कुणाचा कोण ?
आमची जीवनवाहिनी- जी पुणेरी मिसळ- तिच्या बाबतीतही असाच अनुभव आला.
पण मिसळ खाऊन ते तृप्त झाले आणि पुण्याची (व आमच्या घराण्याचीही) अब्रू वाचली.
गिऱ्हाईक बेकरीतून उतरून पळत सुटेपर्यंत त्यांची ही ‘रेकॉर्ड’ चालू असते.
-आणि शेवटी हातात अळुवड्यांचं पार्सल घेऊनच फब्या दुकानाच्या पायऱ्या उतरला !
त्यामुळे गोंधळ अजूनच वाढला होता.
त्यानंतर ‘होय ! झालं क्लिअर !’ अशा अर्थाची मान हलवत मुकाटपणे तिथून निघालो.
पण माझा चेहरा साफ पडला असावा असं रस्त्यातल्या तुरळक लोकांच्या नजरेवरून वाटलं.
घरी माणसं उत्सुकतेने वाट पहात थांबली होती.
मित्रवर्य विनय हर्डीकर याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तो मोजकंच लिहितो पण जे लिहितो ते मनःपूत लिहितो. विषयाला सर्वांगाने भिडून आपल्या व्यासंगाच्या मुशीतून तो ते असे उतरवतो की वाचकांना अगदी नेहेमीच विषय असला तरी तो नव्याने कळतो. ‘अंतर्नाद’ दिवाळी अंकात त्यांनी एक शिवधनुष्य उचलले आहे आणि ते म्हणजे ‘आमचा संगीत (प्रेमाचा ) त्रिकोण’ या लेखाच्या निमित्ताने कुमार गंधर्व ,भीमसेन जोशी आणि किशोरीताई यांच्या एकूण गान कारकिर्दीची तुलनात्मक मांडणी. दोन माणसांची तुलना करताना भल्याभल्यांची तंतरते इथे तर हे ३ दिग्गज. पण विनयने अत्यंत कुशलतेने ही स्वरचित्रं साकार करुन शास्त्रीय संगीताच्या अथांग सागरात सूर मारुन त्यांतील नेमकी रत्नं वेचून वाचकांच्या हाती ठेवली आहेत.
या गायकांची जडणघडण मांडत त्यांच्या शागीर्दीचा प्रवास उलगडत गाण्याचे मर्म या लेखात अतिशय सहज मांडलं आहे. .शिष्य आणि विद्यार्थी हा फरक सांगत या कलेच्या उच्च शिक्षणमूल्यांचा उच्चार लेखक करतो यातूनच तो शास्त्रीय संगीताचं मर्म सहजपणे सांगतो. घराण्याचा सोस आणि परंपरेचं जोखड याची चर्चा करत या तिघांच्याही आधुनिक दृष्टिकोनाचा सन्मान या लेखात होताना दिसतो. हा संपूर्ण लेख गायकांवर आणि गाण्यावर असला तरी लेखक आपल्या बहुआयामी अनुभवाच्या शिदोरीतून तो जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करत पुन्हा समेवर कसा आणतो हे तो वाचल्यावरच समजेल.
रियाज, आकार युक्त गाणं, सादरीकरण तंत्र, राग मांडणी, बढत अशा अनेक पैलूंची चर्चा अतिशय रसाळपणे आणि संपर्क उदाहरणामुळे अभ्यासपूर्ण आणि प्रवाही झाली आहे. गाणं समजणं, शास्त्र समजणं, गायक समजणं आणि श्रोते समजणं आणि एकूण समाज पर्यावरण समजणं हे पाचही मुद्दे लेखकाच्या कह्यात असले की तो लेखच एक उत्कृष्ट मैफिल होऊन जातो याचं हे एक सुरमयी उदाहरण आहे.
