हेमंत मोने
लेखांक नववा
राजविद्या राजगुह्य योग
विनोबा म्हणतात नववा अध्याय म्हणजे समर्पणयोग
एखाद्या नाटकाला, कादंबरीला जसे मध्यवर्ती सूत्र असते तसे गीतेलाही एक सूत्र आहे. गीतेचा सगळा भर कर्म, धर्म, कर्मफल आणि स्वतःचं रूप (स्वरूप) ओळखणे यावर आहे.
दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायात कर्माची चर्चा आहे. कर्म करावे पण त्याचे कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये. ‘कर्तृत्व माझे’ असा भाव आला की कर्मफळाचा भोक्तेपणाही आला. कर्म करण्याचा अभिमान आणि त्याच्या फळाचा उपभोग या दोन्ही गोष्टी म्हणजे स्वतःला बंधनात अडकवून घेणे आहे.
कर्तेपणा आणि कर्मफळाचा भोग या दोन्ही गोष्टी सोडल्या तर मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रातून मोकळा होऊ शकतो कारण या दोन्ही गोष्टी सोडल्याने कर्माचे अकर्म होते. कर्म करून न केल्यासारखे होते मग बंधन कसले?
कर्माचा प्रधान हेतू चित्तशुद्धी असावा, त्याचा कर्म प्रयोजनाशी संबंध नाही. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितो तेव्हा ज्ञान देणे, विद्यार्थ्याला विचारप्रवृत्त करणे, कौशल्य शिकविणे हे सर्व म्हणजे त्याच्या अध्यापनाचे प्रयोजन. त्याची पूर्तता झालीच पाहिजे पण ही उद्दिष्टे साधत असताना शिक्षकाला समाधान वाटले, मनी संतोष झाला तर प्रयोजन आणि चित्तशुद्धी दोन्ही गोष्टी झाल्या.
पहिल्या काही अध्यायात या सर्व गोष्टींचा ऊहापोह केला असला तरी एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे कर्मफळ सोडून दिले, फळाचा त्याग केला तर फळाचे काय करायचे? कर्माचे फळ तुम्हाला मिळणारच आहे मग सोडायला ती काय वस्तू आहे का? आपण विसर्जन करतो म्हणजे मूर्ती पाण्यात सोडतो, लाटलेली पुरी तेलात सोडतो. फळ सोडणे म्हणजे असे तर नव्हे, मग फळाचे करायचे काय?
गीतेचा नववा अध्याय या प्रश्नाचे उत्तर देतो. गीता म्हणते कर्मफळ देवाला, ईश्वराला अर्पण कर. येथे कर्मफळ सोडणे याचा अर्थ ते ईश्वराला समर्पित करणे. याने काय होईल? दान करण्याबाबतचा संभ्रम नाहीसा होईल. दान सत्पात्री करावे असे म्हणतात पण सत्पात्र शोधायचे कुठे आणि कसे? सर्वश्रेष्ठ ईश्वराला फळ अर्पण केले की पात्रतेचा प्रश्नच मिटला. फळ ईश्वरार्पण करणे यापेक्षा आणखी कोणती महान गोष्ट असू शकेल?
नवव्या अध्यायात केवळ कर्म फळाचाच विचार नाही तर कर्माबद्दलचा विचारही केला आहे.
कर्म ईश्वरार्पण वृत्तीने करावयाचे आहे. ईश्वराला फळ अर्पण करायचे आहे परंतु काम तर समाजासाठी करावयाचे आहे. सेवा व्यक्तीची करावयाची आहे. सेवेला मूर्त आलंबनाची आवश्यकता आहे. हे कोडं गीतेने सोडवले आहे. आपण सूर्य, नदी, पर्वत यांना महान मानतो. त्यांचा आदर करतो. सूर्याला अर्घ्य देतो तर कोणी सूर्यनमस्कार घालतो. गंगेसारख्या नदीचं पाणी पवित्र मानतो. कोणी नर्मदेची प्रदक्षिणा करतो.
कन्या राशीत गुरु ग्रह गेला की कृष्णामाईचा उत्सव होतो. पण मग आपले भाऊबंद, नातेवाईक, मित्र यांच्याशी आपले वागणे कसे असते? त्यांच्या गुणांची आपण कदर करतो का? की त्यांचे अवगुण मोठे करून बघतो आणि त्यांच्या मागे निंदा करतो. यावरूनच ‘पिकतं तिथे विकत नाही’ ही म्हण पडली असावी का?
वस्तुतः तोच परमात्मा आपल्यात ‘जीवात्म’ स्वरूपात आहे. तो सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमात्माच शरीरात राहून आपलं जीवन चालवीत आहे. माता, पिता, गुरु यांना आपण देवासमान मानतोच ना! महावाक्य सांगतं की ‘तत् त्वम असि! अहं ब्रम्हास्मि’.
इतके सारे असताना मानव रूपातील ईश्वराला तू ओळखत कसा नाहीस? त्याची उपेक्षा, विटंबना का करतोस? नवव्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकात हे स्पष्टपणे म्हटले आहे.
मज मानव-रुपात तुच्छत्वे मूढ देखती
नेणूनी थोरले रूप जे माझे विश्वचालक
तेव्हा मानव रूपातील ईश्वराची आपण उपेक्षा करतो ही खेदजनक गोष्ट आहे. हे घडते याचे कारण आपण देहाला महत्त्व देतो मानवाची किंमत आपण देह बुद्धीने करतो. समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याची जात, त्याचा धर्म, देश, त्याची उपाधी हेच निकष व्यक्तीची ‘किंमत’ किंवा दर्जा ठरवितात. म्हणजे आपण प्रेम देवावर करत नाही, देहावर प्रेम करतो. ही देहबुद्धी जाईल तेव्हा आतील भावना जागी होईल. सगुण साकारात निराकार परमात्मा भरला आहे ही भावना, देहासक्ती नाहीशी होईल तेव्हांच जागृत होईल. या भावनेने व्यक्तीची किंमत ठरविण्यासाठी देह हा निकष राहणार नाही.
ईश्वर आणि विश्व
एखादा कार्यक्रम चोख पार पडला, त्या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित असले, कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाले, सर्वांनी आपले काम चोख बजावले म्हणजे आपण हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला त्यांचे कौतुक करतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मग या विश्वाचा पसारा कोणी निर्माण केला, तो व्यवस्थित चालवणारा निर्माता आणि व्यवस्थापक कोण याचा विचार आपण कधी करतो कां? त्याच्या प्रति आपल्या भावना उचंबळून येणं तर दूरच परंतु असा विचारही आपल्याला शिवत नाही. यात आपला १०० टक्के दोष आहे असे नाही.
एक तर हा जगत् निर्माता आपल्याला दिसत नाही आणि दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिय या विश्वाच्या पसाऱ्यात मोहग्रस्त झाली आहेत. राधाकृष्णन् यांनी म्हणूनच म्हटले आहे की, we are spiritually blind. आपण आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे आहोत. पुरावा आणि तर्क या दृष्टीने प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली पाहिजे अशी आपली देहबुद्धी सांगते. विनोबा म्हणतात, तर्क तो देव जाणावा हीच अंधश्रद्धा. मग परमेश्वराला ओळखण्याची बुद्धी आपणास केव्हा होईल? हे ज्ञान केव्हा लाभेल? श्रद्धा असेल तर!
