जगातला सर्वात ‘कलात्मक’ दरोडा !

स्वागत फुलांनी 
बँक ऑफ रिओ, अकॅसुसो, अर्जेंटिना

वार : शुक्रवार.
तारीख : १३ जानेवारी २००६.
वेळ : साधारण दुपारी १२.३० ची.
स्थळ : अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स परगण्यामधील ‘अकॅसुसो’ (Acassuso) या टुमदार शहरातल्या ‘बँक ऑफ रिओ’ ची दुमजली इमारत.  

रिओ बँकेच्या दर्शनी भागातलं काचेचं दार ढकलून सुटाबुटातले पाच पुरुष एकामागोमाग आत शिरले. त्यांच्या हातात मोठ्या बॅगा होत्या. त्यातले दोन जण आतला जिना चढून वरच्या मजल्यावर गेले. बाकीच्या तिघांनी तळमजल्यावर जागा धरल्या. आडोशाला उभं राहून सर्वांनी खिशातून रबरी मुखवटे काढून तोंडावर चढवले आणि एकाच वेळी खिशातून पिस्तुलं काढून ती समोरच्या लोकांवर रोखली. त्यावेळी दोन्ही मजल्यावर मिळून २३ कर्मचारी आणि ग्राहक होते. वरच्या मजल्यावर जे मोजके कर्मचारी होते त्यांना खाली आणण्यात आलं. मग सर्वांना जमिनीवर पालथं झोपण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे  बँकेवर दरोडा पडत असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. पालथं झोपल्यामुळे दरोडेखोर नेमकं काय करत आहेत हे कुणालाच दिसत नव्हतं.

पोलिसांचं आगमन
एव्हाना दरोडा पडत असल्याची बातमी पोलिसांना समजली होती. त्यामुळे एकामागोमाग एक पोलिसांच्या गाड्या तिथे पोहोचल्या होत्या आणि पोलिसांनी नि कमांडोजनी बँकेच्या इमारतीला वेढा घातला होता. दरोडेखोर अजून आतच असल्याचं पोलिसांना समजलं तेव्हा त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बँकेची कॅश लुटण्याचा हा नेहमीसारखाच एक प्रयत्न आहे आणि दरोडेखोर आपल्या तावडीतून सुटत नाहीत अशी त्यांची खात्री झाली. तरीही पोलिसांनी दरोडेखोरांच्या कलाने घ्यायचं ठरवलं. कारण १९९९ साली ‘रामेल्लो’ शहरात अशाच एका बँकेवर पडलेल्या दरोड्याची आठवण ते विसरले नव्हते. त्या दरोड्यात बराच विध्वंस आणि गोळीबार झाला होता. काहींचा त्यात बळी गेला होता. त्या प्रकरणात पोलिसांनाही दोषी ठरवण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांना ते होऊ द्यायचं नव्हतं.    

बँकेच्या इमारतीला अन्य कुठल्याही बाजूला दुसरं दार नव्हतं. त्यामुळे दर्शनी भागाच्या मुख्य दारासमोरच काही अंतरावर पोलिसांनी मुक्काम ठोकला. शिवाय बँकेला वेढा घालून सुमारे शंभर शस्त्रसज्ज पोलिस उभे होते. पोलिसांचे छुपे निशाणेबाज- ज्यांना स्नायपर म्हणतात- तेही आजूबाजूंच्या रस्त्यांवर आणि इमारतींवर दडून बसले होते. इकडे मीडियावाल्यांनी मिळतील तिथे जागा पकडून त्या घटनेचं चलत् चित्रण करायला सुरुवात केली होती. काही मीडियावाले तर कॅमेरा घेऊन आजूबाजूच्या झाडांवर चढले होते. बघ्यांची गर्दीही वाढत होती.        

एक चमत्कारिक घटना
तेवढ्यात एक चमत्कारिक घटना घडली. काचेचं दार ढकलून बँकेचा सुरक्षा रक्षक बाहेर पडलेला पोलिसांना दिसला. त्याच्या उजव्या हातात पिस्तुल होतं. हातात संरक्षक ढाल धरलेले दोन पोलीस पुढे जाऊन त्याला घेऊन आले. अधिकाऱ्यांनी लगेचच त्याला ताब्यात घेऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा तो म्हणाला, “ते कितीजण आहेत मला नेमकं समजलं नाही. तीनचार जण तर नक्कीच होते. त्यांच्या अंगात सूटबूट आहेत आणि तोंडावर बुरखे आहेत. एकाच्या हातात मोठी गन आहे. लोकांना त्यांनी फरशीवर झोपवलं आहे. ओलीसांची संख्या वीस-पंचवीस असावी. माझ्यावर पिस्तुल रोखून त्यांनी माझं रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं. त्यातल्या गोळ्या काढून माझ्याच खिशात टाकल्या आणि रिव्हॉल्व्हर पुन्हा माझ्या हातात दिलं. माझ्याशी ते अगदी सौजन्याने वागले. करडा सूट घातलेल्या एकाने मला दंडाला धरून काचेच्या दारापर्यंत आणलं आणि बाहेर जायला सांगितलं. त्यापूर्वी मला तो ‘सॉरी’ म्हणाला. या पहा रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी काढलेल्या गोळ्या !” खिशातून गोळ्या बाहेर काढत सुरक्षा रक्षक म्हणाला. त्याने दिलेल्या माहितीमुळे पोलीस अगदी थक्क झाले. कारण यापूर्वी असं कधी घडल्याचं त्यांना आठवत नव्हतं.

दरोडेखोरांशी संपर्क  
बँक मॅनेजरसुद्धा आतच असल्याचं पोलिसांना समजलं तेव्हा त्याच्या मोबाईलवर त्यांनी फोन लावला. काही मिनिटांतच दरोडेखोरांशी संपर्क प्रस्थापित झाला. बोलणाऱ्या दरोडेखोराने स्वतःचं नांव ‘वॉल्टर’ असं सांगितलं. पोलिसांचा बोलणी-अधिकारी (Negotiator) मिग्युएल सिएलो याने त्याला विचारलं, “वॉल्टर, तुम्हाला काय हवंय?”
“सांगतो. पण आधी एक करा. वर मला हेलिकॉप्टर फिरताना दिसतंय !” वॉल्टर म्हणाला, “ताबडतोब ते हलवा. आणि गच्चीवर जे कमांडो उतरलेत त्यांनाही खाली बोलवा. नाहीतर आम्ही ओलीसांना ठार मारायला सुरुवात करू.”
“ओके ओके. मी त्यांना हटवतो. तुम्ही कुणाला मारूबिरू नका.” सिएलो म्हणाला आणि त्याने दोन्ही हाताचे अंगठे खाली करून गच्चीवरील कमांडोज आणि आकाशातील हेलिकॉप्टर यांना खूण केली. त्याबरोबर हेलिकॉप्टर तिथून दूर निघून गेलं आणि गच्चीवरून उड्या मारून कमांडोज खाली आले.
“वॉल्टर, तुमच्या इच्छेप्रमाणे झालं आहे. तुम्हाला काय हवंय ते सांगा.”
“आम्हाला सेफ पॅसेज हवाय.”  
“ते कठीण आहे. तुम्हाला आम्ही वेढा घातलाय. तुमचं लाईव्ह चित्रण होत आहे. तुम्ही शरण या म्हणजे थोडक्यात सुटू शकाल. कमीतकमी शिक्षा व्हावी म्हणून मी स्वतः तुमची शिफारस करीन.”
“मी तो निर्णय घेऊ शकत नाही. थोडा वेळ द्या. बाकीच्यांशी बोलून सांगतो.”  वॉल्टर म्हणाला.
“ठीक आहे.” असं म्हणून सिएलोने फोन ठेवला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मितहास्य होतं.  

पोलीस आणि कमांडोजचा बँकेच्या इमारतीला वेढा

आणखी एकाची सुटका
थोडा वेळ गेला आणि काचेचं दार ढकललं गेलं. एक अतिशय घाबरलेला तरुण मुलगा बाहेर डोकावला. त्याची पॅन्ट ओली झाली होती. “हा नर्व्हस झालाय, याला जपून न्या !” मागून करडा सूटवाला दरोडेखोर पोलिसांना उद्देशून ओरडला. दार पुन्हा बंद झालं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन शांत केलं आणि काय घडलं ते विचारलं.

“मी भयंकर घाबरलो होतो-” तरुण सांगू लागला, “मला लघवीला होत होती. तेव्हा त्यांनी मला टॉयलेटला जाऊ दिलं. पण पुन्हा व्हायला लागली. तेव्हा तो वॉल्टर का कोण आहे त्याने मला धीर दिला आणि ‘तू आता बाहेर जाऊनच कर’ म्हणाला. भीतीने माझे पाय थरथरत होते. पण त्याने मला मदत केली. आधार देत त्याने मला दारापर्यंत आणलं.”
“त्यांनी कुणाला मारहाण वगैरे केली का?”
“छे छे, अजिबातच नाही. ते आमच्याशी अगदी समजुतीने बोलत होते.”

हे सगळं ऐकून अधिकाऱ्यांचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता.
“काहीतरी गौडबंगाल आहे ! मला हे फार विचित्र वाटतंय” एक अधिकारी म्हणाला.
तोपर्यंत तिथे सरकारी वकील पोहोचला होता. बोलणी-अधिकारी सिएलोने पुन्हा फोन लावला.
“वॉल्टर, काय ठरलं?”  
“समजा आम्ही शरण आलो तर तुम्ही आम्हाला जिवंत ठेवाल याची काय हमी?” वॉल्टरने विचारलं.
“छे छे, ते तू मनातही आणू नकोस. या घटनेचं लाईव्ह चित्रण टीव्हीवर दाखवलं जातंय. तुम्ही निःशस्त्र होऊन बाहेर या, आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. इथे सरकारी वकील आले आहेत तेही याची हमी देतील. बोल त्यांच्याशी.”
“हॅलो, वॉल्टर, तुम्ही काळजी करू नका.” सरकारी वकील बोलू लागला, “तुमच्या सुरक्षेची जबाबदारी मी घेतो. फक्त आत कुणाला इजा करू नका. आम्ही बचाव पक्षाच्या एका वकिलांनाही बोलावलंय. ते तुमची बाजू कोर्टात मांडतील.”
“विचार करून सांगतो.” एवढं बोलून वॉल्टरने फोन बंद केला.

वाटाघाटी याप्रमाणे चालू राहिल्या. दरम्यान बचाव पक्षाचा एक वकीलही तिथे पोहोचला होता. मात्र वॉल्टरने त्याच्याशी बोलायला नकार दिला. ‘ब्युनोस आयर्समधील सुप्रसिद्ध वकील अमुक अमुक यांना बोलवा. ते आले की आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि मग शरण येतो’ असं त्याने सांगितलं आणि त्या वकिलाचा नंबर सिएलोला दिला. त्याप्रमाणे पोलिसांनी त्या वकिलाला फोन लावायला प्रयत्न केला. फोन बराच वेळ एंगेज येत होता, पण शेवटी एकदाचा लागला. मग पोलिसांनी त्याला अकॅसुसो शहरात रिओ बँकेपाशी येण्याची विनंती केली. ‘ओके, मी ताबडतोब निघतो, पण मला तासभर तरी लागेल’ असं वकिलाने सांगितलं आणि फोन ठेवला.

नाचगाण्याचा आवाज  

काचेच्या दरवाज्यातून ‘वॉल्टर’चं क्षणदर्शन

बाहेर पोलिसांची आणि मीडियावाल्यांची गडबड चालू असताना मध्येच आतून गाण्याचा आणि टाळ्यांनी दिलेल्या ठेक्याचा आवाज ऐकू आला. पोलिसांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. तेवढ्यात काचेचं दार उघडलं आणि एका म्हाताऱ्या बाईला धरून उभा असलेला करड्या सुटातील तो दरोडेखोर पुन्हा एकदा दिसला. यावेळी त्याने तोंडावरचा मुखवटा वर केला होता. त्यामुळे चष्मा आणि जाड मिश्या असलेला त्याचा चेहरा सर्वांना दिसला. ‘या आजींना घेऊन जा !’ तो ओरडला आणि दार पुन्हा बंद झालं. ढालधारी पोलीस पुढे जाऊन तिला घेऊन आले. पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, “दरोडेखोरांनी सगळ्यांकडचे मोबाईल घेऊन ते एका बाकड्यावर रांगेने लावून ठेवले होते. माझा फोन पुन्हा पुन्हा वाजत होता म्हणून त्या करड्या सुटातल्या माणसाने- वॉल्टरने- तो फोन दाखवून ‘हा कुणाचा?’ म्हणून विचारलं. मी म्हटलं ‘माझा’. तेव्हा तो म्हणाला, ‘सारखा कुणाचा फोन येतोय तुम्हाला?’ तेव्हा ‘माझा आज वाढदिवस असल्यामुळे नातेवाईक फोन करत असतील’ असं मी म्हणाले. मग आधार देऊन त्याने मला उभं केलं आणि म्हणाला ‘घाबरू नका आजीबाई, आपण तुमचा वाढदिवस साजरा करूया.’ मग त्याने मेणबत्ती मिळाली नाही म्हणून एक कँडी पेटवली आणि तो नि त्याचे साथीदार माझ्याभोवती फेर धरून नाचत ‘हॅपी बर्थ डे’ गायला लागले. त्याने सांगितल्यामुळे पडल्या पडल्या जमिनीवर हाताचा ठेका धरून सर्व ओलीसही त्याला साथ करत होते. मी फुंकर घालून कँडी विझवल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग तो म्हणाला, ‘वाढदिवसाची तुम्हाला भेट देतो आजीबाई. जा, तुमच्या नातवंडांमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करा !’ आणि मग हाताला धरून त्याने मला बाहेर आणून सोडलं. मोठा प्रेमळ माणूस !”

त्या म्हाताऱ्या बाईचं हे वर्णन ऐकून पोलिसांच्या डोक्याला मुंग्या आल्या. ‘हे चाललंय काय?’ असं ते एकमेकांना विचारू लागले. टीव्हीवर त्या बाईचं बोलणं ऐकणाऱ्या जनतेनेही घरातल्या घरात हसून टाळ्या वाजवल्या. करड्या सुटातला वॉल्टर, त्याचा चष्मा आणि जाड मिश्या लोकांच्या मनावर ठसल्या. मग अजून काय काय गंमत बघायला मिळतेय या उत्सुकतेपोटी लोक जेवणखाण विसरून टीव्हीकडे पहात राहिले.                  

पिझ्झाची मागणी
एव्हाना दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून दोन तास होऊन गेले होते. ब्युनोस आयर्समधून निघालेला वकील तासभर होऊन गेला तरी अजून तिथे पोहोचला नव्हता. तेव्हा तो बनावट नंबर असावा अशी पोलिसांना शंका आली. पण वॉल्टरने ती शंका फेटाळून लावली. “ते आल्याशिवाय आम्ही बाहेर येणार नाही.” तो म्हणाला, “अजून अर्धा तास वाट बघू. तोपर्यंत ते आले नाहीत, तर मघाशी येऊन गेला त्या वकिलाला बोलावून ठेवा.”  

त्यानंतर पाऊण तास झाला तरी ब्युनोस आयर्सचा वकील आला नाही. दुपारचे ३.३० वाजले होते. पुन्हा एकदा पोलिसांनी फोन लावला. “तुमचे ते वकील काही आले नाहीत. पण बचाव पक्षाचे दुसरे वकील इथे आलेले आहेत. आता शरण या.” सिएलो म्हणाला.
यावर वॉल्टरने पोलिसांना एक विनंती केली. “आम्हा सगळ्यांना भूक लागलीय.” तो म्हणाला, “तुम्ही सर्वांसाठी पिझ्झा आणि सोडा वॉटरच्या बाटल्या मागवू शकाल काय? तीस-पस्तीस तरी लागतील. बिचाऱ्या ओलीसांनाही भूक लागली असेल. आम्ही खाऊन घेतलं की मग तुम्ही सांगाल त्याप्राणे शरण येतो.”
पोलीस भयंकर चडफडले पण त्यांना ‘होय’ म्हणणं भागच होतं. त्यांनी लगेच पिझ्झा आणि सोडावॉटर आणायला व्हॅन पिटाळली.  

दरोडेखोर गायब !


पोलीस पिझ्झा घेऊन निघाले

पिझ्झा येण्यात अर्धा तास गेला. सिएलो वॉल्टरला फोन लावू लागला पण फोन लागेना. आईमाईवरून शिव्या घालत पोलीस फोन लावत होते पण उपयोग झाला नाही. शेवटी अधिकाऱ्यांनी काही वेळ आपसात चर्चा केली. मग हातात पिझ्झाचे खोके घेऊन दोन पोलीस काचेच्या दारापाशी आले. त्यांच्या मागोमाग रिव्हॉल्व्हर घेऊन अन्य पोलीस आणि कमांडोज दबक्या पावलांनी येत होते. दार ढकलून बघतात, तर समोर कुणीच नाही. मात्र फरशीवर झोपून राहिलेले ओलीस त्यांना दिसले. पोलीस आत आल्याबरोबर काही ओलीस उठून बसले, काही उभे राहिले तर काही अजून झोपूनच राहिले होते. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना झोपूनच राहायला सांगितलं.

काही पोलीस जिन्याने वर गेले. वरचा हॉलही रिकामा होता.  त्यांनी आढ्याकडे नजर टाकली. तिथे काही तोडफोड दिसली नाही. खिडक्यांमधून दरोडेखोर बाहेर पडूच शकत नव्हते कारण खाली पोलिसांचा वेढा होता. पोलिसांची अक्षरशः मती गुंग झाली. साले गेले कुठे? मग लक्षात आलं, की बँकेला तळघर आहे. पोलीस दोन जिने उतरून तळघराकडे धावले. दार आतून बंद होतं ते फोडण्यात आलं. आतलं दृश्य बघून पोलिसांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. सेफ डिपोझिट व्हॉल्ट्स उचकटून काढून बाजूला त्यांचा ढीग रचलेला दिसला. त्यातच एक बॅटरी पॅक आणि गिरमिटासारखं कुलूप फोडणारं हत्यारही पडलं होतं. एकूण ४०० व्हॉल्ट्स होते, त्यापैकी १४७ दरोडेखोरांनी रिकामे केले होते. एवढं करूनही दरोडेखोर गायबच होते. सर्व भिंती शाबूत होत्या. मात्र भिंतीपाशी एक शुभ्र वस्त्र अंथरलेलं दिसलं. त्यावर दरोडेखोर आपली सर्व शस्त्रे ओळीने मांडून ठेवून गेले होते. शस्त्रं पाहून पोलिसांना हसावं की रडावं कळेना. कारण बंदूक आणि पिस्तुलं सर्व खेळण्यातली आणि खोटी होती. वरच्या बाजूला भिंतीवर एक कागद चिकटवला होता. त्या कागदावर दरोडेखोरांनी पोलिसांना उद्देशून काही मजकूर टाईप करून ठेवला होता. हा मजकूर असा,

“In a neighbourhood of rich people,
 without weapons or grudges,
 Its just money, not love.”

(भावार्थ : “जवळच श्रीमंत लोकांच्या वस्तीत,
  शस्त्रं किंवा  राग-द्वेष न बाळगता आम्ही असू.
  विषय फक्त पैशाचा आहे, प्रेमाचा वगैरे नाही.”)  
तो मजकूर पाहून पुन्हा एकदा पोलिसांनी दरोडेखोरांना आईमाईवरून शिव्या घातल्या.

भुयार आणि बोगदा
ज्याअर्थी दरोडेखोर गायब झाले, त्याअर्थी तळघराच्या खालून एखादा बोगदा असावा असा इंटीलिजन्स अधिकाऱ्यांनी कयास केला. व्हॉल्ट्स असलेली पोलादी कपाटं सरकवायला त्यांनी पोलिसांना सांगितलं. जाण्यापूर्वी तीनही मजल्यांवर दरोडेखोरांनी क्लोरीनचा फवारा मारला होता आणि मानवी केसांच्या बटा उधळल्या होत्या. त्यामुळे उद्या ते पकडले गेले तरी डीएनए तपासातून काही निष्पन्न होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे मुद्देमालासकट त्यांना पकडणं भाग होतं. बोगद्यातून दरोडेखोर कुठेतरी जमिनीवर येतीलच हे ओळखून अधिकाऱ्यांनी वेळ न गमावता पोलिसांच्या गाड्या सर्व बाजूंच्या रस्त्यांवर रवाना केल्या. ‘जी जी संशयास्पद माणसं किंवा वाहनं दिसतील त्यांना थांबवा आणि इकडे घेऊन या !’ असा आदेश शहरात जारी केला गेला.  

एव्हाना पोलादी कपाटं सरकवण्यात आली होती. भिंतीला एके ठिकाणी माणूस आरपार जाईल एवढ्या आकाराचं भोक पोलिसांना दिसलं. पोलिसांनी आत जाऊन पाहिलं तर घसरगुंडीसारखं एक तिरपं भुयार केलेलं त्यांना दिसलं. भुयाराची लांबी साधारणपणे १५ मीटर एवढी होती. त्या भुयार-वजा-घसरगुंडीचा वापर करून पोलीस खाली आले तेव्हा एका भल्यामोठ्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला ते भुयार जोडलेलं दिसलं. त्या बोगद्यात महापालिकेचे अंधुक दिवे होते आणि साधारण ढोपरभर सांडपाणी वहात होतं. त्या पाण्यातून चालत काही पोलीस दोन्ही दिशांना जात राहिले, पण त्यांना दरोडेखोर कुठेही दिसले नाहीत. त्याचवेळी वरच्या बाजूनेही पोलिसांची वाहने बोगद्याच्या दोन्ही टोकांकडे सुसाट वेगाने जात होती. थोड्याच वेळात वाहनं प्रवेशद्वारापाशी पोहोचली पण दरोडेखोर त्यांना आढळले नाहीत. काही पोलीस तिथे खाली उतरून उलटे चालत निघाले तेव्हा त्यांना दुसऱ्या बाजूने येणारे पोलीस भेटले. त्यांना पाहून दरोडेखोरांनी आपल्याला चकवल्याची त्यांची खात्री झाली. ड्रेनेजचं दुसरं टोक नदीपाशी होतं. तिथेही आतून आणि वरून  पोलीस पोहोचले. पण तिथे चिटपाखरूही नव्हतं.

लोकांची भावना


बँकेतून बाहेर येणारे ओलीस

इकडे एकेक ओलीस बँकेतून बाहेर येऊ लागले. प्रत्येकाची कसून तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येत होतं. ओलिसांनी मीडियाला सांगितलं, की दरोडेखोर त्यांच्याशी सौजन्याने वागत होते. त्यांनी कुणाला दुखापत केली नाही किंवा कुठलाही विध्वंस केला नाही. ते कुठे गायब झाले हे मात्र त्यांना समजलं नव्हतं. कारण जाण्यापूर्वी वॉल्टरने त्यांना डोळे मिटून जमिनीला तोंड लावून झोपायला सांगितलं होतं. पोलीस आत शिरेपर्यंत ते तशाच अवस्थेत पडून राहिले होते. टीव्हीवर लाखो लोकांनी हे वर्णन ऐकलं आणि त्यांच्या मनात दरोडेखोरांविषयी कौतुकाचीच भावना निर्माण झाली. त्यांना ते ‘रॉबिन हुड’प्रमाणे वाटू लागले. वॉल्टर तर त्यांचा आवडताच झाला होता. तसंही अर्जेंटीनातल्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट बँकांविषयी लोकांचं मत चांगलं नव्हतंच. त्यामुळे बँकेची जिरली याचा उलट त्यांना आनंदच झाला. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये आकडे आले त्यावरून लोकांना समजलं, की दरोडेखोरांनी एकूण २३ लोकांना ओलीस धरलं होतं आणि १४७ व्हॉल्ट्स फोडून त्यांनी अंदाजे २० मिलियन (२ कोटी) डॉलर एवढा ऐवज लंपास केला होता. त्यात कॅश आणि सोनं, चांदी, जवाहीर याचा प्रामुख्याने समावेश होता. पुढे कित्येक दिवस लोटले, पण पोलिसांना दरोडेखोर सापडू शकले नाहीत. ते गेले ते गेलेच !            

दरोड्याचा मास्टर माईंड
यशस्वी, कलात्मक आणि परिपूर्ण दरोडा घातल्यानंतर ५ आठवडे लोटले आणि एका किरकोळ चुकीमुळे पोलिसांना दरोडेखोरांचा सुगावा लागला. त्याविषयी सांगण्यापूर्वी दरोड्याचा बेत कुणी आणि कसा आखला हे थोडक्यात सांगतो.

फर्नांडो अराउजो (Fernando Araujo) हा एक मनस्वी कलावंत होता. शिवाय फावल्या वेळेत तो स्थानिक मुलांना मार्शल-आर्ट शिकवत असे. १९९९ साली वर उल्लेखिलेल्या रामेल्लो (Romello) शहरातील बँक दरोड्याच्या बातम्या वाचून तो वैतागला होता. “हे दरोडेखोर किती बिनडोक आहेत !’ त्याच्या मनात विचार घोळत होते, ‘कुठलाही विध्वंस न करता आणि कुणालाही दुखापत न करता कलात्मक दरोडा घालणं अगदी सहज शक्य असताना हे असा मूर्खपणा का करतात?’
पण हा विचार त्यावेळी तिथेच थांबला. पुढे २००३ साली अराउजोचा त्याच्या प्रेयसीशी ब्रेक-अप झाल्यावर काही काळ तो ‘मारिजुआना’ या ड्रगच्या आहारी गेला होता. त्यावेळी पुन्हा त्याच्या मनात कलात्मक दरोड्याचा विचार घोळू लागला आणि त्या दिशेने तयारी करायला त्याने सुरुवात केली. ‘निन्जा टर्टल’ या व्हिडीओ मालिकेमधूनही त्याला प्रेरणा मिळाली होती.  

दरोड्याची पूर्वतयारी  



एकदा विचार ठरल्यावर अराउजोने शहरातल्या रिओ बँकेवर दरोडा घालण्याचा बेत नक्की केला आणि बँकेपासून अगदी जवळच त्याने एक घर भाड्याने घेतलं. त्यानंतर जेव्हा त्याने बँकेच्या इमारतीचं निरीक्षण केलं तेव्हा बँकेच्या अगदी जवळूनच पण रस्त्याखालून सांडपाणी वाहून नेणारा नगरपालिकेचा प्रशस्त बोगदा नदीच्या दिशेने जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ‘आपण आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहोत’ असं सांगून महापालिकेच्या संबंधित खात्याकडून बोगद्याची यंत्रणा कशी चालते हे त्याने समजून घेतलं. एव्हाना रिओ बँकेच्या दुसऱ्या शहरातील एका शाखेत खातं उघडून एक सेफ डिपॉझिट व्हॉल्टही त्याने मिळवला होता. बँकेतले कॅमेरे चुकवून या सगळ्याचे फोटो काढून त्याने कच्ची योजना तयार केली. त्यानंतर त्याने काही माणसं विश्वासात घेतली, ती अशी,  

१. सॅबेस्टियन बोल्स्टर – अराउजोचा वर्गमित्र, पेशाने इंजिनियर, कुटुंबवत्सल, कायद्याचं पालन करणारा.
२. ‘डॉक’ (टोपणनांव)  – एक जुना, निवृत्त बँक दरोडेखोर.
३. अल्बर्टो डी ला तोरे ‘बेटो’ –  ‘डॉक’ चा सहकारी.
४. लुई मारिओ सेलेनेस – शैलीदार निवृत्त चोर आणि पैसा पुरवठादार. ‘स्पायडर मॅन’ नांवाने प्रसिद्ध.
५. लुई उर्फ ‘द किड’ – एक तरुण गुंड.  
६. ज्युलियन झालोशेवेरा – कुशल ड्रायव्हर आणि मदतनीस.          

दरोड्यामागचा प्रतिभाशाली मेंदू : फर्नांडो अराउजो

वरीलपैकी केवळ ‘डॉक’शीच अराउजोची साधारण ओळख होती. बोल्स्टर वगळता बाकीची सर्व मंडळी ‘डॉक’ने आणली. या सर्वांना अराउजोने समजावून सांगितलं, की “आपल्याला कोणताही विध्वंस न करता, हत्या न करता एक कलात्मक दरोडा घालायचा आहे. एरवी दरोडेखोर मध्यरात्री बँकेचं दार वगैरे फोडून (Break-in) आत जातात, आपण दिवसाढवळ्या आत जायचं आहे. पोलिसांच्या साक्षीने दरोडा घालायचा आहे आणि आतून बाहेर (Break-Out) निसटायचं आहे. जो ऐवज मिळेल तो सर्वांनी सारखा वाटून घेऊ. तुम्ही सूचना करू शकता, मात्र अंतिम निर्णय माझा असेल आणि सर्वांनी तो मान्य केला पाहिजे.”
प्रत्येकाने ही गोष्ट कबूल केली.      

परिपूर्ण योजना

भूमितीविशारद सॅबेस्टियन बोल्स्टर

सर्वात आधी अराउजोने बोल्स्टरला विश्वासात घेतलं आणि बोगद्यामध्ये नेऊन आणलं. बँकेच्या अगदी समोरच रस्त्यावर ड्रेनेजचं एक बंदिस्त मॅनहोल होतं तेही त्याला दाखवलं. मग त्याने विचारलं,
“आपण इथपर्यंत खालच्या बोगद्यातून येऊ आणि साधारण इथून एक तिरपं भुयार वर खणू. त्या भुयाराचं वरचं टोक थेट व्हॉल्ट्सच्या खोलीत उघडेल. हे शक्य आहे का?”
उत्तर देण्याआधी बोल्स्टरने अनेकदा बोगद्यात जाऊन निरीक्षण केलं. मग तो म्हणाला,        
“मॅनहोलपासून बँकेच्या त्या खोलीपर्यंतचं अंतर आणि इथून खाली बोगद्याच्या तळापर्यंतचं अंतर या दोन बाजूंची मापं जर मला मिळाली तर त्या मापांचा ‘त्रिकोण’ काढता येईल आणि त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूचं माप मी सहज काढू शकेन.”

या संभाषणानंतर एकदा उशिरा रात्री बँकेपाशी जाऊन अराउजोने एक टेप त्या मॅनहोलच्या भोकातून खाली सोडली. खाली बोल्स्टर उभा होता त्याने मापं घेऊन नोंदी करून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या एका दिवशी अराउजोने  आपल्या बाईकच्या चाकाचा परीघ नीट मोजून टायरवर खूण करून ठेवली आणि बाईक त्या भोकापासून बँकेच्या भिंतीपर्यंत हातात धरून नेली. तिथे पोहोचेपर्यंत टायरवरील खूण किती वेळा फिरली याची आकडेमोड करून तो आकडा त्याने बोल्स्टरला दिला. बँकेच्या भिंतीपासून व्हॉल्ट्सच्या खोलीपर्यंतची मापे त्यांच्याकडे होतीच. त्यामुळे त्या सर्व मापांचा वापर करून भूमितीनिपुण  बोल्स्टरने १५ मीटर लांबीचं भुयार खणावं लागेल असा निष्कर्ष काढला. हा निष्कर्ष किती अचूक ठरला हे पुढे सिद्ध झालंच. भुयार खणण्याचं कामही मुख्यतः बोल्स्टर आणि अराउजो यांनी उरकलं. फक्त सेफची भिंत फोडायची तेवढी त्यांनी बाकी ठेवली.

दरोड्यासाठी अराउजोने स्वतःची गाडी वगैरे विकून थोडे पैसे उभे केले होते. लुई सेलेनेसने त्याला एक लाख डॉलर उसने दिल्यावर बरेच प्रश्न सुटले. अराउजोने प्रथम बँकेतल्या व्हॉल्ट्सच्या ब्रॅन्डचे काही व्हॉल्ट्स खरेदी केले आणि त्यावर त्याचे आणि बोल्स्टरचे प्रयोग सुरु झाले. अखेर केवळ सात सेकंदामध्ये प्रत्येक व्हॉल्टचं कुलूप उचकटण्यात बोल्स्टर यशस्वी झाला तेव्हा अराउजोने त्याला मिठीच मारली ! या पूर्वतयारीमुळेच प्रत्यक्ष दरोड्याच्या दिवशी काही अडचणी येऊनसुद्धा बोल्स्टर १४७ व्हॉल्ट्स उचकटण्यात यशस्वी झाला होता. याचबरोबर अराउजोने एक जुनी व्हॅन खरेदी करून त्याचा तळ कधीही काढता व बसवता येईल अशी व्यवस्था करून घेतली होती. दरोडा घातल्यावर ऐवज लुटलेल्या पिशव्या बोगद्यातल्या पाण्यातून वाहून नेण्यासाठी एक हलक्या वजनाची झोडियॅक बोटही बोल्स्टरच्या वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे घडीची एक शिडी-कम-जिनाही तयार करण्यात आला.  

दरोड्याच्या दिवशी
हवामान खात्याची मदत घेऊन पाऊस नसलेला दिवस दरोड्यासाठी नक्की करण्यात आला. नियोजित दिवशी सकाळी सर्वांनी आपली घड्याळे नीट लावून घेतली होती. निघाल्यानंतर दोन मोटारी चोरून त्या मोटारींनींच (बोल्स्टर आणि ज्युलियन वगळता) सर्वजण बँकेत गेले. आपली चेहरेपट्टी आणि वेशभूषा बदलण्याची त्यांनी काळजी घेतली होती. बँकेच्या पार्किंगमध्ये त्यांनी गाड्या उभ्या केल्या आणि मग ते बँकेत शिरले. बरोबरच्या बॅगांमधून त्यांनी खेळण्यातली शस्त्रं, ऐवज भरण्यासाठी पॉलिथिनच्या रिकाम्या पिशव्या, मास्क, बॅटरी पॅक आणि जॅकहॅमर, क्लोरीन, केसांचे जुडगे अशा आवश्यक त्या सर्व गोष्टी घेतल्या होत्या. बोल्स्टर आधीच बोगद्यात गेला होता. त्याने झोडियॅक बोट लपवून ठेवली आणि भुयारात चढून तो बँकेच्या भिंतीपाशी येऊन उभा राहिला होता. ज्याक्षणी ‘डॉक’ आणि अराउजोने सेफच्या दालनात प्रवेश करून इशारा केला, त्याक्षणी बोल्स्टरने भिंत फोडली आणि तो आत आला. त्याविषयी बोल्स्टर म्हणतो, “किल्लीच्या भोकात गिरमिटाचं टोक घुसवून व्हॉल्टचं लॉक फोडायचं आणि पुढल्या व्हॉल्टकडे वळायचं एवढंच काम मी पुढला दीडएक तास करत राहिलो होतो. बाकीचे दोघे काय करताहेत इकडे माझं लक्ष नव्हतं.”

खालच्या मजल्यावर सेलेनेस, बेटो आणि द किड हे ओलीसांवर शस्त्रं रोखून उभे होते. त्यापैकी सेलेनेस म्हणजे ‘करडा सूटवाला’ म्हणून प्रसिद्ध झालेला ‘वॉल्टर’. आजीबाईंना बाहेर सोडताना त्याने मुद्दामच आपला चेहरा सर्वांना दाखवला होता. अर्थातच त्याचा चष्मा आणि मिशी खोटी होती हे सांगायला नकोच. पोलिसांचा बोलणी-अधिकारी सीएलो याच्याशी तोच वाटाघाटी करत होता. त्याचा उद्देश अराउजोने निघण्याचा इशारा करेपर्यंत वेळ काढत बसणं एवढाच होता. ‘ब्युनोस आयर्समधला वकील’ म्हणून सिएलोला त्याने आपल्याजवळचा एक बोगस नंबर दिला होता आणि सिएलोचा फोन आल्यावर वकील म्हणून तो स्वतःच आवाज बदलून बोलला होता. थोडक्यात, वाटाघाटी हा केवळ देखावा होता.

मॅनहोलमधून थेट व्हॅनमध्ये  

मॅनहोलमधून दरोडेखोर थेट व्हॅनमध्ये शिरले

अराउजोने इशारा केल्यावर पोलीसांना पिझ्झाची विनंती करून आणि ओलिसांना तोंड जमिनीवर टेकवायला सांगून सर्व निघाले. काढलेला ऐवज त्यापूर्वीच पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून भिंतीच्या पलीकडे भुयारात सोडण्यात आला होता. पिशव्या घसरगुंडीतून सरळ झोडियॅक बोटीत येऊन पडत होत्या आणि दोन जण त्या रचून ठेवत होते. सर्वजण भिंतीपलीकडे आल्यानंतर भोकातून हात घालून पोलादी कपाट सरकवण्यात आलं. भोक आता बाहेरून दिसणार नव्हतं. सगळे भराभर खाली आले आणि बोटीतून वेगाने काही अंतरावर गेले. तिथे वरच्या बाजूस दोन पुरुष उंचीवर ड्रेनेजच्या मॅनहोलचं झाकण उघडून त्यातून घडीचा जिना खाली सोडला गेला होता. हे मॅनहोल बँकेपासून दहा ब्लॉक (साधारण दोन ते अडीच हजार फूट) अंतरावर  थोडं आडबाजूला होतं. अराउजोची व्हॅन हे मॅनहोल मधोमध घेऊन उभी केलेली होती. टायर पंक्चर झाल्याचा देखावा करून ज्युलियन तिथे वाट बघत बसून राहिला होता. व्हॅनचा तळ बाजूला करून आणि मॅनहोलचं झाकण काढून घडीचा जिना त्यानेच खाली सोडला होता. (याचा पूर्वीच त्याच्याकडून सराव करून घेण्यात आला होता.) त्या जिन्याने पिशव्या वरच्या भोकातून थेट व्हॅनमध्ये पोचवण्यात आल्या. मागोमाग माणसंही पोहोचली. त्यापूर्वी झोडियॅक पाण्यात लोटून देण्यात आली होती. ती नदीच्या दिशेने वहात गेली. जिना वर ओढून घेऊन झाकण पुन्हा लावण्यात आलं, व्हॅनचा तळ बसवण्यात आला आणि गाडी निघाली. पाचच मिनिटांत ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. जेव्हा पोलीस बँकेत घुसले, तेव्हा अराउजो आणि त्याचे साथीदार भोजन करत टीव्हीवर बँकेचा देखावा बघत हसत-खिदळत बसले होते. ती रात्र त्यांनी तिथेच काढली. मिळालेल्या ऐवजाचं सर्वांना समान वाटप करण्यात आलं. त्यानंतरच्या एकदोन दिवसात आपापला ऐवज घेऊन प्रत्येकजण तिथून निघून गेला. व्हॅनचीही विल्हेवाट लावण्यात आली.

दरोड्याचा उलगडा

पोलिसांना खबर देणारी अलिशिया

अराउजोने प्रत्येकाला जपून राहण्याविषयी बजावलं होतं. पण अखेर डी ला तोरे ‘बेटो’ याची चूक झालीच. त्याने एक आलिशान गाडी विकत घेऊन मैत्रिणींना फिरवायला आणि त्यांच्याशी लफडी करायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या त्याच्या बायकोने- अलिशियाने- सरळ पोलीस चौकीत जाऊन दरोड्याची खबर दिली. पोलिसांनी झटपट हालचाली करून पाच जणांना ताब्यात घेतलं. मात्र ‘डॉक’ आणि लुई उर्फ ‘द किड’ हे दोघे शेवटपर्यंत मिळाले नाहीत. यापैकी अराउजो आणि ज्युलियन यांचा हा पहिलाच गुन्हा होता. खटला चालवण्यात आला आणि सर्वांना १० वर्षांपासून १५ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या. मात्र प्रत्येकाने जेमतेम वर्ष-दीड वर्ष कैद भोगली आणि मग त्यांची सुटका करण्यात आली. ऐवजातला फारच थोडा भाग वसूल करण्यात पोलीस यशस्वी झाले. बाकीचा ऐवज दरोडेखोरांनी कुठे जिरवला याचा आजपर्यंत पत्ता लागलेला नाही. विचारलं तर ‘बेटो’ म्हणतो, “पोलिसांनी पकडलं तेव्हा मला एवढा मानसिक धक्का बसला, की पैसे कुठे ठेवले तेच आठवत नाहीत!” हाच प्रश्न विचारल्यावर अराउजो एखाद्या काल्पनिक बेटाचं आणि त्यावरील काल्पनिक बँकेचं नांव सांगतो. “तिथल्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्समध्ये माझा ऐवज आहे !” असं म्हणून डोळे मिचकावत तो हसतो.

डी ला तोरे ‘बेटो’ हल्ली असा दिसतो

सर्वांनाच फायदेशीर ठरलेला गुन्हा

घराघरात लोकप्रिय झालेला ‘वॉल्टर’ उर्फ सेलेनेस

शतकातील या सर्वात कलात्मक दरोड्यामधील प्रत्येकजण आज एक ख्यातनाम व्यक्ती बनला आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सेलेनेस याचे ट्विटरवर ३०,००० फॉलोअर आहेत.

स्वतः फर्नांडो अराउजोने दोन पुस्तकं लिहिली असून त्यावर चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्सही बनल्या आहेत. नेटफ्लिक्सच्या ‘रिअल क्राईम’ मालिकेत या दरोड्यावर चित्रपट निघाला असून त्यात अराउजो, सेलेनेस प्रभृतींनी कामं केली आहेत. या सर्व फिल्म्सचा सल्लागार म्हणूनही अराउजोने काम केलं आहे. शिकाऊ पोलिसांना अशा गुन्ह्यांमधील खाचाखोचा कळाव्यात म्हणून पोलीस खात्यातर्फे अराउजोची व्याख्यानेही ठेवली जात असतात.