यंदा दिवाळीच्या सणाचे आणि फुरसतीचे चीज करणारे एकाहून एक असे दिवाळी अंक बाजारात आले आहेत. दिवाळी संपली तरी या अंकांचे वाचन चालू आहे. या अंकातील काय आवडले काय नावडते याचा ताळेबंद वाचकांनी थोडक्या शब्दात पाठवावा असे आमच्या मनात असते. पण मागील वर्षी केलेल्या आवाहनाला विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. म्हणून यंदा तसे विचारले नाही. तरी रसिकाग्रणी केशवराव साठये यांच्याकडून आलेले एक निरीक्षण आपल्या समोर ठेवत आहोत. आपणही मोजक्या शब्दात कळवू शकता. – सं.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादे वर्ष असे उजाडते की त्याच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळून जाते. सुखांच्या क्षणांपायी कधी ते वर्ष संस्मरणीय ठरते तर कधी त्याला दुःखाची झालर असते. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात एकदा तरी नाना रंगांची उधळण करणारे असे इंद्रधनुष्य उमलते आणि त्या माणसाच्या उभ्या आयुष्यालाच एक नवीन अर्थ प्राप्त करून देते , जीवनप्रवासाला एक आगळा अर्थ प्रदान करणारे असे इंद्रधनु व्यक्तीच्या आयुष्याच्या नेमक्या कुठल्या वळणावर येईल, लवकर येईल की उशीरा उगवेल, हे मात्र सगळे गूढच असते.
असेच एक वर्ष सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी एका, तोवर सर्वसाधारण चारचौघांसारखाच गणल्या जाणा-या एका मनुष्याच्या जीवनात उगवले. आजच्या भौतिकशास्त्राचा पाया रचला गेला तो नेमक्या त्याच घटिताद्वारे. गणितातील नवीन दालने त्यांतूनच उघडली गेली. गुरुत्वाकर्षणाचा शोधसिद्धांत, गतीचे तीन नियम, कॅल्क्युलसचा जन्म, त्याच दालनात त्याच वर्षी घडून आला. त्या असाधारण व्यक्तीचे नाव आता वेगळे उकलून सांगण्याची गरज खरोखरच आहे का… सर आयझॅक न्यूटन ! न्यूटन यांनी लावलेल्या त्या शोधांनी आपल्या सगळ्यांचाच जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलालाच पण, आपल्या रोजच्या जगण्याला त्यांमुळे एक वैज्ञानिक बैठक देखील प्राप्त झाली.
एक असामान्य वैज्ञानिक म्हणून पुढे ज्या न्यूटन यांचे नाव त्रिखंडात गाजले त्या न्यूटन यांना त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट सोडायला लागले होते आणि तेही केवळ त्यांच्या आईच्या हट्टाखातर, हे तर आज कोणालाही सांगून खरे वाटणार नाही. अविश्वसनीय वाटावे असेच हे सगळे नाही का ? नियतीच्या मनात केव्हा काय येईल याचा नेम कोणी सांगावा ? न्यूटन यांनी त्यांच्या जन्मदात्याप्रमाणेच शेतकरी बनून शेतात राबावे, अशी त्यांच्या मातोश्रीची इच्छा होती, याला काय म्हणावे ?
१६४२ सालातील डिसेंबर महिन्यात जन्माला आलेल्या न्यूटन यांचे जन्मदाते वडील त्याच्या तीन महिने अगोदर वारले होते. न्यूटन तीन वर्षांचे झाल्यावर त्यांच्या आईने दुसरा विवाह केला. न्यूटन यांचे त्यांच्या सावत्र वडिलांशी बिलकुल पटले नाही. त्यामुळे ते कायम पुस्तकातच रमत राहिले. मात्र, चारचौघांसारखा दिसत असला तरी हा मुलगा असामान्य बुद्धिमत्तेचे लेणे ल्यालेला आहे ही बाब ज्या शाळेत न्यूटन यांचे नाव दाखल केलेले होते, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी अचूक हेरली. खास न्यूटन यांना वाचण्यासाठी ते निरनिराळी पुस्तके आणून देत. त्यांच्या वाचनाद्वारे न्यूटन यांच्या ठायीची उपजत जिज्ञासा सतत वाढती राहिली. हट्टाला पेटून न्यूटन यांच्या आईने त्यांना शाळेतून काढले तेव्हा याच मुख्याध्यापकांनी आणि न्यूटन यांच्या काकांनी त्यांचे नाव परत शाळेत दाखल केले.