श्रद्धेची गोष्ट
श्रद्धेचा जन्म विश्वासातून होतो. आपण एखाद्या घराचा पत्ता शोधतो तेव्हा काय करतो. गुगल मॅप पाहतो. नाहीतर त्या भागात गेल्यावर एखाद्या व्यक्तीला तो पत्ता विचारतो आणि आपण इच्छित स्थळी पोहोचतो. वस्तुतः जिने आपल्याला पत्ता सांगितला ती व्यक्ती आपल्या ओळखीची नसते किंबहुना ती आपल्याला प्रथमच भेटते. गुगल मॅप असो की अनोळखी व्यक्ती असो आपण त्यावर विश्वास ठेवतोच ना.
आपण दुसरे उदाहरण घेऊ घरातले दिवे प्रकाश देत असतात, पंखे फिरत असतात पण अचानक दिवे गेले, पंखे थांबले की आपण म्हणतो ‘वीज गेली.’ ही वीज तुम्ही गेलेली पाहिली का हो? वीज कोणी पिशवीतून घेऊन आला असे घडले आहे का? आपण ‘वीज’ नावाची शक्ती, ऊर्जा आहे यावर विश्वास ठेवतो कारण विजेचा परिणाम आपण अनुभवत असतो. तसंच त्या अव्यक्ता पलीकडे असलेल्या अव्यक्ताचेही आहे. हा विश्वाचा पसारा त्यानेच उभा केला आहे. तोच निमित्त, कारण आहे.
प्रकृतीतून हे सारे निर्माण झाले आहे म्हणजे प्रकृती हे उपादन कारण आहे पण ईश्वर असा निर्माता आहे की त्यानेच प्रकृतीची निर्मिती केली त्यामुळे निर्माता ईश्वर, हे जग, जगाचे स्वरूप आणि त्यापासून ईश्वराची अलिप्तता हे सारच अगम्य आहे.
हे सारे कोणाला विचारायचे ? अहो कोणाला म्हणजे काय? संतांना, महापुरुषांना, ऋषींना. त्यांनी ग्रंथरूपाने हे ज्ञान आपल्यापर्यंत आणले आहे. रामदासांचा दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे सर्व कालचे – परवाचे नाही तरी लोक ते वाचतात. त्याचे चिंतन करतात. या संतांवर आपण विश्वास ठेवला नाही तर आम्ही करंटेच ठरू. मग हरिपाठ, मनाचे श्लोक, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम हे सगळे व्यर्थच म्हणायचे का?
म्हणूनच आपली सर्व कर्म ईश्वराला साक्षी ठेवून करू या. ईश्वरच आपल्याकडून हे करवून घेत आहे अशी श्रद्धा ठेवू या आणि त्या कर्माचे फळ त्यालाच अर्पण करू या.
आपल्या रोजच्या जीवनाकडे पहा ‘कर्म’ या शब्दाने घाबरून जाण्याचे कारण नाही. कर्म म्हणजे आपले रोजचे काम समजू या. आपण ज्या कुटुंबात रहातो ज्या घरात रहातो तेथील कामे आठवून पहा. स्वयंपाक करणे, केर काढणे, भांडी आणि कपडे धुणे, वस्तू जागेवर ठेवणे, भांडी जागेवर लावणे अशी कितीतरी लहान मोठी कामे आहेत. या सर्व कामांची जबाबदारी आपण घरातल्या कर्त्या बाईवर टाकतो जी कोणाची तरी आई असते. याशिवाय नात्यानुसार सासू, सून, नणंद, भावजय, जाऊ अशा उपाधीही तिला चिकटलेल्या असतात.
या माऊलीच्या कामात आपण मदत केली तर! कुटुंबातील जिव्हाळा, नात्यातला ओलावा यामुळे टिकून राहील. आपण करतो ती प्रत्येक गोष्ट ती त्या व्यक्तीसाठी करत नसून परमेश्वरासाठी करतो आहोत ही भावना ठेवली तर आपले रोजचे जीवन साधे दिसले तरी ते महान यज्ञकर्मच होईल. त्या कामात अनंत शक्ती येईल. जो नियम घरच्या कामाला तोच नियम घरच्या आणि कार्यालयीन कामालाही लावायचा. बघा त्यात अपार आनंद भरला जाईल.
[ विनोबांच्या गीता प्रवचनांवर हेमंत मोने यांनी लिहिलेले व ” बालविकास मंदिर ” या मासिकात प्रसिद्ध झालेले क्रमांक ९ चे प्रकरण साभार पुनःप्रसिद्ध ]
– ©️ हेमंत मोने
hvmone@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
स्वागत फुलांनी – Rhododendron wallichi
– तनुल करकरे, पुणे.
फोटो उत्तराखंड रंथनटॉप.
प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
नवीन मुखपृष्ठ – आयर्विन पूल, सांगली – मिलिंद महाबळ
milind.mahabal65@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विचारशलाका
(53)
Climb the mountains and get their good tidings. Nature’s peace will flow into you as sunshine flows into trees. The winds will blow their own freshness into you and the storms their energy, while cares will drop away from you like the leaves of automn.
– John Muir
(TOI Oct 22, 2025)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आणखी एक (अज्ञात ) केशवसुत
कै. म. के. दामले
– पृष्ठ ६१ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संपूर्ण वन्दे मातरम्
*राष्ट्रीय गीत :* वन्दे मातरम्
*रचना :* — बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
*जन्मस्थान :– कोलकाता जवळील नैहाटी कान्तालपाडा
*जन्मदिन : कार्तिक शुद्ध नवमी, शके १७९७ अर्थात् ७ नोव्हेंबर १८७५ (मध्यरात्र)
*प्रथम प्रकटन : बंकिमचंद्र यांनी लिहिलेल्या “आनंदमठ” कादंबरीत १८८२.
*प्रथम प्रकट गायन :– रवींद्रनाथ ठाकूर, १८९६ (कोलकाता येथे आयोजित राष्ट्रीय कॉंग्रेस सभेत)
गीताचा मराठी भावानुवाद
सौ. विनया माधव जोशी.
वंदे मातरम्!
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्! ll ध्रु ll
शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,
सुखदाम् वरदाम्, मातरम्!
