाहेरून पोखरले गेले. या पार्श्वभूमीवर मस्तानीच्या वंशजांची निष्ठा पाहण्यासारखी आहे. थोरल्या माधवरांच्या पश्चात काही वर्ष राज्यात माजलेली निर्नायकी बेबंदशाही असो, पानिपत संग्राम असो, किंवा १८५७ चा उठाव असो, कटू प्रसंग असो अथवा कसोटीचा प्रसंग असो, मस्तानीच्या वंशजांचा स्वराज्याप्रती अतूट सेवाभाव आणि निष्ठा अविचल, अभंग राहिली. मस्तानीच्या वंशजाने कोणत्याही कटू प्रसंगी, विद्रोहाचा, उठावाचा विचारही मनात आणला नाही, या सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही”.
थोरले समशेरबहाद्दर (कृष्णसिंह)
पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा एकमेव पुत्र २८ जानेवारी १७३४ रोजी जन्मला. ऐतिहासिक कागदपत्रात त्याचे नाव समशेरबहाद्दर उर्फ कृष्णसिंह असा उल्लेख आढळतो.. हा आपल्या माता-पित्याप्रमाणे देखणा होता. वयाच्या सहाव्या वर्षीच मातृ-पितृ विहीन झाल्यावर नानासाहेबांनी, म्हणजे पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या मोठ्या मुलाने, त्यांना प्रेमाने, आपुलकीने, आणि योग्य इतमामाने सांभाळले. समशेरबहाद्दरच्या पालनपोषणात त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. परिवारातल्या इतर मुलांप्रमाणे ते देखील शनिवारवाड्यात लहानाचे मोठे झाले. आणि त्यांना सगळे शिक्षण देण्यात आले. ते मराठी भाषा, देवनागरी आणि मोडी लिपीत सुंदर लिहीत असत.
समशेरबहाद्दर यांच्यावर पहिल्या चिमाजीआप्पांचा मुलगा सदाशिवराव म्हणजे भाऊसाहेब यांचा खूप प्रभाव होता. सदाशिवरावभाऊंच्या हाताखाली राहून हे कारभारी आणि दरबारी कामकाजात हुशार बनले. तसेच लष्करी कामातही ते तरबेज होते. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी रघुनाथरावांबरोबर म्हणजे आपल्या सावत्र भावाबरोबर उत्तर भारताच्या मोहिमेत सहभाग घेतला होता. नानासाहेबांनी समशेरबहाद्दरना लहानपणीच सरदारी दिली होती. समाजरितीनुसार बाजीराव- मस्तानीचा मुलगा हिंदू असायला हवा होता. पण काही अगम्य कारणास्तव त्याला मुसलमान मानले गेले. या अर्थाने मुस्लिम असूनही समशेरबहाद्दर पत्रावर “पांडुरंग” असे लिहीत. पेशव्यांबद्दल यांना अतिशय निष्ठा आणि आदर होता. पेशव्यांच्या अनेक मोहिमात जातीने हजर राहून यांनी मराठी साम्राज्याची बहुमोल सेवा केली. तडफ आणि शौर्य याबद्दल यांचा लौकिक होता.
सन १७५८ च्या मध्याच्या सुमाराला समशेरबहाद्दरने एक मोठी कामगिरी बजावली. या काळात “बुंदेलखंडात छत्रसालांचे नातू हिंदूपत” हे राज्य करत होते. त्यांना नानासाहेबांनी “राजा” म्हणून मान्यता दिली होती. त्याबद्दलच्या अंतिम कराराच्या अटी ठरवण्याची बोलणी करण्यासाठी समशेरबहाद्दरना बुंदेलखंडात पाठवले. हिंदूपद हे छत्रसालांचे नातू तसेच, समशेरबहाद्दर हे बाजीराव – मस्तानी यांचे पुत्र म्हणजेच छत्रसालांचे नातूच.. यामुळेच उभयतामध्ये बंधुभावाने आणि मोकळेपणाने बोलणे होऊन राजा हिंदूपत आणि पेशवे यांच्यात करार झाला आणि या करारांवर पेशव्यांतर्फे प्रतिनिधी आणि साक्षीदार म्हणून समशेरबहाद्दर आणि गोविंदपंत बुंदेले यांनी सही केली.
याच प्रकारचे काम त्यांना पुन्हा एकदा करावे लागले ते अशासाठी की, “बुंदेलखंडात जयपूरला छत्रसालांचे दुसरे एक नातू “जगतपुत्र पहाडसिंग” आणि “पहाडसिंगचे दोन पुतणे” यांच्यात, गादीसाठी वाद निर्माण झाला. या परिस्थितीचा आढावा घेऊन न्याय निर्णय करण्यासाठी नानासाहेबांच्या आदेशावरून समशेरबहाद्दरना बुंदेलखंडात जावे लागले. त्यांनी सगळी परिस्थिती पाहून “पहाडसिंगाचे” बाजूने कौल दिला. धोरणीपणा, मुच्छद्दीगिरी, सेनानायकत्व, दक्ष कारभार, असे समशेरबहाद्दरचे गुण यासारख्या अनेक प्रसंगातून दिसून येतात. १७५९ साली समशेरबहाद्दरना “साहेब नौबतीचा” मान मिळाला.
एक शाहीर पोवाड्यात समशेरबहाद्दरचे शौर्य वर्णन करताना म्हणतो..
“समशेरबहाद्दर रणशूर रणगाढा,
रणी वाजे चौघडा,
हटकुन गिलचे हाणितो धडाधडा,
ढाल तलवार जमदाढा,
ज्याने रणी अडवला तीस लाख घोडा,
सन्मुख दावी मुखडा,
रावबाजीचा पुत्र जसा हिरा,
येती जखमांच्या लहरा”
१७६१ च्या पानिपतच्या युद्धात त्यांनी पराक्रम दाखवला. या युद्धात समशेरबहाद्दर जबर जखमी झाले आणि त्या अवस्थेत ते भरतपूरला गेले. घायाळ झालेल्या समशेरबहाद्दरना जवळच कुंभेरीला आणण्यात आले. औषधोपचाराचे खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. सरदार सूरजमलने त्याची चांगली निगा राखली. “भाऊ, भाऊ” असा शोक करून ते लवकरच मरण पावले. यांचा पहिला विवाह १७४९ ला “लालकुंवरबाई” त्यांच्याशी झाला. चार वर्षातच या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजे १७५३ लाच यांचा विवाह “मेहेरबाई” यांच्याशी झाला. या पतीबरोबर पानिपतच्या मोहिमेवर गेल्या होत्या. परंतु युद्धाचा बेरंग दिसू लागल्यावर समशेरबहाद्दरने यांना झाशीला पाठवून दिले आणि तिथून त्या पुण्याला परत गेल्या. पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेबांनीच मेहरबाईला तिच्या मुलासह म्हणजे, “थोरल्या अलिबहद्दरसह” तिच्या वडिलांकडे पाठवले. या स्वतः मराठी जीवनाशी, संस्कृतीशी, एकरूप झालेल्या होत्या. एकादशी, चतुर्थी, यासारखे उपावास, त्यांच्या मनात रुजले होते.
(क्रमश:)
©अॅड. क्रांती आठवले-पाटणकर
डोंबिवली.