जगविख्यात अशा केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी महाविद्यालयात न्यूटन शिकत असताना १६६५ साली लंडनमध्ये प्लेगची जबरदस्त साथ आली. सगळीकडे हाहाकार माजला. जो तो शहर सोडून बाहेर धाव घेऊ लागला. न्यूटन हे देखील मग आपल्या आजोळी वुल्सथोर्प मनोर, लिंकनशायर [ Woolsthorpe Manor, Lincolnshire ] येथे गेले. तेथे गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की पुस्तकांपेक्षा निसर्गातच आपल्याला अधिक चांगले आणि उपयुक्त ज्ञान मिळते. आपल्या आजोळच्या शेतात, बागेत मग ते रमू लागले. रात्रीच्या चांदण्या आणि आकाश त्यांना गूढतेचा अनुभव प्रदान करत असे. सकाळपासून ते शेतात जात आणि एखाद्या झाडाखाली बसून विचारात मग्न होऊन जात. एकदा असेच ते अंगणातील सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना अचानकपणे एक सफरचंद त्यांच्या पुढ्यात पडले आणि गुरुत्वाकर्षणाची संकल्पना त्यांच्या मनात अंकुरली. आपले मित्र विल्यम स्टुकेले ( William Stukeley ) यांना न्यूटन यांनी ती गोष्ट सांगितली. पुढे स्टुकेले यांनी तीच गोष्ट Memoir of Sir Isaac Newton’s Life या १७५२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात नमूद केली.
खरे तर न्यूटन यांचा स्थायीभाव अलिप्त राहण्याचा होता. त्यांना फारसे मित्र नव्हते. त्यांनी कधी लग्नही केले नाही. बालपणीच, दुसरे लग्न केल्यामुळे, आपल्याला आई दुरावली याचा त्यांच्या मनावर विलक्षण ओरखडा उमटलेला होता. पुढील आयुष्यात सावत्र वडिलांशी होणा-या सततच्या वादांमुळे न्यूटन वृत्तीने अंमळ तुसडे बनले. आप[आपल्या सावत्र वडिलांचे घर जाळून टाकायचे, ताशीव आपल्या मनातली सुप्त इच्छा त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून देखील ठेवलेली होती. या सगळ्यांपायी ते जरासे एकलकोंडे आणि शीघ्रकोपीसुद्धा बनले होते. थोडी देखील टीका त्यांना सहन होत नसे. या अशा सगळ्या गुंत्यामुळे कायम एकटे राहणेच त्यांनी पसंत केले.
अर्थात जे होते ते चांगल्यासाठीच होते असे जे म्हटले जाते, ते खरेच होय. १६६५ साली प्लेगची साथ आली नसती तर कदाचित सगळे चित्रच वेगळे दिसले असते. त्या वर्षी जे शोध न्यूटन यांना लागले, निसर्गाचे जे गूढ त्यांना उमगले ते कदाचित कधीच घडले नसते. त्याच वर्षात न्यूटन यांनी बायनॉमिअल सिद्धांत ( Binomial Theorem ) आणि कॅल्क्युलसचा देखील शोध लावला. त्याचबरोबर धवल प्रकाशाबाबत ( White light ) त्यांनी जो सिद्धांत मांडला त्याचा पायाही त्याच वर्षात रचला गेला. त्या संदर्भांतील ग्रंथ १७०४ मध्ये Optik या नावाने प्रसिद्ध झाला. त्याचे असे झाले की आकाशीय किरणांचा प्रकाश पांढराच आहे, असा भास न्यूटन यांना एके रात्री आकाशनिरीक्षण करत असताना झाला. मात्र, तेच दृश्य त्यांनी ज्या वेळी भिंगामधून पाहिले तेव्हा बाहेर फेकला जाणारा तो प्रकाश दरवेळी पांढराच नसतो, असे त्यांच्या लक्षात आले. त्याच बाबीचे निरीक्षण करण्याचा मग त्यांना जणू छंदच जडला. वेगवेगळ्या भिंगांमधून निरीक्षण करण्याचा त्यांनी एक प्रकारे धडाकाच लावला. नंतर काही दिवसांनी न्यूटन यांनी एक प्रयोग करून पाहिला. घराच्या भिंतीला त्यांनी एक भोक पाडले. ते भोक असे पाडले की त्यातून सूर्यप्रकाश बरोबर आत यावा. आत येणारी सूर्याची किरणे जिथे पडत तिथे त्यांनी एक त्रिकोणाकार लोलक (prism ) ठेवला. पांढरा रंग फेकणारी सूर्यकिरणे लोलकामधून पलीकडे जाताना मात्र आपला रंग बदलतात हे न्यूटन यांच्या ध्यानात आले. ही सगळी त्या लोलकाची करामत असावी अशी न्यूटन यांची धारणा झाली. म्हणून मग आणखी एक लोलक त्यांनी पहिल्या लोलकाच्या विरुद्ध बाजूस परंतु त्याला समांतर अशा पद्धतीने ठेवला. ही सगळी मांडणी झाल्यावर न्यूटन यांनी पुन्हा नोंदी घेण्यास सुरुवात केली.