वंदे मातरम्, वंदे मातरम्॥१ll
कोटि कोटि कण्ठ कल कल निनाद कराले
द्विसप्त कोटि भुजैर्धृत खरकरवाले
के बोले मा तुमी अबले
बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम्॥
वंदे मातरम्! ll२ll
तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम्॥
वंदे मातरम्! ll३ll
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम्॥
वंदे मातरम्! ll४ll
श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्
धरणीं भरणीं मातरम् ॥५ll
मराठी भावानुवाद —
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन l
पवित्र जल ते महानद्यांचे करी तुजला सुजल
फळा फुलांनी असशी तू समृद्ध अन् सुफल
मलयगिरीचा चंदनगंधित वारा करी तुजला शीतल
बहरलेल्या पिकांनी तुझा वर्ण दिसे श्यामल
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll ध्रु ll
तेजस्वी शुभ्र चांदणे,करी पुलकित ही यामिनी
बहरलेले पुष्प ताटवे,करती तुज सुशोभिनी
सुहास्यवदना असशी तू,असशी मधुरभाषिणी
सुखदायिनी तू माते, तू असशी वरदायिनी
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll१ ll
कोटी कोटी कंठातून होतो,तुझाच जयजयकार
कोटी कोटी करशस्त्रातून होई सामर्थ्याचा साक्षात्कार
नसशी तू अबला,तू तर असशी बहुबलधारिणी
रिपुदमन करशी, तू सकलांची तेजस्वी तारिणी
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll२ ll
हे भारतमाते, तू तर असशी ज्ञानमयी
ज्ञानाची जननी , असशी ज्ञानदायिनी
तूच आमुचे हृदय, तूच असशी धर्म
या देहातील प्राण आणि आमुचे मर्म
तूच असशी आमुच्या, बाहूंमधली शक्ती
तूच असशी सकलांच्या हृदयातील भक्ती
मंदिरा मंदिरातूनी घडते तुझेच ते दर्शन
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll३ll
दश करात तुझिया करशी, दश शस्त्रे धारण
असशी तू दुर्गा, करशी तू शत्रूंचे निर्दालन
कमला तूच असशी, कमलपुष्पी तू विराजमान
वागीश्वरी सरस्वती तू, तूच देशी विद्यादान
हे ऐश्वर्यदायिनी कमला,तू अमला अन् अतुला
सुजला, सुफला माते,वंदन करितो मी तुजला ll ४ll
बहरलेल्या पिकांनी तुझा, श्यामल दिसे वर्ण
सुचरिता तू, प्रसन्न हास्य असे तुझे भूषण
तूच करशी प्रेमे ,आम्हा सकलांना धारण
तूच करशी मायेने ,आमुचे पालन पोषण
हे भारतमाते, तुजला करितो मी वंदन ll५ ll
– ©️ सौ. विनया माधव जोशी.
प्रेषक माधव मनोहर जोशी
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता
प्रदीप अधिकारी
कोहरा….!!
बिलकुल गुमसुमसी
हो गयी थी ….!
कल तक हाथ पकडकर मेरा
उछलती थी, कुदती थी
बच्चों की तरह, साथ मेरे,
आगे पीछे, भागती थी….!
अचानक इसे ये क्या हुआ ?
चलते चलते पूछा,
चुप क्यों हो? क्या बात है?
चलना नहीं है क्या मेरे साथ?
क्यों खिंच रही हो मेरा हाथ?
डबडबाती आँखों से बोली,
क्यों जा रहे हो भागे भागे?
देखते नही, कोहरा है आगे,
उठा लो ना मुझे, अपनी बाहों में
नहीं तो खो जाऊँगी,
इस कोहरे में…!
उठा तो लिया हूँ उसे
अपनी बाँहों में,
लेकिन चल नहीं पा रहा हूँ
एक कदम भी आगे
बस्स, तभी से रुका हुआ हूँ,
इस जिंदगी के साथ
कोहरे की इस गहराइयों में..!
– ©️ प्रदीप अधिकारी
adhikaripradeep14@gmail.com
**********************************
प्रा. विजय पांढरीपांडे
अवती भवती
भोवती आहेत सारे हासणारे
काहीही बोला मान डोलावणारे
करावी लागते पर्वा ज्यांची तुम्हाला
ते आहेत सारे पाय खेचणारे
वेचून घ्या हुंगून घ्या मोजकी फुले
सारीकडे आहेत काटे टोचणारे
गायचे ते गा सूर सांभाळूनी
आहेत ऐकणारे बेताल नाचणारे
पर्वा नको कुणाची साद ऐका मनाची
काम झाल्यावरी हे हलकेच पांगणारे
लागेल पळावे तुम्हा गाठण्या गाव अपुले
नसतील साथ कोणी सारेच रांगणारे
बहुसंख्य भोवतीची गर्दी लुबाडणारी
संस्कार नीती धर्म थोडेच पाळणारे
- विजय पांढरीपांडे
७६५९०८४५५५
– ©️ प्रा. विजय पांढरीपांडे
vijaympande@yahoo.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
ग्रेट भेट
व्यक्ती विशेष – ३
सौ शुभदा अघोर
आमचा गाण्याचा क्लास संपल्यावर मेघना, माझी संगीत सखी तिच्या बाबांना म्हणजे चित्रकार श्री रामचंद्र देशमुख यांना भेटायला घेऊन गेली. तसे या आधी मी रामकाकांना त्यांच्या चित्रांतून भेटले होते. पण आज आमने सामने!
सुहास्य वदनाने रामकाकांच्या सहधर्मचारिणी म्हणजे मेघनाची आई यांनी आम्हा दोघींचे स्वागत केले. अपेक्षेप्रमाणे रामकाकांच्या टेबलावर एक सुंदर चित्र आकार घेत असताना दिसले.
अतिशय अनौपचारिक गप्पा मग सुरू झाल्या. मी चित्रांची वही हातात घेऊन एक एक चित्र पाहात होते. सुबक रेषा, अप्रतिम रंगसंगती व बोलक्या व्यक्तीरेखा ! प्रत्येक चित्र जणूकाही आपल्याशी संवाद करू पाहत होतं.
पहिल्याच चित्राबद्दल त्यांना प्रश्न विचारले आणि अगदी सहज ओघवत्या भाषेत ते आपले विचार व्यक्त करताना दिसले.त्यांच्या प्रत्येक चित्रात निसर्ग आढळतो.डोळ्यात भरतील अशी नयनसुखावह रंगसंगती दिसून येते.
हिंदू संस्कृतीनुसार पेहराव केलेल्या दोन सख्यांच्या चित्राने माझे लक्ष वेधून घेतले. अतिशय मिश्किलपणे रामकाका म्हणाले, ” त्या दोघी जणी गुजगोष्टी हळू आवाजात करत आहेत.कोणाला ऐकू येऊ नयेत म्हणून! ” हे बोलत असताना लहान मुलाप्रमाणे निरागसता आणि मिश्किलपणा या दोन्ही छटा काकांच्या चेह-यावर उमटल्या होत्या.
ते उच्चशिक्षित आहेत. जे.जे स्कूल ऑफ आर्ट मधून ए.एम, फाईन आर्ट आणि आर्किटेक्चर ह्या पदव्या घेतल्या. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ३८ वर्ष कुर्ल्याच्या होली क्रॉस शाळेत कला शिक्षक म्हणून सेवा केली.त्यानंतर १५ वर्ष महाराष्ट्र शासनाच्या कलासंचलानयाच्या ग्रेड परीक्षांचे प्रमुख म्हणून काम केले. असा दमदार प्रवास केला आहे.
खरे तर त्यांना भारतीय सेनेत सामील होऊन देशसेवा करायची होती. पण वडिलांनी परवानगी नाकारल्याने ते होऊ शकले नाही याची खंत मनाला अजून ही आहे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.