9969087559
०२.०५.२०२५
(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संस्कृत श्लोक व सुभाषिते
क्रमांक ४
अरविंद खानोलकर
श्री गणेशाय नम:
कालच गणेशचतुर्थी होती. गणपतीची पूजा सर्व महाराष्ट्रात घरोघरी तसेंच सार्वजनिक गणेशोत्सवात होते. काही आरत्या, काही श्लोक म्हटले जातात. काही सार्वजनिक गणेशोत्सवांत जास्तींत जास्त मोठा आवाज करून श्री गणेशाच्या सुपासारख्या कानांची परीक्षा घेत असतात तर घरोघरी भक्तीभावाने गणेशाची पूजा होत असते. कोणत्याही देवाची पूजा असली, कोणतेही होम हवन असले तर प्रथम गणेशाचे वंदन, पूजन केल्याशिवाय ती पूजा होत नाही. गणपतीची पूजा प्रथम का करायची ह्या बद्दल पुराणात तीन कथा आहेत परंतु त्यांतील पहिली सर्वांना ठाऊक असलेली कथाच सर्वमान्य आहे व इतर कथा त्याच कथेवर आधारित आहेत. पार्वतीमातेने निर्माण केलेला बाल गणपती रक्षक म्हणून तिथे प्रवेश करू पाहणाऱ्या शिवालाच अडवतो. तेव्हां क्रोधित होऊन शंकर बालकाबरोबर युध्द करतो आणि त्या बाल गणपतीचा शिरच्छेद करतो. पार्वती जेव्हा हे पहाते, तेव्हा ती दु:ख आणि क्रोध ह्यामुळे विश्वप्रलय करायला सिध्द होते. तेव्हा शिव आणि विष्णु तिची विनवणी करतात आणि त्या बालकाला जिवीत करण्याचे आश्वासन देतात. ते उत्तर दिशेला जातात, तिथे त्यांना सर्वप्रथम एक हत्ती नजरेस पडतो. ते त्याचेच शिर कापून आणतात आणि त्या बालकाच्या धडावर लावून त्याला जिवंत करतात. बरोबरच त्याला वर देतात की त्याला सर्वत्र अग्रपूजेचा मान मिळेल आणि तो चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती मानला जाईल.
गणपतीबद्दलची दुसरी कथाही थोड्या फार फरकाने सर्वत्र प्रचलित आहे. अग्रपूजेचा मान कोणाला असावा ह्याबद्दल जेव्हा वाद निर्माण झाला, तेव्हां भगवान शंकरांनी सांगितले की जो पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्वांत आधी परत येईल, त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. सर्व देव आपापल्या वहानांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. गणपती मात्र तिथेच थांबला. त्याने विचार केला पृथ्वी हे केवळ शिवाचं प्रतिबिंब आहे व शिवापासून ती वेगळी नाही. त्याच्यातच सामावलेली आहे. त्याने शिवाभोवती एक प्रदक्षिणा केली व तो स्वस्थ बसला. सर्व देव परतल्यावर शिवाने जाहिर केले की अग्रपूजेचा मान सर्वज्ञ आणि बुध्दीमान गणेशाला दिला जात आहे. देव म्हणाले, “तो तर इथून हललाही नाही.” गणपतीने सांगितले की आपण भगवान शिवाभोवती प्रदक्षिणा घातली कारण पृथ्वी त्यांच्यातच सामावलेली आहे. भगवान विष्णु आणि भगवान शिवांनी त्याचा हा युक्तिवाद मान्य केला व गणपतीस अग्रपूजेचा मान देण्यांत यावा, असे जाहिर केले. ह्या कथा तार्किक कसोटीवर घासत न बसतां, त्यांचा भावार्थ लक्षांत घेऊन समजून घेतल्या पाहिजेत.
आता आपण श्री विंझे ह्यांच्या कोशांतील गणेशाबद्दलचे दोन परिचित श्लोक समजून घेऊया. पहिला श्लोक असा आहे….
मूळ संस्कृत श्लोक –
ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे
कवीं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रम्हणा ब्रम्हणस्पत
आन: शृण्वन्नूतिर्भि: सीदसादनम् ॥
विंझे ह्यांनी केलेला काव्यमय मराठी अनुवाद
हे नायका गणांच्या ! श्रेष्ठ कवे सर्व दूर तव किर्ति
वृध्दश्रेष्ठ गणपते मंत्रांची रक्षिका तुझी शक्ति ।
आम्ही निमंत्रितो तुज, स्वीकृत आमंत्रणास त्या करूनी
ये आमुच्या गृही, वस, रक्षकसंभार सर्व घेवोनी ॥
सुलभ अर्थ–
गणांचा नायक, श्रेष्ठ कवि (ज्ञाता), सर्वत्र किर्ती पसरलेला, सर्व मंत्रांचा रक्षक, अशा हे गणपते, आम्ही तुला बोलावित आहो. हे आमचे आमंत्रण ऐकून आमचे संरक्षण करण्याच्या सर्व साधनांसह, तू आमच्या निवास स्थानी येऊन रहा.
हा वैदिक वाङ्मयातून घेतलेला श्लोक आहे. ह्यात गणपतीला आवाहन केलेले आहे. आधी त्याची स्तुती केली आहे. तो गणांचा नायक. गण हे पूर्वीचे लढाऊ पथक. अशा लढाऊ पथकांचा नायक, कविंमध्येही श्रेष्ठ कवि, ब्रम्हज्ञात्यामध्ये ज्येष्ठ ब्रम्हज्ञाता, तुझ्याकडे रक्षक मंत्र आहेत, तुझी किर्ती दूरवर पसरलेली आहे, अशा गणेशा तुला आम्ही आवाहन करतो. हे आवाहन पहिल्याच चरणात केले आहे. हवामहे म्हणजे आवाहन करत आहोत. नंतर त्याचे इतर गुण आणि सामर्थ्य सांगितले आहे. गणेशाला वंदन करून सुरू केलेले कार्य पूर्ण होतं, सिध्दीस जाते, तो विघ्नहर्ता असल्याने त्यात विघ्ने येत नाहीत, हा विश्वास त्यामागे आहे. तिसऱ्या व चौथ्या चरणात निमंत्रण करतोय, त्याचा स्वीकार कर आणि सर्वशक्तिंनीशी आमच्या घरी येऊन रहा, अशी विनंती केली आहे. तुझा वास घरात असला म्हणजे आमची कर्तव्ये आम्ही पार पाडू शकू, ही भावना आहे. गणेश पूजनांत बरेच वेळा प्रथमच हा श्लोक म्हटला जातो. त्यामुळे अर्थ माहित नसला तरी हा श्लोक सर्वांना परिचयाचा वाटेल.
विंझे यांनी वरील श्लोकाच्या अनुवादासाठी आर्या वृत्त वापरले आहे. आर्या वृत्त वापरण्यासाठी कवि मोरोपंत फार प्रसिध्द आहेत. त्यांची केकावली ही संपूर्ण रचना १००० कडवी आर्या वृत्तात आहेत. ते समयसूचक आणि शीघ्र कवि होते. त्यांचे एकदा सरदार घोरपडे यांच्या वाड्यावर पुराण सांगायला गेले होते. श्रोते रंगले होते. सरदार घोरपडे ह्यांच्या मनांत विचार आला, “ह्या एवढ्या पंडिताला बिदागी तरी किती द्यायला हवी.” ते आपल्या दिवाणास त्यासंबंधी कुजबुजू लागले. मोरोपंतांच्या लक्षांत येतांच ते म्हणाले,
भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे ।
ऐसे असता माझ्या बिदागिचा का तुम्हास घोर पडे ॥
ही आर्या ऐकताच सरदार घोरपडे यांनी दाद देऊन आपल्या गळ्यातली भारी किंमतीची माळ काढली आणि मोरोपंतांच्या गळ्यात घातली.