आज इतका काळ उलटून गेल्यानंतर ही गोष्ट खूपच साधी आणि सोपी वाटत असली तरी त्या काळात मात्र ती कमालीची दखलपात्र ठरली. त्याचे कारणही तसे साधेसरळ होते. अवघा २३ वर्षांचा युवक कोणत्याही प्रकारच्या प्रगत अशा वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीशिवाय एक आगळी बाब जगासमोर मांडू पाहत होता. न्यूटन यांचा तो प्रयोग एका अर्थाने क्रांतिकारक ठरला. अतिसूक्ष्म कणांची एक सलग मालिका म्हणजेच प्रकाश, हे वास्तव न्यूटन यांच्या ध्यानी आले ते या प्रयोगानंतरच. अवकाशीय पोकळीमधून प्रकाश सर्वसाधारणपणे ज्या वेगाने प्रवास करतो त्या पेक्षा अधिक वेगाने तो काचेच्या कोणत्याही माध्यमातून प्रवास करत राहतो.
प्रकाश म्हणजे अतिसूक्ष्म कणांची मालिका हा शोध न्यूटन यांनी लावण्यापूर्वी त्याच शोधाच्या जवळपास जाणारा एक प्रयोग इटलीतील एक शास्त्रज्ञ ग्रिमाल्डी ( Grimaldi ) यांनी केला होता. प्रकाश हा कणांपासूनच बनलेला आहे, असेच त्यांचे मत प्रयोगांती बनलेले होते. परंतु जननिंदा आणि जनपवादाच्या भीतीपायी आपला हा प्रयोग त्यांनी बराच काळ प्रकाशितच केला नाही. त्याला कारणे दोन. एक तर ग्रिमाल्डी हे एका चर्चमध्ये पाद्री म्हणून कार्यरत होते आणि दुसरे म्हणजे गॅलिलिओ यांनी केलेल्या नानाविध प्रयोगांमुळे त्यांना ज्या पद्धतीने लोकनिंदेला सामोरे जावे लागले ते दिव्य आपल्या वाट्याला येऊ नये अशी ग्रिमाल्डी यांची इच्छा होती. प्रकाशाच्या लहरी निर्माण होत असतात, अशा प्रकारचे प्रतिपादन विख्यात फ्रेंच तत्त्ववेत्ते आणि गणिती रेने डेस्कार्ट्स ( Rene Descartes ) यांनी त्याच्या आधी मांडलेले होते.
न्यूटन हे विलक्षण चिकित्सक आणि विचक्षण होते. प्रकशलहरींच्या त्या सिद्धांताबाबत ते म्हणूनच कमालीचे साशंक होते. शिवाय त्या चिकित्सेला अस्तर लगडलेले होते. सूक्ष्म अशा राष्ट्रवादी भावनेचे. प्रकशलहरींबाबतचे संशोधन केले होते एका फ्रेंच शास्त्रज्ञाने आणि त्याला दुजोरा देणारा शास्त्रज्ञ होता इटलीचा ! ख्रिश्चन ह्युजेन्स ( Christian Huygens ) नावाच्या एका वैज्ञानिकानेही १६७९ साली प्रकाश लहरींच्या संदर्भात आपला सिद्धांत मांडला होता परंतु तो पूर्णपणे खोदून काढत आपलाच निष्कर्ष कसा बरोबर आहे हे न्यूटन यांनी आपल्या पुस्तकात अतिशय सखोलपणे विशद केले.
न्यूटन यांच्या भोवतीच्या वलयामुळे म्हणा किंवा विज्ञानजगतावरील त्यांच्या प्रभावामुळे म्हणा, प्रकाश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अतिसूक्ष्म कण आणि अशा कणांची सलग ,मालिका होय, हा न्यूटन यांचा सिद्धांत त्या काळात अनेकांनी उचलून धरला. परंतु, प्रकाशाच्या लहरीच असतातहे वास्तव थॉमस यंग (Thomas Young ) यांनी डबल स्लिट (Double slit ) च्या तंत्राद्वारे १८०१ साली सिद्ध केले. त्यानंतर बरोबर १०१ वर्षांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी क्वांटम थिअरी ( Quantum Theory ) च्या साहाय्याने थॉमस यांग यांचा सिद्धांत हा न्यूटन मांडत असलेल्या प्रकाश किरणांच्या सिद्धांतापेक्षा वेगळा असल्याचे प्रतिपादन सप्रयॊग मांडले. त्यासाठी त्यांनी फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या विश्लेषणाचा आधार घेतला. मात्र, न्यूटन यांचा सिद्धांत चुकीचा आहे, असे आईन्स्टाईन यांनी चुकूनही म्हटलेले नाही, हे विशेष.