कोविड काळात जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. तेंव्हा जग कोविडमुळे थांबले होते, सगळे जण आपापल्या घरात बंदिस्त झाले होते.अशा वेळी रामकाकांनी चित्र काढायला सुरूवात केली. त्या वेळी सुरू झालेले हात आजपर्यंत काम करत आहेत.
कला कोणतीही असो, मनाला आनंद आणि समाधान देते. सकारात्मक ऊर्जा देते. मनातून कागदावर उतरते.
या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या चित्राला पहिली दाद देणारी ही त्यांची अर्धांगिनी असते, हे ते खूप आनंदाने व अभिमानाने सांगतात. काकूंच्या हातचा आले घातलेला मस्त वाफाळलेला चहा घेतला.त्याही गप्पांमध्ये सामिल झाल्या. रामकाकांना त्यांच्या तीनही मुलींबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे. त्या सुशिक्षित असून आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, हे सांगताना काकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
अशी ही अनौपचारिक भेट मलाही खूप काही देऊन गेली. कलाकाराचे शरीर थकले तरी मन थकत नाही.आज रामकाकांचे वय ८२ जरी असले तरी कला त्यांना नेहमीच मनाने उत्साही ठेवेल यात शंका नाही. कलेची सेवा अशीच त्यांच्या हातून घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!!
– ©️ सौ.शुभदा प्रवीण अघोर
२२/९/२५
shubhadaaghor@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
फुलपाखराची अळी
भवताल : १२
सविता कांबळी
घरच्या हळदीच्या पानावर यथेच्छ ताव मारणारी ही फुलपाखराची अळी ( chocolate Demon ). अंड्यापासून हिचा प्रवास पाहिलाय मी. दोन मोठी मोठी पान हिने दोन दिवसात फस्त केलेयत. तशीही या अवस्थेत ती बकासुरच असते. नीट पाहिलं तर कुरतडून खाणारी पानं तिच्या पारदर्शक पोटात जाताना स्पष्ट दिसत आहेत. पारदर्शकच होती जन्मली तेव्हा. कोषात जायच्या आधीच्या टप्प्यात अगदी हिरवीगार गलेलठ्ठ झाली. सोबत हालचालीनेही बोजड. शेवटी तर एका पानाला तोंडातील धाग्याने एक टाका देऊन त्यात स्वतःला लपवून घेतलं. आणि शेपटीकडून कोष विणायला घेतला ..पण काय…! निसर्ग नियम आला पुढे. जीवो जीवस्य जीवनम्…! शिंपी दादा आला आणि आपल्या इवल्याशा चोचीतून गट्टम केल. माझं कोशातून बाहेर येणार फुलपाखरू बघायचं स्वप्न अधूरी एक कहाणीच राहील शेवटी ..!
– ©️ सविता कांबळे
savitak211@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
राशीस्वभावानुसार उखाणे
*भाग ६/६*
अॅड. क्रांती आठवले पाटणकर
उखाणे, शायरी ,विडंबन काव्ये यांची मला लहानपणापासून फारच आवड होती. शाळेत असताना “र” ला “ट” जोडून मी एक काव्य केले होते. एका वहीवर मी माझे असे नाव लिहिले होते…
“*क्रांती नामे वदती तियेला*
*वसंत नामे वदती पित्याला*
*आठवले हे तिचे कुलनाम आहे*
*ती या वहीची मालकीण आहे*.”
‘माझे वकिली व्यवसायातील अनुभव” या लेखमालेत (फेसबुक पोस्ट …दि. २७.०३.२०२५ ) मी, कल्याण कोर्टात आम्ही सुरु केलेल्या स्नेहसंमेलनाविषयी लिहिले आहे. एका वर्षी आम्ही एक एकांकिका सादर केली होती. त्याचे नाव आठवत नाही, पण विषय एका काल्पनिक खटल्याचा होता. त्यात मी गावाकडील एका स्त्रीचा रोल केला होता. तिच्या साक्षीच्या वेळी वकील तिला नाव विचारतात,
“नाव सांगा ?”
त्यावेळी मूळ संहितेत नसलेली चार वाक्ये आम्ही ठरवून वाढविली. त्यात मी एक स्वरचित उखाणा घेतला..
“*अंबाबाईच्या देवळात हळदी-कुकवाच्या राशी*
*शिरीपतीचे नाव घेते साक्षीच्या दिशी*…”
त्यावर न्यायाधीश संतापतात आणि म्हणतात. “तुम्हांला उखाण्यात नाव विचारले आहे का ? नुसते तुमचे संपूर्ण नाव सांगा”
ह्या प्रसंगाला सर्वांची दाद मिळाली.
(स्मरणसौख्य -Nostalgia म्हणून त्यावेळेचा फोटो खाली दिला आहे)
*दहावी रास मकर*:
राशीतील दहावी रास ही मकर , व्यक्त करत नाहीत स्वतःचे मत,
स्वामी शनी, पृथ्वी तत्त्व, काळासावळा वर्ण, मध्यम बांधा.
वैराग्य प्रिय, दिर्घोद्योगी अन काटकसरी, लहरी आणि अबोल.
*अशी कष्टाळू व कामास प्राधान्य देणारी मकर*.”
*या राशीत तीन नक्षत्रे येतात*. उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा.
*उत्तराषाढा* – याची आकृतीसुद्धा साधारण मंचका / पलंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती ढोबळ मानाने विचार करणारे, मोठी कामे चटकन करणारे पण किचकट कामे टाळणारे. नक्षत्र स्वामी : रवी.
*श्रवण* – याची आकृती तीन पाय असलेल्या लहान मुलासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती, विश्वासू, दयाळू, कुणालाही न दुखावणा-या, नीटनेटके राहण्याची आवड. नक्षत्र स्वामी : चंद्र
*धनिष्ठा* – याची आकृती मृदंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती महत्वाकांक्षी, आशावादी, वजनदार व्यक्तिमत्त्व. विविध पदार्थ खाण्याची विशेष आवड, खेळाडू असतात. नक्षत्र स्वामी : मंगळ.
राशी स्वामी शनी असल्याने यांचा स्वभाव थोडासा निराशावादी असतो. काही व्यक्तींमधे छोट्या दु:खाचा बाऊ करण्याची सवय असते. काही लोकांना आयुष्यात खुपदा तडजोड करावी लागते.
*मकर राशीची स्त्री कशी उखाणा घेईल*:
1)लोकलचा प्रवास करते फर्स्टक्लास मधे बसून,
रवीची पडली भूल, आले प्रेमात फसून.
२) दिसते तसे नसते ,म्हणून जग फसते ,
अनिलचे अस्ताव्यस्त घर सगळ्याना नंदनवनासारखे भासते ! (स्वरचित)
*या राशीचा पुरुष कसा उखाणा घेईल*:-
1) सागराला नाही मर्यादा, आकाशाला नाही अंत,
रोहिणी आहे सोबत पण, मला आहे रोजचीच खंत. (स्वरचित)
२) लग्नाला झाली दोनच वर्ष एवढ्यातच बसले संसाराचे चटके,
रुपालीच्या ब्युटी पार्लरच्या बिलाचे माझ्या खिशाला बसतात फटके.