आता गणपतीशी संबंधित आणखी एक श्लोक पाहूया. हा श्लोकही विंझे ह्यांनी वैदिक वाङ्मयांतून घेतलेला आहे.
मूळ संस्कृत श्लोक
भद्रं कर्णेभि: शृणुसाम देवा:
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ।
स्थिरैरंगैस्तुष्टवॅांसस्तनूभि:
व्यशेमहि देवहितं यदायु: ॥
विंझे यांचा काव्यमय मराठी अनुवाद
हे यज्ञप्रिय देव, नित्य अमुच्या कानी पडो मंगल
नेत्रांनाही दिसे सदैव अवघे जे जे असे निर्मल
हे आम्ही स्तवितो स्थिरेंद्रिय अशी एकाग्रता साधूनी
जावो अमुचे जीवित प्रभू! तुझ्या संपूर्ण आराधनी ॥
सुलभ अर्थ :- हे यज्ञप्रिय देवा, आमच्या कानी नेहमी मंगलच पडो. आमच्या नेत्रांना नेहमी मंगलच दिसो. आम्ही सर्व अवयवांची एकाग्रता साधून, तुझे स्तवन करून एवढेच मागतो की आमचे जीवन तुझ्या सेवेंतच व्यतीत होवो.
वैदिक काळी यज्ञ हे देवाला आवाहन करण्याचे प्रमुख साधन होते. यज्ञ केल्याने पंचमहाभूते, देवता, संतुष्ट होतात व संकल्प करावा ते देतात, असा समज होता. आजही पूजेचा तो एक उद्देश असतो. मात्र तो एकमेव उद्देश असतो, असे आता म्हणतां येणार नाही. म्हणून देवाला यज्ञप्रिय देवा, असे संबोधले आहे. देवाकडे मागणी केली आहे ती देखील काय तर आमचे जीवन तुझ्या सेवेत व्यतीत होवो.
आम्ही चित्त, बुध्दी, शरीर सर्वाची एकाग्रता साधून तुझ्याकडे हे मागतो आहे. त्या आधी म्हटले आहे की आम्हाला सदैव मंगल दिसो व मंगलच ऐकायला येवो. प्रसन्न वातावरणांत एकाग्रता साधणं शक्य होईल, ही भावना त्यामागे आहे.
आपल्या संताच्या वाणींतही हा विचार प्रकर्षाने दिसतो. संतशिरोमणी तुकाराम म्हणतात, “माझे चित्त तुझे पायी।राही ऐसे करी कांही। धरोनियां बाहीं। भव हा तारी दातारा॥” नामदेव म्हणतात, “तैसा मजलागी होऊनी कृपाळ। करी गा सांभाळ अनाथाचा॥” संत आपले चित्त, संसार, व्यवहार सर्वच विठ्ठलावर सोंपवून मोकळे होतात. ते विठोबाला आर्त आवाहन करतात, “आम्हाला तुझ्या चरणाशिवाय कांही नको” जिवंत असेतोवर पोट भरणे माणसाला भाग असते पण तो जगण्याचा एकमेव हेतू नाही. म्हणून अशा प्रार्थना मानवी मनांत येतात. परमेश्वर मानणारा परमेश्वराकडे मागतो आणि परमेश्वर न मानणाराही मनांत आशावादी राहूनच प्रयत्न करतो. आज गणेश चतुर्थी घरोघरी गणेशाकडे लोक कार्यसिध्दी आणि विघ्नहरण मागणार आहेत. आपण सामूहिक प्रार्थना करूया, “देवा गजानना, तुझी भक्ती करणाऱ्या ह्या महाराष्ट्र राज्यांत सुख, शांती, समृध्दी नांदो.”
– ©️ अरविंद खानोलकर
arvindkhanolkar@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आपणच लिहिलेली शोकांतिका
साद प्रतिसाद : ४४
प्रा. विजय पांढरीपांडे
या शतकाचे पाव शतक संपत आले. स्वातंत्र्य मिळून तर पंचाहत्तर वर्षे झालीत. आपला सशक्त लोकशाही असलेला देश. आतापर्यंत विविध राज्यात, केंद्रात आलेल्या वेगवेगळ्या सरकारचे क्लेम खरे मानले तर आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात फक्त विकासच केला!. या लोकशाही देशात आपण निवडून दिलेले लोक प्रतिनिधी हे फक्त लोकसेवाच करतात. ते एकनिष्ठ आहेत आपल्या पक्षाशी, पक्षाच्या विचार धारेशी. त्यांच्या या विचारधारा सारख्या बदलतात. प्रत्येकाला काहीतरी नवे हवे असते सारखे. जुन्याचा पटकन कंटाळा येतो. लोकसेवक असल्याने प्रत्येकाला स्वतःचाही विकास तितकाच महत्त्वाचा वाटतो. किंबहुना स्वतःचाच विकास जास्त महत्वाचा असतो राजकारणात. मग त्यासाठी काहीही करायची तयारी. कोणत्याही स्तराला जायची तयारी. निवडणुका आल्या की होणारे तमाशे, उडणारी धुळवड, चिखलफेक आपण बघतोच. हे आक्का, भाई, दादा, बाहुबली काहीही करू शकतात. मारामाऱ्या, खून, खोक्याची देवघेव.. अगदी काहीही..कसलेही खास उत्पन्न, कामधाम नसताना हे लोकसेवक लखपती, करोडपती कसे होतात याचा कुणीच शोध घेत नाही; आपल्या सुधारलेल्या लोकशाही, विकसनशील देशात! हे नवलच आहे!!
आपण शिक्षण क्षेत्रात सुधारणेचे दावे करतो. गेली पाच वर्षे सारखे एन इ पी म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाचे ढोल पिटले जाताहेत. अगदी जागतिक विद्यापीठाशी स्पर्धा सुरू असल्यासारखी वातावरण निर्मिती केली जातेय. पण अजूनही अनेक शाळेत शिक्षक नाहीत. स्वच्छता गृहाची नीट सोय नाही. प्रयोगशाळा, संगणक, इंटरनेटसारख्या सुविधा नाहीत. महाविद्यालयात तर विद्यार्थीच येत नाहीत वर्गात. तरी निकाल छान छान लागतात. संशोधक विद्यार्थी कॉपी पेस्ट करून प्रबंध लिहितात. त्यावर मान्यतेसाठी सही करायला प्राध्यापक लाखो रुपये घेत असल्याच्या बातम्या येतात. खाजगी कॉलेजेसची तपासणी, प्राध्यापकाच्या नेमणुका, त्यासाठी होणारी लाखोची देवघेव हे सगळे आता उघडे गुपित झाले आहे. काही अपवाद वगळता कुलगुरू नेमणुकीत होणारा राजकीय हस्तक्षेप, मग अशा कुलगुरूपैकी काहींनी केलेला पैशाचा अपहार, त्याचे मीडियातील व्हिडिओ क्लिप याचीही आपल्याला सवय झालीय. अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या कुणाची चौकशी झाली, त्यांना शिक्षा झाली, त्याची पेन्शन थांबवली असे ऐकिवात नाही. ही भ्रष्टाचारी माणसे समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसतात..लोकांना द्यान पाजळायला मोकळे फिरतात! आपल्याकडे आय आय टी सारख्या उच्च शिक्षण संस्थात सरकारच्या, जनतेच्या पैशाने शिक्षण घेऊन आपलेच होतकरू तरुण, हुशार विद्यार्थी जगाचे कल्याण करायला परदेशात जातात. अन् आपल्या आई वडिलांना इकडे एकटे सोडून तिकडचे च होऊन बसतात. यालाच देशसेवा म्हणतात. कारण ते म्हणे इकडे डॉलर्स पाठवतात. ज्यामुळे देशाचा विदेश निधी वाढतो. देश थोडा बहुत आर्थिक दृष्ट्या संपन्न होतो. आपण कोणत्याही गोष्टीकडे कोणती दृष्टिकोनातून बघतो त्यावर फायदे तोटे, चांगले वाईट, योग्य अयोग्य ठरत असते.