एकीकडे वैज्ञानिक दृष्टीने प्रयोग करत असतानाच न्यूटन दुसरीकडे गणितातली आपली आवड आणि जिज्ञासादेखील जोपासत होते. त्याच काळात न्यूटन यांना कॅल्क्युलसचाही उलगडा झाला. त्याचे असे झाले की गुरुत्वाकर्षणाच्या विचारातच न्यूटन सतत असत. अशा अवस्थेत असताना जमिनीवरील छोट्या छोट्या उतारांवर न्यूटन यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्या उतारांचे मापन ते गणित, भूमिती आणि /अथवा बीजगणिताची फारशी मदत न घेता करू लागले. कॅल्क्युलसच्या विकासाची पायाभरणी त्या सगळ्या प्रक्रियेत कोठे तरी घडून आली असावी, असा या क्षेत्रातील जाणकारांचा होरा आहे. मी,तर, न्यूटन यांनी आपले ते संशोधन कुठल्याच नियतकालिकात प्रसिद्ध केले नाही. त्या नंतर तब्बल आठ वर्षांनीं जर्मन गणिती Gottfried Leibniz ( इ. स. १६४६ – १७१६) यांनी कॅल्क्युलसचा तोच सिद्धांत प्रकशित केला तेव्हा न्यूटन याना ती बाब फार जिव्हारी लागली. दोघामध्ये वादही झाला. पुढे अनेक वर्षे त्या वादाच्या ठिणग्या पडताच राहिल्या. अखेर कॅल्क्युलसच्या शोधाचे श्रेय इतिहासकारांनी या उभयतांच्या ओंजळीत घातले.
असे हे १६६५ वर्ष ! युगायुगातून अवचितच केव्हा तरी उगवणारे. इतिहासावर आपली मुद्रा कोरणारे. न्यूटनसारख्या एका अवलियाची ओळख उभ्या जगाला करून देणारे … !
नमस्कार सुप्रभात, आजच्या अंकातील सरपोतदार यांचा वेगळा माहितीपूर्ण लेख दैनंदिन जीवनातील अनुभवाच्या खूप जवळचा आहे. काही ठिकाणी तर दुकानांत येणारे लोक हे मालकाच्या दृष्टीने दुर्लक्ष करणेची बाब असते. .जणू काही वाणसामान देऊन तो समाजावर उपकार करत असतो. म्हणून मग आज काल सुपर मार्केटची व्यवस्था चांगली वाटत आहे. यांवर हे दुकानदार, “आमचेकडून तुम्ही हल्ली सामान घेत नाही असेही विचारतात.” लक्षणीय – त्रिवेणी संगमाच्या तीरावर आवडले. शास्त्रीय माहिती पण वेगळ्या दृष्टीकोनांतून – इतिहासावर आपली मुद्रा कोरणारे वर्ष वाचताना हेही पटले की एखादी संधी/एखादे वर्ष जीवनांत भरपूर आनंद देते.
Thanks Megha !
नेहमी प्रमाणेच हर्षदजींचे ऐसपैस गुदगुल्या करत,हसवत राहिले .त्यांच्या यूपी च्या पाहुण्यावरून सहज आठवले. हरियाणात असताना मी ऐकले होते . दोन मित्र गप्पा करीत होते . एक म्हणाला …अरे यार, मैं अभी बंबई जाके आया . व हाँ ट्रेन में , वो भी लोकल में लोग टिकट खरीदते है और मेरा पैर लग गया एक बंदे को ..तो वो मुझे सॉरी बोला, …सुना.. वो मुझे सॉरी बोला..सॉरी..आणि दोघे खो खो हसू लागलेत
साठये जींचे परिक्षण वाचून आनंद झाला . आता हा देखील दिवाळी अंक आणावासा वाटत आहे
न्यूटन चे वाचले .खूप नवी माहिती मिळाली आणि सहज असे ही वाटून गेलं 25 डिसेंबर थोर लोक जन्म घेतात की काय ..हाहा
बापरे ! म्हणजे हरियाणाही यूपीसारखाच आहे ? यूपी पाहिल्यावर बिहार काय असेल अशी शंका माझ्या मनात आली होती व भारतीय असल्याबद्दल प्रथमच मी ओशाळलो होतो. असो. २५ डिसेंबर तुमचा जन्मदिवस असावा असा एक तर्क.