स्वतः अराउजोच्या म्हणण्याप्रमाणे ‘दरोड्याच्या या गुन्ह्यातून सर्व संबंधितांना फायदाच झाला आहे. ज्यांचा ऐवज चोरीला गेला त्यांना त्याहीपेक्षा जास्त भरपाई मिळाली. इन्शुरन्समुळे बँकेला तोटा झाला नाही. उलट रिओ बँक आणि इन्शुरन्स कंपनी यांचा धंदा दरोड्याच्या प्रसिद्धीमुळे बराच वाढला. संबंधित पोलिसांची प्रमोशन झाली. बोलणी-अधिकारी सीएलो तर डिटेक्टिव्ह बनला. सर्व न्यायमूर्तींनाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. एखाद्या कलात्मक सादरीकरणाने आनंद मिळतो तसा या दरोड्यामुळे सर्वांनाच आनंद मिळाला आहे. यापेक्षा आणखी काय हवं ?’
एकूण प्रकरणाकडे नजर टाकल्यास प्रतिभाशाली अराउजो काहीही चुकीचं बोलला नसल्याची आपली खात्री होते.
निदान माझी तरी झाली.    

सध्याच्या घराच्या पडवीत ध्यानस्थ बसलेला अराउजो

हर्षद सरपोतदार      

संदर्भ स्रोत व फोटो साभार :
1. ‘The Heist of the Century’ (Argentine Movie, 2020).
2. Article by Alex Mitchell, New York Post, 10-08-2022.
3. Article by Josh Dean, www.gq.com, 20-02-2020.
4. Netflix Documentary : ‘Bank Robbers – The Last Great Heist’, 2022.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – White Buttercup 

अनघा फर्नांडिस 

प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर,

priyakar40@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(56) 

Think like a farmer

Don’t shout at crops.

Don’t blame crops for not growing fast enough.

Don’t uproot crops before they have had a chance to grow. 

Choose best plants for the soil.

Irrigate, fertilise, remove weeds.

You can’t control seasons, you can only prepare for them.

Sorce : Internet 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ६४ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता 

१२ व्या अध्यायाचा भावानुवाद

श्लोक ६ आणि ७*–

*ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ १२-६ ॥*
*तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्‌ ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम्‌ ॥ १२-७ ॥*

*अर्थ* —

परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच
अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ॥ १२-६ ॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप
संसारसागरातून उद्धार करणारा होतो. ॥ १२-७ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —

अर्पिती जे भक्त l त्यांची नित्य कर्मे l
मजसी जे प्रेमे l भक्तिभावे ll
करुनी चिंतन l सगुण रूपात l
मला भजतात  l निरंतर ll
जाण तू हे पार्था l ज्यांनी गुंतविले l
चित्त ते आपुले l मज प्रती ll
जन्म मृत्यू फेरे l त्यांचे चुकविले l
त्यांना पार नेले l पैलतीरी ll

*श्लोक ८* –

*मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ १२-८ ॥*

*अर्थ* –

माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥ १२-८ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —

ठेव रे तू पार्था l तुझे रे ते मन l
कर तू  स्थापन l मजपाशी ll
बुद्धी तू माझ्यात । ठेव रे खुशाल ।
माझा राहशील । निश्चित तू ।।

*श्लोक ९* —

*अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्‌ ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ १२-९ ॥*

*अर्थ* —

जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया (अर्थात अर्जुना), अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ॥ १२-९ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —

जर तुज वाटे l तुला न जमते l
ठेवण्या मन ते l माझ्याठायी ll
तर मग ठेव l मम प्राप्ती ध्येय l
अरे धनंजय l योगाभ्यासे ll

*श्लोक १०* —

*अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १२-१० ॥*

*अर्थ* —

जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. ॥ १२-१० ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
जर तुज नसे l शक्य हा अभ्यास l
घे तू माझा ध्यास l कर्मासाठी ll
कर्म परायण l व्हावी तव बुद्धी l
मिळे तव सिद्धी l सहजच ll

– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

आपला दिवस आनंदात जावो

तुझेच तुझ्याशी आतल्या आत
किती चाललय युद्ध
बघ!!शांतपणे माझ्याकडे पहात
मंद हासत म्हणाला बुद्ध

केवढा तो चिखल केलास
बघ रुतत चाललीस आत
हात दाखवून अवलक्षण
करुन का घेतेस आपला घात

भोगतेस मग एकटीच
देतेय का कुणी साथ
गुंतत नाही कुणी कुणात
प्रत्येकाची वेगळी वाट

ठेव नित्य स्मित ओठी बघ
जमताय का माझ्यासारखं
कशासाठी दुःख मिरवायच
चारचौघात वेड्यासारखं

ढवळून टाक मन गढूळलेले
होऊ देत निचरा त्याचा
येऊ देत वर  निवळशंख
एक निळा आलाप अंतरीचा

केवढे वाहतेस ओझे भार कर
हलका झाळून मन शुद्ध
त्यागलीस वल्कले क्रोधाची की
गवसेल तुला तुझ्यातला बुद्ध

नको करुस काळजी
अधिक उणे होत राहणार
स्विकारवे जसेच्या तसे
क्षण क्षण सुखी होणार

एक पणती लाव स्नेहाची
ज्योतीने ज्योत पेटू देत
तुझ्या कृतीतून जगाला
पुनःश्च एकदा बुद्ध भेटू देत

 

– ©️ प्रज्ञा करंदीकर

pradnyakarandikar85@gmail.com

@@@@@

वांग्याचे भरीत 

[ रेसिपी ] 

– ©️ प्रज्ञा करंदीकर

pradnyakarandikar85@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

असाही एक सूर्योदय

आज सकाळी सूर्य बहुधा पश्चिमेला उगवला असावा,
नाही तर तो वेड्यासारखा समुद्राच्या किनारी घुटमळतांना का दिसतो आहे ? आणि लेकाचा समुद्रात बुडण्याऐवजी वर वर सरकताना का दिसतोय ?

 गिरगाव चौपाटीवरून फिरताना माझ्या मनात आलेला प्रश्न इतर कुणाच्याही मनात आला नसेल असं नाही.  पण का कोण जाणे कोणी  बोलत नाही. सारे निमूट चालताहेत.

रस्त्यात एक पारशी बाई  कुत्रा घेऊन चालली होती. कुत्रा मध्येच थांबला. बाई देखील  थांबली. कृत्याने विष्ठा विसर्जन केलं. आणि पुढे चालू लागला. तसं दोरी खेचून त्या पारशी बाईने त्याला थांबवलं. बाईने आपल्या पर्समधून दोन पुठ्ठे काढले. कुत्र्याची विष्ठा गोळा करून तिने व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा केली आणि कुत्र्याला हिसका देऊन ती पुढे निघाली.
मी थक्क !
किती विलक्षण दृश्य.
 या शहरात असा प्रकार मी कधीच पाहिला नव्हता..
 मूढासारखा मी काही काळ जागीच उभा राहिलो.

 आसपास पाहिलं, लोक काहीच घडलं नाही, अशा थाटात शांतपणे चालत होते. विशेष म्हणजे सारेच्या  सारे फुटपाथवरून चालत होते. एकही जण फुटपाथ सोडून रस्त्याच्या कडेने चालत नव्हता.
मुंबईसारख्या शहरात ही  शिस्त आली कधी आणि  कुठून काही अंतर गेल्यावर रस्त्यात एकदम  जोरदार आवाज झाला. वळून पाहिलं.  एका मोटारीने दुसऱ्या मोटारीला धडक दिली होती.

पुढच्या मोटारीची मागची बाजू भाग या धडकेने चेपली होती. दोन्ही ड्रायव्हर गाडीचे दार उघडून खाली उतरले. आता दोघात बाचाबाची होणार असं वाटलं. पण मागच्या गाडीचा ड्रायव्हर जपानी लोक झुकतात तसा दुसऱ्या ड्रायव्हरच्या समोर  झुकला; सॉरी म्हणाला. पुढच्या गाडीचा ड्रायव्हरने “नेव्हर माईंड” बोलत त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
“मी चालू ट्रॅफिक मध्ये.अचानक ब्रेक लावायला नको होता,” तो मागच्या माणसाच्या पाठीवर थोपटत म्हणाला.” “माझच चुकलं. मला अचानक ब्रेक लावण जमलं नाही. ” सॉरी सॉरी म्हणत दोघे एकमेकांची क्षमा मागत होते. अपराध मीच केला म्हणत होते.

मी हे अभिनव दृश्य पाहत असता एक तरुणी समोरून गेली.  मध्येच तिला रस्त्यात एक कागदाचा बोळा पडलेला दिसला. ती वाकली,  तिने तो बोळा उचलला आणि दोन तीन मीटर पुढे असलेल्या कचऱ्याच्या पेटीत शांतपणे टाकला. तिच्या मागून आलेल्या दुसऱ्या इसमाने त्या डब्यात तंबाखूची पिचकारी टाकली. आणखी एकानं चॉकलेटचं आवरण टाकलं.

मनात आलं, नागरिकशास्त्राचे आणखी किती नमुने आज मला पाहायला मिळणार आहेत कोण जाणे.
.
मला पलीकडच्या फुटपाथला जायचं होतं. 
गाड्यांचा प्रवाह थांबला की रस्ता क्रॉस करावा असं वाटलं. सिग्नल तीन चार मीटरवर होता. तो पाहून माझ्याच बेशिस्त मनाची लाज वाटली. मुंबई सुधारते आहे आपणही सुधारूया म्हटलं आणि चालत सिग्नलपर्यंत गेलो.
पादचाऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता पण गाड्यांचा ओघ पूर्ण बंद झाला होता. रस्ता रिकामा होता. करूया का क्रॉस.
माझ्याबरोबर सहा सात जण रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे होते; त्या शिस्तप्रिय लोकांचे निश्चल चेहरे पाहून मी बेकायदा क्रॉस करण्याचा मोह आवरला. ग्रीन सिग्नल आल्यावर त्यांच्या सोबत रस्ता क्रॉस केला.

आज मेट्रोनं प्रवास करावा असं वाटलं. तिथलं वातावरण एकदम सोफिस्टिकेटेड.  मी डब्यात चढलो. डबा तसा रिकामा होता, पण सीट सगळ्या भरलेल्या होत्या. सीटपाशी उभा असताना  जवळच बसलेली महिला उठली. मला बसायला जागा झाली. वाटलं त्या बाईचं स्टेशन आलं असणार. पण नाही ती तशीच उभी राहिली.
स्त्री दाक्षिण्यासारखे हे पुरुष दाक्षिण्य !

काय झालंय समाजाला. एका दिवसात एवढा बदल ? मला ऑड वाटलं. मी उठलो. दुसऱ्या डब्यात जागा शोधू .. तिथं जागा नाहीच मिळाली पण एक गंमत पाहायला मिळाली.  बहुतेक प्रवाशांकडे खिशात मोबाईल होता. पण एकही प्रवासी मान खाली घालून मोबाईल पाहत नव्हता. काही पेपर वाचत होते, काहींच्या हातात पुस्तक होतं.
मोबाईल हातात न घेतलेला समाज मेट्रो प्रवासामुळे पाहायला मिळाला. धन्य वाटलं.
मुंबईकर सुसंस्कृत झाले की अख्खा देश सुसंस्कृत झाला आहे. कळेना.
भल्या सकाळी अरबी समुद्रातून उगवलेला सूर्य डोळ्यासमोर आला. एकूण उलथापालथ चालू आहे सगळीकडे.

 मला शाळेतले दिवस आठवले.
शाळेत जायला मला नेहमी उशीर व्हायचा. एक दिवस मी चक्क वेळेवर वर्गात हजर राहिलो.
मला वर्गात बघून रेगे सर म्हणाले, “आज अगदी टायमावर हजर. सूर्य पश्चिमेला उगवला की काय ?”
आगाऊपणे उत्तर द्यावं असं वाटलं. ” सर, बाहेर येऊन पहा एकदा. बसेस आणि गाड्या वेळेवर येतात का.” पण तेव्हा शिक्षकांना उलट उत्तर द्यायची पद्धत नव्हती. आज तर चित्र हातातच उलटं पालटं  होऊन गेलं आहे.

काय म्हणावं याला ? ही क्रांती की उत्क्रांती ?  हे शहर आणि शहरातली माणसं एका दिवसात कशी बदलली आणि  एका दिवसात बदलली म्हणजे क्रांतीच. पण क्रांती देखील इतक्या वेगाने,  एका दिवसात नाही बदलत. ती बऱ्यापैकी  मोठी प्रक्रिया असते म्हणे.

घरी परतेपर्यंत संध्याकाळ झाली.
काय काय पाहायला मिळालं रस्त्यात.
 विचारू नका. दर्शन एका आदर्श समाजाचं.
मी सोडून कोणीही या अदभुत प्रकाराची दखल  घेतली नाही हे मात्र आश्चर्य.

पूर्वेला मावळतीचे लालसर रंग दिसायला लागले होते. आणि सूर्यबिंबही तांबूस दिसायला लागलं होतं. संध्याकाळसारखी संध्याकाळ. फक्त दिशा बदलली.
कोणी बदलली ?
रस्त्यातून दिवे लावलेली वाहनं  चालली होती. पण नेहमीसारखी आवाज करत नाही तर शांतपणे आणि लाईनची शिस्त पाळत.
पलीकडून कोणती तरी धार्मिक मिरवणूक येताना दिसली .. मिरवणुका आवाजी असतात.  पण या मिरवणुकीचा आवाज येत नव्हता. जवळ आल्यावर सौम्यसा आवाज येऊ लागला. बासरीचा कोवळा आवाज. दोन बासरीवादक. भक्तीगीत वाजवत होते.

सगळं गोड गोड होतं. प्रश्नच नाही.
 पण या उलथापालथीने  माझं डोकं आऊट झालं .
आधी लाऊड स्पीकरच्या कर्कश आवाजाने आता या शांततेच्या आवाजाने. पुरता चक्रावून गेलो.
 ‘ साउंड ऑफ सायलेन्स ‘ हे गाणं आठवलं. ग्लानीच आली. ग्लानीतच हताश शब्द मनात उमटले.

****************

कधी पसरेल या शहरात हा शांततेचा ध्वनी .
स्वप्नंच बघायची का आपण हयातभर? आधुनिक शास्त्र, आधुनिक तंत्र शिकायची ती काय फक्त आपल्यापुरती, साधन संपत्ती मिळवण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी ?

कधी स्वच्छ होणार आपली गावं आणि शहरं. कधी थांबणार स्त्रियांची आणि प्रामाणिक कष्टकऱ्यांची पिळवणूक आणि देशातील भ्रष्ट वारे आणि वादळे..

काल परवा महिला क्रिकेट संघानं विश्वचषक मिळवून नव्या सूर्योदयाची किरणे पसरवली.
असा सूर्योदय पूर्वेला होऊ द्या किंवा पश्चिमेला, आपल्या सर्वांना तो हवा हवासा आहे. सूर्योदयाच्या दिशांपेक्षा  आशा महत्त्वाची.
आशेची ही किरणंच आजचा अंधकार दूर करतील आणि उद्या उजाडेल. घराघरात आयुष्याच्या मशाली पेटतील.

– ©️  अवधूत परळकर.

awdhooot@rediffmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चक्रीवादळ : २

भूगोलाचा इतिहास : ३९

कुणास वाटे रूप देखणे
भय प्रलयाचे कोणा वाटे
निसर्ग वादळ दृश्य अलौकिक
मनास माझ्या अद्भुत वाटे

डॉ. राम राऊत यांच्या ‘तांडव’ या कवितेतील या ओळी आहेत. तसे फोटोत सुंदर दिसले तरी चक्रीवादळ प्रत्यक्षात धडकी भरवणारेच असते. त्याचे हे नावही किती समर्पक  आहे ? अमेरिकेत त्याला ‘हरिकेन’ म्हणतात.
कोलंबससोबत गेलेल्या स्पॅनिशांनी हे नाव युरोपात आणले. ‘हराकेन’ ही माया संस्कृतीतील तर ‘हुराकेन’ ही कॅरिबियन परिसरातील अनिष्टांची देवता. त्यावरून ‘हरिकेन’ हा शब्द आला. पूर्व पॅसिफिक महासागरात अशा वादळांना ‘टायफून’ म्हणतात. हे नाव चीनमध्ये बाराव्या शतकापासून वापरले जाते. त्याचा मूळ अर्थ – ‘टिकणारे वारे’. मात्र भारतीय उपखंडात सर्वत्र त्याचा उल्लेख चक्रीवादळ म्हणजे सायक्लोन असा केला जातो.

आजकाल प्रत्येक चक्रीवादळाला त्याचे असे वेगळे नाव दिलेले असते. पृथ्वीवरील एकाच भूप्रदेशात, उदा. बंगालच्या उपसागरात, एकाच वेळी एकापेक्षा अधिक चक्रीवादळे अस्तित्वात असू शकतात. यामुळे गोंधळ टाळण्यासाठी त्यांना नावे दिली जातात.  ही नावे जागतिक हवामानशास्त्र संघटना (world Meteorological Organization) किंवा त्या त्या देशातील हवामानविषयक कार्यालयातील समित्यांतर्फे दिली जातात. जागतिक हवामान संघटनेने उष्ण व उपोष्ण कटिबंधीय वादळे, त्यांचे प्रकार व स्थान यानुसार जगाचे भाग – क्षेत्रे – पाडले असून त्या त्या भागातील देशांना हे नाव देण्याची संधी दिली जाते. भारत त्यापैकी उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात समाविष्ट आहे. या क्षेत्रात भारतासोबत श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, इराण, मालदीव, कतार, सं. अरब अमिरात इ. चा समावेश होतो.

चक्रीवादळांची नावे अनेकदा विचित्र वा गंमतीदार वाटतात. कारण ती वेगवेगळ्या भाषेतील असतात. सामान्यतः चक्रीवादळाची नावे, ते नाव सुचवणारा देश, त्यांची भाषा व संस्कृती यांना प्रतिबिंबित करणारी असतात. उदा. बांगला देशाने सुचवलेली नावे, निसर्ग, बीपर जॉय (म्हणजे आपत्ती), अर्णब अशी बंगाली भाषेतील आहेत. भारताने दिलेली नावे गती, तेज, इ. आहेत, तर २०२४ मध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या वादळाचे रेमाल (वाळू ) हे अरेबिक नाव ओमानने दिलेले होते. चक्रीवादळांच्या नावांच्या याद्या काही वर्षे आधीच जाहीर केलेल्या असतात. एकदा चक्रीवादळ निर्माण झाले की ते अस्तित्वात असेपर्यंत त्याचे नाव बहुधा कायम राहते. एखादे वादळ फार विध्वंसक ठरल्यास ते नाव वादळांच्या नामयादीतून निवृत्त केले जाते, म्हणजे ते पुढे वापरले जात नाही.

पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्यामुळे उत्तर व दक्षिण गोलार्धात चक्रीवादळांची स्वतःभोवती फिरण्याची दिशा भिन्न असते. उत्तर गोलार्धातील चक्रीवादळे प्रतिघड्याळी (Anticlockwise) दिशेने फिरतात. तर दक्षिण गोलार्धात ती घड्याळी ( Clockwise) दिशेने फिरतात.

चक्रीवादळे फक्त उष्ण व उपोष्ण कटिबंधात होतात.  स्थूल मानाने पृथ्वीवर कोणत्या क्षेत्रात व कोणत्या काळात ती वादळे निर्माण होतात, हे अचूक रित्या माहिती झाले आहे. उष्ण कटिबंधातील चक्रीवादळांचे वार्षिक सरासरी प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. वेस्ट इंडिज बेटे – ६, चिनी समुद्र – ३०, पॅसिफिक महासागर ( फिजी बेटे)  – २, हिंदी महासागर (मॉरिशस परिसर) – ६. तर भारतीय उपखंड परिसर – १२.

अरबी समुद्रात वर्षाला सरासरी २ दोन तर बंगालच्या उपसागरात वर्षाला सरासरी १० चक्रीवादळे निर्माण होतात. म्हणजे बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रापेक्षा अधिक चक्रीवादळे निर्माण होतात. बंगालच्या उपसागरातील वादळे निर्माण झाल्यानंतर वायव्येकडे प्रवास करीत भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे बंगाल, उडीसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांच्या किनाऱ्यांना वारंवार चक्रीवादळाला तोंड द्यावे लागते. अरबी समुद्रात चक्रीवादळाचे प्रमाण कमी असून ती केरळच्या नैऋत्येस तयार होऊन प्रथम उत्तरेकडे सरकतात. नंतर महाराष्ट्राच्या समोर आल्यावर काही काळ ती वायव्येकडे प्रवास करीत गुजरातच्या नैऋत्येस येतात. येथून ती दिशा बदलून ईशान्येकडे वळून गुजरातच्या किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे  गुजरातच्या वेरावळ, द्वारका या भागास वारंवार चक्रीवादळास तोंड द्यावे लागते. पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई व इतर बंदरांना चक्रीवादळाचा तडाखा कमी बसण्याचे कारण त्या वादळांचा असा विशिष्ट प्रवास मार्ग आहे. आणि त्याचे कारण थरचे वाळवंट हे आहे. भारतीय उपखंडातील सर्वात कमी वायूभार क्षेत्र राजस्थान – थरच्या वाळवंटात असते. त्यामुळे अरबी समुद्रातील बहुतेक वादळे राजस्थानकडे जाण्यासाठी  ईशान्य दिशेने गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचतात.

पण चक्रीवादळांचा स्थूल प्रवासमार्ग माहीत असला तरी ते कुठे व केव्हा निर्माण होईल व किनाऱ्यावर नेमके कुठे धडकेल याचा काहीही अंदाज बांधणे पूर्वी शक्य नसे. भारतात पूर्व किनाऱ्यावर १८६४ मध्ये दोन प्रचंड चक्रीवादळे आली. पहिले ऑक्टोबरमध्ये कलकत्त्याला व दुसरे नोव्हेंबरमध्ये मच्छलीपट्टणला धडकले. त्यांनी प्रचंड विध्वंस घडवून आणला. तेव्हा सरकारने १८६५ मध्ये चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेसाठी इशारायंत्रणा उभारण्याचे ठरवले. अशी पहिली यंत्रणा कलकत्ता येथे १८६५ मध्ये कार्यान्वितही झाली. गंमत म्हणजे खुद्द हवामान खाते मात्र त्याच्यानंतर, १८७५ मध्ये स्थापना झाले. पश्चिम किनाऱ्यावर कराची, मुंबई इ. ठिकाणी अशी यंत्रणा १८८० मध्ये उभारण्यात आली. १८८६ पर्यंत सर्व भारतीय बंदरावर ही यंत्रणा कार्यरत झाली. सुरुवातीला पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील वादळाचे संकेत इशारे वेगवेगळ्या पद्धतीचे होते. त्यामुळे उडणारा गोंधळ टाळण्यासाठी १८९८ पासून सर्व बंदरावरील संकेतइशाऱ्यात एकसूत्रता आणण्यात आली. पुढे यासाठी उपग्रह सेवांसह सर्व अत्याधुनिक तंत्रे वापरण्यात येऊ लागली व त्यातून चक्रीवादळाचे अचूक भाकिते मिळू लागली.

आजकाल समुद्रावर सर्वत्र सागरी जलाचे तापमान व वायूभार यावर उपग्रहांद्वारे लक्ष ठेवण्यात येते व त्या आधारे संभाव्य चक्रीवादळाचा अंदाज सांगितला जातो. एकदा चक्रीवादळ निर्माण झाले की त्याचा विकास, गती, प्रवासाची दिशा व वेग यावरही उपग्रहांद्वारे लक्ष ठेवले जाते. त्यानुसार संबंधित भागाला इशारे दिले जातात व योग्य सावधगिरीचा उपाय योजना करून जीवित व वित्तहानी टाळली जाते. एखाद्या रेल्वेचे वेळापत्रक सांगावे, तसे आजकाल चक्रीवादळाच्या प्रवासाचे वेळापत्रक सांगितले जात आहे. नैसर्गिक आपत्तींना केवळ अटळ संकट न मानता मानवाने या क्षेत्रात साधलेली ही एक श्रेष्ठ सिद्धी होय.

माणूस निसर्गाला गुलाम बनवू शकत नाही हे खरे. पण तो केवळ निसर्गाचा गुलाम म्हणूनही राहू शकत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास व त्याला विवेकाची जोड हाच मानवाच्या खऱ्या मुक्तीचा खरा मार्ग आहे. ज्यांनी हा मार्ग दाखवला त्या संशोधकांचे आपल्यावर केवढे ऋण आहे ?

१.चक्रीवादळाचे छायाचित्र
२. चक्रीवादळाची एक नामयादी

– ©️ एल. के.कुलकर्णी

lkkulkarni.nanded@gmail.com

सोबतचे चित्र : १.चक्रीवादळाचे छायाचित्र
२. चक्रीवादळाची एक नामयादी
[ ५ ऑक्टोबर २०२४ च्या ‘लोकसत्ता‘मध्ये पूर्वप्रसिद्ध ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

ला..जून हासणे, अन्… 

चांदणे स्वरांचे

लेखांक # २१

नुकताच एप्रिल महिना संपला आणि मे महिना सुरू झाला. यात काही विशेष नाही हो. एक महिना संपून दुसरा चालू झाला इतकच पण ही जी ३० एप्रिल २०२५ तारीख होती ती एका तरल सांगितिक प्रवासाची सुरवात घेऊन आली. आजही श्रावण सुरू होताच बरसणारा पाऊस आणि श्रावणातल्या उन पावसाच्या खेळातली ती निळाई घेऊन येणारं ‘श्रावणात घन निळा ‘आठवतं. संध्याकाळी कातर वेळी मुलं घरात आली नाही की कासाविस करणारं ‘या चिमण्यांनो’ आठवत. किती म्हणून गाणी सांगावी? मराठी अस्मितेचं स्फुल्लिंग चेतवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आठवावं की पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हालेलं ‘उगवला चंद्र पुनवेचा आठवावं?’ ही आणि अशी अनेक रसपूर्ण , गोड , मधाळ गाणी देणारे संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे ! त्यांच हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने संगीतातल्या अवलियाला वाहिलेली ही साहित्यमय आदरांजली.

आजचं गाणं ना खूप खास आहे.आपल्या काव्य प्रतिभेने मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे मंगेश पाडगांवकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे प्रेमगीत आणि त्याला स्वरसाज चढवलेला तितकाच प्रतिभावंत संगीतकार पण या गाण्यात मात्र गायकाच्या भूमिकेत असलेले, पं.हृदयनाथ मंगेशकर. गाणं सर्वांनी ओळखलच असेल

ते म्हणजे ” ला .. जून हासणे अन्…

गाण्यातला पहिला शब्द तोडून एकच अक्षर लांबवून जो काही परिणाम खळ्यांनी साधलाय तो मला नाही वाटत जगातल्या कुठल्याही भाषेत कुठल्याही गाण्यात साधला गेला असेल. एरव्ही शब्द तोडणे बरोबर वाटत नाही पण इथे मात्र त्या प्रियकराच्या अवस्थेला पूर्ण न्याय खळ्यांनी दिला आहे.

सुरवातीलाच आपल्याला एका अनामिक ओढीनं खेचून घेणारं संगीत. सतार, कॅार्ड्स, ठेका याचा वापर करून बांधलेला समा आणि मग टींग टींग , टींग टींग ,टींग टींग … टींग अशा वाजणाऱ्या कॅार्डस् मनामनात रूतून बसल्या आहेत. खुणेची कॅार्ड मिळताच येणारा ला आणि किंचित मागून येणारं जून. अहा ! साऱ्या गाण्याची नजाकत इथेच एका शब्दातच आहे असे वाटावे. मी तर किती वेळा मागे करून करून हाच भाग ऐकला आहे.

*लाजून हासणे अन् हासून हे पहाणे*

ला.. जून शब्द असा इतका गोड वाटतो की त्या प्रियकरावर तिची पडलेली मोहिनी, तिच्या लाजण्यामधे हरवून गेलेला तो. तिचं लाजणं तिचं लाजून हसणं हे सारे विभ्रम त्याला अगदी अगदी परिचयाचे असेच.
नव्याने प्रेमात पडलेल्या तरूणाला त्याच्या प्रेयसीची किंवा होऊ घातलेल्या प्रेयसीची प्रत्येक गोष्ट भावते. प्रेमातली लटकी भाषा त्याला बरोबर उमगते. आणि शब्द येतात

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
यात ओळखून हा शब्द अगदी स्वतःच ग्वाही देत असल्यासारखा येतो तर तुझे वर दिलेला जोर, तिचं लाजणं ,हसणं सारं अधोरेखित करतो. मी असा लांबवला आहे की मला तुझे बहाणे पक्के माहित आहेत अशी माझी खात्रीच आहे, हे जाणवावं. मी ओळखून… या ओळीसाठी वापरलेली व्हेरीएशन्स किती अर्थवाही आहेत? हृदयनाथांच्या आवाजात खूप कमी गाणी आहेत पण जी आहेत ती अत्यंत हृदयस्पर्शी , भावस्पर्शी. त्यांच्या कार्यक्रमाचं भावसरगम हे नाव अगदी समर्पक वाटतं.
कडव्यानंतर येणारं संगीतही त्या प्रेमिकाची भावावस्था उलगडणारं. काहीसं स्वप्नावस्थेत नेणारं.
तुला पाहताना डोळ्याच्या मध्ये पापण्यासुद्धा येऊ नयेत,
त्याचाही भार वाटावा अशी त्याची बिकट अवस्था.
डोळे मिटता क्षणीच तिचा चंद्रासम चेहरा समोर तरळावा.
ही इतकी भावव्याकूळ अवस्था प्रियकराची का व्हावी?
त्याचं उत्तर बडे बडे आसामी सुद्धा नाही देऊ शकत.
त्याची ती व्याकूळ अवस्था वर्णन करताना काय सुंदर तरल शब्द पाडगावकर वापरतात.

*डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?*
*मिटताच पापण्या अन् का चंद्रही दिसावा?*
*हे प्रश्न जीवघेणे*
*हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*

डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा हा अगदी भाबडा प्रश्न गायक विचारतो. ती यात डोळ्यास नंतर किंचित ठहराव पापण्यांचा नंतरही तसाच मग का सांग हा चिरंतन प्रश्न भार व्हावा ची अचूक शब्दफेक! कमालिची सुंदर चाल बांधली आहे. मिटताच पापण्या अन् का नंतरही किंचित ठहराव. का तू मला सतत समोर दिसत्स हा स्वतःलाच विचारलेला प्रश्न , ती असोशी , बेचैनी चालीतून , स्वरांतून हलेकेच प्रसारीत होते. हे प्रश्न जीवघेणे च्या चालीत जी हतबलता आहे. व्याकुळता आहे ती दाखवताना खळे आपसुकच ती ओळ खालच्या स्वरात चालू करतात. व्याकुळता व्यापक करताना जीवघेणे आळवून म्हणावयास लावतात.
तरल कवी , सुक्ष्म भाव टिपणारे संगीतकार आणि ते गाऊन उलगडून दाखवणारे हृदयनाथ. जणू ती प्रियकराची अवस्था नसून आपल्याच हृदयाची आहे असं वाटावं.

जिच्यामुळे ही अवस्था झाली आहे अशा प्रेयसी ला कसं बर कळावं की अशी घायाळ अवस्था व्हायला तीच तर कारणीभूत आहे. ती घनव्याकूळ , घायाळ अवस्था वर्णन करताना पाडगावकर फार सुंदर रूपक वापरतात.

ही अवस्था दाखवण्यासाठीच जणू उंचावणारे सूर कडव्यांमधे येतात आणि हृदयनाथांचे आर्त टीपेचे सूर येतात, त्याला कसे कळावे मधली व्याकूळता, हृदयात लागलेला प्रेमाचा बाण सहन करतानाची सैरभैर अवस्था

हे इतक्या परिणामकारक चालीतून दाखवलय की त्या प्रियकराविषयी सहानुभुतीच वाटायला लागते.
आणि तरीही तो कलिजा खलास करणारा तिरपा कटाक्ष झेलायला तो अगदी ओढीने तयार असतो.

*हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?*
*हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे*
*तिरपा कटाक्ष भोळा*
*तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*

हे सर्व बहाणे मला कळतातच आणि अर्थात आवडतातच असे सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा ती आळवणी येते.

कदाचित दिवस रात्र ही ओढ सहन केल्यावर , तिच्या आठवात जागरण झाल्यावर ती दिसताच कमालिचा टवटवीत तारा उगवल्यासारखं त्याला वाटतं आणि तिच्या आठवांच्या गंधाने पुनित झालेला सुगंधी वारा वाहू लागतो.
तिच्या आठवणींची धुंदी , तिची ओढ, तिच्या आठवणीत धुंद तरंगणारा प्रियकर या कडव्याच्या आधी जे संगीत येत
त्यातून दिसू लागतो.ती धुंदी ते तरंग त्या व्हायोलिनसदृश सुरावटीतून वाऱ्यावर लहरू लागतात. रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे…काय सुंदर कल्पनाविलास आहे!

*जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा*
*देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा*
*रात्रीस चांदण्याचे*
*रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*
*लाजून हासणे अन् हासून हे पहाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*

निसर्गातील प्रतिके वापरून पाडगावकरांनी त्या प्रियकराची भावावस्था सुरेख टिपली आहे.प्रत्येक कडव्याची चाल वेगळी आहे पण अंतरे असे बसवले आहेत की धृवपद उचलता येते. तरीही ही चाल गाताना गायकाची तारेवरची कसरत आहेच. खळ्यांचे ते वैशिष्ट्यच नव्हे का?

शब्दांना, भावांना अनुरूप चाली देणारा हा संगीतकार इतका मनस्वी की कधी कधी ते ११ चाली करत पण त्यातली चाल चपखल वाटेपर्यंत निवड होत नसे.
इतकी समरसता असेल तर गाणी का नाही आपल्यावर आजही आणि पुढेही मोहिनी घालणार आणि घालत रहाणार?

संपूर्ण गाणे ऐकताना आपण इतके धुंद होतो की त्याच स्वरलहरींवर असच विहरत रहावं असं वाटत.
हृदयनाथांनी हे गाणं इतक तरल मखमली म्हटलय की स्वतःची अधिक गाणी त्यांनी का नाही म्हटली अशी खंत राहून राहून वाटते. भावसरगम मधून ते गातच आले पण चित्रपट वा भावगीत अजून खूप गायला हवे होते असे वाटते पण मनस्वी कलाकारांची जातच वेगळी. ते काय आणि कुठे आपल्या प्रतिभेचा शोध घेत राहतील सांगता येत नाही. आणखी एक विचार मनात चमकून गेला, हे गाणे तलत नी गायले असते तर ? असेच रेशमी झाले असते नाही?

दिग्गज कवीची लेखणी, अत्यंत सुक्ष्मभाव टिपणारा संगीतकार आणि प्रतिभाशाली संगीतकार असून गायकाच्या भुमिकेत शिरणारा गायक असल्यावर असे दुर्मिळ योग येतातच. आपण फक्त त्या पर्वणीमधे मनसोक्त न्हाऊन घ्यायचं आणि स्वर संगीताच्या मोहिनीमध्ये  चिंब चिंब व्हायचं. याहून आनंद अवस्था काय असू शकते? सोबत दुवा जोडत आहे आपणही ह्या पर्वणीचा लाभ घ्या.

– ©️ शिल्पा कुलकर्णी
shilpa.y.kulkarni@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे जाणा व ज्ञानात भर घाला

 प्रश्नसमूह 5

16. खाली काही संतांची मूळ नावे-आडनावे दिली आहेत. पहिले नाव गाळले आहे.  आपण ते गाळलेले नाव भरायचे आहे तसेच त्या संताला आपण  कोणत्या नावाने ओळखतो ते कंसात लिहायचे आहे.  
–—- सूर्याजी ठोसर म्हणजे (   )
—– विठ्ठलपंत कुलकर्णी   (   )
—— बोल्होबा अंबिले      (   )
—— सूर्यनारायण देशपांडे   (   )
—– दामाजी रेळेकर       (   )
—— काका कुंभार        (    )

17. खालील संत कोणत्या शतकात होऊन गेले ? –
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत एकनाथ
संत रामदास
संत चोखामेळा
संत तुकाराम

18. संत  वाङमयात खालील संतांच्या विशेष गद्यपद्य रचना कोणत्या ?
ज्ञानेश्वर
नामदेव
एकनाथ
तुकाराम
रामदास
19. कोणते संत महाराष्ट्राबाहेरसुद्धा आदरणीय मानले जातात.

20. महाराष्ट्रातील स्त्री संत कोण कोण होऊन गेल्या ?

वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.   

उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.  

– ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

प्रश्नसमूह ५ ची उत्तरे :-

१६. खाली काही संतांची मूळ नावे-आडनावे दिली आहेत. पहिले नाव गाळले आहे.  आपण ते गाळलेले नाव भरायचे आहे तसेच त्या संताला आपण  कोणत्या नावाने ओळखतो ते कंसात लिहायचे आहे. 

नारायण सूर्याजी ठोसर म्हणजे (रामदास)
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी   (ज्ञानेश्वर)
तुकाराम बोल्होबा अंबिले      (तुकाराम)
एकनाथ सूर्यनारायण देशपांडे   (एकनाथ)
नामदेव दामाजी रेळेकर       (नामदेव)
गोरोबा काका कुंभार          (गोरा कुंभार)

१७. खालील संत कोणत्या शतकात होऊन गेले ? –

संत ज्ञानेश्वर – १३ वे शतक ( इ.स. १२७५ ते १२९६)
संत नामदेव  – १३ वे व १४ वे शतक ( इ.स. १२७० ते १३५०)
संत एकनाथ – १६ वे शतक ( इ.स १५३३ ते १५९९)
संत रामदास – १७ वे शतक (इ.स. १६०८ ते १६८१)
संत चोखामेळा – १३ वे – १४ वे शतक ( इ.स. १२७३ ते १३३८)
संत तुकाराम – १७ वे शतक ( इ.स.१६०८ ते १६५०)

१८. संत  वाङमयात खालील संतांच्या विशेष गद्यपद्य रचना कोणत्या ?
ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वरी ( ९००० ओव्या ) , अमृतानुभव ( ८०० ओव्या), चांगदेवपासष्टी, हरिपाठ, अभंग.
नामदेव – अभंगगाथा ( २५०० अभंग), हिंदीच्या बोलीभाषेत अभंग ( १२५ पदे)
एकनाथ – एकनाथी भागवत ( १८००० ओव्या) , भावार्थ रामायण( ४०,००० ओव्या), रुक्मिणी स्वयंवर, दत्ताची आरती ( त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा)
तुकाराम – अभंग गाथा ( ४५०० अभंग)
रामदास – दासबोध ( ७७५० ओव्या),मनाचे श्लोक ( २०५ श्लोक) , भीमरूपी स्तोत्र, करुणाष्टके, आरत्या ( सुखकर्ता दुखकर्ता इत्यादी)   

१९. कोणते संत महाराष्ट्राबाहेरसुद्धा आदरणीय मानले जातात ?
– नामदेव.व नामदेव हे शीख संप्रदायात पूज्य मानले जातात. त्यांना नामदेवबाबा असे संबोधतात. नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन  कीर्तने केली. शिखांची शबदकीर्तने व महराष्ट्रातील वारकरी  कीर्तने यात बरेच साम्य आहे. नामदेवांनी हिंदीच्या व्रज किंवा शौरसेनी भाषेत सुमारे १२६ अभंग रचले आहेत. त्यातील 62 अभंग पवित्र गुरुग्रंथसाहेबात “ नामदेव मुखबानी” या नावाने समाविष्ट केले आहेत. नामदेवांचे मंदिर पण पंजाबमध्ये आहे. राजस्थानात सुद्धा आहे.

२०. महाराष्ट्रातील स्त्री संत कोण कोण होऊन गेल्या ? 
१) संत मुक्ताबाई – मुक्ताई विठ्ठल कुलकर्णी. १३ व्या शतकातील.संत ज्ञानेश्वरांच्या कनिष्ठ भगिनी. स्वतः योगी होत्या. ज्ञानेश्वरांना “ ज्ञानेश्वरी” लिहिण्यास प्रवृत्त केले. वयोवृद्ध योगी चांगदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते.
२) संत बहिणाबाई – बहिणाबाई आउजी कुलकर्णी. १७ व्या शतकातील. तुकारामांचे शिष्यत्व पत्करलेल्या संत. सातएकशे रचना त्यांनी केल्या. ब्रह्मण असून वाणी जातीच्या तुकारामांचे शिष्यत्व पत्करले म्हणून त्रास सोसावा लागला.
३) संत सोयराबाई – संत चोखोबांच्या पत्नी. स्वतःही संत. साध्या भाअषेत काही अभंग रचले आहेत.
४) संत जनाबाई – विठ्ठल भक्त. १३-१४ व्या शतकातील. नामदेवांना समकालीन. नामदेवांच्या घरी काम करायच्या. तीनशे अभंग रचले.