आपले शालेय शिक्षण तर इतके छान छान झालेय की विचारूच नका. कॉन्व्हेन्ट, इंटरनॅशनल, ग्लोबल अशी नावे असलेल्या, विस्तीर्ण वातानुकूलित कॅम्पस असलेल्या शाळांतील पहिली दुसरीची फी लाखो रुपये असते. म्हणजे इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षाही महाग! पण इथेही लांब लाइन असते ऍडमिशनसाठी. कुणीही काहीही प्रश्न न विचारता इथे मुलाना प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. मुळातच व्यस्त पालकांना आजकाल फालतू चौकशा करायला वेळ नसतो. प्रत्येकापुढे कसल्या ना कसल्या डेड लाइन्स असतात. मोठमोठे टार्गेट्स असतात. त्यासाठी ते अग्निशमन दलासारखे फायर फायटिंग करीत असतात.
आता या देशात पूर्वीची कुटुंबव्यवस्था, नातीगोती, त्यातला लळा जिव्हाळा हे सगळे शोधून बघावे लागते. कामापुरता मामा अशी परिस्थिती आहे. लग्न संस्थेला तडे जात आहेत. छोट्या मोठ्या कारणाने होणाऱ्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मुले मुली लिव्ह इन रिलेशन शीपमध्ये राहायला लागली आहेत. तेही पालकांच्या संमतीने! आहेत स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही अशी एकूण परिस्थिती आहे. तरीही आम्हाला आमच्या संस्कृतीचा, सांस्कृतिक वारसा जपण्याचा, मूल्ये जोपासण्याचा सार्थ अभिमान आहे. याला गणितात paradox म्हणजे विरोधाभास म्हणतात.
पर्यावरण, निसर्गाची जपणूक, प्रदूषण यासारख्या विषयाचे गांभीर्य तर आमच्या ध्यानी मनी देखील नाही. हे सगळे परीक्षेत पर्यावरण विषय शिकणे, आवश्यक तितके पास होण्यापुरते मार्क मिळवणे इथपर्यंतच मर्यादित आहे. माणसाने निसर्गाचे वस्त्रहरण केल्यामुळे वाढलेले तापमान, प्रदूषण, बदललेले ऋतुमान, त्यामुळे वाढलेली रोगराई याची आम्हाला अजूनही गंध वार्ता ही नाही. त्यावर गांभीर्याने विचार करावा, हे सगळे थांबविण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावीत, याकडे प्राथमिक गरज म्हणून बघावे असे आम्हाला, आम्ही निवडून दिलेल्या सरकारला कोणालाच वाटत नाही. आम्ही आपापल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या कामात फार बिझी आहोत. ही काही नैसर्गिक, काही मानवनिर्मित भयानक संकटे आपल्या दाराशी येऊन ठाकली आहेत याचे आम्हा कुणालाच भान नाही.
जो माणूस कोणे एके काळी एकमेकाच्या हातात हात घालून सहकार्याने, विवेक बुद्धीने इथपर्यंत कसा बसा पोहोचला तोच माणूस आज एक दुसऱ्याच्या उरावर बसतो आहे. तिसऱ्या महायुद्धाचा शंखनाद वाजवतो आहे, ही खरी आपली शोकांतिका आहे.आपणच लिहिलेली!
– ©️ प्रा. विजय पांढरीपांडे
७६५९०८४५५५
vijaympande@yahoo.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
महाजनो येन गतः स पन्थाः
जगाच्या पाठीवर अमेरिका नावाचे प्रकरण : लेखांक ५
देवेंद्र रमेश राक्षे
कला, साहित्य, संस्कृती यांच्या अविष्कारात रममाण झालेल्या कलाकारांचे समाजातील स्थान कवि केशवसूत यांनी मोजक्या शब्दात वर्णिले आहे.
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
आम्हाला दुर्लक्ष्य कराल तर –
आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥ असेही केशवसूत बजावतात.
ही कलाकार मंडळी म्हणजे सामान्य लोक नव्हेत तर त्यांना “अभिजन” म्हणून गणले जाण्यात बहुमान वाटतो.
अभिजन (किंवा शिष्टजन) म्हणजे समाजातील असे विशिष्ट लोक जे जन्मजात किंवा स्वकष्टाने मिळवलेल्या गुणवत्तेमुळे, ज्ञानामुळे, प्रतिष्ठेमुळे किंवा इतर कारणांमुळे एक विशेष दर्जा आणि महत्त्व प्राप्त करतात.
या अभिजनातले जे श्रीमंत होतात आणि समाजावर प्रभाव टाकू पाहतात तेव्हा त्यांची गणना “महाजनात” होते.
धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम्। महाजनो येन गतः स पन्थाः।
धर्माची म्हणजे एकंदर महाज्ञानाची कवाडे एखाद्या गुहेत दडलेली आढळतात तेव्हा महाजन चालतील ती वाट वहिवाट (पंथ) म्हणून स्वीकारावी असा या संस्कृत वचनाचा अर्थ होतो.
तर आम्ही कुणीतरी विशेष आहोत हे समजणारे अभिजन तथा महाजन जेव्हा अडचणीत येतात तेव्हा लोकानुनयाच्या युक्त्या वापरत ही मंडळी त्यांच्या एकंदर राहणीमानाचे प्रदर्शन समाजासमोर मांडतात. समाजमन रोजचे दैनंदिन व्याप विसरत या अभिजन, महाजन मंडळींच्या उत्सवात स्वत:चे मनोरंजन करून घेते. हजारो कोटी खर्च करून केलेले विवाहसोहळे, राणीची अंत्ययात्रा, राजकुमाराचा घटस्फोट, राजाच्या भेटीआधी विशिष्ट राजशिष्टाचाराचे पाहुण्यांना घडणारे सक्तीचे प्रशिक्षण इत्यादी गोष्टींतील तपशील वृत्तपत्राचे रकाने भरतात, तसेच वृत्तवाहिन्यांद्वारे प्रेक्षकांच्या काना-डोळ्यावर आदळतात तेव्हा त्या मनोरंजना देखील बाजार मांडला जातो व त्यातून मोठी आर्थिक कमाई देखील साधली जाते. उत्सवी नग्न राजा आणि मनोरंजनात मग्न प्रजा, अशी सारी व्यवस्था अव्यवस्थेला झाकण्यात यंत्रणा दंग होतात.