*मकर राशीचा एक किस्सा *…यामुळे या राशीचा स्वभाव समजायला मदत होईल …
१) नवरा आणि बायको ताजमहाल बघायला जातात. वृषभ राशीचा romantic नवरा म्हणतो, हे खरं प्रेमाचे प्रतिक. त्यावर मकर राशीची बायको म्हणते, हे कसले प्रेम. हा वेडेपणा आहे. मेलेल्या बायकोसाठी एवढा खर्च कशाला करायचा? तिला थोडेच कळणार आहे.
२) उमेशराव सेवा निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उमेशरावांची पत्नी काय बोलणार या बद्दल लोकांना उत्सुकता होती. उमेशरावांची पत्नी मकर राशीची होती. ती म्हणाली सेवानिवृत्ती म्हणजे यांचे निवांत राहाणं, आळसावल्यामुळे वजन वाढणं. हे म्हणजे अर्ध्या पगारावर दुप्पट वजनाचा नवरा सांभाळण्यासारखे आहे
*माफी मागण्याची पद्धत.*
ह्या व्यक्ती नुसते “sorry” असं म्हणणार नाहीत तर असं का घडलं त्याची कारणं व स्पष्टीकरण देत बसण्याची यांना सवय असते.
*मकर राशीचा शेर पाहू*.
“*ना कसूर आपका है, ना गलती मेरी*,
*वक्त ने आपको बदल दिया और आपने मुझे बदल दिया*”..
लेखमालेच्या पहिल्या भागात डोंबिवलीतील एका मंडळातील उखाणा स्पर्धेविषयी मी लिहिले आहे. तशीच एक स्पर्धा मोठ्या व्यासपीठावर झाली होती.
२५.०८.२०१५ रोजी श्रावण महिन्याच्या निमित्ताने, *कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच* प्रस्तुत “श्रावण सोहळा, सोबत कॉमेडीचा मेळा” ह्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते.
त्यात महिलांसाठी विविध वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एक विनोदी उखाणे स्पर्धा होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. सह्याद्री वाहिनीच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदीका आणि विविध मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम सादर करणाऱ्या सौ. दीपाली केळकर यांनी माझे नाव सुचविले होते.
स्पर्धकांनी उत्तमोत्तम उखाणे सादर केले. काही उखाणे इतके छान होते की कुणा एकाची निवड करणे अवघड झाले होते. पण स्पर्धा म्हटली की एकच विजेता असतो…
हा माझ्यासाठी एक आगळावेगळा अनुभव होता.
*अकरावी रास कुंभ*:
राशितील अकरावी रास ही कुंभ. ही स्पष्टवक्ती असे फार,
स्वामी शनी, वायू तत्त्व, बांधा उंच आणि सडपातळ,
अबोल वाटणारी आणि गंभीर चेह-याची अशी विचारात घ्यावी ही रास.
कुशाग्र बुद्धीमत्ता, चिकाटी, उत्तम आकलन शक्ती,
सोशिक आणि संशोधक वृत्तीची,
परंतु संन्यस्त, रुक्ष, कठोर तर अशी हि प्रगल्भ बुद्धीची कुंभ .
*ह्या राशीत तीन नक्षत्र येतात*. धनिष्ठा, शततारका, आणि पूर्वा भाद्रपदा.
*धनिष्ठा* – याची आकृती मृदंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती महत्वाकांक्षी, आशावादी, विविध पदार्थ खाण्याची विशेष आवड, बौद्धिक खेळाची आवड असते. नक्षत्र स्वामी : मंगळ.
*शततारका* – याची आकृती वर्तुळाकृती दिसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती शांत पण स्वतःची ठाम मते असणा-या. भौतिक जगापेक्षा कल्पनेच्या विश्वात रमणारे. तत्त्वज्ञ, वायफळ गप्पा न आवडणारे. कायदा हा आवडीचा विषय. प्रामाणिक, स्पष्टवक्ते, कुटुंबावर प्रेम करणारे, मानसन्मान मिळतो. नक्षत्र स्वामी : राहू
*पूर्वा भाद्रपदा* – याची आकृती हस्तिदंताप्रमाणे दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले उदार मताचे, ज्ञानशील पण चटकन संतापणारे, वृत्तीने लढवय्ये पण लवकर निराश होणारे व अस्वस्थ स्वभावाचे. नक्षत्र स्वामी : गुरु.
कुंभ राशीच्या व्यक्ती खोलवर विचार करणा-या आणि एखादी गोष्ट विस्तृत वर्णन करून सांगणा-या असतात. बुद्धीने प्रगल्भ, शिवाय नर्मविनोदी असतात.
*कुंभ राशीची स्त्री कशी उखाणा घेईल*:
१)सागवानी पेटीला सोन्याची चूक,
आनंदच्या हातात असते कायद्याचे बुक.
२)लग्नात लागतात हार आणि तुरे ,
अमितचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे !
*या राशीचा पुरुष कसा उखाणा घेईल*:-
१)विज्ञानाने शोध लावला मानव गेला चंद्रावर ,
मनीषाचे नाव सदैव कोरले माझ्या मनावर.
२ ) लग्न झालं आमचं, बातमी वाऱ्यावर पसरली
सगळ विसरायची आहे सवय अमिताला
नशीब मला नाही विसरली.
*कुंभ राशीचा एक किस्सा *…यामुळे या राशीचा स्वभाव समजायला मदत होईल …
ह्या राशीची माणसं सतत कसला तरी विचार करत असतात आणि आपल्याच तंद्रीत असतात.
१ ) कुंभ राशीचे वसंतराव वैज्ञानिक असतात. त्यांच्या घरी त्यांचा मित्र जेवायला येतो. त्याच्या लक्षात येतं की वसंतराव त्यांच्या बायकोला डार्लिंग, हनी, प्रिये, सखे अश्या वेगवेगळ्या प्रेमळ नावांनी हाक मारताहेत.
तो मित्र वसंतरावांना विचारतो, “तुमच्या बायकोवर तुमचे इतके प्रेम आहे. तुम्ही नेहमीच तिला अशीच लाडीकपणे हाक मारता”.
वसंतराव हळूच म्हणतात, ‘तुला वाटते तसं नाहीये’.
‘मला बऱ्याचदा माझ्या बायकोचं नावच आठवत नाही’.
२ ) एक “वृषभ राशीचा” प्रियकर आपल्या “कुंभ राशीच्या” प्रेयसीला म्हणाला, तू माझ्या आयुष्याचा सूर्यप्रकाश आहेस. तुझ्याशिवाय माझं आयुष्य म्हणजे रखरखीत वाळवंट आहे. तू जणू सुखद पावसाळी हवा आहेस. हिवाळ्यातील थंड वा-याप्रमाणे तू माझ्या हृदयात आहेस.
कुंभ राशीची प्रेयसी म्हणते “तू माझ्यावर प्रेम व्यक्त करत आहेस का हवामानाचा अहवाल सांगतोयस.”
*माफी मागण्याची पद्धत*.
या राशीच्या व्यक्ती ढोंगी नसतात. स्वच्छ मनाच्या असतात. त्यांची चूक झाल्याचे त्यांना जाणवल्यावर त्या व्यक्ती माफी तर मागतीलच. पण त्यांच्या चुकांमुळे जे समोरच्या व्यक्तीचे नुकसान झालं असेल त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करतील.