 [ वरील प्रश्नांची उत्तरे पाठवणा-या सर्व वाचक मित्रांचे अभिनंदन आणि आभार ] 

 – ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विहंग मित्र

मित्र क्र. ३ ३ :  sarus crane ( सारस क्रौंच 
उंच राखाडी रंगाचा क्रौंच पक्षी.

पाय मात्र गुलाबी असतात. डोक्यापासून मानेपर्यंत लाल रंगाचा भाग असतो.
उथळ पाणथळ जागांमधून भक्ष्य शोधत असताना दिसतो. पाणी भरलेल्या शेताडीमधून सुद्धा दिसतो.
असं म्हणतात की नर-मादिची जोडी कायम असते.  
नराचा मादीला वश करतानाचा नाच अतिशय बघण्यासारखा, वैशिष्ट्यपूर्ण आणि दिमाखदार असतो.
खालील प्रकाशचित्रे नळ सरोवरच्या (अहमदाबादच्या जवळ) परिसरात काढली आहेत.



– ©️देवदत्त पाटणकर

8378980966 .
castingalu@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

मैं तो देखुंगी बम्बई

गेल्या महिन्यात मी श्रीवर्धन-हरिहरेश्वर-दिवेआगर येथे जाऊन आले. २२ नोव्हेंबरला मी या टूरवर एक लेख लिहिला. तो लोकांना खूप आवडला. अनेकांनी मेसेज/फोन करून इतर टूरवर देखील लिहावे असे सांगितले.

गेल्या २५ वर्षात, महाराष्ट्र आणि भारतातील सुमारे १५० ठिकाणी मी पर्यटनासाठी फिरून आले. सगळ्या ठिकाणांवर सविस्तर लिहिणे शक्य नाही. पण काही विशेष माहितीपूर्ण किंवा गंमतीशीर अनुभव लिहिणार आहे. या १५० ठिकाणात डोंबिवलीचे गल्लीबोळ, ठाण्यापासून कर्जत पर्यंतची ठिकाणे देखील आहेत.

काही माणसे माझ्या परिचयाची आहेत ज्यांनी अर्धे जग पाहिले आहे. पण त्यांनी त्यांचे गाव अद्याप नीट पाहिलेले नाही. एका पुणेकर नातेवाईकाने दुबई, युरोप, बाली, श्रीलंका पाहिले आहे. पण पुण्यातील पेशवेकालीन मंदिरे पाहिलेली नाहीत. सासवड, यवत, पुरंदर वगैरे लांबच राहिले. एप्रिल २०२५ मध्ये उद्घाटन झालेले चिंचवडचे क्रांतिवीर चापेकर बंधूंचे स्मारक (क्रांतितीर्थ) आम्ही पाहून आलो. पण चिंचवडमधील एका मैत्रिणीला असे काही स्मारक असल्याचे माहितही नव्हते.

चालायचेच…

पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना…

सुरुवात “*मुंबई दर्शन*” पासून…

माझा जन्म, शालेय शिक्षण सगळंच डोंबिवलीत झाले. आता लग्नानंतर settle ही डोंबिवलीत झाले, त्यामुळे मी अगदी ज्याला “स्थानिक डोंबिवलीकर” म्हणतात तशी आहे.. दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मी रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा आणि पदवी प्राप्त केल्यावर कायद्याच्या अभ्यासासाठी सरकारी विधी महाविद्यालय, चर्चगेट, इथे जात असे. त्यामुळे मला मुंबई शहराचा तसा थोडाफार परिचय होता.

१९८०-१९९० च्या दशकात डोंबिवलीत गरजेपुरती दुकाने होती. त्यामुळे लग्नासाठी किंवा सणासुदीसाठी दागिने/कपडे खरेदी करायला दादरला जाणे होत असे. आम्ही भावंडे आई – वडिलांसोबत जात असू. दादरला खरेदी करायची तिथेच “मामा काणे” यांच्या हॉटेलमध्ये राईसप्लेट खायची आणि मग घरी यायचे. असा आमचा उपक्रम काही वर्ष चालला.

हळूहळू चांगली दुकाने डोंबिवलीत येऊ लागली आणि मग दादरला खरेदीला जायचे बंद झाले.

कॉलेज किंवा खरेदी या व्यतिरिक्त, मी मुंबई पाहिली ती डोंबिवलीत जेव्हा महाराजा टूर्स तर्फे “मुंबई दर्शन” ही एक दिवसीय ट्रीप जायला लागली तेव्हा. मी माझ्या शाळासोबती मैत्रीणीसह १९९२-९३ ला ही टूर केली होती. त्यानंतर वर्षभरातच बहीणी व भाच्यांसह पुन्हा गेले होते. पण एका दिवसात २५-३० ठिकाणे पाहायची म्हणजे धावपळच होते. शिवाय या धावपळीत ते स्थळांची फारशी माहिती देत नाहीत, असं मला वाटलं.

अशा पार्श्वभूमीवर मुळ गिरगावकर असलेल्या माझ्या नवऱ्याचे, म्हणजे अजितचे, डोंबिवलीत घर आहे समजल्यावर एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. अजितला मुंबईचा (उपनगरे नव्हेत…फक्त मुंबई शहर- *कुलाबा ते दादर*) प्रचंड अभिमान. असो…

तर मी सांगत होते, “*मैं तो देखुंगी बंम्बई*”…

अजित नेहेमी म्हणायचा की ‘आपण कधीतरी दक्षिण मुंबई चालत पाहू. मी विनामुल्य गाईड आहेच’. पण तो योग येत नव्हता.

तसं एकदा २००८-०९ च्या सुमाराला माझी भाची आणि तिच्या लहान मुलीसह आम्ही डोंबिवलीहून कार घेऊन मुंबई दर्शन करायला गेलेलो होतो. पण आपणच आपली सगळी ठिकाणं बघायची,  माहिती द्यायला कोणी नाही,  असं हे मुंबई दर्शन थोडं कंटाळवाणेच झालं.

काही वर्षांपूर्वी सहजच नेटवर काहीतरी शोधत असता,  एक १९४७ सालच्या “डोली” या चित्रपटातलं एक गाणं सापडलं. ह्या गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत. या गाण्यात ती म्हणते, “दिल्ली की गलियो मे जिया नाही लागे,  मैं तो देखुंगी बम्बई…” नायक तिला हरप्रकारे दिल्ली कशी छान आहे हे पटवून देत असतो आणि नायिका मात्र मला मुंबईच बघायची आहे यावर हटून बसलेली असते. त्याच्यातली एक ओळ मला फारच आवडली ती म्हणते, “वहाँ सैगल भी है और सुरैया भी हैं, मैं तो देखुंगी बम्बई…”

(*गाण्याची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे*)

झालं ! हे गाणं ऐकलं काय आणि मी अजितच्या मागेच लागले की तुला तुझ्या मुंबईचा फारच अभिमान आहे ना ! मग आता मला तुझी मुंबई फिरव. दिवसाची आणि रात्रीची मुंबई देखील. तू माझा गाईड म्हणून काम करायचं. सर्व दक्षिण मुंबई पाहायची. म्हणजे आपण व्ही. टी. स्टेशनला उतरल्यावर पायी, पायी फिरायचे. अजितला गंमतीने म्हटलं  “वहाँ धरम भी है और हेमा भी है, मैं तो देखुंगी बम्बई…” “वहाँ अमिताभ भी है और रेखा भी है, मैं तो देखुंगी बम्बई…”.

अर्थात हे आपलं डोली मधल्या गाण्याला जोडून म्हटले एवढेच. एरव्ही नट-नट्यांना प्रत्यक्ष पाहण्यात मला अजिबातच रस नाहीये.

एकदा म्हणजे २००१ च्या सुमाराला आम्ही गिरगावातील आमच्या घरी राहून, रात्रीचे मरीन ड्राईव्ह पाहिले होते. अकराच्या सुमारास घरातून निघालो. घरापासून चालत दहा मिनिटांवर चौपाटी. चौपाटीवर थोडा वेळ फिरलो. नंतर चौपाटी पासून नरीमन पाँइंट पर्यंत घोडागाडीतून फेरफटका मारला. तो एक विलक्षण अनुभव होता. त्यावेळी सी.आय.डी. चित्रपटामधील “ऐ दिल है मुश्कील जीन यहाँ,   ज़रा हटके ज़रा बचके,   ये है बम्बई मेरी जान” म्हणणारा जॉनी वॉकर आठवला. त्यानंतर रात्री साडेबारा- एकच्या सुमारास आम्ही चौपाटीवर आईस्क्रीम खाल्लं. थोडा वेळ कट्ट्यावर बसून समुद्र पाहिला आणि घरी परतलो.

त्यानंतर २००९ साली  विक्रांत युद्धनौका पाहायला गेलो होतो.( नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेली ‘विक्रांत’ dismantle करण्यापूर्वी सामान्य लोकांना बघण्यासाठी उपलब्ध होती. एरव्ही युद्धनौका आपल्या सामान्य लोकांना कशी पाहायला मिळेल?). युद्धनीती किंवा बोटीवरील तांत्रिक बाबी काही मला कळत नाहीत. पण विक्रांत युद्धनौका जेव्हा बघितली तेव्हा त्याची भव्यता पाहून अवाक् व्हायला झाले. हा एक वेगळा संस्मरणीय अनुभव..

तेथून मग  कमला नेहरू उद्यान, म्हातारीचा बूट, (येथे मी इयत्ता तिसरीत असताना आमच्या शाळेची ट्रीप गेली होती. त्यानंतर २००९ ला पाहिले.) तिथून गिरगाव चौपाटीचे विहंगम दृश्य, चर्चगेट स्टेशन जवळील सम्राट हॉटेल मधील unlimited थाळी खाल्ली. (इथल्या थाळीत तळलेली गवार उपपदार्थाच्या बाजूला होती. पहिल्यांदाच मी तळलेली गवार खात होते. फारच रुचकर लागत होती. unlimited थाळीत, मी unlimited तळलेली गवार खाल्ली! जेवण राहिलं बाजूलाच….कोणाचं काय आणि माझं काय….त्यानंतर वेगवेगळे पदार्थ घरी करून बघण्याची माझी हौस मला स्वस्थ बसू देईना. मी लगेच अशा प्रकारची गवार बरेचदा घरी केली. खूपच चांगली लागते.)

मात्र गेल्या तीन वर्षात खूप वेळा मुंबईला जाण्याचा योग आला. कधी कामानिमित्त तर कधी फिरण्यासाठी.. त्यामुळे लेख लिहिताना पाहिलेल्या ठिकाणांच्या क्रमाबाबत थोडेफार इकडचे तिकडे, थोडेसे पुढे-मागे होण्याची शक्यता आहे.

*“मैं तो देखुंगी बम्बई”*

२०२० साली आम्ही दक्षिण मुंबई पाहिली होती. त्यावर अजित पाटणकरांनी लिहिलेला लेख मैत्रीमध्ये (मार्च २०२२) प्रसिद्ध झाला होता.

आता त्यानंतरच्या माझ्या मुंबई दर्शनची एक झलक..

*एपिल २०२३*.

गिरगावच्या घरी गेलो होतो. येताना घराच्या मागील रस्त्यावर असलेले फडके गणपती मंदिर… त्यासमोरील प्रकाशचा साबुदाणा वडा,  बटाटा पुरी,  पियुष, घेतले. (इथल्यासारखे हे पदार्थ जगात कुठेही मिळत नाही.)

भटवाडी, बनामा हॉल लेन (न.र.फाटक, चंद्रकांत काकोडकर यांचे निवासस्थान, आध्यात्मिक ग्रंथांचे प्रकाशक: ढवळे प्रकाशन) एकांकिकांच्या पुस्तक विक्रीसाठी प्रसिद्ध रामकृष्ण बुक डेपो ही ठिकाणे पाहिली.

घरी परतताना… हरकिसनदास हॉस्पिटल, दिलीपकुमार-मधुबालाचा खटला चालला होता ते गिरगाव कोर्ट, ड्रीमलँड थिएटर वगैरे पाहिले. हिंदी सिनेमातील गाण्यांची चार आणे किंमतीची छोटी पुस्तके विकणाऱ्या पाववाला स्ट्रीट मधील बऱ्हाणपूरवालाचे दुकान इथून दोन मिनिटांवर होते. (ऑर्केस्ट्रा करणाऱ्या मंडळीना गाण्याचे बोल यामुळेच सहज मिळत असत) तिथे गेलो नाही…..

* ऑक्टोबर २०२३*

त्यानंतर ऑक्टोबरमध्ये दादर-नायगावच्या “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात” कामानिमित्त गेलो होतो. तेथून जवळच “प्रीतम” हे सुप्रसिद्ध हॉटेल आहे. त्याच सुमारास त्या हॉटेलचे मालक कुलवंतसिंह जानी यांचे “मुंबई मेरी जान” हे सदर “दैनिक लोकसत्ता” मध्ये येत असे. त्यात प्रीतम हॉटेलात भेटलेल्या दिग्गज मंडळीच्या आठवणी असत. राजकपूर आदी मंडळींचा, त्या काळी, राबता असायचा. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात गेलो असता, प्रीतम हॉटेलात जेवून आलो. बरेच दिवसाची एक इच्छा पूर्ण झाली. उगाचच…

तिथल्या मालकासोबतचे राज कपूरसह अनेकांचे बरेच फोटो तिथे दर्शनी भागातच लावलेले आहेत.

हिंदमाता क्लॉथ मार्केटमधून ड्रेस मटेरीअल्स खरेदी करायची फार दिवसांची इच्छा होती. अनायासे तिथपर्यंत गेलोच होतो तेव्हा ही इच्छा देखील पूर्ण केली.

*२०२४*

जानेवारी महिन्याच्या ११ तारखेला पुन्हा एकदा दादर-नायगावच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात कामानिमित्त जाणे झाले. माझ्या एका लेखमालेसाठी जुन्या काळातल्या वर्तमानपत्रातील एक बातमी/लेख शोधायचा होता. त्याचे फोटो घेतले. जाताना VJTI कॉलेज, हिंदू कॉलनी वगैरे भाग फिरलो. यावेळी सोबत सुप्रसिद्ध लेखक/पत्रकार श्री. रविप्रकाश कुलकर्णी होते. पृथ्वीराज कपूर, के.एन.सिंग, नौशाद अशा जुन्या काळातील दिग्गज सिनेकलाकारांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. (नौशाद १९३० साली मुंबईत आले. नाव मिळेपर्यंत अनेक रात्री दादर टी.टी. येथील ‘ब्रॉडवे सिनेमा’  समोरच्या फुटपाथवर त्यांना झोपावे लागले होते. १९४६ साली त्यांचा रतन सिनेमा हिट झाला. पुढे १९५२ साली याच ब्रॉडवे थिएटरमध्ये त्यांचा ‘बैजू बावरा’ हा चित्रपट ५० आठवडे चालला, तेव्हा तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना आपल्या संघर्षाचे दिवस आठवून अश्रू अनावर झाले होते, “त्या फुटपाथवरून या फुटपाथवर यायला १६ वर्षे लागली”, असे ते म्हणाले होते.)

तेथून दादर पश्चिमेला येऊन काही खरेदी केली आणि घरी परतलो.

दादरला जाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे १२ जानेवारीला अटल सेतूचे उदघाटन झाले. त्याचे कौतुक ऐकले, व्हिडीओ बघितले आणि लगेच १८ जानेवारीला अटल सेतू पाहायला गेलो.. जाताना वडाळ्याचे सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिर पहिले. हे मंदिर ४०० वर्षांपेक्षा जास्त जुने आहे आणि ते ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. जवळच असलेले सी.के.पी. राम मंदिर पाहिले.  तेथूनच पुढे शिवडीवरून  भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल असलेल्या अटलसेतूवरून जाताना खूप मजा आली. शिवडी ते पनवेल.. २० मिनिटांचा, १६ किलोमीटरचा विना अडथळा प्रवास. अथांग पसरलेल्या जलाशयावरून आपण जातोय ही कल्पनाच मोहवून टाकणारी होती. नॉन स्टॉप आणि मस्क्यासारख्या सुरेख अशा रस्त्यावरनं जाणारी गाडी… आजूबाजूला समुद्र बघताना मजा येते.

पनवेलला जेवलो, तेथील डी मार्ट मधून उगाचच किरकोळ खरेदी केली आणि डोंबिवलीला परतलो.

त्याच वर्षी ११ मार्चला underwater/undersea Tunnel चे उद्घाटन झाले. दोनच महिन्यात *२९ मे २०२४*ला या समुद्राखालील बोगद्यातून गेलो.

हाजी अली पाहून झाल्यावर, वरळी ते मरीन ड्राईव्ह १० किलोमीटरचा प्रवास undersea Tunnel मधून केला.  अटलसेतूवरून जाताना खूप मजा आली होती.. याउलट समुद्राखालून जाताना मात्र अपेक्षित मजा जाणवली नाही. आपण फक्त आपल्या मनाची समजूत करून घेतो की आपण समुद्राखालून जात आहोत. प्रवासाचा वेळ वाचतो हे मात्र खरे आहे.

समुद्राखालील बोगद्यातून जात असताना मला “हनुमान विजय” सिनेमातील एक सीन आठवला … हा सिनेमा पाहण्यास आम्हाला शाळेतर्फे नेले होते. मी ६ / ७ वर्षांची होते. सिनेमात एका प्रसंगी रावणाचा भाऊ अहिरावण, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचे अपहरण करतो आणि देवीला बळी देण्यासाठी त्यांना पाताळलोकात घेऊन जातो. तिथल्या नागकन्या चंद्रसेनाचे रामावर प्रेम असते. रामाशी लग्न लावून देण्याच्या अटीवर ती हनुमानाला राम-लक्ष्मणाची सुटका करण्यास मदत करते. पण राम एकपत्नी असल्याने ते शक्य नसते. तेव्हा प्रभू रामचंद्र तिला वचन देतात की कृष्णावतारात मी तुझ्याशी लग्न करेन आणि तू माझी आवडती राणी सत्यभामा होशील”.

सिनेमातील हा सीन मला खूप आवडला होता. ‘पाताळलोक’ डोक्यात पक्का बसला होता. १५-२० मिनिटांचा हा सीन तपशीलवार माझ्या लक्षात आहे.

बोगद्यात असताना मी पाताळलोक शोधत होते. पण मला काही दिसला नाही !!.

बोगद्यातून बाहेर पडून लिबर्टी सिनेमा, पारसी डेअरी (कुल्फीसाठी प्रसिद्ध) मेट्रो सिनेमावरून क्रॉफर्ड मार्केटला गेलो. आंब्याचा सिझन संपत आला होता. तिथून आंबे घेतले. (माझे वडील १९९२ ला सेवानिवृत्त झाले. तो पर्यंत याच क्रॉफर्ड मार्केटहून घरच्यासाठी कधी भाजीपाला, तर कधी उत्तम प्रतीची फळफळावळ आणत असत),  मार्केट समोरच बादशहा कोल्ड्रिंक हाउस … सदानंद हॉटेल (पूर्वीच्या काळातील एकमेव ग्रेड वन उडिपी हॉटेल), बाजूला स्टेशनरीचे होलसेल मार्केट असलेला, अब्दुल रेहमान स्ट्रीट,  इलेक्ट्रिक उपकरणांचे मार्केट, लोहार चाळ व आसपासचा परिसर. बाजूला सरदार गृह — लोकमान्य टिळकांचे मुंबईतील उतरण्याचे ठिकाण.. आता अगदी जुनाट झालेली इमारत पण अद्याप ढाचा भक्कम आहे. लाकडी जीने आहेत. एकदम वरच्या मजल्यावर टिळक हॉल आहे. आता सरदारगृहात प्लास्टिकच्या फुलांचे व्यापारी आहेत.

तिथून येताना, चालत चालत जी.टी. हॉस्पिटल, त्यासमोरील पिकेट रोडचा दक्षिणाभिमुख मारुती, लघुवाद न्यायालय, जिथे अनेकदा शुटींग होते तो इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूटचा जिना (कोर्टाच्या पायऱ्या म्हणून दोन ठिकाणी शुटींग होते. एक हे आणि दुसरे ठिकाण एशियाटिक सोसायटी.) पाहिले.

तिथून माझगावला गेलो. २०२३ मध्ये अजितने ‘ललित’ मासिकाच्या दिवाळी अंकासाठी, १८८६ सालच्या “वेषधारी पंजाबी” या पहिल्या मराठी रहस्यमय कादंबरीवर परिचयात्मक लेख लिहिला होता. त्या कादंबरीतील बहुतेक घटना दक्षिण मुंबईत घडतात. त्यात माझगावच्या नेस्बीट रोडवरील एका बंगल्याचा उल्लेख आहे. माझगावचे जीएसटी भवन (पूर्वीचे विक्रीकर कार्यालय) हे अजितचे कार्यालय, त्याच रस्त्यावर. तेथून गिरगावात येण्यासाठी तो ज्या बसथांब्यावर, उभा राहात असे, त्या समोरच्या पदपथापलीकडे मोठे आवार असलेला एका पारशी व्यक्तीचा जुन्या पद्धतीचा प्रशस्त आवार असलेला टुमदार बंगला होता. कादंबरीतील नेस्बीट रोडवरील बंगल्याचे वर्णन वाचल्यावर हाच बंगला असावा अशी त्याची खात्री आहे. तो बंगला आम्ही (बाहेरून) पाहिला.

तेथून पुढे जाताना मीनाकुमारीचे दफन केले होते ते अंजीर वाडी जवळचे कब्रस्तान बाहेरूनच पाहिले.

तिथून घरी परतलो.

*११ मे २०२४* (*रात्रीची मुंबई*)…

असं म्हणतात की मुंबई कधीच झोपत नाही. मुंबई ही रात्रंदिवस धावत असते / पळत असते, पण कधी थकत नाही. पण दिवसाची मुंबई आणि रात्रीची मुंबई ही मुंबईची दोन रूपे आहेत. अशी ही रात्रीची मुंबई पहायला आम्ही जेवून खाऊन रात्री दहाच्या सुमारास डोंबिवलीहून कारने निघालो. डोंबिवलीच्या माणकोली ब्रिजवरून आमची गाडी सुसाट निघाली. साधारण दीड तासात आम्ही मुंबईत पोहोचलो. मुद्दाम रात्रीच्या शांत समयी बेलार्ड इस्टेट परिसरात गेले (गडकरी सरांकडे ज्युनिअर असताना भारत पेट्रोलीयम बिल्डींगजवळ असलेल्या, कॉन्ट्रॅक्टर बिल्डींगमधील, सहकार न्यायालयाच्या ५ नंबरच्या कोर्टात मी अनेकदा गेले होते.) तेथून मंत्रालय, एल.आय.सी.ची इमारत, असे फिरत, फिरत मरीन ड्राईव्हवरील अॅम्बेसेडर हॉटेल,  “कृष्णमहल” ( आठवते का !!! “वहाँ सुरैया भी हैं”, तिचा एक चाहता बरीच वर्षें सुरैयाच्या घरासमोरील कट्ट्यावर तिला पाहण्यासाठी बसून राहत असे) वरून पुढे नरीमन पॉइंटला पोहोचलो. कट्याच्या टोकाला जाण्याचा रस्ता काही कारणाने बंद होता. अजित खट्टू झाला. एकट्याने निवांत बसायला सर्वोत्तम ठिकाण असे त्याचे मत..  

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. पण तसे मुळीसुद्धा वाटत नव्हते. समुद्रकिनाऱ्यावर गर्दी होती. खाण्याच्या गाड्या लागल्या होत्या. लोक हिंडत होते आणि खात होते. समुद्रावर रात्रीची काळी छाया पसरली होती. त्यातच आजूबाजूच्या उंच, उंच इमारती,  रस्त्यावरील दिव्यांचा झगझगीत प्रकाश त्या काळ्याभोर समुद्राच्या पाण्यावर उठून दिसत होता. Queen’s Neckless हे नाव अगदी सार्थ करणारा. हिऱ्यासारखा चमकणारा तो आजूबाजूच्या दिव्यांचा प्रकाश समुद्रकिनाऱ्यावर खरोखरच रत्नहाराप्रमाणे शोभून दिसत होता. तेथून वाळकेश्वर पर्यंत चक्कर टाकून डोंबिवलीकडे यायला निघालो. रात्रीच्या मुंबईचे एकंदरच कल्चरच निराळे. एकीकडे उंच, उंच इमारतीत रंगणाऱ्या पार्ट्या, दुसरीकडे डोंगरी, नागपाडा सारखी वस्ती, आणि तिसरीकडे गिरगाव परिसरातील मध्यमवर्गीय लोक.. सगळेच आपापल्या परीने आयुष्य जगत असतात. पहाटे ३ च्या सुमारास डोंबिवलीत परतलो.  

येताना गोल देऊळ, नळबाजार, भेंडीबाजार, डोंगरी, कर्नाक बंदर, …

अजितचे माहिती देणे चालूच होते..

मुंबईला अनेकदा वेळेला जाऊन आलो होतो पण रात्रीची मुंबई पाहायचीच राहिली होती. रात्रीची (दक्षिण) मुंबई शांत आणि वेगळीच दिसते.

एकंदरच दिवसाची काय आणि रात्रीची मुंबई काय ! मुंबई फक्त वाचण्याचा किंवा लेखनाचा विषय नाहीये. तर तो अनुभवायचा विषय आहे. काही अनुभव हे शब्दांत मांडणे अवघड असते. ज्याला त्याला मुंबईबाबतचा अनुभव वेगळा येईल. कोणाला गर्दी, धावपळ आणि घामेजलेली मुंबई दिसेल, तर कोणाला सगळे जाती, धर्म, पंथ, श्रीमंत, गरीब, भेदभाव विसरून सर्वसमावेशक असलेली मुंबई दिसेल.

गाईड सोबत असला की त्या वास्तूंशी निगडीत आठवणी उलगडून सांगितल्यावर आनंद मिळतो. त्यामुळे मला दिवसाची आणि रात्रीची अशी मुंबईची दोन्ही रुप आवडली.

अजितच्या म्हणण्यानुसार गेटवे ऑफ इंडिया, म्युझियम, जुने विधान भवन व त्या आसपासचा परिसर, पाहायचा आहे.

वाळकेश्वर-बाणगंगा आणि गिरगाव परिसरातील अजून अनेक ठिकाणे पाहायची आहेत. उदा. सी.पी. टँक,खत्री लेन मधील विनय हॉटेलची मिसळ,  भुलेश्वर, माधवबाग, पांजरापोळ, पायधुनी, सुरती हॉटेल मधील थाळी, पंजाबी घसीटारामची लस्सी आणि रबडी.

गिरगावात असताना अजितने पाहिलेल्या सिनेमांवर त्याने एक लेख लिहिला आहे. त्यात उल्लेखलेली सिनेमा थिएटर्स व तिथल्या आठवणी, शिवाय काळबादेवी रोड परिसर आणि काळबादेवी मंदिर (हे मंदिर त्या काळातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचे केंद्र होते, जिथे क्रांतिकारक एकत्र येत असत. चाफेकर बंधू येथे दर्शनासाठी येत.)

आणि बरेच काही..

*बघूया कधी योग येतोय ते*..

(समाप्त)
*©अ‍ॅड. क्रांती आठवले पाटणकर*
डोंबिवली.
9969087559
०९.१२.२०२५

(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)
*(सदर लेख माझ्या फेसबुक वॉलवरही वाचण्यास उपलब्ध आहे)*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

 

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– ©️मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 – ©️ युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

बिनआवाजी उठाव

स्वागत फुलांनी

कथा 

[  ही कथा फेब्रुवारी २००० साली ‘अंतर्नाद’ ह्या मासिकात छापून आली होती. त्यावेळी संपर्काचे पोस्ट कार्ड हे एक साधन होते. आज पोस्ट कार्ड इतिहासजमा होत चालले आहे. एका पोस्ट कार्डाने आणि आपल्या प्रत्येकात दडलेल्या गजानन जोशीने, अशक्य ते शक्य करून दाखवले, त्याची ही कथा. चोवीस वर्षे उलटली पण परिस्थिती काही बदललेली नाही. गोष्ट थोडी मोठी आहे. WhatsApp च्या जमान्यात इतके प्रदीर्घ वाचणारे कमीच. कथा पाठवायचे काम मी केले  आहे. वाचायचे काम तुमचे. वाचा वाचा आणि वाचवा. अभिप्राय नक्की पाठवा.
या कथेचा  हिंदी अनुवाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख श्रीमती लीना मेहेंदळे यांनी केला आहे. हा अनुवाद अक्षर पर्व या हिंदी मासिकाच्या ऑक्टोबर २००० सालच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. ज्यांना WhatsApp वर वाचणे अवघड जाते त्यांनी ईमेल पत्ता पाठवल्यास कथा ईमेल केली जाईल. – लेखक ]

आठ एकोणचाळीसच्या स्लो लोकलमध्ये वाऱ्याच्या दिशेला तोंड करून खिडकी जवळची जागा गजानन जोशीला मिळाली. स्वच्छ रुमालाने घाम पुसत गजानन लोकलमध्ये स्थिरावला. रोजचीच लोकल, रोजचीच वेळ,रोजचीच जागा. ती त्याला हमखास मिळायचीच कारण ही गाडी यार्डातून येऊन स्टेशनला लागायची. गजानन यार्डातच गाडीत जागा पटकवायचा. आज देखील त्याने तशीच नेहमीची खिडकी जवळची वाऱ्याच्या दिशेची जागा मिळवली होती. आपल्या हमखास जागा मिळवण्याच्या बहादुरीवर गडी खुश होता.

लोकल फलाटावर आली आणि भरली. प्रथम तीन तीन माणसे, मग जरा दाबून घेत चार चार माणसे घेऊन बाक आणि डबे माणसाळून गेले. स्वच्छ परीटघडीचा ड्रेस घातलेल्या गजानन शेजारी रात्रभर जागरण झाल्यामुळे तारवटलेला एक भैया गजाननला दाबून ऐसपैस बसला होता. त्याच्या नसानसातून दारूचा दर्प दरवळत बाहेर पडत होता. सत-असत, हिंसा-अहिंसा, सदाचार -दुराचार,चांगले – वाईट  यांची जशी द्वंद्वे होतात तद्वतच दारूचा दर्प आणि गजाननने लावलेल्या चंदन तेलाचा सुगंध यांचे आसमंतात युद्ध चालू होते.

गजाननला हे असह्य झाले. पण करतो काय? भय्याच्या त्या अवस्थेत त्याच्याशी बोलायला गजाननकडे धारिष्ट्य  तर पाहिजे! आपण काहीच करू शकत नाही, ह्याचे गजाननला नेहमीच भारी दु:ख होई.

अथर्वशिर्षाचे पुस्तक काढून ते वाचण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता.
— अथर्वशीर्षाच्या पठणाने सर्व साध्य होते, पण धारिष्टय काही येत नाही, एक जोशी जन्मला आणि गेला ह्यापलीकडे आपले जीवन नाही.
एक भली मोठी उदास पोकळी गजाननला कायम अस्वस्थ करीत असे. काहीतरी केले पाहिजे.
आपल्या आजूबाजूला चाललेला अत्याचार त्याला सहन होत नव्हता आणि आपण काहीही करू शकणार नाही, हे तो पुरते जाणून होता.
परीकथेतील राजकुमारासारखी  मग तो स्वप्ने पाहायचा. साधारण गाडीने दोन स्टेशने ओलांडली की त्याला झोप यायची. मग तो झोपेत शूर-वीर बलवान होत असे. रोज एकेका गैरव्यवहाराची दखल घेऊन तो विजयी होत असे. पण फक्त दादरपर्यंतच. जागा झाला की गजानन जोशी. आपण निदान स्वप्नात तरी अव्यवहारांचा परामर्श घेतो, ह्याचा त्याला अभिमान होता.

— नाहीतर असे कितीतरी जोशी असतील की ते ‘आपल्याला काय करायचे’ असे वागत असतील. आपण सर्व सशाच्या हृदयाची माणसे! कुठलाही आघात सहन करायची आमची ताकद नाही. फक्त पाहायचे अन् पुढे न येता भिऊन मागच्यामागे पळून जायचे हा आमचा गुणधर्म. सशाने भित्रेपण मान्य करून टाकले त्यामुळे त्याच्या पळून जाण्याचे कौतुक होते. मग आपणदेखील भित्रे आहोत, हे जाहीर का करू नये ?
गजाननच्या डोक्यात एका मोठ्या मूलभूत विचारांचे रोपण होत होते.
आधीच गजानन सशाच्या विचारात तरंगत होता त्यात व्ही.टी. आले. गजाननने उतरायची संमती दर्शवली आणि तो आपोआप वाहत वाहत बाहेर रस्त्यावर आला देखील !  ‘सचिवालयाच्या बसच्या रांगेत नुसते काय उभे राहायचे, चला जाऊ या चलत’ असे म्हणत तो तसाच विचारांच्या नादात तरंगत तरंगत चालू लागला.

ऑफिसमध्ये मस्टरवर सही करून तो आपल्या नेहमीच्या टेबलावर स्थानापन्न झाला. तेच तेच काम; केले तरी वाहवा, अन् नाही केले तरी वाहवा! त्याच्या कामाचा परिणाम त्याला कोठेच दिसत नव्हता. मग काम कशासाठी करायचे; तर घरासाठी करायचे, एवढाच एक खुर्चीला खिळवून ठेवणारा विचार होता. बाकी कामाबद्दल म्हणाल तर त्याच्याकडे विचार करण्यासारखे काम होते तरी कोठे? इकडून तिकडे अन् तिकडून इकडे उतारे उतरवण्यापलीकडे कामच नव्हते.

गजाननने एक स्वच्छ कोरा कागद घेतला आणि आपल्या सभोवती राजरोसपणे चाललेल्या गैरव्यवहारांची तो यादी करू लागला.
— ह्यातील एकेकाला जरी आपण निपटून काढले तरी आपले जीवन सार्थकी लागेल. असे त्याला मनोमन वाटायचे. पण हे सर्व गजाननला आपली घट्ट नोकरी, टुमदार घर, अन् स्वत:चे सुंदर जग  न मोडता करायचे होते .
दारूचा अड्डा अन् मटक्याचा खेळ उघड उघड  अनेक ठिकाणी चलालेला गजानन रोज जाता येता  पाहत होता. रोज दर्शन घ्यावे लागणारा हा व्यवहार स्टेशनवर सायकल स्टँडच्या मागे एका पडद्याच्या आड गजानन रोज बघत होता.

आता या गोष्टी मान्यवर लोकांना दिसत नसतील? एवढ्या मोठ्या शहरातील हे मध्यवर्ती ठिकाण! कलेक्टर, अभियंते, उपअभियंते, प्रबंधक, महाप्रबंधक, अधीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर अशी कितीतरी सरकारी माणसे  आणि आपले मान्यवर नेते, नगरसेवक ह्या चौकातून एकदा देखील गेले नसतील? त्यांना हे अड्डे दिसले नसतील? मग या पैकी कोणीच कशी या गैरव्यवहारांबद्दल कारवाई केली नाही? का, ही माणसेसुद्धा आपल्यासारखीच सशाच्या हृदयाची असतील?

ज्या अर्थी हा गैर व्यवहार खपवून घेतला जातो, त्या अर्थी हे अधिकारी खरोखरच काहीही करू शकत नसतील तर ही माणसे लबाड कोल्ह्याच्या वंशाची असतील. त्यांनी माणसाची कातडी पांघरलेली आहे. सशाचे आणि कोल्होबांचे हे युद्ध आहे भित्रा ससा आणि लबाड कोल्हा. कोल्हा सशाच्याच  कळपात राहतो आणि सशाच्या भित्रेपणामुळे त्याचे फावते.

गजाननच्या पायाशी मघापासून काहीतरी सतत  टोचत होते. विचारांच्या नादात त्याने त्या टोचण्याकडे दुर्लक्ष केले  होते. पण त्या टोचण्याने गजाननचे लक्ष विचलीत केलेच. सारखे  टोचते म्हणून खाली वाकून त्याने ती वस्तू बाहेर काढली. ते एक पोस्ट कार्ड होते. कोणीतरी त्याला कोपऱ्यात एक टाचणी लावली होती. ती गजाननला मघापासून टोचत होती. प्रथम गजाननने टाचणी काढून टाकली आणि मग पत्र पाहिले. पत्र बारीक अक्षरात लिहिले होते. कुठला तरी अगम्य मंत्र त्या कार्डावर वारंवार लिहिला होता. त्या मंत्रातून अर्थबोध तर काहीच होत नव्हता. पत्राच्या मागील बाजुस दोनच ओळीचा मजकूर होता
.
हे पत्र जसे लिहिले आहे, तशीच वाचणाऱ्याने दहा पत्रे लिहून आपल्या ओळखीच्या लोकांना पाठवावीत. असे केलेत तर आपल्याला मोठा धनलाभ होईल. न लिहिल्यास आरीष्टाला सामोरे जावे लागेल. तुमचा हितचिंतक. स्वामी भक्त.

कोठून हे पत्र वाचले असे गजाननला झाले. त्याच्यातला ससा जागा झाला. गजानन पुरा बेचैन झाला. कोणी कोणी केव्हा केव्हा सांगितलेल्या अतर्क्य गोष्टी त्याला लगेच आठवू लागल्या. रात्री दहा पत्रे लिहू, अन् मोकळे होऊ ह्या कटकटीतून, असा सुरक्षित विचार करून दहा कार्डांचा खर्च कोणत्या खात्यातून वजा करावा याची तो चिंता  करू लागला.  

रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर गजानन ती पत्रे लिहायला बसला. अजूनही त्याच्या डोक्यात सकाळचेच विचार घोळत होते. नामानिराळे राहून, आपल्या  स्वत:च्या खाजगी जगाला जराही आच न लागता आपण कांही तरी करू शकू, लढा देऊ शकू, असे त्याला वाटू लागले होते.  परत एकदा आपल्याला कोणी पाहत नाहीना ह्याची खात्री करून त्या अतर्क्य मंत्राची पारायणे असलेली दहा पत्रे लिहायला तो सरसावला.

मा. श्रीयुत कलेक्टर साहेब यांसी,
स.न.वि.वि.

मी एक सामान्य माणुस एका असामान्य शक्तीच्या आदेशावरून हे पत्र लिहीत आहे. आपण आमच्या गावाचे मुख्य. गावाच्या सर्वांगीण भल्यासाठी आपण नियुक्त आहात. आपण गाडीतून हिंडता. गाडीवरील टेंगुळ असलेल्या दिव्यामुळे आणि गाडीच्या अती गडद्द काचांमुळे आपणच गाडीत आहात असा आम्ही समज करून घेतो. आम्हाला वाटते बंद गाडीतून आपण ‘हरून अल् रशीद’ सारखी गावाची पाहणी करत आहात. ह्या विचाराने आम्ही मनोमन सुखावतो. रोज मी, तुम्ही ज्या रस्त्यावरून जाता, त्याच रस्त्यावरून जात असतो. या रस्त्यावरील काही ठळक गोष्टी तुमच्या नजरेतून सुटतात असे मला वाटते. कदाचित भुरकन जाण्याचा तो परिणाम असेल. असो.

तर आपल्या शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या साळगावकर चौकातील महात्मा गांधी रस्त्यावरून थोडेसे रेल्वे स्थानकाच्या बाजूला गेलात तर तेथे तुम्हाला पडदा टाकलेला एक गाळा दिसेल. परवा मी सहज त्या पडद्याच्या आत डोकावलो पडदा उन्हासाठी असेल असा माझा अंदाज होता. पण तो खोटा ठरला. पडद्यामागे माणसांची बरीच गर्दी होती. विड्या आणि सिगारेटच्या धुराने तो गळा भरला होता. भिंतीवर ‘कल्याण’, ‘वरळी’, ‘आज बंद’,  ‘ओपन’ असे एकेकटे शब्द आणि त्यांना साथ देणारे काही आकडे त्यांच्यासमोर लिहिले होते. जमिनीवर कागदांच्या तुकड्यांचा खच पडला होता.

मी भित्रा असलो तरी हा मटक्याचा  अड्डा आहे आणि तेथे राजरोस जुगार चालतो, हे समजण्या इतका हुशार नक्की आहे. मला जेव्हापासून समज आली तेव्हापासून मी ही  असली पडदानशीन दुकाने अनेक ठिकाणी बघतो. हा गैर व्यवहार कोण थांबवणार ?

माझ्या ‘तोची गुरु’ कडून आपल्याला पत्र लिहून कळवायचा मला आदेश आला. म्हणून हे पत्र! तुमच्याकडून योग्य कारवाईची अपेक्षा आहे. योग्य कारवाई केल्यास तोची गुरूची कृपा होईल न केल्यास त्याच्या अवकृपेस सामोरे जावे लागेल.
आपला  …. तोचि भक्त.

 टाकोटाक गजाननने वरील पत्र लिहिले. त्याने ते पुन्हा पुन्हा वाचले आणि तो सुखावला. कारण त्या लिहिण्यावरून ते पत्र कोणी लिहिले आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता . पत्राच्या वाईट अथवा चंगल्या परिणामांची झळ त्याला लागणारच नव्हती. एखादे अमोघ अस्त्र सापडल्याच्या नादात त्याने दुसरे पत्र लिहायला घेतले.