या अभिजन – महाजन वर्गाची एक राखीव अशी अंतस्थ: व्यवस्था असते, अशीच एक व्यवस्था जगभर “फ्री मेसन” म्हणून ओळखली जाते. या व्यवस्थेतील महाजन म्हणजे “मेसनरी” आणि ते गुप्तपणे भेटतात तेव्हा त्या जागेस “लॉज” असे संबोधले जाते. मेसनरी मंडळी एकमेकांना “फेलो ब्रदर” असे संबोधतात.
“फ्री मेसन” सारख्या अनाधिकृत परंतु गूढगम्य संस्थांना “ईल्यूमनाटी” असे संबोधले जाते. या संस्था आपल्या अस्तित्वाची पुरेपूर काळजी घेऊन देखील आपले अस्तित्व गूढ राखण्यात प्राधान्य देतात. अशी मंडळी जेव्हा त्यांच्या ठरलेल्या “लॉज” मध्ये भेटतात त्या बैठकीची गुप्तता अतोनात राखली जाते. बैठकीबद्दल कोणताही लेखी पुरावा देखील ठेवला जात नाही. जणू “असे काही घडलेच नाही”, “अशी काही संस्थाच नसते”, “असे काही लोकच नाहीत” असा देखावा देखील केला जात नाही. “तेरी भी चूप – मेरी भी चूप” असा सगळा मामला असतो.
ही मंडळी स्वत:ला “देवाने खास म्हणून घडवलेले” असे समजतात. त्यांची प्रत्येक भूमिका, कर्तव्य हे केवळ आदर्श असेच असते असाच त्यांचा दावा असतो. समाजात जे काही चांगले घडते ते त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच अशी त्यांची ठाम समजूत असते. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात देणग्या देत अशी सामाजिक कामे घडवून आणतात.
भारतात प्रत्येक शहरात मेसनरी असतात, ते आपली ओळख “मेसनरी” म्हणून उघड करत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्रात त्याचा उल्लेख करत नाहीत.
ही “फ्री मेसन” टोळी (सोसायटी) सर्वप्रथम जर्मनीत काही शतकांपूर्वी प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते. प्रत्येक देशात त्यांच्या खाणाखुणा आढळतात. त्यांची एकंदर ३२ प्रकारची चिन्हे असतात. अगदी डॉलरच्या काही नोटांवर देखील यातली काही चिन्हं आढळतात.
अगदी नवी दिल्लीतल्या “ल्यूटेन्स” या रायसिना टेकडीच्या परिसरात अनेक पुराण्या इमारती आणि त्यांचे वरवरचे आकार या फ्री मेसन सोसायटी वापरत असलेली चिन्हं दर्शवितात. कनॉट प्लेस परिसरात देखील फ्री मेसन सोसायटीच्या चिन्हांचे प्राबल्य आढळते.
भारतातील मेसनरी होऊन गेलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तिंमध्ये पंडित जवहारलाल नेहरू, डॉ० राजेंद्रप्रसाद यांची नावे होती असे सांगितले जाते. यावरून या फ्री मेसन टोळ्यांचे प्राबल्य जाणवू शकते.
मेसनरी म्हणून गणना होताना एक प्रकारचा शपथविधी त्या मेसनरीच्या विशिष्ट “लॉज” (उदा० लॉज क्रमांक १३८ ई०) मध्ये घडवून आणला जातो, त्याचेही आणि असे इतर अनेक कर्मकांडं मेसनरी पाळतात.
एकंदरीत काय तर आम्ही सामान्य नाहीत तर इतरांपेक्षा वेगळे आहोत, कुणीतरी खास आहोत याची जाणिव मनात घट्ट रोवून टाकायची आणि या जाणिवेशी अत्यंत प्रामाणिक रहायचे. मेसनरी व्यक्तिचा मेसनरी असण्याचा हुद्दा जर त्याच्या कोणत्याही
अपत्याने पुढे रुजू ठेवला नाहीत तर ती व्यक्ति आपल्या वारसांना मेसनरी टोळीबद्दल काहीच सांगत नाही. एक प्रकारची गूढगम्य अशी गुप्तता पाळणे हा त्या शपथविधीतला एक नियम असतो.
अगदी फ्री मेसनच नव्हे तर अशा सदृश्य अनेक यंत्रणा गुप्ततेत आपले काम करतात. “सुमडी में दमडी और दमडी सें कोंबडी” ही म्हण साजरी करणारी अशी या टोळीची एकंदर धाटणी असते.
“ल्यूटेन्स दिल्ली” म्हणून एक केवळ विशिष्ट परिसर आपल्या डोळ्यासमोर तर येतोच परंतु त्याचबरोबर सत्तेच्या भोवती लाळघोटेपणा करत आपले महत्त्व अबाधित ठेवत सत्तेची फळे चाखण्याचे यशस्वी प्रयत्न या अशा टोळ्या करतात. मध्य दिल्लीतील प्रशस्त बंगले, त्याच्या भोवतालची काही एकरातली बाग अशी मोक्याची जागा पटकावून ही मंडळी बसलेली दिसतात.
समाजसेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगणे ते ही कायद्याच्या चौकटीत हे मुख्य सूत्र असते. यातून बाहेर पडते यांचे खरे रूप. ते रूपच मुळात असते खोटे. “मोठे तितुके खोटे” आणि “थोर तितुके चोर” ही जाणिव या टोळीतील कुणाही सदस्याच्या जवळ गेले की कळून चुकते.
यातून फोफावतात अनेक अपारदर्शी सत्ताबाह्य परंतु सत्तेवर प्रभाव टाकणारी सत्ताकेंद्रं. एक आभासी वातावरण या टोळ्यांच्या आसमंतात घुमू लागते. याचा प्रभाव मोठमोठ्या कार्पोरेट उद्योगात देखील पडतो. कार्पोरेट कल्चर नावाचे आभासी प्रभावकेंद्र देखील असेच. कुणी काम करतो का? ते कसे करतो? किती तत्परतेने करतो? वगैरे गोष्टी नगण्य ठरतात. “मी काम करतो की नाही ते महत्त्वाचे नाही”, तर माझ्या वरिष्ठाला “मी काम करतो आहे हे पटले की झाले”. हे या कार्पोरेट यंत्रणेचे सत्तासूत्र ठरते.
ही अशीच पार्श्वभूमी “सी०आय०ए०” या अमेरिकन कारस्थानी संस्थेला जन्म घालणारी ठरली त्याची कहाणी या लेखमालेच्या पुढील अंकात.
(क्रमश:…)
पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी (सर्व आवृत्त्या) दि. ३ ऑक्टोबर २०२५
– @ देवेंद्र रमेश राक्षे
rakshevendra@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पाणी एकाच वेळी गोठते आणि उकळते!
‘त्रिस्थली बिंदू’ (Triple Point)
दीपक देवधर
मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,
पाणी हा आपली सृष्टी, पृथ्वीवर जीवन निर्माण करून ते समृद्ध करणारा प्राथमिक घटक आहे. आपण पाहतो हे पाणी द्रवरूपात तर सर्वत्र उपलब्ध असतेच पण आपण चहा करताना त्याची वाफ होताना पाहतो, तर घरात फ्रीजमध्ये तसेच उत्तर गोलार्धात अनेक ठिकाणी नैसर्गिक अवस्थेतही पाहतो.