कुंभ राशीची मंडळी तत्त्वज्ञानी, संशोधक असतात.
*एक शेर पाहूया* …
“*रूकता नही तमाशा, रहता है खेल जारी*,
*उसपर कमाल यह है, की दिखता नही मदारी*”.
*बारावी रास मीन*
वाचक हो हे राशीगुण वाचून आला का शीण.
तरी ऐका ही राशीतील बारावी रास मीन,
स्वामी गुरु, जल तत्त्व, गौर वर्णी, सात्विक मोठे डोळे, मऊ केसं,
अशी विचारात घ्यावी ही रास.. नम्र, परोपकारी, मायाळू, नाजूक परंतु संथ,
सत्वगुणांचा काही वेळा अतिरेक, *अशी देवभोळी व सेवाभावी मीन*.
*ह्या राशीत तीन नक्षत्र येतात*. पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती.
*पूर्वा भाद्रपदा* – याची आकृती हस्तिदंताप्रमाणे दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले. उदार मताचे, ज्ञानशील, लवकर निराश होणारे व अस्वस्थ स्वभावाचे. नक्षत्र स्वामी : गुरु.
*उत्तरा भाद्रपदा* – याची आकृती जुळ्यांसारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले कलाप्रेमी, विचारी, चिंतनशील सरळमार्गी, सज्जन परंतु धीमे व संथ पद्धतीने काम करणारे. नक्षत्र स्वामी : शनी.
*रेवती* – याची आकृती मृदंगासारखी दिसते. या नक्षत्रावर जन्मलेले. शांत, मनमिळाऊ, कुटुंबात, आर्थिक चणचण नसते, उत्तम व सुसंस्कृत माणसांशी संबंध ठेवणारे. नक्षत्र स्वामी : बुध.
मीन राशीच्या व्यक्ती नको त्या बाबीत चिंतनशील असतात. गोष्ट थोडक्यात न सांगता रटाळपणे सांगतात. उगाचच नको त्या गोष्टीचा विचार करत असल्याने सांगताना विनाकारण गुंतागुंत निर्माण करतात..
*ह्या राशीची स्त्री कशी उखाणा घेईल*:
*काही जानपद उखाणे पाहू*…
“जानपद उखाणा” म्हणजे मोठेच्या मोठे, लांब, लांब उखाणे असतात. त्यास “जानपद उखाणे” असे म्हणतात. ते निघतात स्वयंपाकघरातून किंवा असेच कुठून तरी मग, सर्व गावभर वळसा घालून येतात तेव्हा, केव्हातरी नवऱ्याचे नाव येऊन जाते, हे कळतच नाही. पण, ऐकण्यास खूप मजा वाटते…
१ ) रुणूझुणु झुण्यात बसून आले मेण्यात, खण चोळी अंगात शेंदूर भरला भांगात,
लवंग वाटीत, वेलची मुठीत, सोन्याची किल्ली उघडली खोली.
खोलीत होते सात हंडे ,हंड्यावर होती परात, परातीत होता भात, भातावर तूप
सोन्यासारखे इकडचे रूप, शोभिवंत चिरेबंदी वाडा,
मिलिंद तुम्ही हातातील काम सोडा आणि मला माहेरला धाडा.
२ ) अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना
आनंदचे नाव घ्यायला शब्द काही जुळेना.
*ह्या राशीचा पुरुष कसा उखाणा घेईल*:-
१ ) देशात देश भारत देश, भारत देशात राज्य फार,
राज्यात राज्य महाराष्ट्र, महाराष्ट्रात शहरे फार,
शहरात शहर डोंबिवली शहर , डोंबिवली शहरात आहे बाजी प्रभू चौक,
बाजी प्रभू चौकात आहे हनुमान मंदिर, हनुमानाच्या खांद्यावर आहे गदा
आणि शर्मिलावर मी झालो एकदम फिदा.
२ ) मनुष्याचे शरीर आणि हत्तीचे तोंड ,मोठ्या पोटावरती रुळते त्याची सोंड
कुणी म्हणतो गणपती ,कुणी म्हणतो गणेश ,सर्व देवांमध्ये त्याचा मान आहे विशेष ,
सोवळे लाल ,गंध फुलंही लाल लाल ,मंदा आरती करते तेव्हा मी धरतो ताल …
*ह्या राशीची माणसे सर्वसाधारणपणे वेंधळी असतात*. *कित्येकदा ते चांगले काम करायला जातात, पण घडते भलतेच*. *त्यांचा हेतू शुद्ध असतो,पण परिणाम विपरीत होतो*.
*मीन राशीचा किस्सा*……
१ ) रस्त्याने जाताना एका घराला आग लागलेली दिसते. मीन राशीचा हा माणूस परोपकाराच्या भावनेने त्या आग लागलेल्या घरात घुसतो आणि एका माणसाला बाहेर घेऊन येतो. तरीही पोलीस त्याला अटक करतात. कारण तो फायर ब्रिगेडच्या जवानालाच बाहेर घेऊन येतो.
२ ) मीन राशीचा निखील वीणाला म्हणतो, “तू सांगितले नाहीस तुझ्या अंगात देवी येते ते !”
वीणा किंचाळून म्हणाली, “काय ?”
निखील म्हणाला, “तुझा केसं विस्कटलेला डी.पी. बघीतला “,
वीणा रागाने उद्गारली, “मुर्खा, अंघोळ झाल्यावर काढलेला सेल्फी होता तो …”
*माफी मागण्याची पद्धत
ह्या व्यक्तीना मुळातच आपण चुकलो हेच कळत नाही.. समोरच्या व्यक्तीचा हा गैरसमज आहे असं त्यांचे ठाम मत असते. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्ती सहसा कधीही माफी मागत नाहीत.
मीन राशींची माणसे परोपकारीही असतात, पण भाबडी असतात.
*एक शेर बघूया*: मीन राशीचा असफल प्रेमी म्हणतो,
“चलो तुम्हारे प्यार में कुछ तो बन सका,
शोहर न बन सका, शायर तो बन गया..”
राशीनुसार स्वभाव जाणून घेताना लग्न रास, चंद्र रास, नक्षत्र, ग्रहांची /राशींची दृष्टि ,आदी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात याबाबत माहिती घेतली. पण ढोबळमानाने एखाद्या राशीचा स्वभाव आणि त्या राशीची व्यक्ती कसा उखाणा घेईल हे पाहिले. तसेच राशींचे स्वभाव वर्णन करणारे किस्से आपण ऐकले.
शेवटी पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की ही लेखमाला फक्त मनोरंजनात्मक आहे. यातील गोष्टी कुणीही personally घेऊ नयेत.
या लेखमालेचा शेवट *स्वरचित उखाण्यानेच* करते,
“*आता मी पुरे करते, लिहित नाही अती*,
*चला, तुमची रजा घेते, अजितची क्रांती*”.