          मा. श्री बर्वे गुरुजी,

          तुमच्या हाताखाली शिकलेला मी एक भित्रा मुलगा आहे. आयुष्यातील सळसळते रक्त तुमच्या हातात देऊनसुद्धा तुम्ही तुमच्या पुस्तकी शिकवणुकीने आम्हाला भित्रे बनवले. सध्या मी ‘तोची गुरूची’ दिक्षा घेतली आहे आणि त्याच्याच आदेशावरून मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. साळगावकर चौकात स्टेशनच्या बाजूकडे एक पडदा टाकलेले दुकान आहे. त्यात दारू, मटका आणि जुगार हे अव्यवहार अव्याहतपणे गेली कित्येक वर्षे चालू आहेत. तुम्ही स्वत: भित्रे आहात आणि आम्हालादेखील भित्रे बनवले आहे. नुसते पाहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. माझ्या ‘तोची गुरू’ने मला मार्ग दाखवला आहे. त्याचा उपयोग करावा. रात्री सर्वत्र निजानीज — अगदी बायकोसुद्धा—  झाल्यावर हळूच उठावे आणि खालीलप्रमाणे पत्र लिहावे.

          ‘साळगावकर चौकातील दारू, मटका आणि जुगाराच्या अड्ड्याला आपण उठवू शकत नाही. मग प्रसिद्धी देऊया! ह्या अड्ड्याविरुद्ध आवाज उठवायचा तर त्याला हिम्मत हवी जी तुमच्या आमच्यात नाही आणि आता येणारही नाही. तेव्हा हे पत्र वाचून स्वस्थ न बसता अशीच दहा पत्रे तुमच्या ओळखीच्या मान्यवर व्यक्तींना लिहा आणि पाठवा. ह्यात तुमचे काहीच वाकडे होणार नाही. तुम्ही कोण हे देखील कोणाला कळणार नाही. कोणी सांगावे ह्या अशा पत्रांच्या साखळीतून ‘तोची गुरू’ हरीच्या लालाला  उठवेल आणि दुष्टांचे परिमार्जन करेल.

          बर्वे सर, वरील आशयाची दहा पत्रे लिहून ‘तोची गुरू’ च्या कृपेस पात्र व्हा. तुमच्या नाकर्तेपणावर ‘तोची गुरूची’ नजर गेली तर नकळत होणाऱ्या तुमच्या नुकसानीस तुम्हीच जबाबदार असाल.

          आपला तोची भक्त.

 दोन्ही पत्रे गजाननने आपल्या ब्रीफकेसमध्ये आतल्या खणात ठेऊन दिली. दिवा मालवला अन् मुलाला बायकोच्या कुशीतून बाजूला काढून तिथे सुखावला. ‘किती काम करत हो,’ असं म्हणत तिने त्याला कौतुकाने मिठी मारली.

 सकाळी गजानन नेहमीपेक्षा लवकरच बाहेर पडला आपल्या घराजवळील पोस्टात त्याने ती पत्रे टाकली. एका वेगळ्याच आनंदात तो नेहमीप्रमाणे आपल्या ठरलेल्या लोकलमध्ये चढला. एवढ्या सगळ्या गानिमिकाव्यात गजाननने नेहमीची लोकल आणि नेहमीची जागा गमावली. पण त्याचे त्याला विशेष काही वाटले नाही. गाडीच्या लयबद्ध खडखटाबरोबर गजानन राहिलेली आठ पत्रे कोणाला लिहायची अन् कशी लिहायची ह्याचा विचार करू लागला. आज त्याला लोकलमधील गर्दीचा अजिबात त्रास होत नव्हता.

 नगरपालिकेच्या  मुख्यालयात  खालच्या आवाजात कुजबुज चालू होती. सावंत साहेब वयस्क आणि चांगला लौकिक असलेले गृहस्थ होते. त्यांचा सरळमार्गीपणा  गावात सरळ सरळ चाललेल्या वाकड्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करत होता. ह्या गैरव्यवहारी लोकांना कामात ठेवल्यामुळे गावात शांतता होती, हा सावंत साहेबांचा स्वत:चे समाधान करणारा एक विनोदी युक्तिवाद होता.

 शांत कार्यालयात एका पोस्ट कार्डने हलचल माजवली. त्या पत्रातील शेवटच्या दोन ओळी म्हणजे शालजोडीतील अलंकार होते.

“ आपल्याकडे अधिकार असून देखील त्याचा उपयोग करण्याचे धारिष्ट्य आपल्याकडे नसल्यास तुम्ही देखील आमच्या प्रमाणेच वरील पत्र लिहून दहा लोकांस पाठवावे अन्यथा ‘तोची’ गुरूच्या अवकृपेस सामोरे जावे.

देवभोळे, साधे , सरळमार्गी सावंत कोणत्याही गुरूच्या अवकृपेस घाबरत. त्यांनी लगेच योग्यती कारवाई करण्याचा आदेश हाताखाली दिला आणि आपण कोणा दहा जणांना अशी पत्रे लिहायची ह्याची मनातल्या मनात जुळवाजुळवी करण्यात ते मग्न झाले.

 बापू बाष्ट्ये शाखाप्रमुख होता. तो म्हणजे सळसळत्या अन् उसळत्या रक्ताचा वाहता पाट होता. उकळणाऱ्या पाण्याप्रमाणे तो भांड्यातल्या भांड्यात सदोदित खदखदायाचा आणि त्याच्या खदखदण्याची वाफ हवेत विरून जायची.

मनगटात ताकद असेल आणि दंडात जोर असेल तरच हे पत्र वाच आणि काहीतरी कर .नसेल तर आमच्यासारखाच तू! तेव्हा अशीच दहा पत्रे लिही आणि स्वस्थ बैस.”

ते पत्र साळगावकर चौकातील अड्ड्याबद्दल होते. पत्राच्या मायन्याने बापू बचैन झाला. काय आणि कसे करायचे हे त्याला जरी समजत होते तरी पण आपण काहीच करत नाही आणि करूही शकत  नाही, हे तो जाणून होता. मनातून अस्वस्थ आणि त्याचबरोबर दु:खी देखील होता.

 पहिले पत्र टाकून आज महिना होत आला होता. गजाननने एकूण दहा पत्रे लिहिली होती. त्या टाचणी असलेल्या पत्रामुळे हे सर्व घडले. ते पत्र आणि त्या पत्रातील  तो अतर्क्य मंत्र न लिहिता आपण हि वेगळीच पत्रे लिहिली हे गजाननला काही दिवसांनी लक्षात आले. इतका तो ‘तोची गुरू’च्या आहारी गेला होता. विशेष म्हणजे त्याला भीती वाटत नव्हती.

 रोज ऑफिसमधून येताना तो त्या अड्ड्यावर ओढलेल्या पडद्याकडे बघायचा. कळकटलेला पडदा स्वच्छ धुऊन लावण्यापलीकडे गेल्या पूर्ण महिन्यात काहीच बदल झाला नव्हता. अड्डा चालवणारा कोण? हे जसे गुपित होते, तसेच पत्रास्त्र सोडणारा कोण हेही गुपितच राहिले होते. त्या अस्त्रांची संख्या वाढली तर नक्कीच आपला विजय होईल, ह्याची आजकाल गजाननला पूर्ण खात्री वाटत होती. त्यामुळे वेळ आणि थोडीशी चिल्लर खिशात खुळखुळू लागली की गजानन तिचा उपयोग पत्रे लिहिण्यासाठी करू लागला. ह्या सर्व गडबडीत गजाननला आणखीन एका गोष्टीचा शोध लागला होता. तो म्हणजे त्याचे लिखाण! तो छान पत्रे लिहू शकत होता. आपल्याला कोणी पाहत नाही, आपण कोण? हे कोणाला कळत नाही. हीच त्याची पत्रे लिहिण्यामागची शक्ती आणि उर्जा होती.

 मॉडेल स्कूल ही गावातील मध्यवस्तीत असणारी अत्यंत गैरसोईनी सुसज्ज अशी शाळा. ह्या शाळेतील मुलेमुली बहुतांश कामगार आणि मोलमजुरी करून जगणाऱ्या पालकांची होती.  अनाथ मुलांची  संख्याही जाणवण्या इतकी होती.  शाळा चालकांना आपण ह्या मुलांना शिक्षण देऊन फार मोठे समाजकार्य करत आहोत, हे एक आत्मिक समाधान होते. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी कट्यावर एक कागदाचा गठ्ठा ठेवला होता. साधारण तीनचारशे पेपर्स असावेत. सर्व पेपर्स छापील होते. मुले  शाळेतून जाता येता  त्या गठ्ठ्यातील एक पेपर घेऊन जात होती. त्या कागदावर लिहिलेला मजकूर असा होता.

“ मुलानो, तुमच्या शाळेसमोर हा गठ्ठा ठेवण्याचे कारण म्हणजे तुम्ही जे दु:ख भोगत आहात त्याचे कारण काय हे सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

तुम्हाला माहीतच आहे, आपल्या सर्वांच्या घरची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच असते. आपल्या प्रत्येकाच्या घरी घरातील कोणीतरी व्यसनाधीन बनला आहे. दारू, मटका, जुगार ह्या तीन राक्षसांशी तुमच्या घरातील बाबा, भाऊ, काका, मामा, यांची खूप दोस्ती जमली आहे. त्यामुळे रोज रात्री मारामारी, आरडाओरडा, कडाक्याची भांडणे यांच्यामुळे तुमच्या अभ्यासाचे आणि भावी आयुष्याचे अपरिमित नुकसान होत आहे.
तुमच्या आजूबाजूला दिसणारी मोठी माणसे ह्या राक्षसांना आळा घालू शकत नाहीत ह्याचे कारण, चुकून कोणी आवाज उठवला तर तो अशा त-हेने बंद केला जातो की  त्यामुळे तुमचे आहे ते घर देखील उधवस्त होईल. म्हणून मग ही सर्व मोठी माणसे गप्प बसतात. तुम्ही मुले जरा चौकसपाणे आजूबाजूला पहाल तर  तुम्हाला अशी अनेक ठिकाणे दिसतील जेथे दारू, मटका आणि जुगार चालू असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर साळगावकर चौकातील पडदा टाकलेले दुकान.
तुम्ही लहान आहात, तुम्हाला पळता देखील छान येते. तुमच्यातील वीस पंचवीस जण जर तयार झाले तर  चौकातील अड्ड्यावर लावलेला पडदा फाडण्याचे काम तुम्हाला नक्की करता येईल. एकदा का हा पडदा फाटला की सगळेच उघडे होईल आणि पोलिसांना कारवाई करावीच लागेल.

ह्या हॅण्डबिलने  शाळेत बरीच चर्चा पिकली. कोणालाच आता काय करावे समजेना. जे लिहिले होते ते तंतोतंत सत्य होते आणि सगळ्यांनाच पटत होते. काही तरी व्हायला हवे असे प्रत्येकालाच वाटत होते. फक्त घाव कोणी घालायचा हा प्रश्न होता.

आज तीन तारीख. नुकतेच पगार झाल्यामुळे आम जनतेचे खिसे गरम होते. त्यातून दसरा दिवाळी तोंडावर आली होती आणि आज शनिवार होता. त्यामुळे सायंकाळी बाजार नुसता माणसांनी फुलाला होता. सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानावर रोषणाई केली होती.

नित्य नियमाप्रमाणे गजानन संध्याकाळी कामावरून परतत होता.आजकाल मुद्दाम तो साळगावकर चौकात भाजी घेतो. तेवढाच जासुसी  केल्याचा आनंद त्याला मिळायचा. रोजच्याप्रमाणे आजही त्याची नजर त्या पडद्याकडे गेली. पडदा नुसता हलत होता. वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो गोल होऊन पुढे यायचा. त्यावेळी आतील लोकांचे पाय दिसायचे. त्या पायाकडे  पाहून तो पडदा आपणास खुणावत आहे असेच गजाननला वाटायचे. वारा  थोडा कमी झाला कि पडदा हताशपणे खाली जायचा.

पगाराच्या दिवसातील तो दिवस आल्याने आज देखील पडद्याच्या आतील बाजूस चांगलीच गर्दी झाली होती. लोक आत जात होते आणि स्वत:ला हरवून बाहेर येत होते. एकाएकी आजूबाजूच्या गर्दीतून एक पंचवीस तीस जणांचा  घोळका आपले नशीब आजमावण्यासाठी त्या पडद्याच्या कुशीत शिरला. आत खूप गर्दी झाली होती म्हणून की काय, पडदा एकदा टरटरून फुगला अन् हताश होऊन खाली येऊ लागला. तो जो खाली आला तो पुन्हा वर न जाण्याच्या इराद्यानेच जणू! क्षणभर मध्ये वेळ गेला असेल, पडद्याच्या आतून एकदम फाड – फाड, काड – काड, धडाड – धुडूम अशी फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली. मधूनच भुईनळ्यांच्याच्या चंद्र ज्योती आसमंतात उडू लागल्या, बाणांना आतमध्ये स्वस्थ बसता येईना म्हणून ते  पडद्याला फाडत आसमंतात  झेप घेऊ लागले. जणू काही त्यांना आतली सत्य परिस्थिती जगाला उघडीकरून दाखवायची होती. अचानक साजऱ्या  होत असलेल्या दिवाळीने आतील पब्लिक भेदरून गेले आणि ती मंडळी आपला जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावू लागली. ह्या सगळ्या गोंधळात त्या पडद्याची लक्तरे लोंबू लागली. आता त्या पडद्यात आतील व्यवहार झाकण्याची ताकद उरली नव्हती. एवढ्यात अजून परत एकदा उरल्या सुरल्यापैकी काही फटाके जोरात आवाज करून आसामंत हलवून गेले. त्या आवाजाच्या धमाक्याने तो उरला सुराला लटकता पडदा जमिनीवर लोळण घेतल्यासारखा पडला .अक्षरश: पडदा पडला.

मघापासून घडत असलेल्या  घटनेचा गजानन प्रत्यक्ष साक्षीदार होता.

पाच दहा मिनिटांच्या घटनेने तो अड्डा आता उघडा पडला होता. आत साठलेला घुर हळू हळू कमी होऊ लागला होता. ह्या अड्याची अब्रू आता चव्हाट्यावर आली होती. चौकामध्ये आणि दुकानाच्या आजूबाजूला फलक लटकले होते.

“खुशखबर! खुशखबर! ह्या  जुगार मटका आणि दारूच्या अड्याचा आज वाढदिवस आहे म्हणून ही आतषबाजी! या आणि सुखी व्हा! कटकटी आणि काळज्या दूर करण्यासाठी ठर्रा प्या! पैसे मिळवण्यासाठी मटका लावा! आणि नशीब आजमावण्यासाठी जुगार खेळा!!! तिन्ही सोई एकाच ठिकाणी. साळगावकर चौकात मध्यवस्तीत. खास तुमच्यासाठी एकमेव अड्डा!”

पाच पंचवीस ठिकाणी या अशा पाट्या लटकल्या होत्या. मजकूर वाचण्यासाठी लोकांचे घोळके जिथे तिथे जमू लागले. हे काय अघटीत असाच सगळ्यांच्या चेहऱ्यावर भाव होता आणि हे असेच व्हायला हवे होते  हे एक समाधान होते. हळू हळू पोलीस आले, पत्रकार आपापल्या शबनम सावरत घटनास्थळी जमा झाले. काय झाले? कोणी केला? कधी केले? कसे केले? कशासाठी केले? अशा प्रश्नांची चिरफाड सुरू झाली. ‘तिन्ही त्रिकाळ’चा वार्ताहर देखील तेथे होताच. गेल्या आठवड्यात ‘तोची गुरु’ च्या एका भक्ताचे ह्याच आशयाचे पत्र त्याच्या खाती जमा झाले होते. ह्या बिनआवाजी उठावाला प्रसिद्धी कशी द्यायची याचाच तो विचार करत होता.

गजानन जोशीने आज मुद्दाम गुलाबजामची खरेदी केली. मस्त मजेत शिळ घालत तो आपल्या सुखी कोषात शिरला.
बर्वे मास्तरांना धन्य झाल्यासारखे वाटले.
बापू बाष्ट्येला संधी हुकल्याचे दु:ख झाले.
मॉडेल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आता पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागतो की काय ? ह्या विवंचनेत पडल्या.
गिर्यारोहकांचा एक सळसळता ग्रुप शहरी दुषित वातावरणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात नवा उत्साह आणि नव्या उर्मी मिळवण्यासाठी आनंदात पाठीवर हाॅवरसॅक घेऊन  नवे शिखर जिंकण्यासाठी मार्गक्रमण करत होता. सगळ्यांच्या तोंडी एकाच भजन होते
‘तोची गुरु मानवा / घाव नकळत घालावा /
क्षणात व्हावे पसार / लोका  करू द्यावा विचार //

०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
©️ कौस्तुभ ताम्हनकर  / ९८१९७४५३९३ / kdtamhankar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – बुरांश ( Rhododendron arboreum )  

प्रियवंदाताईनी पाठवलेल्या (Rhododendron Wallichi ) फुलासारखेच फूल मला पाहिल्यासारखे आठवत होते. [ २७ नोव्हेंबर २०२५  चा ‘मैत्री’चा अंक पहा ] पाहिले आहे तर फोटो काढला नसणार, हे माझ्या बाबतीत शक्यतो शक्य नसते. जरा शोधाशोध केल्यावर क्लोजअप फोटो नाही, पण काही फोटो सापडले. आणि मन मग दोन-तीन वर्षांपूर्वी काढलेल्या हिमाचल प्रवासामध्ये गुंतून गेले.

आम्ही हिमाचलला गेलो होतो, तेव्हा एका हॉटेलमध्ये आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून गुलाबी रंगाचं सरबत देण्यासाठी एक मुलगी पुढे आलेली. आता नुकतेच कुठे हिमाचलच्या थंडीत पाय ठेवलेली मी, अगदीच गारठून गेलेली आणि त्यात हे कोकम सरबत?

आधी नकोच म्हणाले होते. पण हॉटेल मॅनेजरने ’पिऊन तर बघा.. हे इकडच्या खास फुलापासून बनविलेले पारंपारिक पेय आहे,’ असं म्हणाला. मग काय ‘फुल और मेरा तो जनम जनम का रिश्ता है’ म्हणत त्या सरबताचा आस्वाद घेतला. आधी तर मला ते कोकम सरबतच वाटले होते. थोडं जास्त पाणी मिसळल्यावर जो गुलाबी रंग येतो तोच आणि तसाच.

आंबट गोड चवीच ते सरबत मला भलतंच आवडून गेलं. मग सुरू झालं मॅनेजरकडे त्याची माहिती विचारणं. अगदी जुजबी माहिती आणि त्या फुलाची बनवलेली पावडर आणि ज्यात पावडर ठेवली होती त्या बॉक्सवरची फुलं  बस्स..एवढीच माहिती पुरवली आणि आपल्या कामाकडे वळला.

एवढ्याने आपलं मन भरणार काय? करंगळी दिली की हात धरणारी म्हण आहे आपल्याकडे. एवढाशा माहितीने काय पोट भरणार माझं. पुन्हा माहिती विचारली तर थोड्या त्रासिक नजरेने त्याने , “मॅडम ये local flower है “ म्हणत परत कामात गढला. नवऱ्यानेही मग माझा हात खेचतच रूममध्ये नेलं. ’मगाशी तर तुला खूप थंडी वाजत होती, सरबत पण नको होतं’ रागाने म्हणाला . ‘तुम क्या जानो एक एक फुलों का आनंद अभिजीत बाबू’ असा डायलॉग फेकावासा वाटला, पण आपली आवड इतरांना कशी असेल? असो..

पण रात्री डिनरच्या वेळी मात्र अगदी नरमाईने पुन्हा एकदा मॅनेजरकडे त्या फुलाची चौकशी केली, आणि मला ते पाहायचं आहे अशी विनंतीही. त्याचा आता जरा मूड बरा होता. म्हणाला,  ”आता त्याचा सिझन संपत आला आहे. माहित नाही झाडावर असतील की नाही, आणि ती झाडंही आवर्जून कुणी लावत नाही. डोंगराळ जंगलात असतात.”तरीही….उरलीसुरली असतील काही माझ्यासाठी.. दाखवाल का मला? पाहायचे आहेत! असं मी बोलल्यावर त्याने तिथेच काम करत असलेल्या एका पोराला बोलावून त्याला विचारलं. तो म्हणाला ”माझ्या घराजवळच्या जंगलात आहे, पण फुलं असतील की नाही ते माहित नाही”. नाही- हो करता शेवटी दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं. एका फुलासाठी एवढी मगजमारी म्हणून नवरा आणि मुलीने थोडे आढेवेढे घेतले, पण मला एकटीला कसं पाठवायचं, म्हणून आले बिचारे माझ्यासोबत .

दुसऱ्या दिवशी आम्ही त्या मुलासोबत ओपन जीपमधून जायला निघालो. कांगडा जिल्ह्यातील कोणतं तरी गाव होतं त्याच. रस्त्यावर जीप जणू मागील दोन पायावर उभी पळतेय एवढा मोठा चढ आणि घाट वळणाचा रस्ता होता. आणि उजवीकडे खाली मोठी खोल दरी. त्यातून कुठलीशी वाहणारी हिरवी नदी, आजूबाजूला डोंगराच्या डोक्यावर सकाळी पडलेलं बर्फ, त्यात आम्ही जात असताना बारीक बारीक गारा आमच्या अंगावर पडून झालेलं स्वागत …

गारा पडण्याचं कमी झाल्यावर जाऊ, म्हणत त्याने जीप एका मंदिराच्या आवारात थांबवली . वरून मोत्यासारखा छोट्या छोट्या गारा आणि तो सोबतीला गार गार वारा छान कॉम्बिनेशन होतं, पण दात, ओठ, शरीर सगळंच बोलू लागलं होतं. थरथरत आजूबाजूला नजर टाकली,तर चोहो बाजूंनी हे मोठाले डोंगर,घनदाट जंगल आणि त्यात आम्ही थांबलेलो ते गुफेतील शिवमंदिर. पाचशे वर्ष जुनं श्री सिद्धपीठ अंघजार खनियारा. धौलाधर पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं. महाभारताशी संबंधित.

असं मानलं जातं की अर्जुनाने इथे शिवाची तपस्या केली होती, आणि शिवाने अर्जुनाला इथेच ’पशुपती अस्त्र’ वरदान म्हणून दिले होते . तपस्यासाठी त्यांने जो अग्नि प्रज्वलित केला होता तो अजूनही इथे अखंड प्रज्वलित आहे. मंदिराच्या समोर असलेली सहा- सात फूट उंचीची तुळस मला आवडून गेली. एका सुंदर आणि शांत, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर माझ्या मनाला शांत करून गेलं. नक्कीच देवाला तिथे राहायला आवडत असेल.!

गारा थांबल्यावर पुन्हा प्रवास सुरू करून डोंगराच्या एका टोकावर जाऊन जीप थांबली. व तिथून पुढचा डोंगर चढायचा प्रवास पायी करावा लागणार होता. कारण त्यापुढे जीप जात नव्हती. चढ चढताना बरीच दमछाक होत होती. सोबत मुलीचे आणि नवऱ्याचे बोलही साथ करत होतेच. पण त्या गुलाबी फुलापुढे सारं फिकं होतं.  ’भेटी लागे जीवा, लागलीसे आस’ या आवडीने मी तर डोंगर चढत होते.

डोंगर चढत असताना पायवाटेच्या कडेला एक ‘बिच्छू बुटी’ म्हणून जास्वंदा सारखी पानांची पण सर्वांगावर भरपूर काटे असलेली वनस्पती उगवलेली असते. तिला फार म्हणजे फार काटे असतात .आणि त्या काट्यांचा आपल्याला स्पर्श झाला तर त्याच्या पानावर असलेली कुस आपल्याला खाज ,जळजळ आणि अंगावर फोड असा प्रसाद देऊ शकते.तिला सांभाळत फुलांपर्यंत पोहोचायचं होत. या बिच्छू बुटीची अजून एक माहिती कळली ती म्हणजे या बिच्छू बुटीची तिकडचे लोक भाजी बनवून खातात. आपला कीचनचा चिमटा असतो त्याने या काटेरी भाजीचे कोवळे शेंडे तोडून गरम पाण्यात घालून त्याची भाजी बनवली जाते. ती फार औषधीही असते.

एवढी जद्दोजहद करून शेवटी एकदाच मला ते गुलाबी फुलांचं म्हणजेचं बुरांशच फुलांनी भरलेलं झाड दिसल. फुले असतील की नाही ही इतरांनी निर्माण केलेली शंका फोल ठरली. गुलाबी फुलांचे घोसच्या घोस हिरव्या जर्द पानांमधून माझ्याकडेच बघत असल्याचं मला जाणवत होत. एकच अडचण होती ती म्हणजे मी त्यांना किंवा झाडाला स्पर्श करू शकत नव्हते. कारण ते खोल दरीत होते. लांबूनच एक फोटो काढून पुढे निघाले.

थोडं पुढे आल्यावर सोबत आलेला मुलगा म्हणाला ”आप यही रुखना,मै थोडी देर मे ही आता हु ।” मला वाटलं त्याचं घर इथेच आहे तर तिथे जाऊन येईल. आम्ही तिथेच एका दगडावर बसलो. तिथून खाली पूर्ण हिमाचल नजरेच्या टप्प्यात दिसत होता. अगदी शुद्ध ताजी थंडगार हवा चारी दिशांनी येत होती. काही वेळातच तो मुलगा येताना दिसला आणि त्याच्या हातात बुरांश फुलांचे गुच्छच्या गुच्छ दिसत होते. येताच माझ्या हातात देऊन म्हणाला ”ये लो मॅडम, कल से आपको देखने थे ना, ये फुल ! उपर पहाडी पर और एक झाड दिखा। उधर से ले आया.

बापरे..! आनंद गगनात मावेना याचा वाक्यात उपयोग शाळेत केला होता कधीतरी. पण इथे खरच शब्दशः त्याचा प्रत्यय आला होता. फुले हातात घेऊन जो आनंद झाला त्याचं वर्णन करायला माझ्याकडे अजूनही शब्द नाहीत.
त्या मुलाने गुच्छातील एक फुल तोडून त्यातील पुंकेसर काढून टाकून मला खायला दिलं. एवढं सुंदर नाजूक पाकळ्यांचं फूल खायला खरं तर जीवावरच आलेलं. पण एक पाकळी चाखली. आंबट गोड चवीची ती चव मी आयुष्यभर विसरणार नाही. नवऱ्याला आणि मुलीलाही एक एक गुच्छ देत फुशारकीने म्हणाले ”अगर किसी चीज को पूरी सिद्धत से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने की कोशिश मे लग जाती है “. नवरा मिश्किलपणे हसला. त्या मुलाला धन्यवाद देत बुरांशसह आम्ही पुन्हा हॉटेलकडे रवाना झालो…!

– ©️ सविता कांबळे

savitak211@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(55) 

My wife and I tried two or three times in the last 40 years to have breakfast together, but it was so disagreeable we had to stop. 

– Winston Churchill

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

 – पृष्ठ ६३ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी

 madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

दशावतारातील दुसरा अवतार

—- कूर्म अवतार ——

दशावतारात l दूजा अवतार l
कूर्म अवतार l हा विष्णूचा ll१ll
दुर्वास ऋषींनी l एकदा इंद्राला l
पारिजात माला l भेट दिली ll२ll
पण इंद्र होता l अहंकारी मोठा l
त्याचा बहु ताठा l आड आला ll३ll
त्याने तीच माला l लगेच फेकली l
ऐरावती गळी l तुच्छतेने ll४ll
ऐरावताने ती l मग तुडविली l
निज पायदळी l सहजच ll५ll
ह्यास्तव इंद्राला l दुर्वास ऋषीने l
बहु संतापाने l शाप दिला ll६ll
दुर्वास उवाच l होशील श्रीहीन l
अन् शक्तीहीन l तू हे इंद्रा ll७ll
शापाच्या प्रभावे l इंद्र खालावला l
खंगत तो गेला l दैनंदिन ll८ll
सर्व देवगण l गेले विष्णूकडे l
घातले साकडे l श्री विष्णूला ll९ll
श्रीविष्णू उवाच l समुद्राचे करा l
मंथन सत्वरा l इंद्रासाठी ll१०ll
झाले देव दैत्य l मंथना तयार l
पर्वत मंदार l वापरून ll११ll
तरण्या सागरी l मंदार पर्वत l
विष्णू मग घेत l कूर्म रूप ll१२ll
नारायण झाला l कूर्म अवतार l
मंदाराचा भार l सोसीयेला ll१३ll
समुद्रमंथन l पार ते पडले l
त्यातून मिळाले l बहुविध ll१४ll
विष्णूचा दुसरा l हाच अवतार l
त्याचे उपकार l जगावर ll१५ll
माधव हा म्हणे l धर्मा येता ग्लानी l
विष्णू ह्या भुवनी l अवतरे ll१६ll

[ चित्र गुगलवरून साभार ]

[ पूर्वप्रसिद्धी ‘सज्जनगड’ मासिकाचा नोव्हेंबर २०२५ चा अंक ]
– ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

भिल्याचं घर !

कथा 

प्रकाश पेठे

डोंगराआडून सूर्य वरती आला. नदीच्या खो-यात ऊन पडलं. भाट्यातली वाळू चमकायला लागली. भिल्याचे आई-वडील केव्हाच उठले होते. ते नदीवर आंघोळही करून आले होते. भिल्याच्या आईने भिल्याला उठवलं.
 “अरे भिल्या उठ ! पहा सूर्य किती वर आलाय ! आज होळीची जत्रा नाही का ? आपल्याला सर्वांना नाचायला जायचंय. “
भिल्या डोळे चोळत उठला. त्याने आळस दिला. इकडे तिकडे पाहिलं. सगळे केव्हाच तयार झाले होते. त्याचा आळस पळाला. त्याने तोंड धुतलं आणि आंघोळीसाठी नदीवर धावला.
नदी संथ वाहात होती. पात्र रुंद होतं. निळंशार पाणी पाहून भिल्याचं मन प्रसन्न झालं. त्याने उंचावरून पाण्यात सूर मारला. ब-याच अंतरावर जाऊन पाण्याखालून डोकं वर काढलं. भिल्या पाण्यात पडला की मासाच होई. नदी, डोंगर, जंगल यांच्या सहवासात राहिल्याने त्याच्या अंगी सर्व प्राण्यांचे गुण उतरले होते. कां कुत्र्यासारखे तिखट होते. नजर कावळ्यासारखी होती. झाडावर तो माकडासारखा चढायचा. ताडाच्या झाडावर शेंड्याला माठ लावून तो खाली उतरायचा ते कळायचंसुद्धा नाही. भिल्याने झटपट आंघोळ आटोपली. घरी आला. धोतर कसलं. शर्ट घातला. कंबरेला पिवळं फडकं बांधलं. डोक्याला लाल पागोटं बांधलं. त्यात मोराचं पीस खोवलं. गळ्यात मण्यांची माळ घातली. कमरेच्या पिवळ्या पट्ट्यात वेळूचा पावा खोचला. आणि तयार झाला. सावळ्या रंगाचा आणि पाणीदार डोळ्यांचा भिल्या छान दिसत होता. आज होळीच्या मुहूर्तावर त्याचं लग्न ठरायचं होतं. म्हणूनही तो जास्त खुशीत होता.
शेजार पाजारची सगळी मंडळी तयार झाली होती. भिल्याच्या वडिलांनी मोहाच्या दारूचं पातेलं आणलं. सर्वांना भांडं भांडं मोहडी पाजली. मोहडीनं तिचं काम केलं. सगळे तंद्रीत चालायला लागले. भिल्याच्या बापाच्या गळ्यात ढोल होता. त्याच्या भावानं वेळूच्या पाव्यावर सूर धरला.    
दूर मैदानात आजूबाजूच्या गावातले लोक जमले होते. एकाच उंचीच्या मुलींनी एकमेकींच्या खांद्यावर हात गुंफले होते. त्यांनी गाणी म्हणत फेर धरून नाचायला सुरुवात केली. त्यात मंगलीही होती. दुसरीकडे मुलांचा गट नाचत होता. त्यात भिल्या शिरला. सगळे गट नाचून थकल्यावर झाडांच्या सावल्यांखाली थांबले. त्यानंतर मंगलीच्या आई-वडिलांना भिल्याच्या घरची सगळी मंडळी भेटली. मंगली आणि भिल्याचं लग्न ठरलं.     
नंतर मंगली भिल्याच्या घरी राहायला आली. सगळे म्हणाले, ” आता भिल्याचा संसार वाढणार. त्याच्यासाठी वेगळं घरटं बांधायला हवं.” घरातले सगळेच त्या कामाला लागले. होळी सरते ना सरते तोच चैत्री पुनवेची जत्रा आली. या वेळची जत्रा नव्या जोडीसाठी नवी होती. पुनवेचा दिवस उजवला. मंगली आणि भिल्या लवकर उठून तयार झाले. मंगलीनं आज नवे कपडे घातले होते. पायांत चांदीचे वाळे होते. नाकात फुलाच्या आकाराची नाजुक चमकी होती. ती दोघं  सगळयांच्या आधी घराबाहेर पडली.
सगळे त्यांच्याकडे पाहात होते.  
दोघं जत्रेत फिरली. पाळण्यात बसली. आईस्फ्रुटे खाल्ली. मंगलीसाठीं मण्यांची माळ घेतली. तसंच नव्या घरासाठी लागणा-या बारीक बारीक वस्तू घेतल्या. दोघांच्याही सावल्या लांब लांब पडायला लागल्या. त्यांना कळलं, संध्याकाळ व्हायला लागली आहे. बाकीची माणसं त्यांच्या आधीच घरच्या वाटेला लागली होती. नवं घर कसं बांधायचं याचा विचार करीत करीत टी केव्हा घरी पोचली ते त्यांनाच कळलं नाही.     
मंगलीनं भिल्याला सांगितलं, ” मी बांबूच्या वनात जाऊन बांबू घेऊन येईन, जमीन सारखी करीन, तू बाकीच्यांना घेऊन ओंडके, वळ्या वगैरे घेऊन ये आणि दुसरी कामं कर. “
राज सकाळी मक्याच्या भाक-या आणि मिरचीचा ठेचा खाऊन घरातले सगळे जंगलात जात. भिल्याच्या खांद्यावर तीरकमठा आणि हातात कु-हाड असायची. नव्या घरासाठी खांब, तुळया, भालं, टेकण, ओंडके, फाटी, पाचरं, सगळं जमलं. सगळ्यांनी मिळून खड्ड्यात खांब उभे केले. त्यांच्या बेचक्यातून भालं बसवली. तुळया बसवल्या. भिंतीसाठी बांबूच्या तट्ट्या लावल्या. हवा येण्यासाठी जागा सोडून बाकीच्या तट्ट्यावर माती लिंपली. सूर्य ज्या दिशेला मावळतो त्याच दिशेकडून पावसाचा मारा होतो ही गोष्ट लहानपणीच बापाकडून कळली होती, म्हणून त्या बाजूचं छप्पर जास्त कलतं आणि कमी उंचीचं केलं. रोज नवं नवं काम होत होतं. मंगली आणि भिल्याला रोज नवा आनंद होत होता.     
आल्या गेल्याला घरात बसायची सोया हवी म्हणून पुरुषभर लांबीचा सपाट ओंडका गुडघाभर उंचीवर बसवला. मंगलीनं त्यावर बसून पाहिलं. खांबाला टेकून ती स्वतःशीच हसली. ते भिल्यानं पाहिला आणि गालात हसला. पिण्याच्या पाण्याची सोया असावी म्हणून बैठकी शेजारी घडवंची उभी करून तीवर माठ ठेवले. सर्व बारीकसारीक गोष्टींची सोया होत होती. मंगलीचे कपडे टांगायला तिनं एक बांबू आडवा टांगून ठेवला. मुंडाशी ठेवायला बेचकी असलेलं लाकूड हाताच्या उंचीपर्यंत बसवलं. लाडक्या गाईसाठी घरातच सोय केली.     
बांबूच्या बनातून आणलेल्या बांबूच्या फाडी लावून झाल्या होत्या. छपराच्या वळ्या आधीच बसवल्या होत्या. नळीची कौलं तयार होती. आता फक्त कौलं बसवायचं काम बाकी होतं.
सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत भिल्या आणि मंगली सतत काम करीत. कौलं घालायला सुरुवात झाली. मंगली शिडीवर चढून कौलं देई आणि भिल्या टी व्यवस्थित रचीत होता. पाहता पाहता अर्धं घर शाकारून झालं होतं. आता दोन दिवसात सगळं घर पूर्ण होणार याचा आनंद मंगलीच्या चेह-यावर मावत नव्हता. त्याच धुंदीमध्ये ती एक एक कौल भिल्याला देत होती आणि भिल्या गाणं गुणगुणत बसवत होता. इतक्यात त्याचं दूरवर लक्ष गेलं. त्याचा मित्र मंगा येत होता. मंगाबरोबर एक शहरी साहेबही येत होता.    
 भिल्या जंगलातल्या बिबळ्यालासुद्धा भीत नसे. सापाला तर तो शेपटी धरून आपटी. पण तो शहरी माणसाला बुजून असे. शहरी माणूस त्याला जादूगार वाटे. त्याचा भरवसा वाटत नसे. त्यांचे वेगळे कपडे, बूट, उघडे डोके, याची त्याला जरब वाटे. मंगा आणि साहेब जवळ आले. मंगाचा चेहरा भांबावलेला होता. भिल्या पण चरकला. तो दोन्ही हात मांडीत धरून उकिडवा बसला. त्याने मंग्याला डोळ्यानंच विचारलं, काय भानगड आहे ?” मंगा म्हणाला, ” साहेब काय म्हणतोय बघ. “
“तुझं नाव भिल्या आहे ना ? ” भिल्याने डोकं खालीवर करून होकार दिला. ” आम्ही ह्या नदीवर धरण बांधणार आहोत. त्यात तुमचं गाव, तुझं हे घर पाण्याखाली बुडणार आहे. “
 भिल्याला काही कळलंच नाही. तो साहेबाकडे थंड डोळ्यांनी पाहात राहिला. साहेबाने सर्व नीट समजावून सांगितलं.     
पाहता पाहता भिल्याच्या डोळ्यात शांतता पसरली. मेलेल्या कुत्र्यासारखे त्याचे डोळे दिसायला लागले. झाडाच्या मोडलेल्या फांदीसारखे त्याचे हात लोंबकळायला लागले. मंगलीलाही सगळं कळून चुकलं. ती घोरपडीसारखी शिडीला चिकटली. तिच्या डोक्यावरून पदर होता. त्यामुळे तिचं तोंड दिसत नव्हतं.     
भिल्याच्या निर्जीव हातातून कौल खाली पडलं आणि फुटलं. भिल्या अर्ध्या उघड्या छपरावर तसाच बसून राहिला.
(  महाराष्ट्र टाइम्स : मैफल रविवार पुरवणी : २८ ऑक्टोबर १९९० , २३ ऑक्टोबर २०१६ च्या मैत्री मध्ये पूर्वप्रसिद्ध  )

– ©️ प्रकाश पेठे

prakashpethe@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

त्या तिघी…

त्या दोघींची इतक्या वर्षाच्या अंतराने भेट होणार या कल्पनेनेच ती आनंदली. सोशल मीडियाचा असाही एक फायदा होऊ शकतो याची तिने कल्पनाही केली नव्हती. लहानपणीच्या मैत्रीबाबत आपण नको तितके नॉस्टॅल्जिक असतो. या दोघी जुळ्या बहिणी तर तिच्या बरोबर बारावीपर्यंत एकाच बेंचवर बसलेल्या. ती नेहमी या जुळ्या बहिणीच्या मध्ये बसायची. त्या तिघीचे छान गुळपीठ जमायचे. काहीच लपून नव्हते त्या तिघीत. त्या दोघी तिच्याकडेच अभ्यासाला जायच्या नेहमी. त्यांच्या घरचं वातावरण पोषक नव्हतं अभ्यासाला. त्या दोघींचा लहान भाऊ मतिमंद होता. तो आरडाओरडा करायचा. कधीकधी विचित्रासारखा वागायचा.वडिलाना व्यसन होतं. ते सारखे दौऱ्यावर असायचे कंपनीच्या कामानं.आई या सगळ्यामुळे वैतागलेली असायची. ही एकुलती एक. लाड कौतुकात वाढलेली. घरची श्रीमंत. त्यामुळे दोघींना तिच्या घरचं वातावरण कुल वाटायचं.बारावी नंतर त्या तिघी विलग झाल्या. तिचे वडील परदेशात गेले. तिकडेच तिचं पुढचं शिक्षण झालं. या दोघा जुळ्या मैत्रिणीचा संबंध तेव्हाच तुटला.
मध्यंतरी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं.
तिला परदेशातच आय टी कंपनीत नोकरी लागली..त्याच कंपनीतील कलिगशी तिचं लग्न झालं. दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करीत होते. तो तिला सिनियर. सर्वच बाबतीत एग्रेसिव्ह. ड्याशिंग पर्सनालिटी. तिला तो आवडला. घरच्यांनी देखील हरकत घ्यायला कारण नव्हतं. सगळेच तिकडच्या सुधारकी वातावरणात रुळलेले.
पण लग्नानंतर तिचा भ्रमनिरास झाला. मित्र, कालिग म्हणून तिने ओळखलेला तो प्रत्यक्षात वेगळाच निघाला. एक लिंगपिसाट, विकृत माणूस!!सांगायलाही लाज वाटावी अशा वर्तनाचा..खरे तर तिच्या कल्पनेतलं नवरा बायकोचं नातं पारिजातकासारखं नाजूक..रेशमी..हळुवार.. पण त्याचं सगळच वेगळं..दिवसा नॉर्मल असणारा तो रात्रीच असा अक्राळ विक्राळ का वागायचा हे तिलाही कळत नव्हतं. तिने त्याला डॉक्टर, मनो विकार तद्न्य यांचा सल्ला घेण्याचा हट्ट धरून पाहिला. पण त्यानं तो धुडकावून टाकला. त्याच्या मते त्यात अनैसर्गिक, आगळं वेगळं असं काहीच नव्हतं. असतो एकेक जण आक्रमक. पण तिला ते पचत नव्हतं. पटत नव्हतं. अन् हे सगळं ती सांगणार तरी कुणाला, अन् कोणत्या शब्दात? आईनं तिलाच वेड्यात काढलं. तिचं म्हणणं सुरुवातीला असतं कुणी असं आक्रमक..त्याला विकृत नाही म्हणत. पण त्याचे घाणेरडे अश्लील चाळे आईला कोणत्या शब्दांत कसे समजावून सांगावे, हे तिलाच कळत नव्हतं.