पण तुम्हाला माहिती आहे का? पाणी एकाच वेळी गोठू (बर्फ होऊ) आणि उकळू (वाफ होऊ) शकतं! हे कसं शक्य आहे? हा चमत्कार ‘त्रिस्थली बिंदू’ (Triple Point) या भौतिक शास्त्रातील संकल्पनेमुळे समजून घेता येतो.
चला तर मग, याबद्दल मजेदार गोष्टी जाणून घेऊया.
त्रिस्थली बिंदू म्हणजे काय?
जेव्हा पाण्याचं तापमान आणि दाब (Pressure) अगदी एक विशिष्ट ठराविक प्रमाणात असतो, तेव्हा पाणी एकाच वेळी तीन अवस्थांमध्ये राहातं,
१. घन अवस्था (Solid) – म्हणजे बर्फ
२. द्रव अवस्था (Liquid) – म्हणजे पाणी
३. वायू अवस्था (Gas) – म्हणजे वाफ
याला ‘त्रिस्थली बिंदू’ किंवा इंग्रजीत Triple Point असं म्हणतात.
त्रिस्थली बिंदू कधी तयार होतो?
पाण्याचा त्रिस्थली बिंदू साधारण 0.01°C तापमान आणि 611 पास्कल (Pa) इतक्या कमी दाबावर तयार होतो.
म्हणजेच जर आपण प्रयोगशाळेत पाण्याला असं खास वातावरण तयार करून दिलं, तर ते पाणी बर्फ, पाणी आणि वाफ या तीनही रूपांमध्ये एकाच वेळी दिसू शकतं. अगदी जादूसारखं वाटतं, नाही का?
हे का घडतं?
तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या तापमान आणि दाबामुळे पाण्याची अवस्था बदलते, म्हणजे सामान्य वातावरणीय दाब असेल तेव्हा,
• तापमान खूप कमी झाले की पाण्याचं बर्फ होतं. (हिमालय किंवा आल्प्स पर्वतावरील बर्फ)
• तापमान १०० अंशापुढे वाढत गेलं की पाण्याची वाफ होऊ लागते. (चहा करताना उकळणारे पाणी)
• सामान्य स्थितीत ते पाणी राहतं.
पण जर आपण तापमान आणि दाब वर दिल्यानुसार अगदी अचूक ठेवले, तर पाणी एकाच वेळी तिन्ही अवस्थांमध्ये राहातं.
त्रिस्थली बिंदू हे भौतिकशास्त्रातील तापमान, दाब आणि पदार्थांच्या अवस्थांशी (Phase of Matter) निगडीत अत्यंत महत्त्वाचे तत्त्व आहे. यामागे प्रामुख्याने थर्मोडायनॅमिक्स (Thermodynamics) आणि फेज इक्विलिब्रियम (Phase Equilibrium) ही भौतिकशास्त्रातील दोन मुख्य तत्त्वे कार्यरत असतात.
१. थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम (First Law of Thermodynamics)
थर्मोडायनॅमिक्स म्हणजे ऊर्जा आणि तिच्या रूपांतरणाचा अभ्यास. थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम सामान्यतः ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम म्हणून ओळखला जातो. ज्यामध्ये असे म्हटले जाते की, कोणत्याही विलग प्रणालीत किंवा एखाद्या बंद प्रणालीमध्ये (Closed System) उष्णता, दाब आणि तापमान नियंत्रित केले असता, ऊर्जा एक रूपातून दुसऱ्या रूपात जाते. म्हणजेच एकूण ऊर्जा स्थिर असते, ऊर्जा एका रूपातून दुसर्या स्वरूपात बदलली जाऊ शकते, परंतु ती निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही
या तत्त्वानुसार इथे दाखवलेल्या चित्रात खाण्यातून मिळालेल्या रासायनिक उर्जेचे रूपांतर आपल्याला खेळण्यासाठी आवश्यक कायनेटिक उर्जेत होते तर सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश उर्जेचे रूपांतर पानामध्ये साठवलेल्या रासायनिक उर्जेत होते.
पाण्याला उष्णता दिल्यास ते द्रव रूपात राहते, उष्णता वाढवली तर वाफ होते आणि उष्णता कमी केली तर बर्फ होतो.
पण जर आपण तापमान आणि दाब अचूक प्रमाणात ठेवले, तर पाणी कोणतेच एक रूप कायम ठेवू शकत नाही आणि तिन्ही रूपांमध्ये सतत रूपांतर होत राहते.
२. फेज इक्विलिब्रियम (Phase Equilibrium) – समतापीय संतुलन तत्त्व
भौतिकशास्त्रात फेज इक्विलिब्रियम (Phase Equilibrium) म्हणजे दोन किंवा अधिक अवस्थांमध्ये पदार्थाचा संतुलन राखणारा बिंदू.
• साध्या शब्दात सांगायचं झालं तर, एखाद्या पदार्थाची दोन किंवा अधिक अवस्था (घन, द्रव, वायू) एकाच वेळी टिकून राहण्याची स्थिती म्हणजे फेज इक्विलिब्रियम.
त्रिस्थली बिंदूचे तत्त्व:
• जेव्हा आपण तापमान 0.01°C आणि दाब 611 Pa (Pascal) ठेवतो, तेव्हा पाण्याच्या तिन्ही अवस्था (बर्फ, पाणी आणि वाफ) यांमध्ये ऊर्जेचा मुक्त प्रवाह (Free Energy Flow) सुरू होतो.
• पाणी एकाच वेळी बर्फात रूपांतरित होत असतं, वाफेत रूपांतरित होत असतं आणि द्रवात राहण्याचा प्रयत्न करतं.
पण असं का होतं?
याचे उत्तर गिब्स मुक्त ऊर्जा तत्त्व (Gibbs Free Energy Principle) देते.
३. गिब्स मुक्त ऊर्जा तत्त्व (Gibbs Free Energy Principle)
भौतिकशास्त्रज्ञ जोसिया विलार्ड गिब्ज यांनी मांडलेलं गिब्स मुक्त ऊर्जा तत्त्व त्रिस्थली बिंदू समजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
गिब्स मुक्त ऊर्जा सूत्र:
G=H−TS
इथे:
• G = गिब्स मुक्त ऊर्जा (Gibbs Free Energy)
• H = एन्थाल्पी (Enthalpy) – म्हणजे एकूण उष्णता
• T = तापमान (Temperature)
• S = एंट्रॉपी (Entropy) – म्हणजे एन्ट्रॉपी, उपयुक्त काम करण्यासाठी उपलब्ध नसलेल्या प्रति युनिट तापमानाच्या प्रणालीच्या थर्मल उर्जेचे मापन.
या सूत्राचा अर्थ:
• पदार्थ नेहमी त्याच्या ऊर्जेचा स्तर कमी करण्यासाठी (Minimum Energy State) बदल करत असतो.
• जर आपण दाब आणि तापमान अगदी विशिष्ट ठिकाणी नियंत्रित केलं (0.01°C आणि 611 Pa), तर पाणी कोणत्याही एका स्थितीत राहात नाही.
• गिब्स मुक्त ऊर्जा सतत बदलत राहते, परिणामी बर्फ, पाणी आणि वाफ, तिन्ही एकत्र दिसतात.