(*समाप्त*)
– © अॅड. क्रांती आठवले-पाटणकर
*डोंबिवली.*
*9969087559*
*०८.१०.२०२५*
*(सदर लेख माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)*
*(ही लेखमाला माझ्या फेसबुक वॉलवर वाचता येईल)*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
उत्तरे द्या आणि ज्ञानात भर घाला
विलास सातपुते
प्रश्नसमूह ५
.बुलेट ट्रेनबद्दल आपणास किती माहिती आहे ? :-
१) बुलेट ट्रेन म्हणजे काय ?
२) भारतातील बुलेट ट्रेनचा वेग किती असेल ?
३) भारतातील बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांमध्ये धावणार आहे व किती किलोमीटर लांबीचा रेल पथ आहे ?
४)भारतातील बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणे अपेक्षित आहे ?
५) बुलेट ट्रेनच्या एका गाडीला किती डबे असतील ?
६) दिवसातून किती गाड्या सुटतील ?
७) कोण कोणत्या स्थानकांवर बुलेट ट्रेन ही गाडी थांबेल ?
८) रोज ३५ गाड्या सोडण्याकरिता किती डबे साखळ्या (रेक्स) कारखान्यात बनवण्यात येतील ?
९) बुलेट ट्रेन या गाडीचे भाडे काय असेल ?
१०) बुलेट ट्रेनच्या प्रवासाचा वेळ किती असेल आणि तिच्यामुळे प्रवासाचा किती वेळ वाचेल ?
११) भारतीय बुलेट ट्रेन कोणाच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने बनत आहे ?
१२) जगात अजून कोठे कोठे बुलेट ट्रेन धावतात ?
१३) इतर देशातील जलद गती आगगाड्यांचा म्हणजे बुलेट ट्रेनचा ताशी वेग काय आहे ?
१४) बुलेट ट्रेन इतका वेग कसा घेऊ शकते ?
१५) मॅगलेव्ह बुलेट ट्रेन म्हणजे काय ?
१६) मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नंतर पुढे काय ?
वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.
उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.
– ©️ विलास सातपुते
vilas.satput54@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
ढगपेरणी : कृत्रिम पर्जन्य
भूगोलाचा इतिहास : ३७
एल. के. कुलकर्णी
अभि क्रंद स्तनय गर्भं धा उदन्वता परिदिया रथेन
दृतिं सुकर्ष विषितं न्यंच समाः भवन्तूद्वतो निपादाः ।।
( भावार्थ – (हे पर्जन्यदेव) पृथ्वी सन्मुख होऊन गर्जना करा. औषधीत गर्भ(जल)ची स्थापना करा. जलयुक्त रथाच्या सर्व बाजुंनी प्रदक्षिणा करा. विशिष्ट प्रकारे बंदिस्त असलेल्या जलपात्राचे मुख खालच्या दिशेने करून जल मुक्त करा. )
ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात पर्जन्यसुक्त ही प्रार्थना आहे. माणूस शेती करू लागला आणि मग पावसाची वाट पाहणे त्याच्या नशिबी आले. प्रार्थना हे त्या दिशेने पहिले पाऊल होते. ख्रिश्चन, मुस्लिमातही पावसासाठी प्रार्थना आहेत. पर्जन्ययाग, आदिम समूहांची पर्जन्यनृत्ये हाही अशा प्रयत्नांचाच एक आविष्कार. पावसासाठी प्रार्थनेपासून ते कृत्रीम पर्जन्यापर्यंतचा इतिहास रंजक तसाच उद्बोधक आहे.
मानवी प्रयत्नांनी ढगातून पाऊस पाडणे म्हणजे कृत्रिम पर्जन्य होय. पाऊस ढगातून पडतो. पण हजारो वर्षे ढगांपर्यंत पोहोचणे माणसाला शक्य नव्हते. तोफांचा शोध लागल्यावर उंच आकाशात काही फेकणे माणसाला शक्य होऊ लागले. पूर्वी युरोपात असा समज होता, की विजेच्या कडकडाटमुळे ढगातून पाऊस पडतो. युरोपातील सप्तवार्षिक युद्ध, नेपोलियनची युद्धे, अमेरिकेतील यादवी युद्धे यानंतर पाऊस पडल्याचा अनेक घटना सांगितल्या जात. यामुळे अनेक शहरात पावसासाठी तोफांचे बार केले जाऊ लागले. एकोणिसाव्या शतकात अमेरिकन सैन्यातील रॉबर्ट डायरेन्फोर्थ हे ‘रेन मेकर’ म्हणून ओळखले जात. वरील प्रकारे टेक्सासमध्ये पाऊस पाडण्यासाठी नऊ हजार डॉलर्सची स्फोटके विकत घेण्यात आली होती. पण डायरेन्फोर्थ यांच्या निगराणीखाली झालेले ते प्रयोग निष्कर्षहीन ठरले. १८९१ मध्ये जर्मन संशोधक लुई गाथमन यांनी असे सुचवले की पावसाच्या ढगात द्रवरूप कार्बन डाय ऑक्साईड फवारल्यास पाऊस पडेल. १९०३ मध्ये ल्युक हॉवर्ड यांचे ढगांचे वर्गीकरण प्रकाशित झाले व ढगांचे स्वरूप समजू लागले.
१९३० च्या दशकात बर्गेरॉन – फिंडसेन नावाची प्रक्रिया शोधली गेली. त्यानुसार ढगात अतिशीत पाण्याचे थेंब असतात. शून्य ते – ४० अंश से. पर्यंत द्रवरूपात असणारे पाणी म्हणजे ‘अतिशीत पाणी’ होय. शून्य अंशापेक्षा कमी तापमान असणाऱ्या ढगात अतिशीत पाणी असते. असे अतिशीत जलबिंदू गोठण केंद्राच्या संपर्कात आले, तर ढगात हिमस्फटिक व अतिशीत जलबिंदूचे मिश्रण तयार होते. ते जलबिंदू हिमस्फटिकाभोवती साकळून पाण्याचे थेंब बनतात व ते पुरेसे मोठे व जड झाले की पाऊस पडतो. तात्पर्य ज्यात पुरेसे अतिशीत जलबिंदू आहेत, त्या ढगात गोठणकेंद्रके (Freezing nuclei) पोचली तर पाऊस पाडणे शक्य होते.
१९३६ मध्ये जपानी शास्त्रज्ञ युकिशिरो नकाया यांनी सर्वप्रथम कृत्रिम हिमवृष्टीचा पहिला प्रयोग केला होता. इरविंग लँगमुर हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ. ते अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीत असतांना व्हिन्सेंट शिफर हे त्यांचे संशोधक सहाय्यक होते. त्या दोघांनी बर्गेरॉन – फिंडसेन प्रक्रिया पडताळून पाहिली. त्याच काळात शिफर यांनी जुलै १९४६ मध्ये कृत्रिम पर्जन्य किंवा ढगपेरणीचे ( Cloud seeding) तंत्र शोधले, तोही एक किस्साच आहे. जनरल इलेक्ट्रिक’च्या प्रयोगशाळेत गोठण केंद्रक म्हणून मीठ, टाल्कम पावडर, माती इ. वापरून शिफर अतिशीत ढगात स्फटिक निर्मितीचे प्रयोग करीत होते. त्यासाठी डीप फ्रीजमध्ये अतिशीत ढग तयार करण्याचा प्रयत्न चालू होता. एक दिवस प्रयोग करतांना डीप फ्रीज पुरेसे थंडच होत नाही हे पाहून शिफर थोडे त्रस्त झाले. फ्रीज अधिक थंड करण्यासाठी त्यांनी त्यात थोडा कोरडा बर्फ (घनरूप कार्बन डाय ऑक्साईड) टाकला. आणि अचानक डीप फ्रीजमध्ये अतिशीत ढग व त्यात असंख्य हिमस्फटिक व जलबिंदू तरंगताना दिसू लागले. अनपेक्षितरीत्या त्यांना ‘ढगपेरणी’ म्हणजेच कृत्रिम पर्जन्याचे तंत्र सापडले होते. तो दिवस होता 14 जुलै 1946. महिन्याभरातच शिफरचा सहकारी बर्नार्ड व्होनेगट याने सिल्वर अयोडाईड वापरून ढगपेरणी करण्याची पद्धत शोधून काढली.