हर्षदजींचे ऐसपैस नेहमीप्रमाणेच खुसखुशीत, खुमासदार ! त्यातला हलकाफुलका नर्म विनोद खूष करून जातो.
न्यूटनच्या ‘सफरचंद’ अपघाताने लागलेल्या गुरुत्वाकर्षण सिध्दांताच्या शोधापलिकडे केलेल्या इतर संशोधनांची, त्याच्या बालपणाची माहिती सहसा नसते ती अज्ञात लेखकाच्या लेखातून मिळाली.
धन्यवाद मुकुंदजी !
हर्षदजी ,सपना बेकरी चे मिशाळ मालक .. अगदी हुबेहूब वर्णन केले आहे .
होय, तुम्ही ओळखत असालच ! 🙂
हर्षदजी सरपोतदार यांच्या विनोदशैलीवर कितीदा लिहावे आणि किती वाखाणणी करावी पण आज हे वाचून पुण्यात जाऊन त्या सपना बेकरीच्या मालक मंडळींना बघायची इच्छा झाली.
आपण दिवाळी अंक समाप्त केला तरी या लेखामुळे ते वातावरण तसेच जिवंत ठेवलेले आहे असे वाटले. केशव साठये यांच्यानंतर किती वाचक यंदा वाचलेल्या दिवाळी अंकांवर लिहितील याची उत्सुकता आहे.
न्यूटनच्या एकूण कामगिरीचा या लेखात घेतलेला आढावा आम्हा पामरांना समजेल असा आहे. आभार.
धन्यवाद चिदानंदजी. तुम्ही डहाणुकर कॉलनीत या. घेऊन जातो.
एव्हाना मैत्रीतील ऐसपैस हे खुसखुशीत सदर खूप वाचकप्रिय झालंय. पुण्यातील दुकानदारांपेक्षा पणजी-म्हापसा येथील दुकानदार काही वेगळे नाहीत. म्हणूनच मॉल संस्कृति बोकाळलीय. मोहनभैया व फब्या गमतीदार आहेत.
मजा आली.
विनय हर्डीकरांच्या, अंतर्नादच्या दिवाळी अंकातील लेखाची थोडक्यात साठ्येजींनी छान समीक्षा लिहिलीय. संपूर्ण अंकच वाचायला हवा.
अर्थबोधपत्रिकेतील न्यूटनबद्दलचा माहितीपूर्ण लेख, विशेषतः त्यातील इतर संशोधकांच्याही माहितीमुळे आवडला. धन्यवाद नाबरजी
धन्यवाद प्रियंवदाजी !
न्यूटन हा महान शास्त्रद्न्य होता हे खरं, पण बायबलच्या जेनेसिस १ मध्ये जगाची उत्पत्ती चार हजार चार वर्षांपूर्वी झाली असा जो अडाणीपणाचा सिद्धांत मांडलेला आहे, त्यावर त्याची (व केपलर याचीही) नितांत श्रद्धा होती. धर्मग्रंथ बुद्धिवंतांनाही कसे पांगळे बनवू शकतात याचं हे एक उदाहरण ! हा सिद्धांत खोटा ठरू नये म्हणून वेदांचा व भारतीय इतिहासाचा काळ पुढे ओढण्यात आला याचे लेखी पुरावे उपलब्ध आहेत.
हर्षद सरपोतदार अगदी सहजपणे सध्या शब्दात नेहमीच्या आयुष्यातले प्रसंग इतक्या खुमासदार शैलीत मांडतात की त्यांना दाद अपरिहार्य असते.
धन्यवाद आनंदजी !
हर्षदरावांचा लेख नेहमीप्रमाणेच हसवून गेला. जुन्या काळातल्या मोठ्या घरांमधले नात्यांचे गोंधळ त्यांनी हसत व हसवत दाखवले आहेत..
धन्यवाद सतीशजी !