अशा वेळी तिला या दोघा जुळ्या वर्गमैत्रिणीची तीव्रतेने आठवण व्हायची. त्या शाळेत असताना सगळं शेअर करायच्या. कसलाही आडपडदा न ठेवता! वयात येतानाची स्थित्यंतरं, घरची गुपितं, त्या वेळचं काफलव्ह, सगळच एकमेकींना सांगण्यात समाधान वाटायचं. पण अचानक दोघींचा साथ सुटला. तिच्यासाठी वडिलांबरोबर जाण्याशिवाय, इंडिया सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तिची मम्मी फार एक्साईटेड होती तिकडे जाताना. डॉलरमध्ये भरघोस पगार, तिकडची सुखवस्तू लाइफ स्टाईल हे सगळं सर्वांनाच आवडणारं..ती सुरवातीला सुखावली होती तिकडच्या आकर्षणानं. पण हळूहळू तिचा भ्रमनिरास झाला. तिकडचे शिक्षण, कॉलेज लाईफ सगळेच वेगळे होते इथल्या पेक्षा. संस्कृती, चालीरीती, यातला बदल तर धक्कादायक तिच्यासाठी. तिकडे कुणीच कुणावर अवलंबून नव्हते. नात्यात, मैत्रीत कोरडेपणा होता. स्पर्शात जवळीक नव्हती. लळा जिव्हाळा नव्हता. पण ती परिस्थिती आहे तशी स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता. स्वातंत्र्य होतं. मोकळीक होती. करियरची देखील चिंता नव्हती. पण तरीही तिला आतल्या आत कसलं तरी दडपण जाणवत होतं. त्या तिकडच्या संस्कृतीतला थिल्लरपणा तिला पचत नव्हता. आपल्या जवळच्या गोष्टीचं महत्व त्या गोष्टी आपल्यापासून हिरावून घेतल्या नंतरच आपल्याला कळतं. तिला सारखी राहून राहून त्या दोघींची आठवण यायची. तिला सर्वात पहिल्यांदा पिरियड आला तेव्हा त्या दोघांनीच तिला हवं ते दिलं होतं. सावरून घेतलं होतं. हे ती कधीही विसरू शकली नाही. तिकडे परदेशात तिला अनेकदा एकटं वाटायचं. म्हणजे अवती भवती सगळं आहे, आपल्या हवंहवंसं वाटणारं.. सुखसमाधान देणारं.. पण आनंद देणारं नाही.. लग्नानंतर तर ती वेगळ्याच भाव विश्वात अडकली. सांगताही येत नाही. अन् सहनही होत नाही..अशी विचित्र परिस्थिती. त्यावेळी ती व्याकुळ व्हायची त्या दोघींच्या आठवणींनी..इतक्या दुरून संपर्क साधायचा तरी कसा? कुठे?

अन् अनेक वर्षांनी अचानक तिला सोशल मीडियावरत्या जुळ्या मैत्रिणीपैकी मोठीचं नाव दिसलं. तिनं संपर्क साधला. तिचाही रिस्पॉन्स आला. तेव्हाच तिनं ठरवलं. इंडियात जायचं. त्या दोघींना भेटायचं. त्यांच्या गळ्यात गळा घालून पोटभर रडून घ्यायचं. आपण इतकं सगळं विचित्रासारखं भोगलं. ते सारं सारं त्यांना सांगायचं.
तिला खात्री होती. त्या दोघी आपल्यापेक्षा निश्चितच सुखी, आनंदी असतील. आपापल्या संसारात रमल्या असतील. कारण दोघीही हुशार होत्या चांगल्या. कर्तबगार होत्या. घरची परिस्थिती आपल्या इतकी चांगली नव्हती. मतिमंद लहान भावाची स्थिती तेव्हाच हाताबाहेर गेली होती. त्यावर काही उपाय नव्हते. ते ओझं जन्मभर सांभाळावं लागणार होतं घराला. वडील व्यसनी.. तापट स्वभावाचे. ती विचार करायला लागली. काय घडलं असेल या दोघींच्या आयुष्यात आपण परदेशात निघून गेल्यावर? त्यांचं करियर, त्यांचं लग्न, संसार.. आपल्यापेक्षा सुखी आनंदी असतील का त्या दोघी? तिला जाणून घ्यायचं होतं..खरं तर तिला कॉम्पिअर करायचं होतं..माणूस नेहमी तुलना अन् स्पर्धा या दोन पारड्याच्या तराजूचा तोल सांभाळण्यातच सगळं आयुष्य घालवतो. त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता आहे असं त्याला वाटतं.

तिने भारताची टूर प्लॅन केली. वर्षभरापूर्वी ती नवऱ्याच्या जंजाळातून सुटली होती घटस्फोट घेऊन.. ती केस देखील बरीच लांबली. तोपर्यंत तिच्या पदरी एक बाळ देखील आलं होतं. इच्छा नसूनही! मुल लहान असल्याने ताबा तिच्याकडेच आला. तिनेही तो स्वीकारला. या बाबतीत आईबाबांनी पूर्ण सपोर्ट दिला तिला. तिची आई आनंदाने तयार झाली नातवाला सांभाळायला. तिकडच्या नियमाप्रमाणे तिला आर्थिक कमपेनसेशन मिळालं भरपूर. त्यामुळे ती चिंता नव्हती. पण आयुष्यातली उमेदीची, तारुण्यातली सहासात वर्षे वाया गेली एका वादळवाऱ्यात भरकटण्यात! विचित्र परिस्थितीशी संघर्ष करण्यात. त्याचं खरं दुःख होतं.
तिला आता थोडं मागे वळून बघायचं होतं. स्वतःला तपासायचं होतं. त्यासाठी त्या दोघींना भेटणं गरजेचं होतं. कारण त्या दोघी बेंचमार्क होत्या लहानपणी तिच्यासाठी. त्यांच्याकडे बघून ती सारं काही ठरवायची. काही समजलं नाही तर दोघींना विचारायची. त्या दोघींचे सल्ला घ्यायची अडीअडचणीला. खरं तर आता ती सुटली होती एका अग्निदिव्यातून. तो गेला काळ तिच्यासाठी परीक्षेचा होता. तिची सहनशक्ती तपासणारा होता. आपल्याच नशिबी हे सगळं का असा एक स्वाभाविक प्रश्न तिलाही पडला. आपण चुका केल्या अन् मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले तर आपण समजू शकतो. पण आपली काहीही चूक नसताना हे असले भोग आपल्या नशिबी का येतात? या मागचं नेमकं लॉजिक काय? हे तिला विचार करूनही, डोकं आपटूनही समजत नव्हतं. अन् तिकडे परदेशात तिला समजावणारं देखील कुणी नव्हतं. आईवडील होते. नाही असं नाही. पण त्याचं समजावणं पारंपारिक होतं. लहान मुलाला गुटी उगाळून पाजण्यासारखं होतं. प्रत्येक सत्य गळी उतरायला सोपं नसतं. आपल्या जवळची मंडळी नेहमी आपल्यालाच दोष देतात. त्यांना तटस्थपणे बघताच येत नाही त्यांना तुमच्या समस्येकडे. त्यांना एकच बाजू दिसते.

तिला वाटलं, नव्हे तिची खात्री होती, त्या दोघीच समजून घेतील तिला. शाळेची अकरा वर्षे एकाच वर्गात, एकाच बेंचवर बसलेल्या त्या तिघी दुधात साखर विरघळावी तशा एकजीव झालेल्या त्या काळी! त्यामुळे न सांगताही समजून घेतील त्या दोघी तिची समस्या, तिची वेदना, तिचं खरं दुःख.त्यांच्याकडूनच मिळेल समाधानकारक उत्तर.. तिचं नेमकं काय चुकलं? तिच्याच नशिबी का आलेत हे असले भोग?

हे प्रश्न तिला सातत्याने छळत होते. पण कुणीच तिचं समाधान करू शकलं नाही. आईवडील देखील नाही.
त्यांनी तिला हवा तो सपोर्ट दिला. कोर्ट कचेरीच्या वेळी मदत केली. तिच्या मुलाला देखील सांभाळलं आईनं. आताही ती इंडियाला जायचं म्हणाली तेव्हा मुलाला आईकडेच ठेवणार होती. किती तरी वर्षांनी ती इंडियात परत जाणार होती. आतापर्यंत न मिळालेली उत्तरं शोधायला..त्या दोघी बालमैत्रिणींना भेटायला. ती मावशीकडे उतरली राहायला. नातेवाईकांपैकी मावशी तिला समजून घेणारी होती. एरवी नातेवाईकांमध्ये टीका टिपणी, चांभार चौकशाच जास्त. ठरल्याप्रमाणे आल्या आल्या तिने दोघींना कॉन्टॅक्ट केला. खूप उत्सुकतेने, जिव्हाळ्याने बोलल्या दोघी. तिला तेव्हढच बरं वाटलं.
तिघींनी अशोका हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं.
तिला जरा आश्चर्यच वाटलं. तिला वाटलं त्या दोघी घरी बोलावतील तिला. पूर्वीच्या आपुलकीने. नाही म्हटले तरी हॉटेलच्या वातावरणात मोकळेपणा नसतो संवादात. पण त्याच म्हणाल्या, अशोकात भेटू, तुझ्या आवडीची पाईनएपल पेस्ट्रीज खायला!
शाळेत असताना अधून मधून जायच्या तिघी अशोकात. परीक्षा झाल्या की अशोका शेजारच्या थिएटरमध्ये एखादा चांगला पिक्चर बघायचा. अन् मग अशोकात बसून पेस्ट्रीज अन् एक्सप्रेसो कॉफीचा मस्त स्वाद घ्यायचा! या तेव्हाच्या सुखाच्या,आनंदाच्या कल्पना होत्या तिघीच्या!

ठरल्या वेळी ती अशोकात पोहोचली. तिच्या पाठोपाठ त्या दोघीही पोहोचल्या. ती बघतच राहिली त्यांच्या कडे. ओळखूच शकली नाही आपल्या जुन्या मैत्रिणींना..इतक्या बदलल्या होत्या..तीही कुठं तशीच राहिली होती? पुलाखालून कितीतरी पाणी वाहून गेलेलं. तिघीच्याही आयुष्यात अमुलाग्र बदल झालेले..आजुबाजूच्या लोकांची, वातावरणाची परवा न करता त्यांची गळाभेट झाली. दाटून आलेले हुंदके कसेबसे सावरत, मीठ्या मारत त्या अशोकात पोहोचल्या. अगदी कोपऱ्यातील टेबल बघून स्थिरावल्या तिघी एकदाच्या.

सुरवात तिनेच केली आपल्यापासून..अगदी भारतातून गेल्यापासून आधी बसलेले कल्चरल धक्के.. मग त्यातून सावरता सावरता झालेलं शिक्षण, त्यातून आलेली स्वावलंबी, स्वतंत्र राहण्यातली स्थिरता, तिकडच्या मैत्रीतला नको तितका मोकळेपणा, शिक्षणानंतर आय टी करियर मधली धावपळ, डेड लाइन, टार्गेट, पॅकेज ची भाषा, त्याच काळात भेटलेला तो, ती रोमांचक, अन् तितकीच अनिश्चिततेच्या गर्तेत गुरफटत जाणारी जवळीक, मग लग्न, अन् शेवटी त्याचे न अपेक्षिलेले अत्याचार, शरीराचा झालेला पाचोळा..त्यात पदरी पडलेलं मूल, अन् शेवटी घटस्फोटाच्या तारखा..तिकडच्या नियमाने बरच काही हरवून हाती लागलेला आर्थिक लाभ.. ती बोलत राहिली..त्या दोघी ऐकत राहिल्या.

मग मध्येच थांबून तिनं विचारलं, ”आता तुम्ही दोघी बोला..तुमचं काय? काय कमावलं,काय गमावलं?”
दोघी हसून एकमेकींकडे बघायला लागल्या. नेहमीप्रमाणे थोरलीने पुढाकार घेतला. खरे तर दोघी जुळ्या बहिणी..म्हणजे एकाच वयाच्या.पण हॉस्पिटलच्या रेकॉर्डप्रमाणे एक दुसरीपेक्षा दोन मिनिटांनी मोठी होती!

“ तुला एक सांगू? आपण आपल्या आयुष्याचा हिशेब करतो तेव्हा बेरजा वजाबाक्या करतो गणितातल्या  सारख्या. पण हे हिशेब इतके सोपे नसतात. कारण आयुष्याला अमुक असं एखादं सूत्र लागूच होत नाही. आम्ही दोघीही ग्रॅज्युएट झालो. नोकरी केली काही वर्ष. मी तर लग्न देखील केलं औट घटकेसाठी. आता हे असं का ते विचारू नकोस. मी मांडव परतणीसाठी माहेरी आले ती परतलेच नाही पुन्हा. तेही का ते विचारू नकोस. कारण हजार पानाचे महाभारत अशा एखाद तासाच्या अवचित घडून आलेल्या भेटीत समजावून नाही सांगता येत. आजही लग्नाला बाजार म्हणतात. हुंडाबळी, मानापमान, लग्नाचे वाढते तीन चार दिवसांचे सोहळे अन् त्यासाठी होणारी लाखो करोडोची उधळपट्टी..समाज बदलला असे आपण म्हणतो. पण लाखो रुपये खर्चून लागलेल्या, जुळलेल्या लग्नाचं शेवटी काय होतं, याचा विचार केलाय कुणी? या उधळपट्टीतून नेमका कुणाला आनंद मिळतो? त्यातून नेमकं काय साधलं जातं, काय सिद्ध करायचं असतं याचं उत्तर कुणालाच मिळत नाही. मुळात हे उत्तर कुणी शोधतच नाही! शिकल्या सवरल्या माणसांना कळतं की आपण चुकतोय. तरी आपण सारखे चुका करीत जातो. त्यातून थोडंफार शिकत जातो.

“काही जखमा आयुष्यात कधीच भरून निघत नाहीत. हे म्हणणं सोपं असतं की मागचं विसरा, पुढे चला. माझा कटू अनुभव बघून हिने तर लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. कारण तुला एक सांगते. लग्न, संसार यातलं यश हे कुण्या एका व्यक्तीवर म्हणजे नवरा किंवा बायकोवर अवलंबून नसतं. त्यात गणिताच्या भाषेत सांगायचं तर मल्टी व्हेरिएबल असतात. या व्हेरिएबलचं एकमेकांवरील परावलंबित्व देखील कुठल्या सूत्रात, व्याख्येत बसणारं नसतं. आपण जे वरवर सुखी म्हणविणारे संसार बघतो त्या पडद्याआड फार मोठे खोटे नाटक दडलेले असते. म्हणजे दिसायचे दात वेगळे, अन् खायचे दात वेगळे तसं काहीसं! शिवाय आजकाल तरी लग्नाची कुणावरही जबरदस्ती नाही. तुम्ही एकटे राहण्याचे स्वातंत्र्य आहेच की! शिवाय आता तर लिव्हिंग इन रिलेशनशिपचा नवा ऑप्शन आलाय. म्हणजे लग्न हा आपण आपल्या पायावर मारून घेतलेला धोंडा आहे!

“ आता तुला धक्का बसेल अशी एक गोष्ट सांगते आमच्याच बाबतीतली..म्हणजे आमच्याच घरातली..तुला माहितीच होतं की आमचे वडील व्यसनी होते. त्याचा आम्हाला त्रासही व्हायचा लहानपणी.आम्ही त्यांनाच दोषी समजायचो. पण पुढे मोठे झाल्यावर एकदा वडिलांनी दारूच्या नशेतच खरं काय ते सांगितलं. माझ्या आईचं एका मुलावर प्रेम होतं. तरीही तिने आईवडिलांच्या हट्टासाठी हे लग्न केलं.नाईलाजाने. तिने संसार केला खरा. पण ती आपल्या जुन्या प्रियकराला विसरू शकली नाही. ती लग्नानंतरही त्याला भेटत राहिली! आजच्या भाषेत सांगायचं तर फ्लरटिंग करत राहिली!! एखाद्या नवऱ्यासाठी आपली बायको आपल्याऐवजी दुसऱ्यावर प्रेम करतेय ही कल्पनाच किती भयंकर असेल? विंचवाच्या सारख्या डसणाऱ्या दंशासारखी. वेदना अन् ते विष दोन्ही पचवणं कठीण! मला सांग कोणता नवरा हे सहन करेल? पण आमच्या वडिलांनी ते केलं आमच्याकडे बघून..आम्ही जुळ्या जन्मलो. पण यू नो, घराला वंशाचा दिवा हवा असतोच. म्हणून त्यांनी दुसरा चान्स घेतला. त्यांचं नशीब इथेही दगा देऊन गेलं. आमच्या पाठचा भाऊ मतिमंद जन्माला आला. आता तू सांग पुरुष कितीही सहनशील, क्षमाशील असला तरी त्याचाही तोल जाणारच. आम्हा स्त्रीयांना प्रत्येक गोष्टीसाठी पुरुषांनाच दोषी धरण्याची, जबाबदार ठरवण्याची सवय होऊन गेली आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांवर अत्याचार व्हायचे, त्यांना दुय्यम लेखलं जायचं हे खरं. पण आता खूप बदल झाले आहेत.
अत्याचाराच्या बातम्या अजूनही येतात. पण आता आवाज उठविण्याचा, पोलिसात तक्रार करण्याचा, कोर्टात दाद मागण्याचा ऑप्शन आहे. मला वाटतं आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतील. दुसरा कुणी सोडवेल, अशी अपेक्षा करू नये..हे आम्ही दोघी आमच्यापुरतं शिकलो.

“वडिलांनी तोल सांभाळण्यासाठी दारूचा आधार घेतला..एकदा आमचा लहान भाऊ घरातून निघून गेला अचानक. आमच्या नकळत..त्याला शोधता शोधता आमच्या नाकी नऊ आले! पोलिसात तक्रार झाली. शहरात शोधाशोध झाली. काही असला तरी तो आमचा भाऊ होता. शेवटी सापडला एकदाचा रेल्वे स्टेशनवर..चार दिवसाचा उपाशी..भीक मागत होता! आमच्या डोळ्याला डोळा नव्हता त्या चार दिवसात.
आता तू हे सगळं ऐकल्यावर काय विचार करशील? मला माहिती नाही. माझ्या आधी तू आपली रडकथा, हो तुझ्या दृष्टीनं ती रडकथाच, सांगितली. तेवढ्यासाठी आमच्याजवळ मन मोकळं करायला इतक्या लांब तू आलीस. तुझ्या इतक्या वर्षाच्या भेटीने आम्हा दोघींनाही आनंद झाला. हे सगळं खरं.पण आपल्या समस्यांची उत्तरं दुसऱ्याकडे शोधणं हेच मुळात चुकीचं. एखादा माणूस जसा वागतो, तो नेमका तसा का वागतो याबाबतचे आपले अंदाज साफ चुकतात अनेकदा. हे माझ्या वडिलांच्या मी सांगितलेल्या वर्तनावरून तुझ्या लक्षात आलं असेल. इथे आमच्या आईला दोष द्यायचा तर तिचीही काही मजबुरी असू शकेल. विकनेस असेल. कारण तसं पाहिलं तर आपल्यापैकी कुणीच परिपूर्ण नसतो. आपण सगळे स्खलन शील असतो. अन् तुला एक स्पष्टच बोलू का? सेक्सच्या बाबतीत बोलायचं तर त्यातून समाधान मिळत असेल पण आनंद मिळतो का हा खरा प्रश्न आहे. समाधान हे तात्पुरतं असतं. आनंद शाश्वत असतो. एकाच घरात गुण्या गोविंदाने राहणारी माणसं वरवर समाधानी दिसत असली, किंवा खरं सांगायचं तर तशी भासत असली, तरी ती मुळात आनंदी असतात का हा खरा प्रश्न आहे.

“ आम्ही दोघींनीही आता लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा चटका बसल्यावर आपण सावध व्हायलाच हवं. दुसरं असं की लग्नाने खऱ्या अर्थाने सुखी, आनंदी झालेली किती जोडपी असतील? मुखवटे घालून जगणाऱ्या,नाटक करणाऱ्या जोडप्यांचीच संख्या जास्त आहे या जगात! आमच्या दोघींच्या बाबतीत म्हणशील तर कशी ही असली तरी ती आमची आई आहे. कसेही असले तरी ते आमचे वडील आहेत. कसाही का असेना पण तो आमचा भाऊ आहे! आम्ही या तिघांचाही सांभाळ करणार शेवटपर्यंत. हे आम्ही दोघींनीही ठरवलं आहे आता. पैशाचा प्रॉब्लेम नाहीय. वडिलाना भरपूर पेन्शन मिळते. शिवाय मेडिकल ट्रीटमेंट फ्री आहे सर्वांनाच. त्यामुळे तसली काही अडचण नाही. पण त्यांना आधार हवाय उतारवयात. तो आता आम्ही दोघी नाही तर कोण देणार? आपण सगळे ह्युमन बीइंग आहोत पण बीईंग ह्युमन जास्त महत्वाचे असते.”
दोघींची कथा ऐकून ती जागच्या जागी सुन्न झाली. आपलच दुःख तेव्हढं मोठं या भ्रमात असलेली ती आता थोरलीची, खरे तर त्या दोघींची कहाणी ऐकून शहाणी झाली. तिने मनोमन ठरवलं. आपल्या छोट्या मुलाला ह्युमन बीईग ऐवजी बीईग ह्युमन हेच शिकवायचं. मोठीच्या बोलण्यातले ते एक वाक्य तिच्या मनात रुतून बसले.
दोघींचा निरोप घेऊन परतताना ती फक्त समाधानी नव्हती. आनंदी देखील होती. परतीच्या विमानात ती एकटी असली तरी त्या दोघीही तिच्या सोबत होत्या. जन्मभर सोबत राहणार होत्या. कशाही असल्या तरी त्या दोघी तिच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मोठीची ‘काहीही झालं तरी…’ही थिअरी तिला मनापासून आवडली.

– ©️  प्राविजय पांढरीपांडे

७६५९०८४५५५
709 SMR Vinay Technopilis
Adjecent Google,Kothaguda,Kondapur
Hyderabad 500084
vijaympande@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

तळमळ शाश्वततेची

ऊठ रे, श्रीरंग…किती अंधारून आलंय..
बैस अजून ..मला तर इथून जावेसेच वाटत नाहीये. राधा.. प्लीज,
हेच, हेच ते किती समजावून झाले..अरे सारा दोष तुझाच नाहीये..तू एकटाच आहेस का ? या देशात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा विद्वान..
हो..मीच ..मीच कारणीभूत आहे ..श्री अचानक केकाटला, राधा घाबरून चार पावले मागेच सरली.
त्याचे लाल लाल आग ओकणारे डोळे, वेडा वाकडा झालेला चेहरा आणि ते संतप्त स्वरात किंचाळणे. याच्या मनावर एवढा परिणाम झालाय का ?.. हा नॉर्मल आहे ना ? घरी नीट जाईल ना ? विचारांची आवर्तनं फेर धरून राधे भोवती नाचू लागली ..
या अंधाऱ्या वेळी, उंच डोंगराच्या एका खडकावर आपण उगाच बसलो एवढा वेळ ..
काय असेल याच्या मनात आत्ता ? भयाची एक शिरशिरी तिच्या मणक्या मणक्यातून झिरपत गेली.
थोड्याच वेळा पूर्वी हा किती विचित्र बोलत होता…ही खोल दरी त्याला म्हणे बोलावते आहे. 
विचारांच्या आवर्तनात राधा भेलकांडत किती तरी वर्षे मागे गेली.

हीच ती जागा, हाच तो खडक, श्री ला खूप खूप आवडते  म्हणून लग्नाआधी आपल्याला आवर्जून येथे घेऊन आलेला ..श्री, माझा श्री…!
त्याच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा मला किती अभिमान आणि माझे निळे डोळे यातच आम्ही दोघे आकंठ बुडालेलो..
हातात हात घेऊन मारलेल्या त्या गप्पा…माझ्या कवितेवर खुश होऊन स्वतः ही कविता करण्याचा हसत हसत प्रयत्न करणारा श्री..
राधा मनातल्या मनातच हसली ..आठवले एकदा म्हणाला ..त्यात काय बघ आता माझे कवन..
व्वा..अगदी कवन
तर काय…

मला ही जागा अन् राधा तुझ्या निळ्या निळ्या डोळ्यांसारखी भारावून टाकते
“ तुझ्या निळ्या निळ्या डोळ्यात
माझ्या निळाईची विरघळ “
काय निळाई? आपण वेडावत म्हणालो तर अजाण बालकाप्रमाणे उत्तरला,
“अगं मी श्रीरंग ना…मग निळा नाही का ?”
वाह वाह..आपण खो खो करीत हसत सुटलो
“गप्प बैस…कविता स्फूरतेय ना..
अच्छा…अच्छा
ह…तर काय… “
“तुझ्या निळ्या निळ्या डोळ्यात माझ्या निळाईची विरघळ
अन् अन्….
आपण तोंडावर हात ठेवून हसणे दाबत राहिलो..आणि तो पुढे म्हणाला
“ तुझ्या सवे मज दिसे
ही डोंगरावरची हिरवळ “
वाह वाह..आपण मनापासून दाद दिली म्हणून त्याचे खरेच विरघळत जाणे..

नंतर पुनः येथेच आलो होतो .. विजांच्या कडकडाटाने मी किती घाबरले होते ..पण त्याला मात्र आनंद झाला..कारण..आपले त्याच्याजवळ जाणे ..घरी जाऊ या ..हे माझे म्हणणे ऐकायलाच तयार नाही….किती किती आग्रह चालला होता ..पावसात भिजत ,त्या वटवृक्षाखाली बसून एखादी कविता म्हण नं  …कर की..तू काय शीघ्र कवयित्री आहेस…त्याच्या प्रेमळ आग्रहाखातर आपण गात गेलो..
.
झरझरत डोंगर झरे वाहती
खळखळत धावे अवखळ सरिता
टपटपत ओघळती थेंब  जणू
तुझे न माझे धुंद गीत गाती…

किती तरी असे सुखाचे क्षण राधेच्या मन:चक्षु समोरून सरसरत गेले….आज काय झाले हे ? .कसे नेऊ मी त्याला घरी ? नुसता भुंगा झाला होता तिच्या डोक्यात…पण हळवे होऊन चालणार नव्हते..त्याला सांभाळून घर तर गाठायलाच पाहिजे होते ..त्याच्या मनासारखे बोलत राधा त्याला घरी तर घेऊन आली पण पुढे काय…. डॉ ला दाखवायचे का? एवढे सिरीयस आहे का?

तिने पाटण्यात  सासर असलेल्या आपल्या मुलीला फोन लावला ..जावयाने फोन उचलला..” हां, मांजी, पाय लागू, बोलिये..नीता तो अभी रसोई में है..” प्रकाश झा, तिचा बिहारी जावई तिकडे पुनः पुनः तेच विचारीत होता आणि ती त्याच्या मधाळ वागण्याने, मृदु शब्दांनी वितळत गेली..किती विरोध केला होता आपण या लग्नाला,
श्री तर जाम भडकला होता ..तेव्हा नेमके मराठी चॅनल वर * काहे दिया परदेस * या  मालिकेचे प्रक्षेपण झाले होते. तणतणतच होता तो. मिडियावाल्यांना काही अक्कलच नाही ..काही दाखवत असतात .अशामुळे मुली बिथरतात वगैरे वगैरे …आता मात्र हसू येते. किती चांगला आहे तो..स्वभाव तर मृदु आहेच पण दिसायलाही छान आणि मुख्य म्हणजे सुशिक्षित. आणखी काय पाहिजे ..माझी तर हीच चर्चा झाली होती काय हरकत आहे अशी लग्न झाली तर ..देश जास्तीत जास्त जवळ नाही का येणार ?
आणि आज…पुनः हा स्वतः च त्या माध्यमांच्या आहारी गेलाय ..एक हुशार इंजिनियर सतत ए आय च्या मदतीने काही ना काही तरी तयार करतो खोऱ्याने पैसा ओढतो पण अस्वस्थ…आज संपूर्ण समाजच असा झालाय का ? व्यसने, अंधश्रद्धा,असंवेदनशीलता, असहिष्णुता,अस्थिरता या साऱ्यातून बिथरलेले आणि बिघडलेले मन प्रकट होत आहेत का साऱ्यांचीच…
हॅलो .. हॅलो…आई कुठे हरवली?.. अगं, बोल ना काही..प्रकाशने तो फोन कधीच नीता कडे दिला होता.आणि राधा विचारमग्न..
अगं हो हो..कितीतरी वेळ ती मुलीसोबत बाबांच्या सध्याच्या वागण्याबद्दल गंभीरतेने चर्चा करीत होती
नीताचे म्हणणे हेच होते की बाबा स्वतःला न आवडणाऱ्या फिल्म्स तयार करीत आहेत ..सारे सारे मिम्स, फोटोज्, व्यंगचित्रं, डीपफेक, कथा.. फक्त आणि फक्त एका विशिष्ट पक्षासाठी , जाती धर्मासाठी तयार करीत आहेत .. त्यामुळे काही झाले का ? तुला आठवते त्यांचे नाव अर्थात कोठेच येत नाही ..पण आपल्याला ठाऊक आहे ..इतकी प्रचंड बुद्धिमत्ता वाया जातेय.
अगं..मागल्यावेळेस नाही का त्याचा एक व्हिडिओ किती वायरल झाला होता..आणि नंतर त्यावरून झालेला दंगा .रायपूर मध्ये मारले गेलेले ते लोक..
हो गं..ते सांगत होते मला एकदा ..खरे तर त्यांचा एक मित्र आहे रफीक कुरेशी…मुंबईत किती प्रचंड पाऊस झाला होता सव्वीस जुलै ला .. तेव्हा त्याच्या घरी किती सुखनैव राहिले होते…
माणूस कोणताही असो.जात,धर्म,देश सारखेच असतात गं.
हो.आई..तुला आठवते तू अमेरिकेहून आलीस तेव्हा सांगत होतीस , तेथले हॅलोविन, लोकांच्या त्या सणाशी निगडीत भावना किती साम्य आहे गं..आपला पितृपक्ष , त्यांचे पितरांना आठवणे .
हो,पण ते फार पूर्वी होते आता तेथेही त्याचे स्वरूप बदलले आहे अगदी आपल्यासारखेच ..सण वार.. तोच मुख्य प्रश्न छळतोय मनातल्या मनात..धर्माधर्मातील तेढ वाढतेय ..आपलाच सण किती मोठा ,आपलाच धर्म कसा,किती उत्तम..हेच बळावतेय.
माझ्या प्रकाशच्या बहिणीने तुला माहीत आहे ना, ख्रिश्चन मुलाशी लग्न केलेय ..किती सुखात आहेत ती दोघं खरं…..आणि त्या बॉम्ब स्फोटाच्या दिवशी, आपल्या शेजारच्या अनुपमाला कोणी पोचवले गं.?? .त्याच लोकांनी.
किती कौतुक करीत होते बाबा…किती छान समजावले होते त्यांनी मला….” माणूसपण महत्वाचे” …जात,धर्म,देश सर्व सर्व नंतर…. आई मला वाटते बाबांना हेच कुठेतरी मनात जाचतेय गं
तू एकदा बोल त्यांच्याशी..नाहीतर ते आपले सायकियाट्रिस्ट डॉ काका आहे ना, त्यांच्याकडे जा.. मनमोकळं होऊ दे त्यांचे..काहीतरी घुसमट होते त्यांची
हो..हो..खूप बरे वाटले गं तुझ्याशी बोलून ..
राधा फोन ठेऊन श्री च्या खोलीत गेली .  बघितले ,

श्रीरंग टेबलावर डोके टेकून निःशब्द बसला होता,त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड काळजी दिसत होती ..खरेच तो शांत होता का ?,मनात वादळ उठले होते …असंख्य मधमाश्या रोरावत आक्रमण कराव्यात तसे कोणीतरी आपल्या चहुबाजूंनी डंख मारीत आहेत की काय असे त्याला वाटू लागले.घशातून कंठ जणू फुटतच नव्हता ..काय चुकले होते माझे ? खरेच मी असे काय बोललो होतो काल कॉन्फरन्स मध्ये ? एवढेच न…. की संगणक थोडेच हे समजू शकतो? त्याला काय भावना आहेत ? आम्ही आपल्या स्वतःला च फक्त त्यात कल्पित करतोय पण ….
मनात राम नाही, प्रेम नाही, वात्सल्य नाही…हे फक्त मशीन ..हुशार नकलाकार ..पण म्हणजे काय त्याला सर्व समजतेय का ?समर्थ म्हणतात ते खरेच का..…
” मना कल्पना कल्पिता कल्पकोटी.
  नव्हे ते नव्हे सर्वथा रामभेटी.
  मनीं कामना राम नाही जयाला
 अती आदरे प्रीति नाही तयाला “.

श्रीचे डोके फुटणार की काय असे त्याला वाटू लागले…त्याच अवस्थेत तो तसाच झोपी गेला.

अचानक कोणी तरी त्याच्या कानात कुजबुजतेय असे त्याला वाटले..मला का नावे ठेवतोस ?
का म्हणजे तू..तू कोण ..?
तुझाच एक मित्र.. ए आय..
मित्र ?
अरे, मी तुला तयार केले ते फक्त, प्रतिक्रिया देण्यास,विश्लेषण करण्यासाठी, स्वयंचलित कार्य करण्यासाठी..तुला काय समजणार माझ्या व्यथा ,माझ्या वेदना , माझी तमा..
पण मी आज तुझ्याशी कोडिंग,डिकोडींग कॉम्प्युटेशन असले काहीच बोलणार नाहीये…तुझी आजची ही अवस्था बघून मी आलोय
तुला काय माहीत, माझा आत्मा…कसा तळमळतोय..तुला आत्मा म्हणजे तरी माहीत आहे का ?
तू माझीच संभ्रमावस्था पुनः माझ्याचवर प्रतिबिंबित करणार ना ?
हो, कबूल आहे …माझा आत्मा नाही पण अशी लाखों पानं मी वाचली आहेत.त्यामुळे मला कळतं..
तुला काय कळते ते? तू फक्त पानं खाऊन लार्ज लँग्वेज मॉडेल बनून जगतोस…तुझे डीफ्यूजन मॉडेल फक्त सुंदर सुंदर दिसणाऱ्या प्रतिमा तयार करतो, ज्यात  कलाकाराचे हृदय,वेदना,आनंद काहीच नसते.फक्त पोपटपंची करणारी मशीन
तुझी ही अवस्था, हे उसासे, ही भीती, हे अवघडण मला कळतंय ..तुला काही आत्मा वगैरेची परिभाषा नकोय ..तुला पाहिजेय .. शांती, माणसामाणसातील प्रेम, सुसंवाद…..
वाह..हे एक मशीन बोलतंय, तू कवी कधी झालास रे?
तूच तर शिकवलेस, तू जे शिकवतो ते मी भडाभडा बोलून मोकळा होतो..
…मला कळतच नाहीये, मी का बोलतोय तुझ्याशी? मी दमलोय, माझी गात्र गात्र शिथिल झाली आहेत.माझ्या आयुष्याची तारुण्याची सारी सोनेरी वर्षे मी तुला देऊन उद्ध्वस्त झालोय.मी तुला का तयार केले ?भावनांची नक्कल करायला? माणसे समजून घ्यायला? मानवता हद्दपार करायला ? का ,,का ?कशासाठी तयार केले मी ?
मग कशासाठी….
अरे मला वाटले होते…मला स्वतः लाच समजून घ्यायला मदत करशील, माणसाची जाणीव,नेणीव, देहभान , प्रकृतीची सौंदर्यस्थळे, त्यांची भाषा हे अधिक उत्तम रित्या तुझ्यामुळे समजेल पण..आता मला फक्त कोलाहल जाणवतोय.. तंत्र नवीन तंत्रं, नवनवीन प्रणाल्या, फक्त तांत्रिक विकास…! प्रत्येक जण असे बोलतो जणू ते ही फक्त यंत्र च आहेत…
हाहा..कृत्रिम बुद्धिमत्ता गडगडाट करत हसते..आणि विचारते
तरीही तू माझ्याशी बोलतोयस?
कारण..कारण…माझ्याजवळ दुसरे कोणीच नाहीये..तूच माझी भाषा समजतोस आता. माझे संपूर्ण जीवन त्यातच गुरफटलेय .
बहुदा तुझ्या दुःखाचे कारण मी नाही म्हणजे..तुझ्या मनातील शल्य तुला कुरतडतेय , तुझा आत्मा तळमळतोय..त्याचा अर्थ समजून घ्यायचाय तुला.
तुला काय माहीत रे अर्थ , स्वार्थ..तुला काय संवेदना आहेत, तुला जो काही अर्थ माहीत असेल तो मीच शिकवला असेल
हो,पण मला तयार करताना तुझ्या आकांक्षा, तुझे अथक प्रयत्न, तू घेतलेले कष्ट काय तुझा आत्मा शोधण्यासाठी, मानवतेचा शोध घेण्यासाठी, का त्याचा पुनः प्रत्यय घेण्यासाठी होते , खरे सांग?
मग कशासाठी?.मला तरी असेच वाटते
अरे, माणसा तुमची प्रत्येक निर्मिती ही तुमच्याच विचारांचा प्रत्यवाय असणारच न वेड्या…आणि दिव्यत्वाच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही मंदिरं उभारता, आणि इकडे चेतना जागृत करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रचंड जाळे विणून ठेवता…माझ्या मते दोन्हीही सारखेच .
पण या ॲप्स मध्ये किंवा मशिनीत देवाचा वास नाही
पण तुझ्या सारे  मंगल करण्याच्या इच्छेचे पडसाद तरी असतील माझ्यात ? का नाही ?
म्हणजे तुझे म्हणणे काय मी अजून ही हेच करीत राहू?जरी दमलोय, उसासे घेत राहतोय तरी हेच बनवत राहू का ?
नाही,नाही,,विश्रांती घे, व्यक्त हो, प्रकटीकरण कर, पण मनातील हा “का “ प्रश्न त्यजू नकोस
हा प्रश्नच तर मला आयुष्यभर छळत राहतोय
पण तो गरजेचा आहे , पावन आहे,…अगदी तुझे औदासीन्य देखील तुला काहीतरी सांगतंय,ते सांगतंय…तुझा आत्मा यंत्रात नाही, तुझ्या शोधात आहे .
अरे तू तर अगदी आमच्या साधू संतांसारखं बोलू लागलास
हाहा…मी तुमची अशी अनेक पृष्ठं वाचली आहेत
असे वाटतेय मला..की तसा बरा आहेस रे तू …इतका तिरस्कार करण्यासारखा नाही.
तुला काय पाहिजे.. शांती, निस्तब्धता, तुझी मूल्यं, प्रेम??
माझ्याजवळ याचे उत्तर नाही माणसा, ते तुझे तुलाच शोधायचे आहे.गरज आहे समरस तेची .
झाले ना..संपली तुझी क्षमता..कशासाठी आला होतास बोलायला ? टेबलावर मूठ आपटून श्री किंचाळला.

राधा पळत आली ..त्याला जवळ घेतले ..अरे कोणाशी बोलतोय ?
मी..?
कुठे ..कोणाशी ?
….
हे बघा राधाताई..एवढी काळजी करण्यासारखे काही नाही ..सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ सप्रे हळुवारपणे सांगत होते..मी बोललोय श्री सोबत..छान आहे तो , व्यवस्थित ..त्याचे मन मोकळे झालेय.
काय असते शेवटी आपले बालपणीचे संस्कार, पालकांकडून झिरपत गेलेली शाश्वत मूल्यं…माणूस विसरू शकत नाही . श्री अतिशय बुद्धिमान आहे त्याचमुळे त्याची या कामासाठी निवड झाली ..तो असे काही दृश्य, चित्रं निर्मित करीत गेला..त्याची ती नोकरीच होती म्हणा ना …की त्यामुळे नकारात्मक सूर समाजात पसरू लागला..द्वेष भावना वाढीस लागली..हे त्याच्या मूळ स्वभावाच्या विपरित होते. त्याला कळत होते , एकांगी विचार समाजाला घातक ठरतात, तो स्वतः एक संवेदनशील ,विवेकी आणि स्वतंत्र दृष्टी असलेला अभियंता आहे.
हो, डॉ अगदी बरोबर, पण पुढे काय?
तेच सांगतोय मी..श्री ची वृत्ती व्यापक आणि सहिष्णू आहे..सामाजिक विषमता वाढविणारे ,माणसाची संधी नाकारणारे, विचार त्याच्या मूळ तत्वात बसत नाहीत . माणसाच्या सहृदयतेला साद घालणं खरे त्याला आवडते
माणसाला आवडणारी वाट सोडून तो असा भलत्याच मार्गावर जाऊ लागला की सैर भैर होतो.
आता डॉक्टर ?
अहो, अजून ही वेळ गेलेली नाही. अनुभवी तज्ज्ञ सांगतात कितीही झाले तरी सकारात्मक विचार हे नकारात्मक विचारांपेक्षा अधिक लवकर पसरतात..जे बीज शुद्ध असेल तेच प्रस्फुटीत होणार ना?तुकाराम सुद्धा सांगून गेलेत
“ फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजापोटी “
त्याला सांगा, मला ही वचन दिलेय त्याने ..त्याला आवडेल तीच त्याची नवीन निर्मिती असेल .