विशेष बाब:
गिब्स ऊर्जा कमी करण्यासाठी पाणी सतत रूप बदलत राहतं. म्हणूनच तिथे स्थिर संतुलन (Stable Equilibrium) निर्माण होत नाही. परिणामी, बर्फ वितळतं, पाण्याची वाफ होते आणि वाफ थंड होऊन पाणी किंवा बर्फ होतं, सतत चक्र सुरू राहतं.
४. ट्रिपल पॉईंट डायग्राम (Triple Point Diagram)
विज्ञानामध्ये हे स्पष्ट करण्यासाठी P-T Phase Diagram (Pressure-Temperature Phase Diagram) वापरला जातं.
या तक्त्यामध्ये:
• एका बाजूला दाब (Pressure) आणि दुसऱ्या बाजूला तापमान (Temperature) असतो.
• काही ठिकाणी एकच अवस्था दिसते (उदा. पाणी, बर्फ, वाफ).
• पण जेव्हा आपण ठराविक तापमान 0.01°C आणि दाब 611 Pa ठेवतो, तेव्हा तीनही अवस्था एकाच वेळी टिकून राहतात. यालाच Triple Point म्हणतात.
५. घन, द्रव आणि वायू — तिन्ही एकत्र का टिकतात?
हे समजण्यासाठी थर्मोडायनॅमिक स्थिरता (Thermodynamic Stability) पाहावी लागेल.
• पाण्याच्या बर्फ या घन रूपात ऊर्जा कमी असते.
• पाण्याच्या द्रव रूपात ऊर्जा थोडी जास्त असते.
• पाण्याच्या वाफेच्या वायू रूपात ऊर्जा सर्वात जास्त असते.
जेव्हा आपण तापमान आणि दाब त्रिस्थळी बिंदू च्या पातळीवर अचूक ठेवतो, तेव्हा पाण्याच्या तीनही रूपांना समान ऊर्जा मिळते म्हणून पाणी ठराविक बिंदूवर तीनही अवस्थांमध्ये सतत बदलत राहातं. यालाच Thermodynamic Equilibrium म्हणतात.
६. फक्त 0.01°C आणि 611 Pa वरच हे का शक्य असतं?
कारण 0.01°C आणि 611 Pa (0.00611 bar) वर गिब्स मुक्त ऊर्जा सर्वात कमी असते. पदार्थ त्याच्या सर्वात स्थिर स्थितीकडे झुकतो (Minimum Energy State).परिणामी, पाणी बर्फ, वाफ आणि द्रव यांमध्ये सतत बदलत राहातं आणि तिन्ही रूपं एकाच वेळी दिसतात.
संक्षेपात: त्रिस्थली बिंदू कसा होतो?
घटक कारण परिणाम
थर्मोडायनॅमिक्स ऊर्जा सतत बदलते पाणी तिन्ही स्थितीत रूपांतरित होतं.
फेज इक्विलिब्रियम संतुलन टिकवणारा बिंदू तीनही अवस्था एकत्र राहतात.
गिब्स मुक्त ऊर्जा ऊर्जा कमी करण्यासाठी सतत बदल पाणी बर्फ, द्रव आणि वाफ — तिन्ही असतात.
त्रिस्थली बिंदूचा प्रयोग
हे तुम्ही घरी करू शकत नाही, पण वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये हे शक्य आहे. प्रयोगशाळेत एक खास बंद बाटली (Vacuum Chamber) घेऊन त्यामधील हवा काढून टाकली जाते आणि तापमान अगदी अचूक ठेवलं जातं.
तिथे पाणी उकळतंही आणि गोठतंही, एकाच वेळी!
त्रिस्थली बिंदू कशासाठी उपयोगी आहे?
१. उष्णता मोजण्यासाठी (Temperature Measurement) – त्रिस्थली बिंदू वापरून तापमान अगदी अचूक मोजलं जातं.
२. वैज्ञानिक प्रयोगांमध्ये – द्रव्यांच्या अवस्था समजण्यासाठी त्रिस्थली बिंदू महत्त्वाचा ठरतो.
३. अंतराळ संशोधनातही – काही ग्रहांवर दाब वेगळा असतो, त्यामुळे अशा स्थितीचा अभ्यास करायला त्रिस्थली बिंदू मदत करतो.
जर तुम्ही प्रयोगशाळेत नेमकं 0.01°C आणि 611 Pa असलेलं वातावरण तयार केलं, तर तुम्हांला तुमच्या डोळ्यांनी हे बघता येईल, पाणी एकाच वेळी बर्फ, द्रव आणि वाफ म्हणून दिसेल!
काय, विज्ञान किती भन्नाट आहे ना?
- © दीपक देवधर
dpdeodhar@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
रंग माझा वेगळा…!!
प्रदीप अधिकारी
निळ्या आणि पांढर्या रंंगाचे मिश्रण असलेली अतिशय सुरेख दिसणारी दुर्मिळ असलेली गोकर्णीची वेल एका बंगल्याच्या कंपाऊंड वाॅलवर बहरलेली पाहिली अन् मन वेडावले.
पावसाळा संपत आला होता आणि चार दिवसांची सुट्टी घेऊन थोरला दिल्लीहून अचानक येऊन थडकला होता आणि त्याच्या हट्टापायी अगदी अनपेक्षितपणे आम्ही कारने दापोलीला निघालो होतो…महाडवरून आत शिरुन एका सुंदरशा रस्त्याने भरवेगात जात असताना डाव्या हाताला असलेला तो बंगला क्षणार्धांत मागे पडला पण निळ्यापांढर्या ठिपकेदार फुलांनी तुफान फुललेली ती गोकर्णीची वेल कायमची मनात ठसली.
‘परत जाताना आपण ह्याच रस्त्याने जाऊ या’ असे ठरवले होते पण आयत्या वेळी GPS ने दाखवलेल्या मार्गाने माणगावरुन पुण्याला गेलो आणि मी मनात ठरवलेला “त्या” बंगल्याच्या मालकाकडून त्या गोकर्णीची एखादी शेंग मिळवण्याचा बेत फिस्कटून गेला….मुलाकडे नाराजी व्यक्त केली तर तो म्हणाला, “बाबा, ह्या वयात असली खूळं डोक्यात घेऊन बसू नका..लॅप टाॅपवर गुगल करा..नाही तर Amazon वरुन मागवा…घरबसल्या मिळेल !”
तो विषय मग तसाच राहिला…नंतर कधीतरी, मी गुगलवर, Amazon वर शोधण्याचे दोन तीन वेळा केविलवाणे प्रयत्न केले पण काही जमले नाही…!
गेल्या महिन्यात आमच्याच सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणार्या एका बागप्रेमी सदस्याशी सहज गप्पा मारताना ह्या गोकर्णीचा विषय निघाला, तर तो अचानक म्हणाला, “अहो काका, माझ्याकडे आहेत एक दोन सुकलेल्या शेंगा तुम्ही म्हणता त्या गोकर्णीच्या..हव्यात का तुम्हाला?? मालवणहून येताना आणल्यात….
हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा….ह्या म्हणीसारखी सिच्युएशन झाली की…मी उत्साहाने त्याच्याकडून ती सुकलेली पांढरट रंगाची अर्धवट उमललेली शेंग मोठ्या आनंदाने घेऊन घरी आलो. शेंगेत फक्त दोन बिया होत्या…सगळे सोपस्कार पार पाडून त्या बिया कुंडीत लावल्या…दोन आठवड्यापूर्वी एक वेल उगवलेली दिसली…! भरपूर खत माती असल्याने बघता बघता तरारली आणि आज सकाळी लक्षात आले ते त्या वेलीवर फुललेले पहिले वहिले गोकर्णीचे सुंदर नाजुक, निर्मळ पांढरे फुल..!!