कृत्रिम पर्जन्याचा पहिला प्रयोग १३ नोव्हेंबर १९४६ रोजी अमेरिकेत करण्यात आला. एका ढगावर अडीच किलोग्राम शुष्क बर्फाची फवारणी करून शिफर यांनी माउंट ग्रेलॉक इथे हिमवृष्टी साध्य केली. पुढे जगभर विविध देशात ढगपेरणीद्वारे कृत्रीम पर्जन्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागले. पर्जन्यास अनुकूल अशा ढगातूनच कृत्रिम पर्जन्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यात फवारण्याचे (पेरणीचे) रसायन ढगांच्या तापमानावर अवलंबून असते. शून्य अंश से. पेक्षा अधिक तापमान असणाऱ्या ढगात अमोनियम नायट्रेट व युरिया यांचे मिश्रण फावरण्यात येते. तर शून्य अंश से. पेक्षा कमी तापमान असणाऱ्या ढगात कोरडा बर्फ किंवा सिल्व्हर आयोडाईडची भुकटी फवारली जाते. कृत्रिम पर्जन्यासाठी कोरडा बर्फही पेरणी घटक म्हणून वापरतात. रसायनांची फवारणी सामान्यतः विमानातून केली जाते. जमिनीवरूनही जनरेटर्स नावाच्या तंत्राद्वारे उंच ढगात बीजारोपण केले जाते. पण त्या तंत्राचा वापर कमी केला जातो . कोणत्याही ढगात गोठण मिश्रण फवारल्याने पाऊस पडत नाही. त्यासाठी तिथे विशिष्ट प्रकारचे पर्जन्यमेघ असणे आवश्यक असते. आजकाल त्यासाठी रडारची मदत घेतली जाते. रसायने भरून विमाने तयार ठेवतात. रडारद्वारे आकाशाचा वेध घेऊन वैमानिकांना संदेश दिला जातो. मगच त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन ढगात फवारणी केली जाते. अशा प्रयत्नातू दहा टक्क्यांपर्यंत पर्जन्य प्राप्त केल्याचे दावे करण्यात आले आहेत.
कृत्रिम पर्जन्याचा वापर एखाद्या प्रदेशातील पाणी पुरवठ्यात वाढ , पाणीटंचाई वर मात, जलसिंचन, विद्युत निर्मिती अथवा इतर कारणांसाठी केला जातो. उदा. अमेरिकी सैन्याने १९६७ ते १९७२ दरम्यान व्हिएतनाममध्ये कृत्रीम पर्जन्याद्वारे मान्सूनचा पाऊस महिनाभर अधिक मिळवण्यात यश मिळवले. १९८३, १९८४ ते ८७ व १९९३ – ९४ मध्ये तामिळनाडूत दुष्काळ पडला होता. त्या काळात तेथे कृत्रिम पर्जन्याचा वापर केला गेला. २००३ व २००४ मध्ये कर्नाटक व महाराष्ट्रात कृत्रिम सिंचनाचे प्रयोग केले गेले. भारतातील ‘सृष्टी एव्हीएशन’ ही कंपनी कृत्रीम पर्जन्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
पण कृत्रीम पर्जन्याच्या वापराबद्दल मतभिन्नता आहे. एक तर हे प्रयोग सर्वत्र सारखेच परिणामकारक व उपयोगी ठरलेले नाहीत. दुसरे, समजा कृत्रीम पर्जन्याचा वापर केला नसता, तर नंतर तिथे पाऊस पडला असता की नाही, हे कुणी सांगू शकत नाही. यावर रूटगर्स विद्यापीठातील प्रा. रोबॉक यांचे उत्तर असे.”आपल्या प्रयत्नामुळे एखादया ठिकाणच्या पावसात समजा फक्त दहा टक्के फरक पडला, तरी त्यासाठी केलेला खर्च परवडू शकेल.”
अजून कृत्रीम पर्जन्याच्या सहपरिणामांबद्दल (Side effects) पुरेसा अभ्यास झालेला नाही. उदा. ढगपेरणीतून वातावरणात मिसळणारी सिल्व्हर अयोडाईड सारखी संयुगे पर्यावररणास घातक ठरू शकतात. तसेच एखाद्या भागातील कृत्रीम पर्जन्यामुळे दुसऱ्या ठिकाणच्या पावसात घट होते का हे अजून निश्चित झालेले नाही. चीनमध्ये २००४ च्या बीजिंग ऑलिंपिकच्या वेळी पावसामुळे स्पर्धेवर पाणी फिरू नये यासाठी ढगपेरणीद्वारे पाऊस इतरत्र वळवण्याची फार मोठी व तयारी करण्यात आली होती. पण त्यातून इतर भागात अनावृष्टी व अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे त्यावर टीका झाली होती.
पर्जन्य असो, फळे पिकवणे किंवा खते – जे नैसर्गिक ते श्रेष्ठ, हे तर निर्विवादच आहे. पण अस्तित्वाचाच प्रश्न येतो किंवा जेव्हा अपरिहार्यच ठरते, तेंव्हा ही तुलना अनावश्यक होते. पर्यावरणाच्या संदर्भात अस्तित्वाचा प्रश्न केव्हां मानायचा किंवा अपरिहार्य केव्हा ठरते याचा योग्य निर्णय म्हणजेच भूगोल विवेक. मानवाचे शास्त्रीय नाव होमो सेपियन्स आहे. यातील सेपियन्स म्हणजे विवेकशील. मानवाचे पर्यावरणाच्या बाबतीतले वर्तन त्याच्या नावाला सार्थ करील अशी आशा करू या.
– एल.के. कुलकर्णी
lkkulkarni.nanded@gmail.com
सोबतचे चित्र : कृत्रीम पर्जन्य ( इंटरनेटवरून साभार )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
– ©️ रामचंद्र देशमुख
संपर्क : ९९३०२४६९८९
प्रेषक मेघना घाटे
meghanaghate25@gmail.com
- ©️ मिलिंद महाबळ
milind.mahabal65@gmail.com
– युती प्रवीण अघोर
प्रेषक शुभदा प्रवीण अघोर
shubhadaaghor@gmail.com
महत्वाची सूचना – या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@
महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.
@@@@@@@@@@@@@@






