एकमेकांना समजून घेण्याची ..ते कमी होतंय..तो  गुरफटला होता ,कांचनमृगामागे लागून असे व्हिडिओज बनवत होता ज्यामुळे समाजातील दुही वाढली, तेढ वाढली, एकमेकांविषयी अविश्वास वाटू लागला
…..
राधा आणि श्रीरंग आपल्या आवडत्या खडकावर बसले होते ..श्री आनंदाने शीळ घालत होता. राधे!ती नोकरी सोडल्यावर मी परत आपल्या,माझ्या भारतात परतलोय असे वाटतेय गं.
मी आता कोमल,सात्विक, सौंदर्यपूर्ण अशा फिल्म्स बनविणार की लोक बघत राहतील ..पण खरेच मला यश येईल ना ..गरज आहे आपल्याला सौहार्द क्षमाशीलता याची..
अरे हो..नक्की नक्कीच येणार …
हातात तिथलीच गवताची काडी घेत .मोरपिसाप्रमाणे अलगद श्री च्या चेहऱ्यावरून फिरवत लाडीक आवाजात म्हणाली..
तुमचा प्रामाणिकपणा, तुमची दयाळू वृत्ती ,तुमचे धैर्य आज तुम्हाला काहीच गोड फळे देत नाही म्हणून निराश होऊ नका,
मातीत लपलेले बी, तसेच असते.. हरवत नाही…तुमचे गुण पण हरवणार नाहीत ,ती मूल्ये शाश्वत आहेत, वेळ आली की बी हळूच मातीबाहेर डोकावते…. अंकुरते ..

राधा तुझे ते गाणे म्हण ना प्लीज
आनंदाचे बीज……

आनंदाचे बीज कुठे दडून बसलं होतं
मृण्मयीच्या कुशीत, मिट्ट काळोखात
प्रस्फुटित होण्याची, वाट बघत होतं

वसुधैव कुटुंबकम् चेच
बीज मी होणार
हे विश्वची माझे घर
म्हणत दरवळणार

द्वेष विद्वेष आकस दूर होणार
स्नेह,आनंद घेऊन मी अंकुरणार
समरसतेचा
घाम गाळलेल्या मातीत
चैतन्य फुलवणार रे मी
चैतन्य फुलवणार

गाणे ऐकत ,तिचा हात हातात घेऊन श्री खडकावर शांत झोपी गेला होता.आणि राधा आईच्या वात्सल्याने त्याच्या केसातून बोटे फिरवित हळुवारपणे त्याला गोंजारत राहिली.

@@@

– ©️  सौ. स्वाती वर्तक

खार (पश्चिम)
मुंबई ४०० ०५२

swati.k.vartak@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

पराग लेले अभिनेता झाला…      

माणूस जिद्दी असला आणि त्याने मनापासून एखादं आव्हान स्वीकारलं की तो काय करू शकतो याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे .

मी दक्षिण मुंबईत , ग्रँटरोडला शास्त्री हॉल नावाच्या वसाहतीत राहतो .
आमची कॉलनी बऱ्यापैकी मोठी आहे आणि इथले उत्सव देखील मोठे असतात……
 आमच्या मंडपात होणारे कार्यक्रम बघायला आसपासच्या वाडीतली रसिक मंडळी येत असतात……

  शास्त्री हॉलच्या सार्वजनिक गणेश उत्सवात , 1971 साली तुझे आहे तुजपाशी या पु .ल . देशपांडे यांच्या अत्यंत गाजलेल्या नाटकाचा प्रयोग झाला. सर्व कलाकार वाडीतलेच होते आणि हौशी होते ……अती हौशी म्हटलं तरी चालेल……

 सर्वांनी वर्गणी काढून नाटक करायचं ठरवलं कारण कार्यकारी मंडळाकडे फारच थोडे पैसे होते .  ते पैसे दिग्दर्शनासाठी रामचंद्र वर्देना द्यावे असं सर्वानुमते ठरलं .

रामचंद्र वर्दे हे त्या काळातले खूप नावाजलेले नाट्यदिग्दर्शक होते .
त्यांनी अत्यंत उत्साहाने या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली . स्वतः कसून मेहनत घेतली आणि कलाकारांना देखील घ्यायला लावली .

उषा आणि गीता यांची भूमिका निभावणाऱ्या त्याकाळच्या तरुण मुली नंतर व्यावसायिक रंगभूमीवर गाजल्या ……
काकाजींची भूमिका करायला सुरुवातीला कोणीच तयार नव्हतं पण अविनाश जोशीने ती जबाबदारी घेतली.
 ही भूमिका उत्तम वठावी म्हणून दाजी भाटवडेकरांची काकाजी ची भूमिका त्याने थिएटरमध्ये जाऊन परत परत पाहिली……
दाजींना घरी जाऊन भेटला ……त्यांचा आशीर्वाद घेतला……

 प्रयोग बहारदार झाला . आचार्य या महत्त्वाच्या भूमिकेत पराग लेले ने प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला . तिसऱ्या अंकातल्या  ‘आचार्य ‘ने अख्ख नाटक खाऊन टाकलं…….

*****

आता सर्व सविस्तर सांगतो कारण त्याशिवाय मला शांत बसवणार नाही…… पराग लेले या माझ्या मित्राने कधीही नाटकात काम केलेलं नव्हतं.
 आपली नोकरी आणि आपलं घर या पलीकडे त्याला विश्व नव्हतं .

 एक वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं .
त्याची बायको हौशी आणि मनमिळाऊ …….
 आपल्या नवऱ्याला नाटक पाहायला खूप आवडतं हे तिला माहीत होतं .

केवळ वेळ घालवायला तो आणि त्याची बायको रोहिणी , नाटकाची तालीम बघायला जात . वर्दे कसं शिकवतात हे बारकाईने पहात…..

 त्याला नाटक बसवणं म्हणजे काय हे एव्हाना समजलं होतं .
घरी गेला की झोपायच्या आधी त्याला नाटकातले काही प्रसंग आठवत .
 ‘पुलं नी कसं काय हे लिहिलं बाबा ?’
असं तो स्वतःशी म्हणत असे .

झालं असं की आचार्याची भूमिका करणारे रविकांत परांजपे यांना मलेरियाने गाठलं ……
नाटकाचा प्रयोग फक्त दहा दिवसांवर आला होता.

 डॉक्टर म्हणाले, तुम्ही नाटक नंतर च्या तारखेला करा .
रवीला मी परवानगी देणार नाही …….

आणि खरंच होतं ते .
रवी आजारपणामुळे अतिशय थकलेला  होता . त्याला हाताला धरून वॉशरूम मध्ये न्यावं लागत असे .आचार्याची भूमिका खूप मोठी आणि मध्यवर्ती होती. सर्वांनी एक बैठक घेतली आणि नाटक पुढच्या वर्षी करूया असं ठरवलं .

पराग त्यावेळी तिथे होता.
 तो म्हणाला , मला तुम्ही संधी द्या . मी आठ दिवसात आचार्याची भूमिका तयार करतो .
सर्वांनी त्याला वेड्यात काढलं .
पण रोहिणी म्हणाली , हे करतील यांच्यामध्ये चांगली जिद्द आहे …..
वर्दे म्हणाले    मी सांगेन तसं तुला करावं लागेल . आठ दिवसाची रजा तुला घ्यावी लागेल .
हे आव्हान तू जबाबदारीने स्वीकारत आहेस …..
 त्या ठिकाणी रोहिणी होतीच……
 ती म्हणाली, हे तुम्ही करू शकाल !

घरी गेल्यावर त्याला म्हणाली  तुम्ही उत्तम काम  करा.
 मी तुम्हाला माझ्या खर्चाने सर्व व्यावसायिक नाटकं दाखवेन ……

रामचंद्र वर्दे हे त्या काळातले अतिशय लोकप्रिय नाट्यदिग्दर्शक होते.
 समर्पित वृत्तीने ते काम करत असत…….

 त्यांना आता नवा आचार्य घडवायचा होता . तो देखील सहा-सात दिवसांमध्ये!
त्यांनी  पराग ला आपल्या घरी बोलावलं आणि त्याच्याकडून आचार्याची भूमिका तयार करून घेतली……
 त्यांनी रोहिणीला एक काम दिलं ते असं की , आधीच्या पात्राचं शेवटचं वाक्य तिने उच्चारायचं आणि मग आचार्याने त्याचे संवाद म्हणायचे…….
 अशाप्रकारे अनेकदा तालिम घेऊन त्यांनी परागमधे परिवर्तन केलं……

 तो आता आचार्य झाला ..
घरात सुद्धा तो तशाच पद्धतीने बोलत असे , आणि मग रोहिणीला आणि तिच्या सासूला  खूप हसायला येई .

रात्री तो संवाद पाठ करण्यासाठी जागत असे तेव्हा रोहिणी सुद्धा झोप उडवून त्याला सोबत करत असे .
मधून मधून कॉफी देऊन त्याचा उत्साह वाढवत असे ……
नाटकाची रंगीत तालीम दोन दिवस आधी करायचं ठरलं .
पराग ला हातात पुस्तक ठेवायची परवानगी वर्देंनी दिली तरी देखील त्याने पुस्तक न घेता रंगीत तालीम छान निभावली .
त्याला उत्तम प्राॅम्टिंग माझ्या एका मित्राच्या बायकोने , सुगंधाने केलं .
नाटक सादर करण्याचा दिवस उजाडला …….

रोहिणी पहाटे लवकर उठली .
आंघोळ करून पूजेचं साहित्य घेऊन गावदेवीच्या मंदिरात गेली .
 तिथे देवीला नवस बोलली आणि घरी परत आली .
पराग तिची वाट पाहत होता .  
म्हणाला, “आज तू काहीही करायचं नाही . आपण बाहेरच ब्रेकफास्ट आणि लंच करू …”
“नको ……नाटकाचा प्रयोग होऊन जाऊ दे मग आपण बाहेर खाऊ कसलंही निमित्त व्हायला नको……” रोहिणी म्हणाली…..

आपल्या नवऱ्याचा अभिनय आपल्या आईने आणि भावाने पहावा यासाठी रोहिणीने फोन करून त्या दोघांना बोलवून घेतलं……
दोघांनाही खूप उत्साह वाटत होता कारण परागचं हे रंगमंचावरच पहिलंच पदार्पण होतं.

 रात्रीचे साडेनऊ वाजले . पहिली घंटा घणघणली आणि मंडपात अचानक दाजी भाटवडेकर आणि रजनी जोशी प्रकट झाल्या……
 कार्यकर्त्यांना प्रचंड उत्साह वाटला……
त्या दोघांना  महत्त्वाच्या जागी बसवून कार्यकर्ते कॉफी आणण्यासाठी देवधरांच्या घरी गेले ……

हे मोठे कलाकार आपल्या छोट्या कलाकारांचं नाटक बघायला स्वतःहून आले आहेत ही बातमी रंगमंचावर गेलीच…….

 मग काही कलाकार त्यांना नमस्कार करण्याकरता स्टेजवरून मंडपात आले….. प्रेक्षकांनी जल्लोष केला .

रजनी जोशींना भेटण्याच्या उद्देशाने मंडपातल्या महिला त्यांच्या दिशेला धावल्या……
 काही काळ  मोठाच गोंधळ निर्माण झाला .
लाऊड स्पीकरवरून सर्वांना शांत बसण्याची विनंती करण्यात आली .
 उदय डांगे यांनी मंडपातले सर्व दिवे बंद करून महत्त्वाचं काम केलं, सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली……

दाजी भाटवडेकर आपण होऊन रंगमंचावर गेले . कार्यकर्त्यांना पडदा उघडायला सांगितला आणि हातात माईक घेऊन ते थोडंसं पण छान बोलले .
सर्व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि खाली उतरले.

पहिल्या अंकातच आचार्य काकाजींच्या घरी येतात असं दृश्य आहे.

 परागचं रंगमंचावर पदार्पण झालं आणि मंडपात टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला ……
नाटकात थोडासा विराम घेतला गेला आणि मगच पुढचे संवाद सुरू झाले.
 तिन्ही अंकात परागने अतिशय चोख अभिनय करून सर्वांची मन जिंकली.

 तिसऱ्या अंकात आचार्य जेव्हा स्वगत म्हणतात तेव्हा अत्यंत गंभीर वातावरण निर्माण झालं…… नाटक या वळणावर संपलं …….
पडदा पडल्यानंतर घोषणा झाली, कोणीही उठू नये, जायची घाई करू नये……

 दोन मिनिटांनंतर पडदा उघडला गेला आणि रजनी जोशी हातात माइक घेऊन सर्वांच्या समोर आल्या . त्यांच्या हातात एक जाडजुड लिफाफा होता आणि एक पुष्पगुच्छ !
त्यांनी सर्व कलाकारांना धन्यवाद दिले आणि पराग लेलेना मंचावर बोलावलं…
 अतिशय कृतज्ञतेने त्यांनी पुष्पगुच्छ परागला दिला आणि अर्थातच तो लिफाफासुद्धा…
 परागचं अभिनंदन करायला रोहिणी घाई घाईने स्टेजवर गेली तर नाटकात उषाचं काम  करणाऱ्या प्रमिलेने अत्यानंदाने परागला मिठी मारली होती …

– ©️  मोहन कान्हेरे  

गुरुग्राम, हरियाणा
mohankanhere@yahoo.in

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बाँब

काळ खूप जुना आहे. २१ वी सदी सुरू व्हायला अवकाश होता, मी जेव्हा इंजिनीयरिंगमधे पीएच डी केलं तेव्हा.

त्या काळी मुली डॉक्टर वा नर्स व्हायच्या पण इंजिनिअर ना बाबा. तरीही माझा त्या विषयात रस बघून बाबांनी होऊ दिलं. आणखी एका विषयात रस होता. जिम्नॅस्टिक्स जे मुली करत नसत. दादा घरी सराव करत असे. त्याचं बघून बघून मीही करत असे. तब्बल १० वर्षं. मात्र त्या काळातील प्रथेनुसार नोकरी आधी मला सौ केलं. अत्यंत पारंपरिकरीत्या बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंती कळवल्या गेल्या. कुंडली जुळवल्या गेल्या. व वैदिक(?) पद्धतीनं लग्न झालं. हे एम बी बी एस, एम एस(जनरल सर्जरी) होते. मिलिटरीत मुरारला(ग्वाल्हेर च्या उपनगरी) कार्यरत होते. नाव होतं आशुतोष टोकेकर व मी झाले सौ. प्रज्ञा टोकेकर.
अजून आठवते ती लग्नानंतर ची पहिली रात्र.

माझे पाय फाकवून, स्वत:च्या जपानी  विजेरी नं काहीतरी बघून हे म्हणाले, “तू व्हर्जिन नाहीस”.
“कशावरून म्हणताय? “
“मी डॉक्टर आहे. तुझं योनीद्वार फाटलेले आहे, त्यावरून.”

मी उठून बसत म्हटलं, “मग डॉक्टर साहेब, जिम्नॅस्टिक्स केलं तर योनीद्वार फाटू शकतं हे ही ठाऊक असेल तुम्हाला?”
पण मुली करत नाहीत जिम्नॅस्टिक्स.
मी तब्बल १० वर्षं करत असे. फोटो दाखवू?

उर्वरित रात्र हे माझी मनधरणी करत राहिले. पण शेवटपर्यंत मी रुसवा सोडला नाही.
दुसऱ्या दिवशी टाटांच्या आय आय एस्सी तून माझ्या नोकरीच्या अर्जाला नकारात्मक उत्तर आलं. कां तर मी स्त्री आहे म्हणून. या मुद्द्यावरून टाटांशी भांडणारी पहिली सुधा मूर्ती व दुसरी मी प्रज्ञा टोकेकर. अखेर मला ती नोकरी मिळाली. यांनी मिलिटरीत अर्ज केला की माझं बंगळूर ला पोस्टिंग व्हावं. तो मंजूर झाला. व आम्ही दोघे बंगळूर ला गेलो.

एव्हाना आमच्या रात्री सुखाच्या व्हायला लागल्या होत्या. त्याचं प्रत्यंतर म्हणजे मी गर्भवती झाले. तब्येत ठीक राहीना.  मी ४ दिवसांच्या सुट्टी साठी अर्ज केला. गंमत म्हणजे काही कामानं आलेले टाटा मला योगायोगानं भेटले व म्हणाले, बघितलंत ना, आम्ही स्त्रियांना कां घेत नव्हतो ते. असो. आता घेतलंय तर आम्ही भोगणार व ते हंसले.मला बाय बाय करत ते लिफ्ट मधे शिरले.

लग्नानंतर बरोबर १० महिन्यांनी मुलगा झाला. नाव ठेवलं सौरभ.
सौरभ ३ महिन्यांचा होण्याअगोदर च मी सुट्टी संपवून कामावर रुजू झाले. स्वयंपाक व सौरभ चं सर्व करण्यात मी दमून जात असे. यांना दर ४ त्या दिवशी २४ तासांची एमर्जन्सी ड्यूटी असे व इस्पितळात च रहावं लागे. एक चांगली गोष्ट म्हणजे एकटीच जामनगर ला रहाणारी आई, मी सौरभ च्या वेळी गर्भारपण असतानाच माझ्याकडे राहू लागली व आयुष्य जरा सुसह्य झालं.

एका रात्री झोपलेल्या सौरभ ला आम्हा दोघांच्या मध्ये ठेवून आई स्वत:च्या खोलीत झोपायला गेली. आम्ही नुकतंच यशवंतपूर मधील हे घर घेतलं होतं. पण फर्नीचर ची व्यवस्था आम्ही करू शकलो नव्हतो. सौरभ खोलीच्या केंद्रात होता. मध्यरात्री ज्याला ट्याहाचा आवाज आला. मी म्हटलं, “बघा हो जरा. ” हे म्हणाले, “तूच बघ ना”. व भिंतीकडे तोंड करून झोपून गेले. पण आईचं हृदय ते. उठले. अंधारात सौरभ कुठे दिसेना. थोड्या वेळानं डोळे अंधाराला सरावले व मला सौरभ दिसला. तो पालथा वळू लागला होता पण इंचही सरकत नसे. तो आज रात्री सरकत सरकत खोलीच्या एका कोपऱ्यात पोचला होता. मला खूप आनंद झाला. यांना हलवून उठवलं व ते दृश्य दाखवलं. मगच दुधाची बाटली देऊन गप्प केलं.

त्याच्या बाललीलांमधे दिवस भराभर जात होते. व तो ६ वर्षांचा झाला.
मला वाटे नमुना म्हणून  १ मूल बस. हे म्हणत, “नाही. मला एक मुलगी हवी.”
या लढाईत हे जिंकले व खरंच एक मुलगी ही झाली. मीही तिचं रूप न् शांती भावली नाव ठेवलं सौम्या. ती सर्व च लवकर करू लागली १० महिन्यात चालू लागली. व पावणेदोन वर्षांचीच बोलू लागली.
२ वर्षांची असताना तर एक दिवस कमालच झाली. सौरभ ची जुनी वर्णमाला तिच्या हाती लागली. त्यातील ग म भ न कडे ती एकटक बघत होती. मला गंमत वाटली. ग वर तिचं बोट फिरवलं व म्हटलं, “म्हण ग ग ग. ती म्हणाली की.”

माझी नोकरीवर जायची वेळ झाली होती. जवळच होतं तरी निघायला हवं होतं. आईला म्हटलं हिला वर्णमाला शिकव. मी निघते. मराठी वर्णमाला आईकडून व इंग्रजी वर्णमाला माझ्याकडून ती लवकरच शिकली. ५ व्या वर्षी शाळेत घालायला गेले तर प्रिंसिपल म्हणाली, “हिला ३ रीत घेते. पण सरकारी नियमात ते बसत नाही. तुम्ही खोटा जन्मदाखला  आणता का?” मी उत्तरले ते माझ्या नियमात बसत नाही. अखेर तिला पहिलीत बसवून आले.

सौरभ १२ वर्षांचा व सौम्या ६ वर्षांची झाली आणि…….
आमच्यावर आकाशातून कुठार कोसळली.

यांची काश्मीर  ला बदली झाली. त्या निमित्तानं आम्ही सर्वांनी(अगदी आई सुद्धा) काश्मीर चं निसर्ग सौंदर्य बघून घेतलं. न् एक दिवस बातमी आली, श्रीनगरच्या इस्पितळातून काही कामासाठी हे ४ जण सीमेकडे जात असताना अचानक विमानाला आग लागली व ते कोसळलं.  या ४ जणांचे देह देखील मिळाले नाहीत. आमच्या दु:खाला पारावार च नाही. पण काळ पुढे जातच रहातो.

सौरभ १० वी पास झाला. बोर्डात ५ वा आला.  त्यानं १२ वी त ८ वा आल्या नंतर आय आय एस्सी तच एरोनॉटिक्स इंजिनियरिंगला प्रवेश घेतला.

सौम्याला बालपणीच खूप लवकर लिहिता वाचता यायला लागलं होतं त्यावरून ही तर सौरभ पेक्षाही जास्त चमकणार अभ्यासात असं मला वाटायचं पण तसं झालं नाही. पास व्हायची नीट एवढंच काय ते.
सौरभ ला दिल्लीला इंडिगोची छान नोकरी मिळाली. माझा पगार, यांची फॅमिली पेंशन यात आमचं छान भागत असे सौम्या बघायची. त्यात आता दादा चा पगार. वा:

तिनं १२ वी सायन्स नंतर हट्टच धरला ती बी फार्म करणार. एक दिवस कुणा एंजेलिना डिकॉस्टा नावाच्या मैत्रिणी ला घेऊन आली व म्हणाली आम्ही दोघींनी गोव्याच्या राजधानीत १८ जून रस्त्यावरील फार्मसी कॉलेजात प्रवेश घेतलाय.

माझी, रहाण्या खाण्या, पिण्याची सर्व व्यवस्था हिचे आईबाबा करणार आहेत. आई तू फक्त पैशाची व्यवस्था करणार ना? तिनं हट्टच धरला. सौम्या बाबांची लाडकी परंतु ६ व्याच वर्षी बाबांना मुली म्हणून मी ही जरा तिचे जास्तच लाड करते. (असं सौरभ म्हणे.) मी हो म्हटलं न् पुढे शिकायला ती गोव्यात गेली.

एक दिवस सौरभ चा फोन आला, “आई देव काय असतात? “
“म्हणजे राम कृष्ण वगैरे? “
“नाही गं कोकणस्थ क-हाडे वगैरे. “
“कां रे, कुणी मुलगी भेटलीय? कोकणस्थच असतात बरं”

मला आनंद झाला. मुलगी इंडिगोत त्याला ज्यूनियर होती. मग पुढील महिन्यात हे लग्न पुण्यातील संगम हॉलमधे झालं. देव मंडळी पुण्याची. आशा देव ची आशा टोकेकर झाली.

सौम्या व एंजेलिना दोघी बी. फार्म. झाल्या. बँकेचं कर्ज घेतलं व बांबोळी ला मेडिकल कँपस जवळ फार्मसी उघडली. दणक्यात कमावू लागल्या.

बंगळूरला मी व आई दोघीच होतो. एक दिवस रात्री जेवणानंतर आई( किती वर्षांची होती तिलाही ठाऊक नव्हतं या नुकतीच सुरू झालेल्या २१ व्या सदीत. पण खुटखुटित होती. )म्हणाली, “माझ्या एका मैत्रिणीने लग्न वयाच्या मुलाला सांगितलं, कशीही मुलगी आणि घरात पण हरिजन व मुस्लिम सोडून. तू काहीही म्हण प्रज्ञा पण हे दोघेही अजून जरा विचित्रच आहेत. कुणाशी म्हणून पटवून घेताच येत नाही.

मी उत्तर दिलं नाही. झाकपाक करायला स्वयंपाकघरात गेले. फोन वाजला. आईनं घेतला. बॉम्ब व मी हादरले असे काही शब्द ऐकू आले. पण नीट काही कळलं नाही. दाण्याचं कूट ग्राइंडर वर करत होते ना! जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा आई घोरत होती.

सकाळी १० च्या सुमारास सौरभ चा फोन आला. म्हणाला, तू काल सौम्या डॉक्टर मेहतर(हरिजन) शी लग्न करतेय हे ऐकून म्हणालीस बॉम्ब च टाकलास?
अरे मी नाही बाबा.

मी हादरलेच.असंही म्हणालीस. मला उलगडा झाला फोनवर आम्हा द़ोघींचा आवाज सारखाच येतो म्हणून. तसं मी सौरभ ला म्हणताच तो उत्तरला आता मला तुझं मत सांग. काल रात्री माझ्याशी बोलताना ती रडत होती.

मी विचारात पडले. तोच पुढे म्हणाला, आई तू नेहमी म्हणतेस मानवजात सगळी एकच.
मी उत्तरले, काही दिवसांपूर्वी श्रीराम लागू यांचं नाटक कन्यादान टीव्ही वर बघितलं. समाजसेवी म्हातारा बाप मुलीला हरिजनांना लग्न करू देतो पण ते लग्न त्या मुलाच्या विचित्र वागणुकीमुळे फसतं.
सौरभ म्हणाला, आई तू उगाच फाटे फोडू नकोस.

मी म्हटलं, अरे या हरिजनांना एक जन्मजात न्यूनगंड असतो. तो झाकायला ते अहंगंडाचं पांघरूण घालतात. सगळा भावनिक गुंता होऊन बसतो.

आई तू उगाच वाद घालू नकोस. करू दे तिला लग्न. चांगला डॉक्टर आहे. स्किन व्ही डी स्पेशालिस्ट.
बरं बाबा. म्हणून मी विषय बदलला. आशाशी ही थोडा वेळ बोलून फोन कट केला.

मनात विचार केला खरंच आपण मानवजात एक म्हणतो मग असे का हादरलो?
करू दे तिला लग्न. ती अन् तिचं नशीब (म्हणजे काय?) नशीब तरी कुठे मानतो आपण?
मला माझंच हसू आलं
————————————-

–  ©️ डॉ. प्रियंवदा कोल्हटकर.

गोवा.
priyakar40@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

जन्याचं पोर…!

गावाच्या जत्रेचा आज शेवटचा दिवस होता. जन्याचं चार वर्षाचं पोर जत्रेला जाण्यासाठी हटून बसल होतं. आजूबाजूची सारी पोरं जत्रेला जाऊन आली होती …खेळणी, भिंग्र्या,  घेऊन खेळत होती, चिक्की, गूळ – दाण्याचे लाडू खात होती……शेतमजुरी करणाऱ्या जन्याकडे एक फुटकी कवडी देखील नव्हती ..पोराला जत्रेला नेलं तर त्याला काय घेऊन द्यायचं ह्या चिंतेत पोराला रोज “उद्याचाला जाऊ ” अस सांगून वेळ मारून नेत होता….पण आज पोर हट्टालाच पेटल होतं; काही केल्या ऐकेना ….जन्याचा संयम सुटला..पोराच्या फाटकन् कानफटाखाली जाळ काढला. आईविना पोरकं पोर रडत रडत झोपी गेलं. संध्याकाळ झाली …..उपाशी  झोपलेलं पोर उठलं …डावा गाल सुजलेला…आजीकडे भाकर तुकडा मागू लागलं……!
खुरमुंडी घालून बसलेल्या जन्यानं पाहिलं …..काळजात कसनुसं झालं त्याच्या ….. ताडकन्  उठला,  पोराला घेतलं खांद्यावर अन तडक निघाला. “आरं, कुट निगाला बाबा “?? म्हातारीनं  कळवळून विचारलं. “जत्रेला.” म्हणून लांब लांब ढेंगा  टाकीत जन्या  निघाला …एकच आशा होती ….भाल्या पाटलाची …..त्याच्या घरी पोहोचला…..” वैनी, भाल्या है का ?” ….. ” भावजी, ते बारक्याला घेवून गेले नव्हं जत्रेला ” …..जन्याचा अंदाज खरा ठरला होता …..भाल्या त्याचा खास मित्र होता,  वेळप्रसंगी त्याला पैशाची मदत करणारा ….खांद्यावर पोराला घेतलेला जन्या जत्रेच्या गर्दीत भाल्याला शोधू लागला !

जत्रेतली दुकानं पाहून जन्याचं पोर हरखून गेलं  …हे घे, ते घे म्हणत ….बापाकडे  हट्ट करू लागल …..जन्या वेड्यासारखा भाल्याला शोधू लागला…..  बाप आपल्यासाठी काही घेत नाही हे लक्षात आल्यावर पोर रडकुंडीला  आलं …!
इतक्यात जन्याला भाल्या दिसला ..त्याच्या बारक्याला फुगा घेऊन देत होता. जन्यानं पटकन खांद्यावरून पोराला उतरवल म्हणाला,” थांब, इथं आलोच मी.” पोर दुकानांतली रंगीबेरंगी खेळणी बघत उभं राहील. जन्यान धावत जावून भाल्याला गांठल ….” एक  धा रुपये उधार देतो का रं बाबा, पोरगं लय अडून बलंय न्हव” .. ” अरे, घे की पोराला आनलास न्हवं ….घे !! जन्याने  भाल्याने पुढे केलेली दहाची नोट घेतली .. आता पोराला एक दोन खेळणी घ्यायचं ठरवत जन्या, धांवत दुकानापाशी  आला ….बघतो तर काय ..पोरग गायब ….!

इकडे तिकडे विचारल, गर्दीत कोणाच कुठे लक्ष असणार ….जन्याचा जीव उडाला …जेमतेम चार वर्षाचं पोर कुठे गेलं ….गर्दीत हरवलं, चेंगरलं  तर …जन्या भिरभिरला…..कावरा बावरा जन्या पोराला शोधू लागला ….तेवढ्यात  भाल्याच समोर आला ….”अरे, पोर सापडना रे बाबा, हरवल बघ गर्दीत”…. “गाढवा, सोडलास  कसा रं तू त्याला ?….भाल्यान आपल्या पोराला उचलून घेतलं आणि तो देखील जन्याचं पोर शोधू लागला…” जन्या, तू बघ तिकड मी बघतो इथं  ..असेल इथच जवळ” ….जन्यान मान डोलावली अन दोघेही दोन दिशांना पोराला शोधू लागले….इतक्यात भाल्याला फ़ुगेवाल्याच्या मागे मागे जाणार जन्याचं पोर दिसलं …..पटकन् पुढं  होत त्यान त्याचा हात पकडला … “आरं, कुठ चालला बाळा..तुझा बाप  शोधून राहिला न तुला “….पोराचा हात पकडून  भाल्या मागे वळला …..पोर देखील भानावर आलं …!!

पोराला हाताला धरून भाल्या मागं वळला पण आता  भाल्याला जन्या कुठे दिसना. स्वत:च बारकं खांद्यावर आणि जन्याचं पोर हाताशी धरून बावचळलेला  भाल्या वेड्यासारखा जन्या कुठे दिसतोय का पाहत जागच्या जागीच उभा राहिला… आपला बाप हरवला.. ह्या जाणिवेने पोराचा धीर सुटू लागला …हळू हळू ते रडायला लागलं …आता भाल्याला सुचेना काय करावं ….तो पोराला समजावू लागला, ” आरं येईल बघ  तुझा बाबा, आसल बघ  इथच कुठे “….जसजसा वेळ जाऊ लागला तस तस पोरग जास्तच रडू लागलं … भाल्या त्याची समजूत काढत म्हणाला, “चल, तुला फुगा देतो”……”मला नकू फुगा …मला बाबा पाहिजे”..!! …परत भाल्या म्हणाला, “चल तुला लाडू घेवून देतो” …”नकू, मला बाबाच पाहिजे”…!! भाल्या एकेक नव्या नव्या वस्तूंची नाव घेऊ लागला. .पण पोरान एकच ठेका धरला मला ‘बाबाच पाहिजे’ …!!

दुपारी बाबाच्या माराने सुजलेला गाल, भिंगरी, फुगा, चिक्की, गूळदाण्याचे  लाडू. पाच मिनिटांपूर्वी हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी त्या चार वर्षाच्या पोराला एका क्षणांत नकोशा झाल्या ….आपला बाबा हरवला ह्या जाणिवेनं  पोर व्याकुळ होऊ लागलं  …हमसून हुमसून रडू लागलं… भाल्याला काही सुचेना ..जन्याला शिव्या घालत तो जागच्या जागी चुळबुळत उभा राहिला….! एवढ्यात कुठून तरी घामाघूम झालेला, भेदरलेला, जन्या गर्दीतून नेमका भाल्याच्या  समोर येऊन उभा राहिला. भाल्या बरोबर उभं असलेल आपल रडणारं पोर बघून मटकन् खालीच बसला…पोराने भाल्याचा हात सोडला आणि जन्याच्या गळ्यांत जाऊन पडला ,,,! जन्या कसाबसा उभा राहिला ….जन्याला शिव्या घालत भाल्या म्हणाला, ” बस्स झालं, जावा आता घराला…आणि आपल्या बारक्याचा हात धरून रागाने निघून गेला..!!

जन्या आता चांगलाच भानावर आला होता.  घट्ट गळामिठी घातलेल्या पोराला परत परत विचारत होता ” काय घेतो  बाबा, चक्री, फुगा, पिपाणी, लाडू ??”  …जन्याच्या खिशात दहा रुपयांची नोट अजूनही तशीच होती ….पोरगं  म्हणत होतं,  ” नकू, मला कायबी नकू ” आणि बापाच्या गळया भोवतीची मिठी घट्ट घट्ट करत होतं ….जन्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत परत परत विचारत होता “काय पायजेल सांग रं बाबा ” पोर म्हणालं , “घरला जावूया”….!!  

अंधार दाटू लागला होता जत्रेतल्या दुकानांतले पेट्रोमॅक्सचे  दिवे उजळू लागले होते …जन्या आपल्या चार वर्षांच्या काटकुळ्या पोराला थोपटत थोपटत घरच्या रस्त्याला लागला होता..जत्रेचा गलका मागे पडत होता …दोघेही रिकाम्या हाती पण हवं ते मिळाल्याच्या समाधानात उपाशी पोटी घरी परतत होते ….!!

– ©️  प्रदीप अधिकारी

adhikaripradeep14@gmail.com 

( मैत्रीमध्ये २० जून २०२१ रोजी पूर्वप्रसिद्ध ) 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

असंभव आणि अभिरुची

मराठी चित्रसृष्टीत अलीकडे उत्तम सिनेमे निघू लागले आहेत या भ्रमापोटी किंवा या समजापोटी म्हणा,  काल ‘ असंभव ‘ हा आजचा बहुचर्चित सिनेमा पाहायला गेलो.
सिनेमा जवळ जवळ हाऊसफुल होता. मला कसंबसं तिकीट मिळालं.

दणकेबाज आवाजात ‘ असंभव ‘ सिनेमा सुरू झाला. सिनेमा सुरू व्हायच्या आधीच हा सिनेमा काही तरी भयकारी कथा पडद्यावर मांडू पाहतो आहे याचा इशारा या वाद्यकल्लोळात होता.

भयपटवाल्यांचा एक पॅटर्न असतो. भीषण आवाज पद्धतीने ते भोवती भीतीचं वातावरण निर्माण करतात.
ज्याचा त्याचा प्रेक्षकवर्ग असतो
हसवणारे सिनेमे असतात तसे रडवणारे सिनेमे असतात आणि घाबरवणारे सिनेमें देखील असतात.
पैसे देऊन  स्वतःला घाबरवून  घेण्याची  प्रेक्षकाची  हौस औरच.
चित्रचौकटी पुढे सरकू लागल्या तसतसं असंभव पुनर्जन्मावर आधारलेला सिनेमा आहे हे  उमगत गेलं.
यापलीकडे या सिनेमाच्या  कथानकाबद्दल काही बोलणं उचित होणार नाही. अशा सिनेमात रहस्य आणि त्यातून निर्माण होणारा सस्पेन्स हा महत्त्वाचा घटक असतो. तेव्हा एवढ्यावरच थांबणं योग्य.

एक मात्र मी पाहत आलो आहे
सस्पेन्स असलेला भयपट असला की परिणामकारी भयकारी वातावरण निर्माण करण्यासाठी धडाकेबाज संगीताची जोड देण्याची परंपरा जुनी आहे.  दृश्याचा आणि चौकटीतल्या हालचालीचा परिणाम वाढवण्यासाठी ध्वनीची पातळी उच्च असावी लागते. मान्य.
पण ‘ असंभव ‘ सिनेमात ती  जरूरीपेक्षा जास्त उच्च होती, कर्णकटू वाटावी अशी होती . असो.  पार्श्वसंगीत कोणत्या स्वरूपाचं असावं हे संगीतकार ठरवतो, संगीताची पातळी किती असावी हे संगीतकार ठरवत नाही, दिग्दर्शक ठरवतो हे लक्षात घेतलं पाहिजे.
बाकीचं जाऊ द्या.
सिनेमाचं दिग्दर्शन कसं होतं  पटकथा कशी होती… पटकथा पडद्यावर मांडायची शैली कशी होती. . .आणि एकूण सिनेमा कसा होता .
या सगळ्याचं  पडद्यावरील दर्शन कसं होतं . स्पष्ट सांगायचं तर ते चांगलंच  निराशाजनक होतं.

 त्याहून अधिक स्पष्टपणे सांगायचं तर ” कायच्या काय ” हे दोन शब्द वापरावे लागतील.
असंभव या सिनेमाचं वर्णन एका शब्दात करायचं तर ‘ बकवास ‘ असं करता येईल.

 पार्श्वसंगीत उच्च स्वरांच आणि तेही पारंपरिक धर्तीचं. शिवाय  अनावश्यक जागी. संगीताचा प्रवाह सतत वाहता रहावा म्हणून ही योजना, बावळट आणि मागास कथाविषय हे सर्व अनुभवत असताना  मनात सारखा विचार येत गेला आला,
” कशाला पाहिजे मराठी सिनेमांना थिएटर आणि प्रेक्षक ? “
अर्थात  एक दोन सिनेमावरून मराठी चित्र दुनियेबद्दल अशी शेरेबाजी करणं ठीक होणार नाही.
आशावाद बाळगावा अशाही घटना मराठी चित्रसृष्टीत निश्चित  घडत आहेत.
 आजच्या  निराशाजनक वातावरणात देखील मराठी भाषेत वर्षाकाठी  दहा वीस दर्जेदार सिनेमे  निघताहेत, याचं आश्चर्य मिश्रित कौतुक आहे.  पण त्यांना म्हणावे तसे  प्रेक्षक लाभत नाहीत.  अनेकदा प्रेक्षकाअभावी  शो बंद करावे लागत आहेत.

 मराठी सिनेमांना थिएटर पाहिजे अशी मागणी सातत्याने  होते आहे . ती आवश्यकच आहे.

पण . . .

अभिजात भाषेला अभिजात दर्जाचा सिनेमा मिळाला तरी अभिजात अभिरुची असलेला प्रेक्षकवर्ग नको का ?  

– ©️  अवधूत परळकर

awdhooot@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे जाणा व ज्ञानात भर घाला

 प्रश्नसमूह 5

16. खाली काही संतांची मूळ नावे-आडनावे दिली आहेत. पहिले नाव गाळले आहे.  आपण ते गाळलेले नाव भरायचे आहे तसेच त्या संताला आपण  कोणत्या नावाने ओळखतो ते कंसात लिहायचे आहे.  
–—- सूर्याजी ठोसर म्हणजे (   )
—– विठ्ठलपंत कुलकर्णी   (   )
—— बोल्होबा अंबिले      (   )
—— सूर्यनारायण देशपांडे   (   )
—– दामाजी रेळेकर       (   )
—— काका कुंभार        (    )

17. खालील संत कोणत्या शतकात होऊन गेले ? –
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत एकनाथ
संत रामदास
संत चोखामेळा
संत तुकाराम

18. संत  वाङमयात खालील संतांच्या विशेष गद्यपद्य रचना कोणत्या ?
ज्ञानेश्वर
नामदेव
एकनाथ
तुकाराम
रामदास
19. कोणते संत महाराष्ट्राबाहेरसुद्धा आदरणीय मानले जातात.

20. महाराष्ट्रातील स्त्री संत कोण कोण होऊन गेल्या ?

वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.   

उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.  

– ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विश्वातले सर्वात मोठे ‘जितेजागते’ हिंदू मंदिर !