सकाळी सकाळीच अपेक्षाभंगाचा धक्का बसला, मन थोडसे खट्टू झाले …मला हवी असलेली “ती” “ही” नव्हतीच..!!
– © प्रदीप अधिकारी
adhikaripradeep14@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
उत्तरे जाणा व ज्ञानात भर घाला
विलास सातपुते
प्रश्नसमूह ६ : प्लॅस्टिक
२६. सगळ्यात प्रथम अस्तित्वात आलेले प्लॅस्टिक कोणते ? कधी ?
२७. सध्या रोजच्या सामान्य वापरात कोणकोणती प्लॅस्टिक्स आहेत आणि ती कोणकोणत्या वापरात आहेत ?
२८. प्लॅस्टिकमध्ये कोणते विशेष उपयोगी गुणधर्म आहेत ?
२९. आजकाल जे नॉन-स्टिक नावाने जे तवे, कढया येतात त्यावर कसला थर दिलेला असतो ?
३०. प्लॅस्टिकचे तोटे काय ?
वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.
उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.
– ©️ विलास सातपुते
प्रश्नसमूह ६ ची उत्तरे
२६. ‘बॅकेलाईट’ हे पहिले प्लॅस्टिक १९१० पासून वापरात आले. लिओ बेकलॅन्ड या मूळ बेल्जियन रसायनशास्त्रज्ञाने ते अमेरिकेमध्ये शोधले. त्याचा वापर घरातील स्विचबोर्ड, वाहनातील पार्ट, इन्सुलेटर्स इत्यादीमध्ये होतो.
२७. अ) – पॉलिथीन – याचे पूर्ण नाव ‘ लो डेन्सिटी पॉलिइथिलीन ( LDPE)’ असे आहे. पातळ कापडाच्या स्वरूपात असते व पिशव्या, पडदे, खाद्य व औषधे यांची पॅकिंग यात वापरले जाते.
आ) पेट( PET) – याचे पूर्ण नाव ‘पॉलिइथिलीन टेरेप्थॅलेट” आहे. अगदी पारदर्शक पण असते. मुख्यत्वे बाटल्या बनवण्याच्या कामी येते.
इ) एचडीपीई(( HDPE) – याचे पूर्ण नाव “ हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन’ हे आहे. हे एलडीपीई पेक्षा जास्ती मजबूत व जाड असते. जाड बाटल्या, जाड कॅन्स्, छतावर उभारल्या जाणार्या पाण्याच्या टांक्या व कारखान्यात अॅसिड इत्यादी साठवण्याकरिताच्या टाक्या, पाईप इत्यादीमध्ये वापरले जाते.
ई) पीपी( PP) – याचे नाव “ पॉलिप्रॉपिलीन” असे आहे. हे एचडीपीई पेक्षा जास्ती मजबूत व टिकाऊ असते. विशेषकरून जरा जास्त तापमानापर्यंत ( 100 डिग्री सें.) वापरले जाऊ शकते. याचा ही वापर छतावर उभारल्या जाणार्या पाण्याच्या टांक्या व कारखान्यात अॅसिड इत्यादी साठवण्याकरिताच्या टाक्या, पाईप इत्यादीमध्ये केला जातो.
उ) पीव्हीसी( PVC) – याचे नाव ‘ पॉली व्हिनाईल क्लोराईड” असे आहे. याचा ही वापर शेतीमध्ये पाण्याचे पाईप, जमीनीवर अंथरायचे गालिचे वा फरशा यात होतो. चपलांचे तळ पण बनतात. आजकाल याचा वापर कमी होऊ लागला आहे.
ऊ) पॉलिस्टायरीन – याचा वापर सोफासेटच्या गाद्या, वाहनांतील सीट्स् यांत होतो. तसेच अंड्यांचे ट्रे, डबे वगैरेमध्ये पण होतो.
ओ) याखेरीज पॉलिकार्बोनेट, अॅक्रिलिक ही पारदर्शक प्लॅस्टिक पण वापरली जातात.
२८. प्लॅस्टिकवर धातूंप्रमाणे गंज लागत नाही, अॅसिड सुद्धा साठवू शकते. वजनाला हलके असते. नजीकच्या वस्तूंशी घर्षण कमी करते. धातूंच्या उलट असते म्हणजे वीज व उष्णता वाहण्यास विरोध करते.
२९. त्या तवे, कढया इत्यादीवर ‘टेफ्लॉन’ या एका वेगळ्या पॉलिमर द्रव्याचा थर दिलेला असतो. हे द्रव्य गुळगुळीतपणा, कठीणपणा, आणि उच्च तपमान सहन करण्याकरिता प्रसिद्ध आहे. त्यावर वातावरण, अॅसिड याचा काही परिणाम होत नाही. ते शुद्ध राहते.
३०. प्लॅस्टिकचे नैसर्गिक दृष्ट्या विघटन होऊन निसर्गातील मूल घटकांत रूपांतर होत नाही. त्यामुळे ते तसेच पृथ्वी वा जलाशय यांमध्ये साठून राहते, जागा व्यापते. म्हणजे प्रदूषण करते. प्राणि व मासे यांच्या पोटात जाते आणि त्यांना नुकसान करते. या सर्वातून सुटकेसाठी त्याला पुन्हा प्लॅस्टिक बनवण्याच्या प्रक्रियेत वापरणे पण अजून तितकेसे शक्य झाले नाही. त्यामुळे लक्षावधी टन प्लॅस्टिक समुद्रात जात आहे.
[ वरील प्रश्नांची उत्तरे प्रकाश पेठे यांनी पाठवली आहेत. इतर सर्व वाचक मित्रांचे अभिनंदन आणि आभार ]
– ©️ विलास सातपुते
vilas.satput54@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विहंग मित्र
देवदत्त पाटणकर
क्रमांक ६ : Asian Emerald dove ( पाचू कवडा )
पाचू च्या रंगाचे पंख, लाल चोच,राखाडी कपाळ,असा हा अतिशय देखणा पक्षी रानात जमिनीवर,झाडांवर दिसतो,
फक्त नराला चंदेरी पॅच असतो. समुद्रसपाटी पासून डोंगराळ भागापर्यंत सर्वत्र आढळतो.
हा पक्षी रानात बघणे अतिशय आल्हाददायक असते.
– ©️देवदत्त पाटणकर.
8378980966
castingalu@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

With Best Regards,
Deodatta Patankar,
8378980966.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन

– ©️ रामचंद्र देशमुख
संपर्क : ९९३०२४६९८९
प्रेषक मेघना घाटे
meghanaghate25@gmail.com
– ©️ मिलिंद महाबळ
milind.mahabal65@gmail.com
– ©️ युती प्रवीण अघोर
प्रेषक शुभदा प्रवीण अघोर
shubhadaaghor@gmail.com
महत्वाची सूचना – या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@
महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.
@@@@@@@@@@@@@@
































































