श्रीरंग मंदिराचा प्रचंड विस्तार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत बोलताना अगदी अलिकडेच म्हणजे ५ डिसेंबर २०२५ या दिवशी प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या मालकीणबाई सुधा मूर्ती यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “अंगकोर (कंबोडिया) येथील विष्णू मंदिर हे जगातलं सर्वात मोठं प्रार्थनास्थळ मानलं जात असलं तरी ते जितंजागतं (living) मंदिर नाही. तिथे पूजाअर्चा होत नाही. मात्र भारतातील तमिळनाडूत असं एक प्राचीन हिंदू मंदिर आहे, की जे जगातील सर्वात मोठं विष्णू मंदिर तर आहेच, पण ते एक जितंजागतं मंदिरही आहे. तिथे नियमितपणे पूजाअर्चा आणि धार्मिक विधी होत असतात. हे मंदिर म्हणजे तिरुचिरापल्ली जवळील ‘श्रीरंगम् मंदिर’. मात्र तमिळनाडूच्या बाहेर ते फारसं कुणाला माहीत नाही. त्यामुळे माझी केंद्र सरकारला अशी विनंती आहे, की त्याचा समावेश आपल्या ‘टुरिझम यादी’त करावा आणि ‘जागतिक वारसा’ म्हणून त्याची नोंद व्हावी यासाठी सरकारी पातळीवर तातडीने प्रयत्न व्हावेत !”

थोडा इतिहास
सुधा मूर्तींच्या या वक्तव्याची दखल कुठल्याच माध्यमाने किंवा वृत्तपत्रांनी घेतलेली दिसत नाही. आणि हे नेहमीचंच आहे. हिंदू आस्थेचा नि गौरवाचा विषय आला, की आपली माध्यमे नि वृत्तपत्रे सोयीस्कर मौन पाळत असतात. त्यामुळे आपण स्वतःच सर्वसामान्यांमध्ये या मंदिराविषयी जागृती करणं अगत्याचं आहे. हे मंदिर २००० वर्षांपूर्वी ‘धर्मवर्मा’ या आद्य चोल राजाने बांधलं. पुढे नदीच्या पुरात या मंदिराची हानी झाल्यावर ‘किल्लीवळवण’ या ३ ऱ्या शतकातील चोल राजाने त्याची पुनर्बांधणी केली. हे मंदिर रंगनाथस्वामी (विष्णूचंच एक रूप) आणि रंगनायकी (लक्ष्मी) या देवतांच्या आराधनेसाठी बांधलं असून या देवतांचे उल्लेख रामायण, महाभारत, पद्मपुराण, ब्रह्माण्डपुराण, गरुडपुराण या संस्कृत ग्रंथांमध्ये आणि अतिप्राचीन तमिळ संगम साहित्यात आले आहेत. वैष्णव संप्रदायातील पंचरात्री आगमाच्या परंपरेतील हे देवस्थान आहे. पुढल्या काळात चोल, पांड्य, होयसळ, विजयानगर आणि मराठा साम्राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम याला हातभार लावला आहे. १४ व्या शतकात महंमद बिन तुघलक याच्या सैन्याने या मंदिरावर हल्ला केला असता विष्णुभक्तांनी प्रतिहल्ला करून त्यांना पिटाळून लावलं. त्या धर्मयुद्धात १३,००० विष्णू भक्त हुतात्मा झाले असं तमिळ इतिहासात नमूद केलेलं आहे.    

प्रचंड विस्तार
द्राविडी शैलीतील हे मंदिर कावेरी आणि कोल्लिडं या दोन नद्यांच्या दुआबात वसलं आहे. तब्बल १५६ एकर (६३ हेक्टर) जमिनीवर ७ आवारांतील प्राकारांमध्ये हे मंदिर विभागलं असून त्यात २१ गगनचुंबी गोपुरे आहेत. (अंगकोरचं विष्णू मंदिर ४०० एकर जमिनीवर बांधलं आहे.) या गोपुरांपैकी एक गोपुर ७३ मीटर- म्हणजे २४० फूट- उंच आहे. बाकीची त्यापेक्षा कमी-अधिक उंचीची आहेत. या गोपुरांमधोमध श्री रंगनाथस्वामीचं भव्य विमान असून ते सोन्याने मढवलेलं आहे. समुद्रमंथनामधून हे सुवर्ण विमान निघाल्याची पुराणकथा तिथे रूढ आहे. मंदिराच्या प्रांगणात ८१ लहानमोठी देवालये, ३९ मोठे सभामंडप आणि कित्येक जलाशय व लहानमोठी कुंडे आहेत. सभामंडपाच्या भिंतींची एकूण लांबी ६ मैल (९.६५ कि.मी.) एवढी असून प्रत्येक मंडपात १००० स्तंभ आहेत. श्री रंगनाथ स्वामी याच्या मुख्य मंदिराबरोबरच जंबुकेश्वराच्या स्वरूपातील एक विशाल शिवमंदिरही तिथे आहे. अशाप्रकारे हरी-हर या देवतांचा संगम झालेला या पवित्र ठिकाणी दिसून येतो. डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास या मंदिराच्या प्रांगणात २१ दिवसांचा उत्सव होतो, त्याला तमिळनाडूतून दहा लाख लोक जमतात. गुगलमध्ये Srirangam Temple हे शब्द घालून Images वर क्लिक केलं, की जे शेकडो फोटो येतात त्यावरून वाचकांना या मंदिराच्या विशाल विस्ताराची उत्तम कल्पना येऊ शकेल.

अक्षम्य उदासीनता
अशा या अतिप्राचीन, भव्य हिंदू मंदिराला ‘जागतिक वारसा’ म्हणून मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे ‘युनेस्को’ मध्ये प्रलंबित म्हणून पडून आहे. भारतीय टुरिझम खात्यालाही या मंदिराची माहिती नसावी यावरून आपला वारसा, आपली संस्कृती आणि आपला धर्म याविषयीची सरकारी उदासीनता प्रकर्षाने दिसून येते. निदान सर्वसामान्य भारतीय प्रवाशांनी तरी या मंदिराला भेट देऊन आपलं हे धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव स्वतःच्या डोळ्यांनी पहावं आणि अनुभवावं एवढीच अपेक्षा.

गगनचुंबी गोपुरांपैकी एक गोपुर

– ©️ हर्षद सरपोतदार   

hsarpotdar1@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

  

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– ©️ मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 – ©️ युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

डब्लिन डायरी

स्वागत फुलांनी 

लेखांक २० 

डब्लिन ऑरर्लॅंडो

डब्लिनमधल्या आमच्या मुलाच्या  घरापासून  सॅन फ्रान्सिस्कोचा  विमानतळ ६६ किलोमीटर दूर आहे. धावपट्टी अगदी समुद्राच्या पाण्याला चिकटून आहे. विमानानं आकाशात झेप घेतल्यावर विमान पाहता पाहता पस्तीस हजार फुटांवरून उडायला  लागतं.  आकाश निरभ्र असलयास विमानाच्या खिडकीतुन खाली पाहिलं तर शहरं, वस्ती, फ्री वे दिसतात. थोड्या वेळाने ऍरिझोनावरून जायला लागत नंतर  ग्रँड कँनियनसुद्धा  दिसतो;  त्यानंतर इतर राज्ये दिसतात. बराच काळ वस्ती दिसत नाही.

विमानातल्या खुर्ची समोरच्या मॉनिटर मध्ये चित्रपट, टीव्ही दिसण्याची सोय असते. शिवाय विमान कसे चालले आहे त्याचे चित्रीकरण  पाहायला मिळते.  ते पाहता पाहता वेळ कसा निघून जातो  ते कळत नाही.  शिवाय विमानाने किती मैल पार केलेत आणि किती बाकी आहेत तेही दिसत राहते.

San Francisco Airport विमानतळाचीएक बाजू पाण्याला चिकटली आहे .. विमान उतरवताना कौशल्याची गरज असेल 

सॅन फ्रान्सिस्कोपासून ऑरलँडो विमानतळ ३९३६ कि. मी. दूर आहे हे कळतं. त्याला मॅकॉय एअर फोर्स बेस असे नाव आहे. विमानतळावर उतरल्यावर तिथून एक मोनोरेल गाडी आहे. त्यात बसून बाहेर जावे लागते. इतका विमानतळ मोठा आहे.

विमानतळापासून मित्राच्या मुलाचे  घर फक्त ११ किमी असल्याने आम्ही लगेच घरी पोचलो. त्या अकरा किलोमीटरच्या प्रवासानं गावानं मन जिंकलं. प्रथमदर्शनी ओरलँडोच्या प्रेमात पडलो.

आम्ही पतिपत्नीने सॅन फ्रान्सिस्कोहून फिनिक्स, शिकागो आणि ऑरर्लॅंडो या सगळ्या गावी युनाइटेड एरलाईन्सने प्रवास केला.  दर वेळी मुलगा विमानतळावर सोडायला आणि घ्यायला येतो. युनाइटेड एरलाईन्सकडे ९७२ विमाने आहेत तर एअर इंडियापाशी  १४५ विमाने आहेत. यावरून युनाइटेड एअरलाईनचा कारभार  किती मोठा  आहे, याची कल्पना येते.  ओरलँडो  जवळ आलं की विमानातून अनेक तलाव आणि पाणथळ जागा दिसतात.



अमेरिकेचं निसर्गसौंदर्य मानवी सौंदर्याला फिकं पाडतं.अमेरिका अफलातून देश आहे. डब्लिनला सगळ्या दिशांना टेकड्याच टेकड्या आहेत, तर ऑर्लॅंडो गावात सरोवरांचे साम्राज्य आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याने प्रसन्न वाटते.

Orlando lakes गुगल अर्थ मधून घेतलेले शहरातील तलावांचे दृश्य . शहर किती रम्य असेल याची कल्पना येते .

ऑर्लॅंडो हिरवंगार आहे. डोळ्यांना सुखावणारं आहे. फ्लोरिडा राज्य अमेरीकेने स्पेनकडून विकत घेतलं. बकरीच्या मानेला लटकणारा अवयव असतो, तसा  फ्लोरिडा अमेरिकेला चिकटलेला आहे.


Map of USA अमेरिकेच्या नकाशात फ्लोरिडाचं स्थान, डाव्या बाजूस मेक्सिकोचा समुद्र आणि पूर्वेला अटलांटिक महासागर. जिथे सूर्योदय दिसतो.


Lake ओरलँडो मधील शंभर तलावांपैकी एक. मित्राच्या घराच्या मागीलदारातून दिसतो.
Fountain–विजेवर चालणारे तरंगते कारंजे. अशी अनेक छोट्या तळ्यात असतात.  

गावाच्या क्षेत्रफळाच्या दहा टक्के तलावाचं क्षेत्रफळ आहे. फ्लोरिडा राज्यात भरपूर पाऊस पडतो. त्याशिवाय जमिनीतून पाण्याचे झरे तलावांना  पाण्याचा सतत पुरवठा करत असतात. बडोद्याला काही भागात शंभर फूट खोदलं तरी बोअरमध्ये पाण्याचा थेंब  येत नाही आणि ओरलॅंडोत जमिनीतल्या पाणफुटीला आवर घालावा लागतो.

मोटारीने घरी जाताना पेट्रोल पंपावर पेट्रोलची किंमत मोठ्या आकड्यात लिहिलेली असते. मी मित्राला म्हटलं, इथे  एका गॅलनला तीन डॉलर आहे आणि सॅन फ्रान्सिस्कोला साडेपाच डॉलर आहे. म्हणजे तुमचं गाव स्वस्त दिसतंय. तो ‘हो’ म्हणाला. ” इथे सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियापेक्षा घरं स्वस्त आहेत”  .. कॅलिफोर्नियात श्रीमंतांची वस्ती आहे आणि तिथली घरं दुप्पट महाग आहेत  तर फ्लोरिडात मध्यम वर्गातले लोक जास्त आहेत. शिवाय फ्लोरिडा स्वस्तही आहे.

फ्लोरिडाला ऑरेंज कंट्री म्हणतात. तीही स्वस्त असतात. शिवाय इथे ग्रेप फ्रूट नावाचं संत्र्यासासारखं फळ मिळतं. फ्लोरिडात फळाची लयलूट असते. निवृत्त लोकांनाही फ्लोरिडात राहणं परवडतं. ओरर्लांडोची वस्ती ३ लाख सोळा हजार आहे (२०२२)  आणि गावाचं क्षेत्रफळ ३०८चौरस किमी आहे  बडोद्याची लोकवस्ती तेवीस लाख असून वस्ती घनता दर चौरस किलोमीटरवर  ७४०० आहे तर ओरलँडोची  १०७१ आहे. म्हणजे बडोद्यापेक्षा  किती तरी कमी आहे.

 दुसऱ्या दिवशी लवकर उठून सूर्योदय पाहायला जायचं की नको अशी चर्चा  झाली. शेवटी उठूया लवकर असा निर्णय झाला.

आम्ही कन्याकुमारी आणि दार्जिलिंगला पहाटे उठून धावत सुटलो होतो आणि दोन्ही वेळेस सूर्योदय पाहायला मिळाला नव्हता, त्यामुळे सूर्योदय पाहायला मिळेल अशी खात्री वाटत नव्हती.  सकाळी थोडं लवकर उठलो. चहा पिऊन सगळे निघालो. समोर काळे ढग दिसत होते. त्यामुळे वाटलं होतं की आज सूर्योदय पाहायची संधी हुकणार.

अटलांटिक महासागरासमोरच्या वाळूत उभे राहिलो. दहा बारा मिनिटांनी समुद्राच्या आतून लाल रंगाचा प्रकाश आकाशात पसरू लागला आणि थोड्याच वेळात सूर्यबिंब वर येऊ लागलं आणि डोळ्याचं पारणं फिटलं. निखळ सूर्योदय किंवा सूर्यास्त दिसायला  निसर्गाची मेहेरबानी असायला लागते .. असे दिवस वरचेवर येत नाहीत.


Orlando Sunrise सूर्योदय
Pondicherry सूर्योदय

माथेरान, महाबळेश्वर, पंचमढी, आंबोली वगैरे अनेक ठिकाणी सूर्यास्त पहायच्या जागा असतात. तश्या सुरेख सूर्योदय दिसणाऱ्याही जागा असतात.  अटलांटिक किनाऱ्यावरच्या वाळूपेक्षा  गुहागरचा समुद्र किनारा आणि तिथली पुळण उत्तम आहे

सूर्योदय किंवा सूर्यास्त दिसायला, एक तर समुद्र हवा नाहीतर क्षितिजापर्यंत मध्ये काहीही नसलेला भूप्रदेश असावा लागतो. पॉंडिचेरीला आम्ही राहिलो होतो, तिथपासून पंचवीस पावलावर समुद्र किनारा होता. तीनचार दिवस रोज सकाळी समुद्रातून सूर्य उगवताना पाहत होतो, असे अनेक जागांवरचे सूर्याचे उदय आणि अस्त सगळ्यांच्या लक्षात राहतात. सकाळी सूर्योदय पाहून परत फिरताना एका मंदिरात गेलो. मंदिराचे प्रांगण विशाल आहे आहे. दीडशे फूट लांब आणि सव्वाशे फूट रुंद सभा मंडपात अनेक देवांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी बालाजीची मोठी मूर्ती आहे .

मंदिरात छायाचित्रे घेण्याची मनाई असल्याने मी पावले मोजून मापे घेतली होती. मंदिरातले भोजनालय विशाल आहे. तिथे एकावेळी पुष्कळ माणसं  बसू शकतात.

ओरलँडोच्या मंदिरातले पुजारी संस्कृत आणि वेदाचे उच्च शिक्षण घेतलेले विद्वान आहेत, मंदिराच्या  व्यवस्थापकात दरेक प्रांतातली माणसे आढळली. मंदिरातर्फे सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. ही फार उत्तम सोय आहे. नाही तर पंचाईत झाली असती.

.शनिवारी आणि रविवारी मंदिरातर्फे तामिळ, तेलगू, कानडी आणि गुजराती भाषा शिकवली जाते. मंदिरातर्फे कँटीन चालवले जाते. तिथे स्वादिष्ट पदार्थ मिळतात. मी डोसा खाल्ला.  तो छान होता.

ओरलँडोला मगरींचं शहर म्हणतात. गावात साडेबारा लाख मगरी आहेत. अर्थात मला एकही दिसली नाही. बडोद्याच्या विश्वामित्री नदीत तीनशे मगरी आहेत. त्या किनाऱ्यावर ऊन खात बसलेल्या नेहमी दिसतात. मित्राच्या घराच्या आसपास हरणं मात्र भरपूर दिसली.

Deers  गावात अनेक  जश्या  गाईम्हशी  फिरतात तशी हिरवळीवर फिरणारी हरणं

फ्लोरिडामध्ये सप्टेंबर महिन्यात वादळ होतात हे माहित होतं. त्यामुळे तिथे घरं कशी बांधतात ते पहायचं होतं. योगायोगाने जवळच दोन घरांचे बांधकाम होत होते.  त्या ठिकाणी लोखंडाचा आणि काँक्रीटचा उपयोग होताना दिसत होता.


CC Block. आम्ही फ्लोरीडाहून परतलो आणि दुसरेच दिवशी हेलेना नावाचे भयानक वादळ फ्लोरीडाच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आले . अनेक घराची छपरं उडून गेली आणि पुष्कळ नुकसान झालं
Steel Channels वादळी प्रदेश असल्याने घरांनी भक्कम असणं अत्यावष्यक असल्याने लोखंड आणि काँक्रीटचा वापर

डब्लिन आणि ओरलँडोमधल्या गृहनिर्मितीच्या पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक आहे. डब्लिनमध्ये सगळे बांधकाम लाकडाचे असते आणि माजघर मोठे हवे असेल तर लोखंडी तुळईचा उपयोग करतात. ऑर्लॅंडोमध्ये तीव्र वादळापासून बचाव करण्यासाठी काँक्रीट आणि लोखंडाचा वापर करतात. शिवाय काँक्रीटचे विटांसारखे ब्लॉक याचाही वापर होतो .  शेवटी डब्लिन असो की आणखी कोणतं  गाव असो. प्रत्येक ठिकाणी डोक्यावरच्या भक्कम छपराची आणि चरितार्थाची काय सोय असते ते महत्वाचं.

योगायोगाने एका सांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावली. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या स्वाध्याय परिवाराची  प्रवृत्ती पोर्तुगाल, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मध्यपूर्वेत चालते, असे कळले. एका रविवारी स्वाध्याय केंदात गेलो होतो. तिथे जवळ जवळ पन्नास गुजराती भाषिक स्वाध्यायी जमले होते.  बहुसंख्य पन्नाशी उलटलेले होते. काही निवृत्त व्यक्तीही होत्या. त्यांनी कदाचित  पांडुरंगशास्त्रीना पाहिलेलं असावं. 

तो कार्यक्रम ऑर्लॅंडोच्या विशाल सायन्स स्कुलमध्ये होतो. तिथे एक विशाल खंड भाड्याने घेतला जातो. स्वाध्यायाच्या कार्यक्रमात प्रार्थनेची कॅसेट लावतात. स्वाध्याय म्हणजे स्वतःच अभ्यास करणं. विशेषकरून योग आणि  नियम पाळून स्वतःचं  व्यक्तिमत्व पवित्र राखणं. वृक्षांना देव समजून त्यांची सेवा करणं. भावपूर्ण  भक्ती करणं. 

 त्यानंतर पांडुरंगशास्त्रींजींच्या प्रवचनाचं दृकश्राव्य प्रसारण केलं जातं. साधारणपणे तासाभराने कार्यक्रम संपतो. त्यानंतर नव्या लोकांशी ओळख करून घेण्याचा अनौपचारिक कार्यक्रम होतो आणि सगळे आपापल्या मोटारीने घरी जातात.

परदेशी गेल्यावर मनात अनेक प्रश्न असतात. मराठी, गुजराती माणसं कशी राहतात. त्यांची घरं आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे.  ते फावल्या वेळात काय करतात. ते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधावासा वाटतो. अनेक वेळा प्रेक्षणीय स्थळांपेक्षा त्यांच्याशी गप्पा मारण्याची जास्त मजा वाटते.

आम्ही मित्राच्या मित्राकडे गेलो होतो. मित्राची आई गेल्या वर्षी देवलोकी गेलेली होती. दिवंगत स्त्रीशी जवळचे  संबंध असणाऱ्या सर्वांना आमंत्रण होतं. आमची गाड्याबरोबरची नळ्याची यात्रा होती. मित्राचं कुटुंब सोडल्यास सगळेच अनोळखी होते.

 त्यांच्याकडे जवळ जवळ पन्नास माणसं जमली होती. सुनेनं वीसपंचवीस गुजराती आणि संस्कृत प्रार्थना एकत्र करून त्यांच्या प्रति सगळ्यांना वाटल्या होत्या. जमलेल्या स्त्रिया एकेक प्रार्थना म्हणत होत्या. सर्वांचे उच्चार शुद्ध होते.काही प्रार्थना सर्वांना पाठ असल्याने त्या सामूहिक गायल्या जात होत्या. शेवटी  मुलाने त्याच्या आईच्या थोड्या आठवणी सांगितल्या.

त्यानंतर  सहभोजनाचा कार्यक्रम होता. सगळा सैपाक चार पाच मैत्रिणींनी  मिळून बनवला होता. त्यात पुऱ्या, भाजी, गुलाब जांबू, चटणी,  कोशिंबिरी वगैरे अनेक रुचकर पदार्थ  होते. त्या  जमावात बडोद्याची दोन कुटुंबं भेटली. एक  मराठी आणि एक गुजराती होते. इथे आलेल्यांनी पन्नाशी ओलांडली आहे. बहुतेकांची मुलंमुली  उत्तम महाविद्यालयात शिकत आहेत. येथे पदवीपर्यंतचे शिक्षण खूप महाग असतं. पण प्रत्येक भारतीयाने ती भरण्याची तरतूद आधीपासूनच करून ठेवलेली असते.  आमची दुसरी भाषा गुजराती असल्याने त्या कंपूत आम्ही मिसळून गेलो होतो. आपल्याकडे मुलगी जन्माला आली की पूर्वी गुंज गुंज सोनं घेऊन ठेवायला सुरुवात करत. तसेच इथं मूल जन्माला आल्यावर पैसे बाजूला ठेवायला सुरुवात करतात. त्या पन्नाशी उलटलेले बहुतेक अमेरिकेचे नागरिक आहेत. त्याच्या काही पालकांकडे ग्रीन कार्ड आहेत. पण बहुतेक पालकांना अमेरिकेत राहायला आवडत नाही, असे लक्षात आले.

एक नवरा बायको भेटले ते ऐंशीजवळ पोचले आहेत. भारतातील त्याचे आईवडील देवलोकी गेल्यामुळे. त्यांना आता भारताची काही ओढ नाही.

तसं पाहता संपूर्ण अमेरिकाच स्थलांतरितांनी भरलेली आहे. सगळ्यात जास्त लोक मेक्सिको, फिलिपाईन्स, एल साल्व्हाडोर, व्हिएतनाम, क्यूबा, गौतेमाला, आणि कोरिया या देशातून येतात. अमेरिकेपुढे तो ज्वलंत प्रश्न असतो.

अमेरिकेच्या लोकसंख्येत ज्यांची मातृभाषा स्पॅनिश आहे ते सगळ्यात जास्त आहेत. त्या खालोखाल इंग्रजी आणि चिनी आहेत. फिलिपिनी सतरा लाख, व्हिएतनामी १५ लाख, अरेबिक १४ लाख, फ्रेंच ११ लाख, रशियन,पोर्तुगीज आणि कोरियन भाषा बोलणारे  दहा लाख, जर्मन आणि हिंदी भाषिक साडेआठ लाख, पोलिश  इटालियन आणि उर्दू पाच पाच लाख, तेलगू ४,६०,०००, जपानी ४,५५,०००, गुजराती ४,३७,०००, बंगाली ४ लाख, तामिळ साडेतीन लाख, पंजाबी ३,१९,०००, थाई २,८४,००० आणि मराठी १,२७,६३०, सगळ्यात कमी आहेत. महाराष्ट्र सगळ्यात प्रगत राज्य असल्याने असं घडलं असेल? किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे, असा स्वभाव असल्यामुळे असेल कां?  याचा अभ्यास करण्यास पुन्हा अमेरिकेकडे पाहावं लागेल. कारण सगळ्यात जास्त डेटा (स्वतःची माहिती ) त्यांच्याकडे देऊन ठेवला आहे आणि त्यावर त्यांचीच मलिकी आहे.  

अमेरिकतेत नाईलाजाने येऊन राहिलेल्या लोकांची संख्या जास्त आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर, युरोपातील अस्थिर राजवटीनंतर बरेच आले. व्हिएतनाम, ब्रह्मदेश वगैरे देशातील लोक अस्थिर परिस्थितीला कंटाळून आले आहेत. भारतातले लोक उत्तम प्रकारच्या शिक्षणासाठी, जसे पूर्वी नालंदा, तक्षशिला येथे भारतात येत तसे किंवा सुखाच्या शोधासाठी अमेरिकेत गेले असावेत. काही चुकून येऊन गेले आहेत आणि काहींचे परतीचे दोर कापले गेले असतील. तरी मनात स्वदेशाची सतत चिंता असते. ही सगळी अवस्था  मानसिक गुंतागुंतीची असू शकते. काही अवघड जागी गळू झाल्याने सांगता येत नाही, असेही गेले असतील.  ज्यांना अमेरिकेत स्वतःचा उद्योग आहे त्यांना  इथे परत मायदेशी  येण्याचे काही कारण नसते . कोणाची काय मजबुरी असेल ते सांगता येत नाही.

खरं तर प्रत्येक स्थलान्तरितांची स्वतंत्र कहाणी असते. अगदी डोळ्यांच्या बुबुळासारखी प्रत्येकाची अगदी वेगळी. मग तो कोकणातून मुंबईला येवो. अथवा भारतातून अमेरिकेत जावो.

– ©️ प्रकाश पेठे 

prakashpethe@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – झिनिया : झिनिया ही अ‍ॅस्टेरेसी कुटुंबातील हेलियनथिया या वंशातील वनस्पतींचीएक प्रजाती आहे . या प्रजातीचे सदस्य त्यांच्या एकाकी लांब-काठाच्या १२ पाकळ्या असलेल्या फुलांसाठी प्रसिद्ध आहेत जे विविध चमकदार रंगांमध्ये येतात. हे नाव १८ व्या शतकातील जर्मन शास्त्रज्ञ जोहान गॉटफ्राइड झिन यांच्या सन्मानार्थ आहे .

ही प्रजाती नैऋत्य युनायटेड स्टेट्स ते दक्षिण अमेरिकेपर्यंत पसरलेल्या भागात , मेक्सिकोमध्ये विविधतेचे केंद्र असलेल्या, झुडुपे आणि कोरड्या गवताळ प्रदेशात मूळ आहे.

प्रकाशचित्र – अनघा फर्नांडिस 
प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  

priyakar40@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(54)
Whoever said money can’t buy happiness simply didn’t know where to go shopping.

Gertrude Stein 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

 – पृष्ठ ६२ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता
१२ व्या अध्यायाचा भावानुवाद

१ डिसेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी होती, तिला मोक्षदा एकादशी तसेच गीता जयंती दिन असेही म्हणतात.
ह्या दिवशी महाभारत युद्ध सुरु व्हायच्या आधी श्रीकृष्णाने अर्जुनास रणांगणावर गीता सांगितली आणि उपदेश केला असल्याने हा दिवस महत्वाचा आहे. आपल्या मैत्री अनुदिनीच्या अंकात आजपासून  श्री.माधव मनोहर जोशी
ह्यांनी त्यांना जसा भावला त्याप्रमाणे त्यांनी केलेल्या गीतेच्या बाराव्या अध्यायातील आणि १५ व्या अध्यायातील श्लोकांचा अर्थ तसेच पद्यात भावानुवाद सादर करत आहेत . सुरुवातीला १२ व्या अध्यायातील १ ते ५ श्लोक आपण एकेका अंकात वाचणार आहोत.
संपादक


श्लोक १—

अर्जुन उवाच–
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १२-१ ॥

अर्थ —

अर्जुन म्हणाला,
जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन, ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची
आणि दुसरे जे केवळ अविनाशी निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये
अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत? ॥ १२-१ ॥

मराठी पद्य रूपी भावानुवाद —

अर्जुन उवाच –
कृष्णा सांग मज l कोण असे श्रेष्ठ l
उच्च योगनिष्ठ l कर्मयोगी ll
असती जे मग्न l भजनी,ध्यानात l
सगुण रुपात l उपासती ll
किंवा जे भजती l ब्रम्हा अविनाशी l
निर्गुण रुपाशी l उपासती ll १२. १ ।।

श्लोक २ –


श्रीभगवानुवाच —
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ १२-२ ॥

अर्थ —
भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त
होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥

मराठी पद्य रूपी भावानुवाद —

श्री कृष्ण उवाच —
जे मज एकाग्री l करुनिया चित्त l
भजती जे नित्य l भक्तजन ll
श्रद्धा ती ठेवून l मज एकनिष्ठ l
तेच असे श्रेष्ठ l योगी जन ll १२.२ ।।

श्लोक ३, ४ —

*ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्‌ ॥ १२-३ ॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ १२-४ ॥*

अर्थ —

परंतु जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या अनप्रकारे ताब्यात ठेवून मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी,
अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची
निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी
समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. ॥

मराठी पद्य रूपी भावानुवाद —

स्वतःच्या इंद्रिया l ठेवून काबूत l
उपासनी रत l होती जन ll
तेच जन जेव्हा l होती एकरूप l
भजती ते रूप l अविनाशी ll
समस्त भुतांच्या l कल्याणा तत्पर l
सर्वांसी आदर l एक असे ।।
ऐसे ते सज्जन l निराकार योगी l
मजला मिळती l जाण पार्था ll १२. ३,४ ।।

श्लोक ५—-

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्‌ |
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ १२-५ ॥

अर्थ —

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा
अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते.॥ १२-५ ॥

मराठी पद्य रूपी भावानुवाद —

कष्टप्रद त्यांची l साधना ही असे l
ज्यांचे चित्त असे l निराकार ll
सच्चिदानंदात l ब्रम्हानंदी टाळी l
पुरुषांच्या भाळी l कष्ट फार ll
जया असे फार l अभिमान देही l
अव्यक्त ब्रम्हाही l प्राप्त नोहे ll १२. ५ ।।

– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

कोव्हीड

तोंडाची चव गेली
अंग दुखायला लागलं
खोकला सुरु झाला
मग सडकून ताप आला
घसा इतका धरलेला की बोलता येईना
लोकशाहीला

मग घरातच आयसोलेट केलं
सोशल डिस्टन्ससिंग करा 
मुकाट्याने बसून राहा
म्हणून सांगितलं
लोकशाहीला

ताप वाढत होता
श्वासही अडकत होता
हॉस्पिटलमध्ये नेलं.
रांगेत उभं केलं
बेडच नव्हता
बेड मिळेल असं सांगून
फुटपाथवर बसवलं
लोकशाहीला

औषधं नव्हती
इंजेक्शनं नव्हती
फुटपाथवरही जागा नव्हती
ऑक्सिजन मिळत नव्हता
काळ्याबाजारातही
लोकशाहीला

कुणालाही ऐकू नाही आल्या
मरते वेळच्या अस्फुट किंकाळ्या
मेल्यावर स्मशानात सुध्दा इतकी गर्दी
उकिरड्यावर शेवटी फेकून दिलं प्रेत
लोकशाहीचं

– ©️रोहिणी भट साहनी

rohinisahni2000@yahoo.com

@@@@@@@

“हास थोडी छान”

चाफ्याच्या पानांवर
शोभत नाही राग
इतरांमुळे हसू हरवणे
का विचित्र त्याग?

तुझ्या गोड बोलण्यावर
फुले बागी फुलतात.
काळ्याभोर केसांवर
फुलपाखरे झुलतात

आभाळाचे दिवस रात्र
तुझ्या पापण्यांनी आहे
हसऱ्या मुखाचे ओज
सूर्य आनंदाने पाहे

संगीत आहे कारण
तू ते ऐकत असते
आरसा बनला कारण
त्याला समोर तू दिसते

ऋतु आहेत कारण
तुला ते आवडतात
तू त्यांना पहावं म्हणूनच
नवी पाने फांद्यांवर बागडतात

आता सांग तू रागावलीस तर
यांचे होईल न नुकसान?
चल आता राग सोड
आणि जरा हास थोडी छान!

– ©️ तुषार कदम
ऐरोली सेक्टर ५, नवी मुंबई 
Email – tushar.kadam.tdk@gmail.com

प्रेषक सौ. शुभदा प्रवीण अघोर  

shubhadaaghor@gmail. com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

फणसे काकू तुसी ग्रेट हो !

व्यक्तिविशेष [ ४ ] 

आलेल्या प्रत्येक दिवसाला आपलं सर्वस्व देणं हीच जीवनाची सार्थकता!! असे मानणा-या फारच थोड्या व्यक्ती असतात .त्यातल्या एक म्हणजे आमच्या फणसे काकू!

खरं तर, माझ्या नव-याच्या म्हणजे प्रविणच्या ऑफिसमधील अधिकारी श्री सुधीर फणसे यांच्या या पत्नी! पण आमची लेक युती हिच्यामुळे  त्या आमच्या फणसे काकू झालेल्या!

१९९५ च्या सुमारास फणसे काकूंच्या घरातील गोकुळामध्ये माझ्या लेकीचा म्हणजे युतीचा ती अडीच वर्षांची असताना  प्रवेश झाला. आणि मी निर्धास्तपणे दादरला माझी विशेष शिक्षिकेची नोकरी करू लागले. युतीही काकूंकडे छान रमली होती. काकांची खडकीला बदली होईपर्यंत युती काकूंकडे राहत असे. इतक्या वर्षांच्या सहवास होता.

एकदा आम्ही दोघी काका काकूंना भेटायला खडकीला गेलो. काका स्टेशनवर आम्हाला घ्यायला हजर होते. घरी काकुंनीही जय्यत तयारी केली होती. युतीच्या आवडीचे इडली सांबार व कमी तिखटाची चटणी आवर्जून केली होती. त्यानंतर आम्ही चौघेजण  जंतरम मंतरम या सिनेमाला गेलो .खूप गप्पा मारल्या. जुन्या आठवणीत रमलो .एक दिवस राहिलोही. दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना युती रडू लागली .का रडत होती हे काही सांगेनाच!  तसंच आम्ही घरी आलो .घरी आल्यावर मात्र म्हणाली, ” मला काकूंकडे राहायचं होतं म्हणून रडत होते.” गंमत वाटली मला!

इतका काकूंचा आणि काकांचा लळा होता. मला आठवतं आमची  अडचण होऊ नये म्हणून स्वप्नाच्या म्हणजे त्यांच्या लेकीच्या बाळंतपणातही काकूंनी सुट्टी घेतली नव्हती .आमची मुलंही सार्थकच्या  म्हणजे स्वप्नाच्या लेकाच्या बाललीलांमध्ये रमली.   फणसे काकूंचा लेक म्हणजे मुलांचा समीरदादा .तो  तर दोन्ही हातावर दोन बाजूंना मुलांना घेऊन गोल गोल फिरवत असे. खूप मजा वाटत असे मुलांना! अशा अनेक आठवणी आहेत.

प्रवीण एकदा बार्शीला राहायला गेला असता मी आणि युती दोघीच घरी होतो. मी नेहमीप्रमाणे  संध्याकाळी काकूंकडे जाऊन युतीला घरी घेऊन जात असे .एकदा काकूंनी मटकीची उसळ आणि पोळ्या असा मला डबा भरून दिला. मला म्हणाल्या, “एकटीच कुठे करत बसतेस! हा डबा खा.”

 फणसे काका तर खरच ग्रेट होते. प्रवीण नसताना एकदा गॅस सिलेंडर संपले तर काकांनी त्यांच्या स्कूटरवरुन मला सिलेंडर चक्क घरी आणून दिले . एक अधिकारी व्यक्ती आपल्याकरता अशीही काम करू शकतो यावर कोणाचा विश्वास बसेल?   पण हे तसे नव्हते .काका काकू नेहमीच मदतीला धावून येत.

एकदा काकांचा उपवास होता.आणि काकूंना बाहेर जायचे होते.मला हक्काने सांगितले की शुभा, काका तुझ्याकडे  साबुदाणा खिचडी खायला येतील. मला खूप छान वाटले होते तेव्हा! आपल्या माणसालाच असं आपण हक्काने  म्हणू शकतो ना!

 युतीच्या लग्नालाही स्वप्ना, फणसे काकूंना घेऊन आली होती .मला आणि प्रवीणला खूप आनंद झाला आणि काकांची उणीवही खूप भासली.   काकांच्या आठवणींनी आम्हा दोघींचे डोळे पाणावले.

चाळीस वर्षांहूनही  अधिक काका काकूंचा संसार होता .काका गेल्यानंतर काकूंनी अतिशय धीराने घेतले. आजही त्या आनंदाने काकांच्या आठवणींबरोबर जीवन जगत आहेत.  काकूंनी एक आदर्श पत्नी,आई, बहिण , मैत्रीण अशा अनेक भूमिका चोख बजावल्या आहेत.  आपल्या मधुर वाणीने आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. त्यातलीच मी आणि माझं कुटुंब आहे. ३७ वर्षाच्या सेवेनंतर मी सेवानिवृत्त झाले. माझीही अखंडित सेवा आनंदात आणि समाधानपूर्वक पूर्ण झाली यालाही फणसे काकू कारण आहेत. काकूंचे घर हे पाळणाघर कधीच नव्हते ते एक गोकुळ होते. या गोकुळातून युतीसारखी अनेक मुलं राहत होती .काका-काकूं बरोबर एक प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले ते कायमचेच! आजही काही आनंदाची बातमी असेल तर ती प्रथम फणसे काकूंना सांगावं असं नक्कीच वाटते आणि मी सांगते ही! काकू, तुसी ग्रेट हो!!

काकू , तुम्ही नेहमीच अशा आनंदी राहा! तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

फणसे काकू

–  ©️ सौ.शुभदा प्रविण अघोर
युतीची आई
shubhadaaghor@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

हरकत नाही पाय नसला तरी…

भवताल : १३  

दोन वर्षापुर्वी ही चिमणी माझ्याकडे रोज ठराविक वेळेला येत असे. बहुतेक करून सायंकाळी. हिच्यासाठीच मग मी नंतर तत्परतेने खिडकीत फिडर लावला होता. फिडरमुळे दुसऱ्या चिमण्याही यायच्या ..त्यामुळे मग ही थोडी उशिरा त्या गेल्या की यायची.. हिला पहायला मी पण मग त्याच ठराविक वेळी सोफ्यावर जरा आडोशाला बसायची. तिची जिद्द बघण्यासाठी..!

सोप्पं नव्हतंच ते तिच्यासाठी.. एका पायावर बँलेन्स राखत खिडकीच्या ग्रीलचा एक एक टप्पा पुर्ण करत मग फिडरपर्यत पोहचायचं..पायावर उभं राहून खाताच यायचं नाही. मग सरळ फतकल मारायच्या फिडरच्या प्लेटमध्ये..बसून मग एक एक दाणा चोचीत पकडायची.. खायची..उशिरा सगळ्यात शेवटी येण्याच हेच कारण असावं तिचं..पोट भरायच की नाही माहीत नाही पण दुसरी कुणी चिमणी आली की ही कसबसं उभी राहायची. उडी मारत प्लेट बाहेर यायची समतोल सांभाळत परत आकाशी झेप घ्यायची..

मी, ती दिसेनाशी होईपर्यत तिला पाठमोरी पहायची ..क्षणभरात गडप पण व्हायची..जीवनाबद्दल कोणतीही तिची तक्रार नव्हती..

एक अनामिक नातं तयार झालं होतं तिच्या माझ्यात..तिला नसावीच याची कल्पना. अशीच कधीतरी मला तिची आठवण येते..महिना दोन महिनाच आली असावी. पण अस्पर्श लळा लावून गेली..आजही मी मनातल्या मनात तिला विचारत असते How’s the Josh…. आणि या फोटोतून वर पहात जणू ती मला High sir..म्हणत आपल्या ध्येयापर्यत पोहचतेय असं वाटतं…!!

– ©️ सविता कांबळे

savitak211@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे द्या आणि ज्ञानात भर घाला

विलास सातपुते 

प्रश्नसमूह  ५

.बुलेट ट्रेनबद्दल आपणास किती माहिती आहे ?  :-

१) बुलेट ट्रेन म्हणजे काय ?

२)  भारतातील बुलेट ट्रेनचा वेग किती असेल ?

३) भारतातील बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांमध्ये धावणार आहे व किती किलोमीटर लांबीचा रेल पथ आहे ?

४)भारतातील बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणे अपेक्षित आहे ?

५)  बुलेट ट्रेनच्या  एका गाडीला किती डबे असतील ?

६) दिवसातून किती गाड्या सुटतील ?

७) कोण कोणत्या स्थानकांवर बुलेट ट्रेन ही गाडी थांबेल ?

८) रोज ३५ गाड्या सोडण्याकरिता किती डबे साखळ्या (रेक्स) कारखान्यात बनवण्यात येतील ?

९) बुलेट ट्रेन या गाडीचे भाडे काय असेल ?

१०) बुलेट ट्रेनच्या प्रवासाचा वेळ किती असेल आणि तिच्यामुळे प्रवासाचा किती वेळ वाचेल ?

११) भारतीय बुलेट ट्रेन कोणाच्या तांत्रिक  व आर्थिक सहकार्याने बनत आहे ?

१२) जगात अजून कोठे कोठे बुलेट ट्रेन धावतात ?

१३) इतर देशातील जलद गती आगगाड्यांचा म्हणजे बुलेट ट्रेनचा ताशी वेग काय आहे ?

१४) बुलेट ट्रेन इतका वेग कसा घेऊ शकते ?

१५) मॅगलेव्ह बुलेट ट्रेन म्हणजे काय ?

१६) मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नंतर पुढे काय ?

वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.   

उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.   


उत्तरे :-

 जपानमधील एक बुलेट ट्रेन

१. बुलेट ट्रेन म्हणजे काय ? – जी आगगाडी ताशी २०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावू शकते ती बुलेट ट्रेन म्हणली जाते.

२. भारतातील बुलेट ट्रेनचा वेग किती असेल ? –  बुलेट ट्रेनची सर्वोच्च गती ताशी ३००-३२० किलोमीटर असेल तर सरासरी गती ताशी२५० किलोमीटर असेल. हे जपानकडून आयातित डब्यांच्या बाबतीत आहे. 

भारतात सध्या ताशी २५० किलोमीटर वेग घेऊ शकेल अशा ८ डब्यांच्या २ साखळ्या बनवल्या जात आहेत. त्या बंगलोर येथील ‘भारत अर्थ मूव्हर्स’ या कंपनीकडून बनवल्या जात आहेत.  

३. भारतातील बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांमध्ये धावणार आहे व किती किलोमीटर लांबीचा रेल पथ आहे ? – बांद्रा-कुर्ला टर्मिनस, मुंबई ते अहमदाबाद (साबरमति) या दोन रेल्वे स्थानकांमध्ये. हे अंतर ५०५ किलोमीटर आहे.

४. भारतातील बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणे अपेक्षित आहे ?  – २०२८ अखेरपर्यंत.

५. बुलेट ट्रेनच्या  एका गाडीला किती डबे असतील ? – १० डबे असतील ७५ जण बसू शकतील एवढे.

६. दिवसातून किती गाड्या सुटतील ? –दर २४ तासात प्रत्येक बाजूने ३५ गाड्या सोडण्याचा बेत आहे.

७. कोण कोणत्या स्थानकांवर बुलेट ट्रेन ही गाडी थांबेल ? — बुलेट ट्रेन ही गाडी जलद आणि धीमी अशा दोन प्रकारची करण्याचे योजिले आहे. जलद गाडी ही अहमदाबाद व मुंबई यामधे फक्त सुरत व बडोदा या दोन स्थानकांवर थांबेल. तर धीमी गाडी ही मुंबई-साबरमति या दोन शेवटच्या स्थानकांमध्ये असलेल्या 10 स्थानकांवर थांबेल. अहमदाबाद काळुपूर, आणंद, बडोदा, भरूच, सुरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे याप्रमाणे.

८. रोज ३५ गाड्या सोडण्याकरिता किती डबे साखळ्या ( रेक्स) बनवण्यात येतील ? – २४ रेक्स म्हणजे एकून २४० डबे. १० डब्यांच्या २४ साखळ्या.

९. बुलेट ट्रेन या गाडीचे भाडे काय असेल ? – अहमदाबाद ते मुंबई या प्रवासाचे भाडे सध्याच्या एअरकंडिशन प्रथम वर्गाच्या सुमारे दीड पट असेल. म्हणजे सुमारे ३३०० रुपये असेल. सध्या अहमदाबाद ते मुंबई हवाई मार्गाचे भाडे ३००० ते ३५०० रुपये आहे.

१०. बुलेट ट्रेनच्या प्रवासाचा वेळ किती असेल आणि तिच्यामुळे प्रवासाचा किती वेळ वाचेल ? – अहमदाबाद ते मुंबई या प्रवासास जलद गतीची बुलेट ट्रेन गाडी सुमारे २ तास घेईल तर धीमी गतीची गाडी सुमारे पावणेतीन तास घेईल. सध्या ‘वंदे भारत’ ही सर्वात जलद गाडी या दोन स्थानकांतील प्रवासात  साडेपाच तास घेते तर एक्स्प्रेस गाड्या सुमारे सात-सव्वासात तास घेतात. हवाई मार्गाने सुमारे सव्वा ते दीड तास लागतात.

११. भारतीय बुलेट ट्रेन कोणाच्या तांत्रिक  व आर्थिक सहकार्याने बनत आहे ?  –  भारतीय बुलेट ट्रेन जपान सरकारच्या तांत्रिक  व आर्थिक सहकार्याने बनत आहे. एकूण ११०००० कोटी रुपये गुंतवणुकीपैकी ८८००० कोटी रुपये जपान सरकारची “ ‘जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजंसी” ही कंपनी 0.१ %% व्याजदराने कर्ज म्हणून देत आहे. ते १५ वर्षांनंतर फेडायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर ५० वर्षांत  फेडायचे आहे. जपानची शिन्‌कानसेन ही कंपनी तांत्रिक ज्ञान व तांत्रिक प्रशिक्षण देणार आहे. याकरिता २२००० कोटी हे शुल्क आकारण्यात येणार आहे.

१२. जगात अजून कोठे कोठे बुलेट ट्रेन धावतात ? – जगात १६ देशांत जलदगती आगगाड्या धावतात. त्यात युरोपमधील प्रगत देश, तसेच अमेरिका, ब्राज़िल इत्यादी आहेत तर आशियातून जपान, चीन, तैवान हे आहेत.  मोरोक्को, अल्जीरिया, इंडोनेशिया, उज़बेकिस्तान अशा छोट्या देशांमध्ये पण बुलेट ट्रेन धावते. इराणमध्ये बुलेट ट्रेनचे बांधकाम सुरू आहे. सर्वात मोठे जाळे चीनमध्ये आहे. ते ४८००० किलोमीटर आहे. तेथे अनेक बुलेट ट्रेन धावतात. चीनने २०११ मध्ये पहिली बुलेट ट्रेन सुरू केली.

१३. इतर देशातील जलद गती आगगाड्यांचा म्हणजे बुलेट ट्रेनचा ताशी वेग काय आहे ? –  युरोप देशांत लांब अंतरांवर धावणार्‌या बुलेट ट्रेन आगगाड्यांचा वेग ताशी २०० ते ३०० किलोमीटर आहे. ३०० किलोमीटरपेक्षा जास्त वेग घेणा-या गाड्या फक्त मोरोक्को, इंडोनेशिया, जपान व चीनमध्ये आहेत. चीनमधील गाड्यांचा वेग सर्वात जास्ती म्हणजे ३५० किलोमीटर ताशी आहे.

१४. बुलेट ट्रेन इतका वेग कसा घेऊ शकते ? – १) सामान्यतः गाडी धावतांना समोरून जोरात वारा येऊन तो इंजिनाशी घर्षण करून वेगाला विरोध करतो. बुलेट ट्रेनच्या इंजिनाचा पुढील भाग एका विशेष आकारात चोचीप्रमाणे निमुळता असा असतो. त्यामुळे हा हवेचा घर्षण विरोध कमी होतो व गाडीला वेग घेता येतो. हा वेग सहन व्हावा म्हणून रूळ, डबे आणि वरील विद्युत्‌ तारा यांची बांधणी व क्षमता नेहमीपेक्षा वेगळी असते. २) नेहमीच्या आगगाडीला एक इंजीन असते व ते पुढे असून एकट्याने सर्व डब्यांना खेचते. पण बुलेट ट्रेनमध्ये प्रत्येक डबा वा काही डबे हे इंजिनाचे गती देण्याचे कार्य करतात. त्यामुळे ट्रेनला चटकन वेग घेता येतो व जास्ती वेग घेता येतो.

१५. मॅगलेव्ह बुलेट ट्रेन म्हणजे काय ? – मॅगलेव्ह ट्रेनच्या तंत्रात चुंबकीय आकर्षणाचा उपयोग करून धर्मराज युधिष्ठिराच्या रथाप्रमाणे आगगाडीला धावतांना जमिनीपासून काही इंचावर अधांतरी ठेवले जाते. यामुळे चाकांचे रुळांशी होणारे घर्षण टाळले जाते. त्यामुळे मॅगलेव्ह गाड्यांचा वेग साध्या बुलेट ट्रेनपेक्षा जास्ती असतो.  चीन व जपान इथे मॅगलेव्ह गाड्या ४३० आणि५०० किलोमीटर ताशी या वेगाने धावतात, पण कमी अंतरावर !

१६. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नंतर पुढे काय ? – भारत सरकारने 7000 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गाची योजना आखलेली आहे. त्यात दिल्ली-जयपूर-अहमदबाद, मुंबई-पुणे-हैदराबाद, वाराणशी-पाटणा-कलकत्ता, दिल्ली-अमृतसर-जम्मू, चेन्नई-म्हैसूर अशा काही मार्गांची योजना आहे. 2047 पर्यंत हे पुरे करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याकरिता “ नॅशनल हाय स्पीड ऑथॉरिटी “ ही संस्था कार्यरत आहे. बहुतेक पुढील बुलेट ट्रेन ही अमृतसर ते जम्मू या मार्गावर धावण्याकरिता बनेल.

[ वरील प्रश्नांची उत्तरे पाठवणा-या सर्व वाचक मित्रांचे अभिनंदन आणि आभार ] 

 – ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

क्षणावली 

कथांचा डिजिटल प्रवास 

“खरंच एकत्र एखादं प्रॉजेक्ट केलं पाहिजे रे. ३५ वर्षांपूर्वी लिटिल थिएटरमध्ये एकत्र काम केल्यानंतर आपण परत कधी एकत्र काम केलंच नाही. काय करूया?” सिंगापूर मध्ये स्थायिक माझा मित्र योगेश तडवळकर ह्याच्याशी फोनवर झालेला संवाद. साल होतं २०२१. कोविडच्या धक्क्यातून नुकतंच कुठे जग सावरत होतं . एकमेकांपासून मैलोन मैल लांब राहून देखील संगणक आणि झूमच्या द्वारे एकत्र येण्याची हळू हळू जगाला सवय होत होती. ह्याच तंत्रज्ञानाचा सृजनशील वापर करून काहीतरी घडवून आणूया असं मी आणि योगेशनं पक्क ठरवलं.

योगेश आणि मी, सुधा करमरकर ह्यांच्या ‘लिटिल थिएटर’ (बालरंगभूमी) शिबिरात प्रथम भेटलो. छोट्यांच्या काही नाटकात एकत्र कामं केली. योगेशची शाळा बालमोहन आणि माझी आय. ई. एस. त्यामुळे शाळेमध्ये नाटकात एकत्र काम करायची संधी मिळाली नाही – त्यातून बालमोहन आणि आमच्या शाळेमधली स्पर्धा तर अगदी जगजाहीर! पण पुढे रुपारेल कॉलेजला आम्ही पुन्हा एकत्र आलो. ९० च्या दशकात रुपारेल कॉलेज प्रत्येक आंतर-महाविद्यालयीन नाटक स्पर्धा गाजवत होतं. रुपारेलमध्ये माझ्यापेक्षा योगेशचा नाटक वर्तुळात जास्त सहभाग होता. मी भरतनाट्यम, जर्मन भाषा, आणि शैक्षणिक अभ्यासक्रम ह्यात स्वतःला अधिक झोकून दिलं होतं. पुढे PhD च्या अभ्रासक्रमासाठी मी अमेरिकेला आले. बॉस्टनमध्ये स्थायिक झाल्यावर अभ्यासाबरोबर पुन्हा नाटकाकडे वळले. गेल्या वीस वर्षात मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषांमध्ये २५  हून अधिक एकांकिका, नाटक, आणि इतर नाट्य प्रकार अमेरिकेभर सादर केले. ह्या काळात CA झालेला आणि ॲडव्हर्टांझिंग, कॉपीरायटिंग, वेब युजेबालिटी, अर्गोनॉमिक्स आणि इतर बरेच काही (उपद्व्याप) करणारा योगेश सिंगापूरला स्थायिक झाला. गेल्या १२-१५ वर्षात फेसबुकसारख्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या नाटक प्रवासाची दखल घेत राहिलो (Thank you social media!!)

आणि मग २०२० मार्चमध्ये कोविडमुळे सगळेच नाट्य उपक्रम बंद पडले. नाटक हे माध्यम आपल्याला परत कधी उपलब्ध होईल हे कळेनासं झालं. आणि त्याच दिवसात कधीतरी माझा आणि योगेशचा हा संवाद झाला. सिंगापूर आणि बॉस्टन हे अंतर आपण नाटक बसवण्यासाठी कधी पार करू शकू इतकं कमी नाही हे आम्हाला दोघांना माहिती होतंच. परत दोघांना नोकरी, धंदा, संसार, जोडीदार, मुलं ह्या सगळ्या जवाबदाऱ्या होत्याच. म्हणून मग कोविडने निर्माण केलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण झूम वरूनच काहीतरी प्रोजेक्ट करायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं. झूमवरून एकांकिका, अभिवाचन ह्याचे काही कार्यक्रम मी कोविड सुरु झाल्यापासून पहिले होते. मी स्वतः कॅलिफोर्नियाच्या ‘कला’ संस्थेबरोबर झूमवरून दोन एकांकिका सादर केल्या होत्या. बॉस्टनच्या कम्युनिटी थिएटरतर्फे ऑनलाईन एक इंग्रजी नाटकसुद्धा केलं होतं.

पण योगेशला आणि मला काहीतरी निराळं करायचं  होतं. आणि तेव्हा “क्षणावली” ची आयडिया सुचली. हल्ली रेडिओ-नाटक किंवा रेडिओ-श्रुतिका हा प्रकार फारसा ऐकण्यात येत नाही. तो कलाप्रकार ताकदीने सादर करायला निराळं कौशल्य लागतं, अधिक मेहनत घ्यावी लागते. केवळ वाचिक अभिनयाच्या जोरावर श्रोत्यांच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं करणं सोपं नसतं. आणि म्हणूनच ते आव्हान आम्ही स्वीकारायचं  ठरवलं. श्रुतिका करायचं ठरल्यावर कथा कोणत्या निवडायच्या ह्या बद्दल निर्णय घ्यायला मात्र अजिबात वेळ लागला नाही. माझ्या बाबांच्या, म्हणजे लक्ष्मण लोंढे ह्यांच्याच, कथांवर आधारित श्रुतिका सादर करायच्या हा निर्णय सोपा होता. इंग्रजीत म्हणतात तसं – it  was a no brainer.  ८० च्या दशकामध्ये ‘सोबत’ या साप्ताहिकामध्ये बाबांनी “झरोका” नावाचं एक कथांचं सदर लिहिलं होतं. आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांवर किंवा लहानशा घटनांवर आधारित अक्षरशः दोन पानांच्या ह्या कथा  – काही नर्म विनोदी तर काही अतिशय तरल, काही इरसाल व्यक्तिरेखा असलेल्या तर काही अनपेक्षित पेचप्रसंग चित्रित करणार्‍या. वैविध्य, मनोरंजन, आणि नावीन्य असलेल्या ह्या कथाच नाटक म्हणून बसवायच्या हे नक्की झालं.

नंतरची स्टेप म्हणजे नक्की कोणत्या पाच कथा सादर करायच्या ते ठरवणं. ह्या निवडीसाठी दोन निकष गरजेचे होते – दोनच पात्र आणि श्राव्य माध्यमाद्वारे परिणामकारकतेने सादर करता येईल असं कथानक. फक्त संवादांवर अवलंबून न राहता गद्यातून कथानक फुलवणं ह्यात बाबांची हातोटी होती. क्षणावली मधल्या पाच भागांपैकी फक्त एकच – “खलनायक” – ही कथा संवाद स्वरूपात लिहिलेली आहे. बाकी सगळ्या कथांमध्ये अतिशय सुंदर गद्य आहे. परंतु श्रुतिकांमध्ये गद्य घेतलं तर ते नाट्य न होता कथावाचन झालं असतं. त्यामुळे “क्षणावली” साठी निवडलेल्या कथांतील गद्याचं सौंदर्य अबाधित ठेवत त्यांचं नाट्यरूपांतर करणं ही पुढची स्टेप ठरली. हे करताना कथांमधला काळ तोच ठेवायचा की बदलायचा, संवाद नैसर्गिक संभाषणासारखे होत असताना त्यातून आशय कसा पोचवायचा, सर्व भागात योगेश आणि मी हेच दोन कलाकार असलो तर प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा वेगळ्या कशा घडवायच्या अशा अनेक बाबींवर आम्ही उहापोह केला. प्रत्यक्ष प्रयोगाइतकीच ही प्रक्रियाही आम्हाला भरपूर आनंद देऊन गेली.  

मीडियाच्या काही वेगवेगळे पर्यायांची चाचणी करून पाहिल्यावर मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरून रेकॉर्डिंग करायचं निश्चित झालं. इथपर्यंतचा प्रवास तसा सहज झाला होता. आता खरी कसरत होती ती म्हणजे सिंगापूर आणि बॉस्टनमधील वेळेचं अंतर सांभाळून तालमी करणं आणि मग रेकॉर्डिंग करणं.  प्रत्येक भागासाठी आम्ही साधारण ६-७ तालिमींची सेशन केली. पहिल्या काही तालमींत कथेचा गाभा, कथेतील पात्रं, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं एकमेकांशी नातं ह्याबद्दल चर्चा केल्या. कधी मतभेद आणि वैचारिक वादही झाले. दोघांचा सहभाग संपूर्ण आणि मनमोकळा व्हावा म्हणून मुद्दामहूनच आम्ही हा दिग्दर्शक आणि तो नट अशी कामाची मर्यादित व्याख्या ठेवली नव्हती. त्याचा खूप फायदा झाला.

मग ३/४ सेशन तालमी करून आम्ही रेकॉर्डिंग्स केली. दोघांच्या बाकी व्यापातून वेळ काढून आम्ही आठवड्यात साधारण एक सेशन करू शकलो. प्रत्येक भागाचं रेकॉर्डिंग्स सुद्धा आम्ही ४/५ वेळा केलं. पोस्ट-रेकॉर्डिंग मिक्सिन्ग वगरे सोयी उपलब्ध नसल्याने एक सिंगल रेकॉर्डिंग दोघांना आवडल्यावरच आम्ही थांबायचो.

रेडिओ श्रुतिकेमध्ये अजून एक महत्वाची बाब असते ती म्हणजे संगीत. जेव्हा श्रोत्याला केवळ श्राव्य अनुभव मिळत असतो तेव्हा संगीत हे नाटकातलं जणू एक अतिरिक्त पात्र बनतं.  उत्तम पार्श्वसंगीत आणि ध्वनी प्रभावांच्या (foley effects) जोरावर केवळ संवादांमधून एक सुंदर चित्र उभा करता येऊ शकतं. क्षणावलीच्या ओपनिंग आणि पहिल्या भागाला उत्तम संगीत देऊन योगेशचा गुणी सह-रंगकर्मी अक्षय अवधानी ह्याने दमदार सुरुवात करून दिली. आणि मग भाग २ ते भाग ५ ह्या चार भागांची संगीताची जबाबदारी उचलली साकेत जोशी ह्याने. प्रत्येक कथानकाची नस साकेतने अगदी अचूक पकडली आणि त्या भावनांना, संवादांना, आणि आशयाला पूरक असं संगीत बांधलं. अर्थात संगीता बरोअबर अंतिम रेकॉर्डिंग तयार करण्यात प्रत्येक भागासाठी अजून २/३ आठवडे गेले.  त्यामुळे प्रत्येक भाग तयार व्हायला जवळ जवळ ३/४ महिने लागले. आणि अख्खी मालिका व्हायला २ हून अधिक वर्षं!

दरम्यानच्या काळात कोविडचे निर्बंध उठले – जगातले व्यवहार पूर्ववत सुरु झाले – नाटकं परत सुरु झाली. योगेश आणि मी सुद्धा कोविड पूर्वी अर्धवट सोडलेल्या आपापल्या उपक्रमांकडे परत वळलो. क्षणावली साठी वेळ देता येणं कठीण झालं. पण ५ भागांची मालिका काहीही झालं तरी नक्की पुरी करायची हा दोघांचा निश्चय मात्र ठाम होता आणि तो आम्ही पुरा केलाच!  

ऑगस्ट ६, २०२५ ला बाबांची दहावी पुण्यतिथी होती. त्या दिवशी ही मालिका त्यांना अर्पण केली – Baba, this one is for you!

मराठी साहित्यातील एक ख्यातनाम आणि धुरंधर लेखक लक्ष्मण लोंढे ह्यांना एका निराळ्या पद्धतीने अभिवादन करायचा आमचा प्रयत्न youtube च्या माध्यमातून पुढील लिंकवर उपलब्ध आहे:

जगभरातील रसिकांना तो आवडेल अशी आशा आहे. ‘मैत्री’च्या वाचकांनी अवश्य प्रतिसाद कळवावा.   

– ©️ऋचा लोंढे

ruchalondhe@gmail.com

 [ वरील लेख [ संक्षेपाने ] ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या २४ नोव्हेंबर २०२५ च्या आवृत्तीत प्रसिद्ध झाला होता. ] 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चक्रीवादळ

भूगोलाचा इतिहास :३८

अहो वायुरपूर्वोsयमित्याश्चर्यवशादिव
व्याघुर्णंते स्म जलधेस्तटेशुषु.वनराजय: ।।
“असे वादळ पूर्वी कधी झालेच नव्हते. म्हणून जे आश्चर्य वाटले, त्यामुळेच जणू समुद्रतीरावरील वनराजी डोलू लागल्या.”

सोमदेवाच्या कथासरित्सागरात वादळाची अशी काव्यमय वर्णने आहेत. सिंदबादच्या कथेतही अनेकदा वादळ येते. मार्कोपोलोपासून ते कोलंबस, वास्को द गामापर्यंत अनेकांची जहाजे वादळात सापडली. युगानुयुगे जगात असंख्य वादळे आली गेली. पण कथेतच नव्हे तर वास्तवातही अशा वादळाचा मार्ग व गती याकडे कुणीही लक्ष दिले नव्हते. ते काम केले एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतल्या एका खोगीर विक्रेत्याने. त्याचे नाव विलियम सी रेडफील्ड. १८२३ मध्ये कनेक्टिकट येथे झालेल्या एका वादळाने केलेला विध्वंस पाहण्यासाठी तो मुद्दाम तिथे गेला. तेथील एकूण विनाशचित्र पाहून त्याने निष्कर्ष काढला की हे वादळ स्वतःभोवती गोल फिरत असावे. हीच चक्रीवादळाच्या अभ्यासाची सुरवात होती.

जेम्स पोलार्ड एस्पि हे अमेरिकेतील एक हवामानतज्ञ होते. अनेक वादळांचा अभ्यास करून त्यांनी निष्कर्ष काढला की अशा वादळातील वारे हे केवळ भोवताली फिरत नसून त्याच्या आत शिरत असतात. ही वादळे कशी निर्माण होतात यासंबंधीचा आपला ‘अभिसरण सिद्धांत’ त्यांनी रॉयल सोसायटी व फ्रेंच अकॅडमीपुढे मांडला. १८४१ मध्ये ‘Philosophy of Storms’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. सर विल्यम रीड हे १८३९ ते १८४६ मध्ये बर्म्युडाचे गव्हर्नर होते. वादळांचे सखोल विश्लेषण करणारा ‘लॉज ऑफ स्टॉर्म्स’ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे येणाऱ्या चक्रीवादळाची चिन्हे सांगणारी मार्गदर्शिकाच ठरली. पण या क्षेत्रात फार महत्वाचे योगदान दिले हेन्री पेडिंग्टन यांनी. ते एक ब्रिटिश नाविक व संशोधक असून आयुष्याच्या उत्तरार्धात भारतात बंगालमध्ये स्थायिक झाले. त्याच काळात १८३३ मध्ये एक मोठे चक्रीवादळ कलकत्त्याला धडकले होते. विल्यम रीड यांचा ग्रंथ वाचून पेडिंग्टनही चक्रीवादळाच्या अभ्यासाकडे वळले. आपल्या व सहकाऱ्यांच्या नाविक नोंदी व वादळाचे अनुभव या आधारे त्यांनी चक्रीवादळांचा सखोल अभ्यास केला. चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी एक ‘प्रशांत क्षेत्र’ (डोळा) असून त्याच्याभोवती वारे चक्राकार फिरतात हे पेडिंग्टन यांनीच प्रथम सांगितले. एवढेच नव्हे तर १८४४ मध्ये अशा वादळांचे ‘सायक्लोन’ असे नामकरणही त्यांनीच केले. (ग्रीक kyklos : चक्र किंवा वर्तुळ). त्यांचा Horn-Book for the Law of Storms for the Indian and China Seas,  हा महत्वपूर्ण ग्रंथ १८४४ मध्ये प्रकाशित झाला. भारतीय व चिनी समुद्रात चक्रीवादळे टाळण्यात नाविकांना हा ग्रंथ फार उपयोगी ठरला.

हवाना मधील एक जेसुईट धर्मगुरू बेनिटो व्हाईन्स हे एका वेधशाळेचे प्रमुख होते. त्यांनी १८७० मध्ये कॅरिबियन परिसरात निरीक्षकांचे जाळे – नेटवर्कच उभे केले. चक्रीवादळाला दिशा देण्यात हवेचे वरचे थर महत्वाची भूमिका बजावतात, हे त्यांनी शोधून काढले. पुढे विमानांच्या शोधानंतर उंचावरून चक्रीवादळाकडे पाहणे शक्य झाले. २७ जुलै १९४३ रोजी अमेरिकी सैन्यातील एअर कर्नल जोसेफ डकवर्थ यांनी तर ए टी- 6 या हवाई दलाच्या विमानातून टेक्सास येथून उड्डाण घेऊन चक्क चक्रीवादळाच्या डोळ्यात प्रवेश केला. यानंतर चक्रीवादळाची टेहळणी ही नेहमीची बाब बनली. अशा अनेक प्रयत्नातून चक्रीवादळाचे स्वरूप उलगडू लागले.

पृथ्वीवर कधी कधी वारे चक्राकार पद्धतीने फिरतात. त्याला ‘आवर्त’ म्हणतात. आवर्ते जेव्हा मोठी, अतिवेगवान व विध्वंसक बनतात तेव्हा त्यांचा उल्लेख चक्रीवादळ असा केला जातो. आवर्तात उष्ण व बाष्पयुक्त हवा केंद्रभागाकडे वेगाने जात असते. पण त्याचवेळी, पृथ्वीच्या परिवलनामुळे ती वर ढकलली जाते. हवेच्या या ऊर्ध्वगामी गतीमुळे आवर्त मोठे होत जाते व त्याचे रूपांतर चक्रीवादळात होते. त्यांचे ‘अभिसारी’ व ‘अपसारी’ असे दोन प्रकार आहेत. अभिसारी प्रकारात वारे वेगाने आत जात असतात तर अपसारी प्रकारात ते बाहेर फेकले जातात. चक्रीवादळांचे उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधीय असेही दोन प्रकार पडतात. भारतातील चक्रीवादळे ही उष्णकटिबंधीय अभिसारी चक्रीवादळे आहेत. उत्तर गोलार्धातील चक्रीवादळे उलट घड्याळी दिशेने (Anticlockwise) तर दक्षिण गोलार्धातील घड्याळी दिशेने फिरतात.

चक्रीवादळांचा व्यास सुमारे शंभर ते दीड हजार किलोमीटर असतो. त्याच्या मध्यभागी कमी वायूभार क्षेत्र असते. त्याला चक्रीवादळाचा ‘डोळा'( Centre) असे म्हणतात. त्याचा व्यास सुमारे २० किमी असतो. हा भाग त्याच्या बाहेरील क्षेत्रापेक्षा शांत असतो. वादळ समुद्रावर असतांना तिथे आकाश निरभ्र असून वारे नसतात. पाऊसही नसतो. या केंद्राभोवती सर्व बाजूने बाहेर वायुभार अधिक व समान असून पर्जन्यही सर्व बाजूने समान असते. केंद्राच्या परिघावरील भागात सर्वाधिक गतीने चक्राकार वारे वाहतात. या भागास ‘नेत्रसीमा’ (Eye wall) म्हणतात. येथील वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते १५० किलोमीटर असतो.

चक्रीवादळ जेव्हा पूर्ण विकसित होते तेव्हा त्याच्या गाभ्यात किंवा डोळ्यात शेकडो मीटर उंचीपर्यंत पाणी चढू लागते. चक्रीवादळ जेव्हा किनाऱ्यावर पोहोचते तेव्हा हेच पाणी दूर दूर पर्यंत पसरून महापूर येतात. चक्रीवादळे ही एका जागी स्थिर नसून ती वेगाने प्रवास करतात. उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण झाल्यानंतर प्रथम पश्चिमेकडे, नंतर वायव्येकडे व नंतर उत्तरेकडे जात शेवटी ईशान्य दिशेकडे जाताना जिरून जातात. चक्रीवादळ किनारा ओलांडून भूप्रदेशावर येते तेव्हा विध्वंस होतो. जमिनीवर आल्यावर त्यांचा वेग झपाट्याने कमी होतो व ती जिरून जातात. किनारी प्रदेशात त्याच्या वेगवान झंजावाती वाऱ्यामुळे मोठमोठे वृक्ष, इमारती, विजेचे टेलिफोनचे खांब व मनोरे इत्यादींना हानी पोहोचते. तसेच प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊन महापूर येतात.

चक्रीवादळ हजारो कि.मी प्रवास करते. त्याला एवढी ऊर्जा कुठून मिळते ? चक्रीवादळाच्या आत पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते.  त्यासाठी सूर्यप्रकाशाची जी ऊर्जा वापरली जाते, ती वाफेत अप्रकट रुपात साठवली जाते. तिला ‘गुप्त उष्णता’ ( latent heat) म्हणतात. या वाफेचे सांद्रीभवन होऊन पाणी तयार होताना ही ऊर्जा मुक्त होते. अशा प्रकारे हजारो टन पाण्याचे अव्याहत बाष्पीभवन व सांद्रीभवन यातून निर्माण होणारी ऊर्जा चक्रीवादळाला गतिमान व फिरते ठेवते. या क्रियेतून चक्रीवादळात सर्वत्र वायूभार समान झाला की ते शांत होते. एका सामान्य चक्रीवादळाला एका दिवसात लागणारी ऊर्जा ही पृथ्वीवरील सर्व विद्युतनिर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या एकूण ऊर्जेचा सुमारे २०० पट असते.

१९६० च्या दशकात अमेरिकी सैन्यातर्फे ढगपेरणीचा एक विशेष प्रयोग करण्यात आला. त्याचा उद्देश अटलांटिक बेसिनमधील चक्रीवादळांचा मार्ग बदलणे हा होता. या प्रयोगात चक्रीवादळाची रचना तात्पुरता का होईना बदलली होती. पण या प्रयत्नातून चक्रीवादळाच्या ऊर्जेत व मार्गात अनपेक्षित मोठा बदल झाला असता तर ? ती शक्यता व संभाव्य भयंकर हानीच्या भीतीमुळे हे प्रयत्न थांबवले गेले. होमरच्या ओडिसीमध्ये एक प्रसंग आहे. युलिसीसला वादळाचा त्रास होऊ नये म्हणून वायूदेव ईओलसने वाऱ्यांची शक्ती एका कातडी पिशवीत बांधून आयोलस त्याच्याकडे दिली होती. अर्थात युलिसीसने ती पिशवी न उघडता जपून ठेवली. पण इथाकाच्या किनाऱ्याजवळ आल्यावर युलिसीसच्या मत्सरापोटी काही खलाशांनी त्या पिशवीचे तोंड उघडले. त्या क्षणी वादळ प्रकटले व त्यांची अर्गो ही नौका पुन्हा खोल समुद्रात फेकली गेली. चक्रीवादळासंबंधी प्रयोगात प्रत्येक वेळी माणूस युलिसीसप्रमाणे वागेल की त्या खलाशांप्रमाणे – हा एक गंभीर प्रश्न आहे.

 

चक्रीवादळाची रचना

– ©️  एल. के. कुलकर्णी
lkkulkarni.nanded@gmail.com
सोबतचे चित्र – चक्रीवादळाची रचना (इंटरनेट वरून साभार)

[ २८ सप्टेंबर २०२४ च्या ‘लोकसत्ता‘मध्ये पूर्वप्रसिद्ध ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विहंग मित्र

मित्र क्र. २ 

Oriental dwarf Kingfisher (  तिबोटी खंड्या )

अगदी झगमगते रंग असलेला जंगलातील किंगफिशर अथवा खंडया  पक्षी ! लालभडक, एखाद्या सूऱ्यासारखी टोकदार चोच, याचे रंग काय वर्णावे? गडद निळी पाठ व पंख, पोटाकडे फिकट नारिंगी, डोक्याकडे वेगळाच लाल, कपाळावर काळा ठिपका आणि मानेच्या कडेला निळे आणि पांढरे पट्टे. गळा पांढरा ……..उगीच नाही याला Jewel of kokan म्हणत !!

असा हा अतीव देखणा पक्षी पुढची पिढी वाढवण्यासाठी दक्षिणेकडून आपल्या निसर्गरम्य कोकणात पावसाळ्यात येतो.

याची प्रकाशचित्रे मिळवण्यासाठी आमच्यासारख्या निसर्गप्रेमींची अगदी धांदल असते.



– ©️देवदत्त पाटणकर.

8378980966 .
castingalu@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

रुळावलेला

हेमंत कुलकर्णी

२४ तास रेल्वेशी बांधील असलेल्या अभियंत्याचे आत्मकथन 

लेख क्र. २  

रेल्वेमध्ये भरतीचे विविध प्रकार आहेत
१ RRB / UPSC
२ कला / खेळ
३ अनुकंपा
४ SCOUTआणि GUIDE
५ इतर सक्षम अधिकारान्वये
ज्या वेळी तुमची सरळ क्र १ द्वारे भरती होते तेव्हा पात्र उमेदवाराला  त्या खात्याबद्दल काही महिने / वर्षे  ट्रेनिंग दिले जाते आणि मगच खाते निहाय परत परीक्षा घेऊन भरती केले जाते. जसे तुम्ही Electronics /Electronics & Communication  मधील विषय असलेले पदवीधारक असाल तर Secunderabad, Electrical  असाल तर नाशिक, Mechanical असाल तर जमालपूर (उ.प्र), Medical असाल तर मद्रास, भायखळा, Civil असाल तर पुणे आणि प्रशासनासाठी बडोदा या ठिकाणी आणि इतर खात्यासाठी  अगदी महाविद्यालय याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते.

या कालावधीमध्ये त्याला त्या त्या झोनमध्ये ( मध्य-रेल्वे, पश्चिम-रेल्वे दक्षिण-रेल्वे आणि इतर) फिल्डमध्ये ट्रेनिंग दिले जाते. जसे माझे खाते संकेत आणि दूरसंचार (Signal&Telecom) आहे. मला मध्य रेल्वेच्याच झाशी, जबलपूर, भोपाल, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी मला Practical / Field ट्रेनिंग दिले व त्यानंतर Posting केले गेले.

मला Field ट्रेनिंग मध्ये आलेले काही अनुभव :-

१. मी जेव्हा सिकंदराबाद इरीसेट (Secundrabad,IRISET, Indian Railways Institute of Signal Engineering and Telecommunication) क्लास रूम ट्रेनिंग संपून जबलपूरला होतो तेव्हा  मला माझ्या सेनिओरने  field वर जाताना, अतिशय गबाळा ड्रेस घालायला सांगितला आणि साधी चप्पल घालून यायला सांगितले.  
आम्ही (Section  किंवा Block म्हणजे दोन स्टेशनमधील रेल्वेच्या अधिकारातील प्रदेश) रेल्वे रुळाच्या बाजूने निघालो. चंबळचे खोरे रुळाच्या दोन्ही बाजूलाच आहे. माझे सिनिअर आम्हाला कामाची माहिती सांगत होते आम्ही  नोट करत होतो. Section  खूपच छान आणि निसर्गरम्य होता. काही अंतर चालून गेल्यावार अचानक दोन डाकूसदृश्य माणसे आमच्या समोर आली आणि म्हणाली, ” निकालो पैसा “, आमच्या सिनिअरने त्यांना  सांगितले, “नये बच्चे है Training दे रहा हु I” तरी त्यांनी आमचे बॅग आणि खिसे तपासले, थोडे फार पैसे होते, ते घेऊन निघून गेले. नंतर सिनिअरने सांगितले, “चांगले कपडे असते तर kidnapp करून पैसे मागितले असते.”

२. असाच एक  आणखीन एक प्रसंग :-
Eastern रेल्वे मधील Lumding (आसाम / मान्म्यामार जवळील प्रदेश)   मधील माझ्या Batchmet  ने सांगितला.
प्रत्येक छोट्या स्टेशनला तिथे काम करणारे कर्मचारी आणि  अधिकारी यांची नावे आणि त्यांचे खाते लिहिलेले फलक असतात. ज्या वेळी कर्मचारी स्टेशनवर कामासाठी येतो आणि त्याला Section मध्ये  जावे लागते तेव्हा तो Duty वर असलेल्या स्टेशन मास्तरला Report  करतो आणि  Password विचारतो आणि Section  मध्ये निघतो.  
ज्यावेळेस एखादा  माओवादी / समाजकंटक  भेटतो आणि कामाला प्रतिबंध करतो त्यावेळी आमचा कर्मचारी त्याला Password सांगतो. Password जुळला तरच त्याला त्रास दिला जात नाही आणि रेल्वे Track आणि इतर उपकरणांची, भूमिगत Cablesची  देखभाल करू दिली जाते..
 याबद्दलची माहिती अशी की Black Widow नावाची अतिरेकी संघटना रेल्वे रुळावर स्फोटके, मोठे दगड आणि लाकडी ओंडके ठेवून देशाला त्रास देत असे. तसे करू नये आणि आपल्या जीवाला धोका होऊ नये म्हणून तेथील स्टेशन मास्तर आणि सर्व कर्मचारी मिळून एक ठराविक रक्कम त्या माओवादी नेत्याला देत असत आणि मासिक Password दिला जात असे. हळू हळू हे आता खूप कमी झाले आहे. मिझोरम आणि मणिपूर आणि येथील अश्या बरर्याच संघटना अश्याच काम करत होत्या.

३. आणखीन एक असाच मला आलेला अनुभव :-
सोलापूर जवळ असल्यामुळे मी,  शनिवारी रविवारी जोडून सुट्टी आली तर सोलापुरी यायचो. त्यावेळेस आताची हुसैन सागर EXPRESS, मिनार एक्सप्रेस म्हणून ओळखली जायची. मी  Secuderabad स्टेशनला घाईघाईत आल्यामुळे सामान्य डब्यात साधरणातः  दुपारी ३ च्या सुमारास चढलो. एकाने मला जागा दिली. तो म्हणाला, कुणी विचारलं तर ड्रॉयव्हर म्हणून सांगा. मला कळले नाही;  मी म्हणालो का?. तो म्हणाला, नंतर सांगतो. गाडी सूरु झाली होती आणि वेग पण पकडला होता. अचानक ३/४  गुंड प्रवृत्तीची तरुण मुले हातात चाकू घेऊन पैसे मागणी करत फिरू लागले.
माझ्यापाशी आल्यावर मी driver आहे असे म्हणालो. ठीक आहे म्हणून पुढे गेली. दोन  अडीच तासाने TANDUR नावाचे स्टेशन आले. तिथे ही गँग चालत्या गाडीतूनच उतरली. मी त्या मित्राला विचारले, हा driver काय प्रकार आहे. त्यांनी सांगितलेली माहिती रंजकच होती.
मुंबईहून महिंद्र अँड महिंद्र आणि अशोक Layland चे आणि इतर कंपनीचे ओपेन truck म्हणजे फक्त Driver ची कॅबीन असलेले Truck, हे Driver, Truck च्या Body बिल्डिंग करता हैदराबादला आणतात, आणि Truck पोहचून मिनार Express ने मुंबईला निघतात. असेच ७/८ Driver, ट्रक पोहचून मुंबईला निघाले असताना ही गँग त्यांना  या गाडीत भेटली. गाडीतच मारामारी झाली. ह्या driver लोकांनी त्यांच्या एका लुटारूला चालत्या गाडीतून ढकलून दिले आणि बाकीच्यांना बेदम मारले. ज्याने मला ही  गोष्ट सांगितली ते तिघेच होते. मराठी बोलल्यामुळे त्याने driver म्हणून संख्या  वाढवली आणि आमचा प्रवास निर्धोक झाला. आता प्रवास खूपच  बिनधोक झाला आहे. ही  घटना १९९० ची आहे.
—————————————–

 नवीन रेल्वे कर्मचारी आणि भारतीय प्रवासी यांच्यातील “चौकशी”  खिडकीवरील सुसंवाद.(विनोदी पूर्ण ऐका ) 

– ©️ हेमंत कुलकर्णी 

ssehemant@gmail.com 

CVI (S&T)/ CSMTVigilance Branch C.R Mumbai

Mob:9004417957

Rly:01054738   

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

  

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– ©️ मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 – ©️ युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@

धर्मेंद्र 

मैं ग़म को ख़ुशी कैसे कह दूं 

जो कहते हैं उनको कहने दो

विनम्र अभिवादन 

– ©️ सौ. स्वाती वर्तक 

swati.k.vartak@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@